Wednesday, February 23, 2011

या पावसाला जबाबदार कोण?


तुफान पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले. जागोजागी पाणी साचले, तुंबले. भिंती पडल्या, लोकल अडल्या, शाळाकॉलेजेसऑफिसेसना बुट्टी बसली, तेव्हा कुठे मुंबईकरांना समजले, 'पावसाळा आला!'
'अहोरात्र नॉनसेन्स' वाहिनीने 'त्या' 26 जुलैची क्लिपिंग्ज दाखवून सगळीकडे घबराट पसरवली आणि 'या पावसाला जबाबदार कोण' असा (अर्थातच नॉन्सेन्स) प्रश्न घेऊन त्यावर सटासट नेत्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. या मुलाखतींमधली ही वेचक मुक्ताफळं. ती कोणाची आहेत हे बा वाचका, तूच ओळखायचे आहेस...

1. पाऊस पडला, तेव्हा मी परदेशात होतो. त्यामुळे मला नेमके काय झाले त्यासंबंधीची माहिती घ्यावी लागेल आणि मगच त्यासंबंधी एक निश्चित अशी भूमिका मांडता येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आज संध्याकाळी माझी भेट होणार आहे. त्यावेळी या प्रश्नावर चर्चा होईल. याला जबाबदार असलेले चुकार ढग आमच्या पक्षाचे असतील, असं मला वाटत नाही. तसं असलंच तर प्रदेशाध्यक्षांकडून अहवाल मागवून कारवाई करू.

2. पावसाचे ढग मुंबई पोलिसांची करडी नजर चुकवून आत शिरले असतील. पण, ते अपराध करून तसेच निसटू शकणार नाहीत. त्यांच्या मुसक्या आवळायला आमचे पोलिस सक्षम आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र बंद पडणारया, गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दोषी ढगांची गय केली जाणार नाही. त्यांना भरआकाशात चाबकाने फोडून काढू.
3. हे ढग आले कुठून? ते नैऋत्य मोसमी वारे, मॉन्सून वगैरे शास्त्र आम्ही जाणत नाही. अहो, या देशाच्या आणि राज्याच्या राशीला गेली ५० वर्षं जळवेसारख्या चिकटलेल्या काँग्रेजी सरकारांनी इथल्या शेतकऱ्याला, आयाबहिणींना इतकं नाडलंय, इतकं पिडलंय की आमचा शेतकरी, आमच्या आयाबहिणी आज ढसढसा रडतायत. त्यांचे अश्रूच त्यांच्या संतापाच्या धगीवर वाफ होऊन आकाशात गेले आहेत आणि त्याचेच ढग झाले आहेत. हा आपल्याच माताभगिनींचा तळतळाट आज शाप बनून आपल्यावर कोसळतोय. आता तरी शहाणे व्हा.

4. आता तोंडं का बंद आहेत यांची दातखीळ बसल्यासारखी? मी बोललो की पोरकटपणा म्हणून हिणवता ना? आता बोला की! तुम्ही फार मोठे आहात ना! उचकटा ना जीभ! मला सांगा, हे ढग तरी कुठून आले. बाहेरूनच ना! बाहेरच्यांनी येऊन इथे वाट्टेल तसा राडा घालायचा, ही परंपरा यांनीच निर्माण केलीये. बाहेरच्यांचे हे लाड मी चालू देणार नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment