Friday, December 2, 2016

...देश पोरका झाला



असं खरंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या जाण्याने त्या त्या वेळी अनेकांना वाटलं होतं… पण, त्या त्या वेळी संपूर्ण देशात तशी भावना दाटली असेल, असं वाटत नाही. कारण, या थोर नेत्यांचे अनुयायी प्रचंड संख्येने असले, तरी त्या त्या वेळचे विरोधकही काही कमी नव्हते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश पोरका झाल्याची भावना निर्माण झाली असण्याची शक्यता कमी आहे.
अर्णब गोस्वामीचं तसं नाही. 

तो 'टाइम्स नाऊ'च्या अध्यक्षपदावरून आणि मुख्य संपादकपदावरून पायउतार झाल्यावर देश पोरका झाल्याची भावना सगळ्या देशात एकसमयावच्छेदेकरून दाटली असणार यात शंकाच नाही. तो नसेल तर आता हातातली पेन्सिल हिंस्त्रपणे नाचवत 'नेशन वाँट्स टु नो' असं आपल्यावतीने कोण किंचाळणार, असा या देशातल्या काहींना पडलेला प्रश्न असेल. (अर्णब हजारो किलोमीटर दूरवरच्या स्टुडिओत असला तरी त्याची ती पेन्सिल आपल्या डोळ्यांत घुसेल, अशा भीतीनेच अनेक पॅनेलसदस्य तो मागेल ती कबुली देत असावेत. आता पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणाही गुन्हेगारांपुढे पेन्सिल नाचवण्याचं तंत्र शिकून घेणार आहेत म्हणे त्याच्याकडून. मग, लाय डिटेक्टर, थर्ड डिग्री वगैरे सगळं इतिहासजमा झालंच म्हणून समजा.) अर्णब प्राइमटाइमवरून लुप्त झाला तर आपण कमालीच्या शिसारीची ट्वीट्स आणि पोस्ट्स कोणाबद्दल टाकायच्या, अशी काहींची पंचाईत असेल. अरे देवा, आता काय रवीश, राजदीप, दिबांग आणि बरखा बघायचे की काय, या भीतीने काहींची झोप उडाली असेल. ज्यांना अर्णबविना बातम्याच बघता येत नाहीत त्यांना दैनंदिन मालिकांमधून इतकं वीरश्रीयुक्त मनोरंजन कुठून आणि कसं मिळणार, असा प्रश्न पडला असेल. 


अर्णबच्या बाबतीत इंग्रजी बातम्या ऐकणाऱ्या आणि त्या बातम्यांविषयीच्या चर्चा आपापल्या भाषेत करणाऱ्या-ऐकणाऱ्या-वाचणाऱ्यांना काही ना काही भूमिका असतेच. यू कॅन हेट हिम, यू कॅन (मे गॉड गिव्ह यू द करेज) लव्ह हिम, बट यू कॅनॉट इग्नोअर हिम. त्यामुळेच आता अर्णब काय करणार, असा सगळ्या देशाला पडलेला प्रश्न आहे.
एकीकडे तो नवा न्यूज चॅनेल काढणार असल्याची चर्चा आहे, त्याचवेळी अर्णबने टाइम्समधूनच पायउतार होऊ नये यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खास मर्जीतले उद्योगपती गौतम अडाणी हे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. अर्णबला भारतातली दुसऱ्या श्रेणीची वाय दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे, असंही म्हणतात. यावरून एकंदर वारं कोणत्या दिशेने वाहतंय, याचा अंदाज यायला हरकत नाही. अर्णब मात्र आपल्या न्यूजरूमच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अंतिम संदेशात 'यापुढचा काळ स्वतंत्र माध्यमांचा असेल' असं काहीतरी सांगत होता म्हणे. 

अर्णबने स्वतंत्र माध्यमांची चर्चा करावी, याइतका मोठा विनोद दुसरा नाही. आपणच चर्चेसाठी बोलावलेल्या मान्यवर तज्ज्ञांना त्यांच्या अभ्यासाच्या विषयांवर जो दोन वाक्यं धड बोलू देत नाही, कोणाच्याही अंगावर अनभ्यस्त आक्रमकतेने धावून जाणं हे ज्याचं वैशिष्ट्य होतं, समोरच्याची सालटीच काढायची, असं ठरवून दोन्ही बाजूंनी आपणच बोल बोल बोलत राहायचं आणि आपण काढलेला निष्कर्ष कसा योग्य आहे, हे ठासून सांगायचं, हे ज्याचं संपादकीय धोरण आहे, तो 'स्वतंत्र' माध्यमांचं महत्त्व सांगतोय?
उद्या अमित शहा निष्कलंक चारित्र्याची महती सांगतील, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.
नुकताच घडलेला एक प्रसंग पाहा.

मिता वशिष्ठ ही गुणी आणि विचारी अभिनेत्री अर्णबच्या सदैव पेटलेल्या आगीचं बालिश चलच्चित्र आणि आक्रमक पार्श्वसंगीत यांनी सजलेल्या तथाकथित चर्चात्मक कार्यक्रमात सहभागी झाली होती. विषय होता पाकिस्तानी कलावंतांचा भारतीय चित्रपटसृष्टीतला सहभाग. अर्णबच्या पाचकळ बडबडीच्या अखंड प्रपातात मिता सांगत होती, पाकिस्तानी कलाकारांना आम्ही बोलावतो का? निर्माते बोलावतात, सरकार त्यात अडथळा आणत नाही. त्यात आम्ही काय करणार? भारत आणि पाकिस्तान हे कधीच मित्र देश नव्हते. मग आताच्या त्यांच्यातल्या शत्रुत्वाचा एवढा बोलबाला कसा काय होतोय? इतके ढोल का वाजतायत? फवाद खान हा अभिनेता हिंदी सिनेमात नाव कमावण्यासाठी इथे आला होता. तो त्याच्या देशात त्याच्या देशाविरुद्ध कसं काही बोलू शकेल? आपल्या लोकशाही देशात तरी आपण असं काही खपवून घेतो का? या देशात सफदर हाश्मी सत्ताधाऱ्यांकडूनच मारला गेला, विनायक सेनसारखा माणूस तुरुंगात सडला. हे इथे होत असेल, तर पाकिस्तानात फवादची काय अवस्था होईल?
आपण एवढा आरडाओरडा करत असूनही मिता हे सगळं बोलते आहे आणि ते प्रेक्षकांना ऐकूही जात असावं, म्हणून की काय, पण, अर्णब पिसाळला (रोजच्याप्रमाणेच) आणि अद्वातद्वा बोलू लागला. मिताने इयरफोन आणि लॅपेल माइक काढला आणि ती त्याला 'शट अप' म्हणून भर कार्यक्रमातून निघून गेली. अर्णबच्या कार्यक्रमात त्याने 'शट अप' केलेल्या अनेकांनी मिताचं अभिनंदन करणारे संदेश पाठवले. अर्ध्या तासाने अर्णबने मेसेज पाठवला, तू कारगिलच्या शहीदांचा अपमान केला आहे.

या सोंड्याच्या शोमध्ये त्याच्या आचरटपणाला आक्षेप घेऊन शट अप म्हटलं की डायरेक्ट शहीदांचाच अपमान होतो? इथे तर 'भक्त'ही लाजले असतील, अशा घाऊक अपमाननिश्चितीचा ठेका त्यांच्याकडे आहे ना!
बरं हे अर्णब कुणाला ऐकवत होता, तर भारताच्या वतीने दोन युद्ध लढलेल्या एका शूर लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीला. तिला त्या तथाकथित पॅनेल चर्चेत कोण सहभागी झालंय हे माहितीही नव्हतं. एकट्या अर्णबची मचमच आणि इयरफोनमधली खरखर (या दोहोंतला फरक तिने ओळखला, याबद्दल तिला किमान पद्मश्री मिळायला हरकत नाही) यापलीकडे तिला काही ऐकायलाही येत नव्हतं. त्या कार्यक्रमात जवानांचे नातेवाईक सहभागी होते, हे तिला कळायचा काही मार्गच नव्हता. अर्थात ते माहिती असतं तरीही ती बाहेर पडण्याने इतर सहभागींचा अपमान होण्याचा काही संबंधच नव्हता. 
हे एक जेनेरिक उदाहरण आहे. 
अर्णबचा कार्यक्रम रोज पाहण्याचं धारिष्ट्य ज्यांनी केलं असेल, त्यांना अशी असंख्य उदाहरणं आठवतील. लोकांना आपल्या कार्यक्रमात बोलावून अपमानित करणं हा त्याचा छंदच आहे. 
तरीही अर्णब हा आपल्या देशातल्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या जगातल्या सर्वात यशस्वी न्यूज अँकर्सपैकी एक, कदाचित सर्वात यशस्वी अँकर होता आणि आहे, त्याचं काय करायचं?
आता चेतन भगत हा आपल्या सर्वात यशस्वी देसी इंग्रजी कादंबरीकारांपैकी एक आहे, त्याचं आपण काय करतो, तेच.
दुर्लक्ष.

अर्णबची सक्सेस स्टोरी ही पौगंडावस्थेतल्या माध्यमांची निव्वळ व्यावसायिक यशाची सक्सेस स्टोरी आहे. भारतीय वृत्तवाहिन्यांच्या गौरवगाथेत समावेश होण्याजोगं त्यात काहीही नाही. पत्रकारितेत अर्णबने काही भरीव कामगिरी केल्याचं ऐकिवात नाही. अनेक विषय त्याने त्याच्या पद्धतीने लावून धरले होते. पण, तसं प्रत्येक वाहिनी आपल्या एक्स्क्लुझिव बातम्यांच्या बाबतीत करतं. अर्णबच्या चॅनेलने हाती घेतलेल्या एका मोहिमेचं उदाहरण पाहा. या देशात कोणीही व्हीआयपी, व्हीव्हीआयपी असता कामा नये, कोणत्याही व्हीव्हीआयपीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यात अडथळा येता कामा नये, असा एक विषय टाइम्स नाऊने लावून धरला होता. नेत्यांसाठी विमानं, ट्रेन कशा रोखल्या जातात, रस्ते कसे अडवले जातात, त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या सुरक्षा यंत्रणेवर किती पैसे अनाठायी खर्च होतात, वगैरे अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यात होता, स्टिंग ऑपरेशन्स होती. देशातल्या जनतेची भावना थेट व्यक्त करणारी ती मोहीम होती. ती अचानक गुंडाळली गेली. त्याबद्दल अर्णबने चकार शब्द काढला नाही. आता तोच अर्णब तशाच व्हीव्हीआयपींमध्ये समाविष्ट होणार आहे आणि १५००० सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागणारी यंत्रणा त्याच्या एकट्याच्या दिमतीला दिली जाणार आहे.
तो राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे ना!

अर्णबचा उथळ आक्रमकपणा (ही प्रतिमानिर्मिती असू शकते) हा त्याचा सेलिंग पॉइंट आहे. १९९१मध्ये देशात आलेल्या उदारीकरणाच्या लाटेत हात धुवून घेऊन तुस्त झालेल्या ढोंगी, मतलबी आणि दुटप्पी मध्यमवर्गाचा आतला आवाज ही त्याची खरी ओळख आहे. त्यांच्यावतीने आणि त्यांच्याच पद्धतीने आक्रस्ताळ्या शैलीत राष्ट्रवादाच्या, देशभक्तीच्या लोकप्रिय कल्पना किंचाळत राहणं, हे त्याच्या यशाचं गमक आहे. ते व्हॉट्सअॅप, फेसबुकवर 'किंचाळत' फिरतात, हा टीव्हीवर किंचाळत असतो. लोकांना असं किंचाळणं फार आवडतं. आपल्याला एकंदर ध्वनिप्रदूषणाची आवड आहेच. त्यांना वाटतं, बघा हा कसा सेक्युलर पुरोगामी, उदारमतवादी, विचारवंतांची (या सगळ्या शब्दांची या नवमध्यमवर्गाला असलेली अॅलर्जी भयंकर बोलकी आहे) सालटी काढतोय! समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, आपणच प्रश्न विचारायचे, उत्तरं द्यायची आणि समोरचा साफ हरला आहे, असंही जाहीर करून मोकळं व्हायचं, हा त्याचा खाक्या. तोच याही मंडळींचा असतो. 
याला धारेवर धरणं म्हणत नाहीत. चर्चा म्हणत नाहीत. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रवक्ते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांना ऑक्स्फर्डमध्ये 'हेड टु हेड' या कार्यक्रमात मेहदी हसन या सूत्रसंचालकाने ज्याप्रकारे टप्प्याटप्प्याने एक्स्पोझ केलं होतं (https://www.youtube.com/watch?v=m1W-oXZ_31U) ते पाहिल्यानंतर अर्णबचा सगळा आरडाओरडा किती शाळकरी असतो, ते लक्षात यायला हरकत नाही. रोजच्या रोज मुठी आवळून, पेन्सिलीने कोथळे काढत कशावर तरी भयंकर आरडाओरडा करून देशाच्या वतीने कोणालाही, कसलेही प्रश्न विचारायचे असतील, तर शाळकरीपणा तिथूनच सुरू होतो. कसल्याही सखोल अभ्यासाची शक्यताच उरत नाही. शिवाय, कितीही अभ्यासू असला तरी कोणताही संपादक काही ब्रम्हदेव नसतो आणि त्याच्याकडे कितीही मोठी रिसर्च टीम असली तरी रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांचे सगळेच्या सगळे पैलू त्या टीमलाही आकळत नसतात. म्हणूनच तर तज्ज्ञांना बोलावून लोकांना त्या त्या विषयाच्या अनेक बाजू समजावून देण्यासाठी पॅनेल डिस्कशन केली जातात. चर्चेच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासणारा आक्रमक आवेग हीच अर्णबची ओळख राहिली आहे. समोरच्याला बोलू दिलं आणि तो आपल्या आकलनाच्या टेम्प्लेटबाहेरचं काही बोलला तर उत्तर काय द्यायचं, अशी पंचाईत. अशी लाइव्ह पंचाईत झाली आणि आपण खोटे ठरलो, तर जो सगळ्यात मोठ्या आवाजात ओरडतोय तो ब्रम्हदेव असं मानणाऱ्या चाहत्यांसमोर आपली काय इज्जत राहील, अशी त्याला भीती वाटत असावी. त्यामुळे मुदलात समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, हेच धोरण. विषय संपला.

अर्णब खरोखरच निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाविना निर्भयपणे कोणालाही, भले अर्धवटपणाने का होईना, भिडणारा असता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेताना त्याचा मवाळ, मचूळ आणि तोडबाज रजत शर्मा झाला नसता. त्याने त्यांनाही निर्भयपणे ग्रिल केलं असतं. तिथे त्याची कल्हई उडाली आणि पितळ उघडं पडलं.
अर्णबची ही अहंमन्य आढ्यता आणि आक्रमक उद्धटपणा हा अपघात नाही; ते टाइम्स समूहाच्या स्वविषयक समजुतीचं आधुनिक रूप आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, तो इतर तीन स्तंभांवर अंकुश ठेवतो, असं मानलं जातं. त्यामुळे वर्तमानपत्र हे साबणवडीसारखंच उत्पादन मानणारा टाइम्स समूहही सोयीनुसार स्वत:ला पत्रकारितेचा दीपस्तंभ मानतो. जाहिरातींच्या मध्ये मोकळ्या जागा राहू नयेत, त्या भराव्यात, यासाठी संपादकीय विभाग असतो, असं आपल्याकडच्या नव्या रिक्रूटांना शिकवणाऱ्या या समूहाचा व्यावसायिक आवाका खूप मोठा आहे. पण, पत्रकारितेत द हिंदू, स्टेट्समन आणि इंडियन एक्स्प्रेस या समूहांना जो मान आहे, तो या समूहाला नाही. त्यांचा व्यावसायिक आवाकाही छोटा होता त्या काळात टाइम्सचे राष्ट्रीय संपादक दिलीप पाडगावकर यांनी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आपण विराजमान आहोत, असं सांगून खळबळ उडवून दिली होती. पहिल्या क्रमांकाचं पद होतं पंतप्रधानाचं. दुसऱ्या क्रमांकाचं पद म्हणे टाइम्सच्या संपादकाचं. त्यांच्या काळात अशी गैरसमजूत का होईना, करून घेण्याइतकं नैतिक अधिष्ठान या समूहापाशी होतं. नंतरच्या काळात ते अधिष्ठान संपत गेलं आणि पोकळ तोरा कायम राहिला.
अर्णब गोस्वामी हा त्या तोऱ्याचं मूर्तरूप होता.

आता त्याने ही इमेज टाइम्स नाऊपुरतीच धारण केली होती की हा मुखवटा त्याच्या चेहऱ्याला घट्ट बसला आहे की त्याचा हाच मूळ चेहरा आहे, हे त्याच्या पुढच्या वाटचालीतून समजून येईल.
या इमेजपलीकडे अर्णब शिल्लक असेल, तर त्याच्या नवीन इनिंग्जकडून काही अपेक्षा बाळगता येतील.
तोपर्यंत, त्याच्या राजीनाम्यानंतर व्हायरल झालेल्या एका ट्वीटच्या आधाराने बोलायचं तर, काही काळ देशात निर्माण झालेल्या शांततेचा आनंद लुटावा. त्याच्या चाहत्यांनी दोन मिनिटांचा कल्लोळ पाळायला हरकत नाही.

पूर्वप्रसिद्धी : अक्षरनामा न्यूज पोर्टल
छायाचित्रे इंटरनेटवरून साभार.



Thursday, December 1, 2016

टिल्लू गँग व्हर्सेस खडूस अंकल (बालकथा)


टुंक टुंक...
हाइकचा मेसेज वाजला आणि नीलने पुस्तकातून डोकं बाजूला न करता नुसती नजर फिरवली... 
`प्रॉब्लेम, लवकर ये...' मोबाइलवर ओजसचा मेसेज आवाज न करता किंचाळत होता. 
``बाबा, अर्धा तास झाला आता. पाय मोकळे करून येतो थोडे. ममाने सांगितलंय, दर अर्ध्या तासाने आय शुड टेक अ स्ट्रोल...'' त्याने अभ्यासाचं पुस्तक बाजूला करत अगदी सहज आवाजात बोलून फ्लिपफ्लॉप्समध्ये पाय सरकवले.
``निळय़ा, परत काहीतरी लफडा झाला का खाली?''
``निळय़ा म्हणू नको ना यार बाबा,'' नीलने नेहमीची तक्रार केली. बाबाने ती नेहमीप्रमाणे हातानेच झटकून, उडवून लावली आणि डोळे मिचकावत म्हणाला, ``तुझ्या हाइकची टुंक टुंक मी पण ऐकली बरं का! खडूस अंकल नडला वाटतं परत तुम्हाला?''
बाबाचं विकट हास्य ऐकायला नील जागेवर होता कुठे? लिफ्टची वाट न बघता तो दणादण पायर्या उतरत निघाला होता. काहीतरी मोठा ड्रामा झाला असणार, हे त्याच्या लक्षात आलेलं होतं. नाहीतर टेन्थच्या फायनल अभ्यासात त्याला डिस्टर्ब करण्याची हिंमत कॉलनीतल्या एकाही मुलाने केली नसती. 
``व्हॉट्सप डूड्स?'' असं विचारायला त्याने वासलेला `आ' तसाच राहिला. कारण काय घडलं होतं, ते समोर दिसतच होतं. लॉबीमध्ये सगळय़ा चपला विखुरलेल्या होत्या आणि टिल्लू गँगची सगळी मुलं विस्कटलेल्या स्थितीत संतापाने धुमसत उभी होती. टिल्लू गँग म्हणजे कॉलनीतली सगळी छोटी मुलं- सेकंड-थर्ड-फोर्थ-फिफ्थमधली. कॉलनीत नीलच्या वयाचे बहुते सगळे दादा आणि दीदीज हे आपापल्या पालकांचे सिंगल चाइल्ड होते. कोणालाही भावंड नव्हतं. हीच मुलं त्यांना धाकटय़ा भावंडांसारखी होती. सगळे खेळायचे वेगवेगळे. पण, सगळय़ांमध्ये सॉलिड एकी होती. दादा कंपनीचं टिल्लू गँगवर लक्ष असायचं. कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर नील, ओजस, मनस्वी, अन्वी, विभास हे सगळे सॉल्व्ह करायचे. खडूस अंकलमुळे हल्ली त्यांचं हे काम वाढत चाललं होतं...
नीलला पाहताच ओजस पुढे आला. 
नीलने विचारलं, ``किस ने किया ये? खडूस अंकल?''
``और कौन करेगा बॉस?'' टिल्लू गँगचा कॅप्टन सोहम बोलला.
टीव्हीवर कबड्डी प्रो लीग सुरू झाली आणि क्रिकेट-फुटबॉलच्या पलीकडे काहीही न खेळणार्या या मुलांना कबड्डीचा चस्का लागला होता. पण, कबड्डी खेळणार कुठे? कॉलनीच्या मध्यभागी एक गार्डन होतं. त्याच्या कडेला बिल्डरने कधीकाळी बसवलेली आणि वर्षातच गंजलेली, तुटलेली खेळणी होती. मधल्या हिरवळीवर आधी मुलं खेळायची. पण, खडूस अंकलने ते बंद पाडलं होतं. हे गार्डन आहे, मैदान नाही, इथे कॉलनीतल्या म्हातार्या माणसांना फिरायला मिळालं पाहिजे, हिरवळीवर व्यायाम वगैरे करता आले पाहिजेत, असा रूलच त्यांनी काढला होता. मुलांना खेळायला आता पॅसेजेस आणि पार्किंग स्पेसेसच्या पलीकडे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. त्यामुळे टिल्लू गँगने बिल्डिंगांच्या एन्ट्रन्स लॉबीमध्येच कबड्डी खेळण्याची आयडिया काढली होती. तेव्हाच पुढे काय राडा होणार आहे, याचा अंदाज नीलला आला होता. त्याने तो बोलूनही दाखवला होता. पण, या पब्लिकने तेव्हा ते सिरियसली घेतलं नाही. अब भुगतो! चपला रांगेने मांडून त्याच्या दोन बाजूंना दोन टीम करून मुलं झपाटून कबड्डी खेळत होते. खेळताना त्यांना भान राहिलं नाही. वॉचमन अंकल गप्प बसायला सांगत असताना त्यांच्या दंग्याचा आवाज वाढला. पाच मिन्टात खडूस अंकल तिथे हजर झाले आणि त्यांनी सगळय़ा चपला उडवून विस्कटून हा खेळ बंद पाडला होता आणि मुलांना तंबी देऊन ते वर गेले होते. 
``क्या यार तेरा बाप! कितना खडूस है, हमेशा हम को नडता है? समझा ना उसको?'' आत्ताच बाहेरून आलेल्या ऍशला सगळय़ा गँगनी घेरलं. तो बिचारा टय़ूशनवरून आलेला. त्याला इथे काय बवाल झालाय याची कल्पनाही नव्हती. लोकांच्या वडिलांना मुलांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात. इथे उलटा प्रकार होता. ऍश ऊर्फ अश्विन दुनिया का ऐसा इकलौता बच्चा होगा, ज्याला रोज त्याच्या वयाच्या मुलांकडून त्याच्या वडिलांच्या तक्रारी ऐकायला लागायच्या. तो काहीतरी उत्तरणार, तेवढय़ात कठोर आवाजात वरून हाक आली, ``अश्विन, वर ये. किती वेळा सांगितलं तुला, फालतू पोरांमध्ये टाइमपास करू नकोस. वाया जायचंय का तुला पण त्यांच्यासारखं.'' खडूस अंकलने वरून पोरांच्या जखमांवर किलोभर मीठच ओतलं. ऍश धूम पळाला.
खडूस अंकलचा दराराच तसा होता. खडूस अंकलचं खरं नाव होतं खडस अंकल, पण, सगळी पोरं त्यांना खडूस अंकल म्हणूनच ओळखायची- अश्विन सोडून- त्याला त्यांना पप्पा म्हणावं लागायचं ना! ते सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी सोसायटीत एकदम कडक डिसिप्लिन आणल्यामुळे सोसायटी स्वच्छ झाली होती, लिफ्ट, जनरेटर, फायर फायटिंग सिस्टम, गार्बेज, वॉचमन, सिक्युरिटी सगळय़ा सिस्टम मार्गी लागल्या होत्या. त्यामुळे सगळी मोठी माणसं त्यांच्यावर खूष होती. पण, बच्चे कंपनी नाराज होती. सगळय़ा सोसायटीत वाट्टेल तिथे, वाट्टेल तितका वेळ, वाट्टेल तसा धुमाकूळ घालणार्या पोरांना ते हटकून हुसकावायला लागले होते. `अंकल, हम फिर कहाँ खेलेंगे?' या प्रश्नावर त्यांनी `मुझे पता नही. ये ग्राऊंड नही है, यहाँ खेलने का नहीं बस' असं उत्तर दिलं होतं. काही मुलांचे आईवडीलही त्यांच्याकडे गेले होते भांडायला. पण, खडूस अंकलच्या कायदेशीर पॉइंट्सपुढे त्यांचीही डाळ शिजली नाही. वर त्यांनी सांगितलं, पटत नसेल, तर मी राजीनामा देतो सेक्रेटरीपदाचा.

``यार, ये खडूस अंकल का कुछ करना पडेगा,'' नीलच्या पॉकेटमनीतून जिगल जिगल कँडी खात विभास म्हणाला. बच्चा कंपनीला शांत करण्यासाठी नील त्यांना कॉलनीतल्या आइस्क्रीम पार्लरला घेऊन गेला होता आणि त्याला टू हंड्रेडची चाट पडली होती. वीकली पॉकेटमनी एकरकमी खर्च झाल्यामुळे आता संपूर्ण आठवडाभर कडकी सहन करायला लागणार होती. त्यामुळेच की काय कावून तो सगळय़ा पोरांवर धावून जात म्हणाला, ``खडूस अंकलचं काय करायचंय? ते तर असेही खडूसच आहेत. तुम्ही त्यांना चान्स देता कशाला? हूज आयडिया वॉज इट टू प्ले कबड्डी इन द लॉबी? (अन्वीने उत्साहाने हात वर केला आणि नंतर जीभ चावली.) कितना बेकार आयडिया था. खडूस अंकलनी अडवलं नसतं ना तर थर्ड फ्लोअरवरच्या अँग्री आंटींनी तुमचा बँड वाजवलाच असता. (या तक्रारखोर आंटींचं आडनाव आंग्रे होतं, ते मुलांनी अँग्री आंटी केलं होतं) लोक ये-जा करत असतात लॉबीमधून. ग्राऊंड फ्लोअरला लोक राहतात. तुम्ही कबड्डी खेळणार, रस्ता अडवणार, वर ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ खिदळणार. कोणी ना कोणी कम्प्लेंट केलीच असती ना?''
``अरे यार तो हम खेलेंगे कहाँ?'' टिल्लू गँगची जस्सी ओरडली, ``सोसायटीत ग्राऊंड नाही. इधर खेलने का नही, उधर खेलने का नही. बच्चों का कोई राइट है के नहीं?''
``दॅट इज नॉट हिज प्रॉब्लेम यार, दॅट इज युअर प्रॉब्लेम,'' नील समजावून सांगायला लागला, ``सी, खडूस अंकल सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. त्यांना सगळी मोठी माणसं आपल्या कम्प्लेन्ट सांगतात. कारण आपण तसं वागतो. आपल्याकडून तशा चुका होतात. आपल्याला खेळायला जागा नाही म्हणून आपण पार्किंगमध्ये खेळतो, पॅसेजमध्ये खेळतो. नोबडी स्टॉप्स यू. पण, तुम्ही जपून खेळता का? हजारवेळा सांगितलं तुम्हाला सायकली स्लो चालवा, रेसिंग करू नका. मोठय़ामोठय़ाने कोकलू नका. क्रिकेट, फुटबॉल खेळून गाडय़ा, काचा तोडू नका. बिहेव युअरसेल्फ. बट यू तो डोंट लिसन ओन्ली!''
``ही इज राइट गाइज,'' ओजस म्हणाला, ``तुम्ही मूर्खासारखे त्या शर्मा अंकलच्या गाडीमागे खेळत बसला होतात, तेव्हा गाडी काढताना चाकाखाली कोण सापडणार होता, तूच ना रे स्वीकार? आणि वॉचमन आजोबांना ज्यादा आवाज करने का नै, तुम कौन होते हो डाँटनेवाले, असं बोलण्याची हुशारी कुणी केली होती? तूच ना रे उमंग? सायकल जोरात चालवून या पिंटय़ाने त्या गावसकर काकूंचा गुडघा फ्रक्चर केला. तो सी विंगमधला पंकज मागच्या पार्किंगमध्ये विनीलच्या छातीवर बसून त्याचा गळा आवळत होता, ते सीसीटीव्हीवर वॉचमनने बघितल्यावर केवढा राडा झाला होता, आठवतंय ना? आता तर घरी कम्प्लेन्ट केली तरी मम्मी-डॅडी पण खडूस अंकलचीच साइड घेतात.''

``तो? अब क्या?'' टिल्लू गँगचा प्रश्न.
``तो क्या? आज से लॉबी मे कबड्डी बंद. बाहेरसुद्धा खेळायची नाही मी सांगेपर्यंत. आता प्लीज मला अभ्यास करू दय़ा यार दोन दिवस!'' फाट्टकन् हात जोडून नील निघून गेला आणि टिल्लू गँग माना खाली घालून चपला गोळा करायच्या मागे लागली.
***
त्या रात्रीपासून जणू कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली आणि दोन दिवस मनोमन आनंदलेल्या मोठय़ा माणसांनाही नंतर चुकल्या चुकल्यासारखं व्हायला लागलं. रोज मुलांच्या दंग्याचा आवाज नाही. पार्किंग शांत, लॉबी शांत, पॅसेज शांत. सगळंच शांत. परीक्षाबिरीक्षा आल्यात की काय सगळय़ांच्या? हवंतर खडूस काकाला नडून खेळा प्रिमायसेसमध्ये, आम्ही भांडायला समर्थ आहोत, असं सांगणार्या आईबापांची मुलंही सरळ खेळायला नकार देत होती. त्यांना खडूस अंकलच्या आरडाओरडय़ाने काही त्रास झाला नव्हता. पण, नीलदादा आपल्यावर रागावला, याने फार वाईट वाटलं होतं. आज याच्या बाल्कनीत, उदय़ा त्याच्या टेरेसवर, परवा कुणाच्या घरी असे गट करून ती शांतपणे खेळत होती. नील आता दर अर्ध्या तासानी पाय मोकळे करायला जाण्याचा डॉक्टरममाचा सल्ला सारखा का विसरतो, म्हणून त्याचा बाबा (हे हाऊस हजबंड म्हणजे डोक्याला ताप असतात- नीलचे मोस्ट प्रायव्हेट थॉट्स) त्याला सारखा टोचत होता. नीललाही मनोमन प्रश्न पडत होता, ``टिल्लू गँग को डोस थोडा ज्यादा हो गया क्या?''
एक दिवस सोहम्बरोबर श्री, परवेझ, जस्टीन, बेला वगैरे गँग त्याच्या घरी खेळायला जात असताना सी विंगच्या वॉचमननी त्यांना थांबवलं. 
``आता काय? अभी घर पे खेलने का भी मनाई किया क्या खडूस अंकलने?'' सोहमने तुसडेपणाने विचारलं.
वॉचमनने खुणेने गप्प करून त्यांना मागच्या बाजूला नेलं. बिल्डिंगच्या जिन्याच्या शेजारी एक छोटा तुकडा होता जमिनीचा. सोसायटीच्या मागची बाजू होती ही. शांत. इथे खूप गवत आणि झुडपं वाढलेली असायची. आज ती जागा साफ झाली होती. ही खेळायला बरी जागा होती. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग, असं म्हणून टिल्लू गँगने या जागेचा ताबा घेतला आणि तिथे लगेच चपला मधोमध लागल्या. शिटय़ा मारणे, हाकारे घालणे वगैरे नेहमीचे फंडे न वापरता मुलांनी इंटरकॉमचा वापर करून इतर मेंबर्सना बोलावलं. वॉचमन अंकलला थँक यू बोलून खेळायला सुरुवात करण्याच्या आधी बेलाने विचारलं, आता इथेपण खडूस अंकल आले तर?
``मी बघतो काय ते. तुम्ही खेळा बिनधास्त.'' वॉचमननी दिलासा दिला आणि मुलं खेळायला लागली.
ही डेव्हलपमेंट नीलला माहितीच नव्हती. ती माहिती पडली अँग्री आंटीच्या कोकलण्याचा आवाज आला तेव्हा. ती मुलांवर डाफरण्याचा आवाज खरंतर नीलच्या बाबाच्या कानावर आला होता. नीलच्या हाइकवर मेसेज येण्याची वाट पाहून अखेर बाबानेच त्याला ढोसलं. ``अरे वेडपटा, अभ्यास कसला करतोयस. तिकडे तुझ्या राज्यावर केवढं मोठं संकट आलंय बघ. त्या पोरांचा सुपरहीरो ना रे तू?'' 
आता आजच्या बवालला खरंच काही अर्थ नव्हता. अँग्री आंटी सी विंगपासून दूर राहात होती. तिचा सी विंगशी काही संबंधही नव्हता. बरं, नीलदादाने दम भरल्यापासून मुलांनी खेळताना इतरांना डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घ्यायला सुरुवातही केली होती. कोणी केकाटला की क्रिकेटमध्ये आउट, फुटबॉलमध्ये यलो कार्ड आणि कबड्डीत फाऊल धरायचं, असंच ठरवून टाकलं होतं सगळय़ांनी. हय़ा आंटी संध्याकाळच्या वेळी गार्डनमध्ये फेरी मारताना मुलांना शोधत होत्या. हल्ली मुलांचा आवाज नसतो, त्यांच्यावर ओरडायला मिळत नाही, म्हणून त्या नाराज होत्या. शिवाय जेव्हा जेव्हा मुलं दिसायची, तेव्हा तेव्हा ती आनंदी असायची, खेळणं बंद झालं म्हणून दुर्मुखलेली नसायची. त्यानेही त्यांना फारच वाईट वाटायला लागलं होतं. ही पोटदुखी असहय़ झाल्यानंतर त्यांनी एका मुलाच्या मागोमाग जाऊन मुलांची खेळण्याची जागा शोधून काढली होती आणि काय हा दंगा सुरू आहे, मुलांना मनाई केल्यानंतरही ती कशी खेळतायत, असा आरडाओरडा सुरू केला होता.
नीलला पाहिल्यावर मुलांच्या चेहर्यावर जरा हुरूप आला. पण, दादा आताही आपल्यावरच कावेल की काय, या विचाराने ती पुन्हा हिरमुसली. नील म्हणाला, ``आँटी, इतर कुणाची काही तक्रार नाही. मुलं काही त्रास देत नाहीयेत. वॉचमन अंकलचंही लक्ष आहे. खेळू दय़ा ना त्यांना. प्लीज.''
``नो नो, नो वे. मी आत्ताच्या आत्ता सेक्रेटरीकडे तक्रार करणार आहे. उच्छाद चाललाय नुसता.''

``कुणाचा उच्छाद? कसला उच्छाद?'' करडय़ा आवाजात प्रश्न आला. खडूस अंकल अपेक्षेप्रमाणे हजर झालेच होते. आता अँग्री आंटीला चेवच आला. ``थँक गॉड तुम्ही आलात? ही मुलं आता माझ्यावर हल्ला करतील की काय, असंच वाटत होतं मला,'' तिने सरळ सरळ थाप मारली, ``अहो, तुम्ही मुलांना सगळीकडे खेळायला बंदी केली होती ना. ही मुलं आता इथे येऊन खेळतायत. केवढा आवाज. केवढा आरडाओरडा. मी त्यांना सांगितलं की हे काही तुमचं खेळण्याचं मैदान नाही. पण, ती माझ्याच अंगावर धावून येतायत.''
``पण, मुलं इथे खेळणारच. हे प्लेग्राऊंडच आहे त्यांचं,'' खडूस अंकलनी हातातली पाटी सुलटी केली. क्रीडांगण असं लिहिलेली ती पाटी त्यांनी भिंतीवर लावायला घेतली आणि आश्चर्याने मुलं बेशुद्धच पडायची बाकी राहिली. खडूस अंकल शांतपणे पाटी लावता लावता म्हणाले, ``मुलांनी पॅसेजमध्ये, समोरच्या गार्डनमध्ये, लॉबीमध्ये, पार्किंगमध्ये धुडगूस घालू नये, यासाठी मी बंदी घातली होती. खेळताना ती स्वतःला आणि इतरांना हर्ट करत होती, त्रास देत होती, हे त्यांना समजणं महत्त्वाचं होतं. त्यांचा खेळच बंद केला तर खेळायचं कोणी? तुम्ही की मी? प्रत्येक बिल्डिंगच्या मागे अशा मोकळय़ा जागा आहेत. त्या साफ करून मुलांसाठी खेळायला दय़ायच्या, असं मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्हीच ठरवलं होतं आणि आम्हीच ही जागा साफ करून दिली होती. फक्त मुलं इथेही दंगा करतायत का, हे पाहण्यासाठी थांबलो होतो. त्यांना सांगितलं नव्हतं. आता इथे ऑफिशियली प्लेग्राऊंड आहे.''
लालबुंद चेहर्याने पाय आपटत जाणार्या अँग्री आंटींना खडूस काका म्हणाले, ``तुमच्या बिल्डिंगच्या मागे बैठय़ा खेळांसाठी शेड टाकणार आहोत आम्ही आणि ते खेळही सोसायटीच प्रोव्हाइड करणार आहे. तिथे फारसा आवाजाचा त्रास नाही होणार तुम्हाला. हो ना रे पोरांनो?''
सगळी पोरं एका सुरात `हो' म्हणून ओरडली आणि इतक्या दिवसांनी मुलांचा तो उत्फुल्ल आवाज ऐकून सगळय़ा सोसायटीतल्या मोठय़ा माणसांचा जीवही भांडय़ात पडला.

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड, दिवाळी अंक २०१६; सर्व चित्रे : ऋजुता घाटे)



Monday, February 22, 2016

देशभक्तीचे विकान

'देशभक्तीचे विकान' अशी पाटी पाहिल्यानंतर आमच्यामधील बहिर्जी लगेच जागा झाला. कान टवकारले, डोळे विस्फारले, चांगल्या बातमीचा गंध आमच्या नाकात शिरला आणि दुकानात मालक म्हणून आमचे परममित्र बाबुराव बोंबले यांना पाहिल्यावर तर आम्ही उडालोच. 
त्यांनी दुकान उघडल्याचं आम्हाला माहितीही नव्हतं. 
बाबुराव कपाळावर टिळा रेखून गंभीर मुद्रेने दुकानात बसले होते. 
एरवी रमी खेळणारे, आठवड्यातून एक दिवस अंमळ चांगभलं करणारे, संध्याकाळी नाक्यावर रमणीय स्थळांचं दर्शन घेणारे रसिक बाबुराव ते हेच, यावर कुणाचा विश्वास बसला नसता. एका टिळ्यामुळे इतका फरक पडतो?
अत्यंत अनोळखी दिसणाऱ्या या मित्राकडे पाहून हसण्याचा आमचा प्रयत्न फोल गेला. 
“काय बाबुराव, हे काय नवीन,” असं सलगीच्या सुरात म्हणालो, तेव्हा त्यांनी दुकानातल्या एका पाटीकडे बोट दाखवलं. 
हे भारतमातेचं पवित्र मंदिर असून येथील पावित्र्य राखावे, हास्यविनोदांसाठी उद्याने आहेत, येथे कामाचे बोलावे, आपले म्हणणे थोडक्यात सांगावे, अशी एक पुणेरी शैलीतली पाटी लिहिली होती. 
संपूर्ण तिऱ्हाईताप्रमाणेच आमच्याशी बोलणाऱ्या, वागणाऱ्या बाबुरावांना आता या पाटीतल्या सूचनांनुसारच बोलतं करावं लागणार, हे लक्षात आल्यावर आम्ही अत्यंत विनम्रतापूर्वक आणि गंभीरपणे विचारलं, “महोदय, हे विकान म्हणजे काय आहे?”
कडक इस्त्री केलेल्या चेहऱ्यावर कमालीचे तुसडे भाव आणून बाबुराव म्हणाले, “असा प्रश्न तुम्हा तमाम देशद्रोही लोकांना पडतो. विकान याचा अर्थ आहे दुकान.”
आमच्या देशभक्तीलाच हात घातल्यावर आम्ही एकदम संतापलोच. पण, आपल्या मित्राला काहीतरी दुर्धर आजाराने ग्रासलेलं असणार, असा विचार करून आम्ही स्वरांवर नियंत्रण ठेवून विचारलं, “दुकानाला विकान म्हणायचं काय प्रयोजन आहे महोदय. तद्वत हा शब्दच न वापरणं म्हणजे देशद्रोह हे कोणी ठरवलं?” 
बाबुराव उत्तरले, “आम्ही.”
“तुम्ही कोण?”
“आम्ही देशभक्त आहोत.”
“कशावरून?”
“खरंतर आम्ही सांगतो म्हणून, एवढंच उत्तर तुमच्यासारख्या देशद्रोह्यांसाठी पुरेसं आहे; पण, तुम्ही प्राचीन स्नेही आहात, पुरातन परिचित आहात, तुमच्यात काही सकारात्मक बदल व्हावा म्हणून सांगतो की, आमचं आमच्या देशावर फार प्रेम आहे आणि आमच्या देशासाठी रक्त वाहायला आणि जीवही ओवाळून टाकायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे आम्ही देशभक्त आहोत.”
बाबुरावांच्या किडकिडीत देहातून रक्ताचे थेंब तासातासाने दोन पडले तरी खूप आणि एखाद्या सिगारेटफुंक्याने त्यांच्या तोंडावर जोरात धूर सोडला तरी श्वास गुदमरून त्यांचा जीव ओवाळून पडायचा, त्यांची ही भाषा ऐकून जाम हसू येऊ लागलं. पण गांभीर्य कायम ठेवून आम्ही म्हणालो, “बाबुराव, म्हणजे आपले विकानचालक महोदय, देशासाठी दरवेळेला प्राण द्यायला हवा किंवा आपलं रक्त सांडायला हवं, तर आपण देशभक्त ही व्याख्या कुणी केली? आणि तीच व्याख्या असेल, तर तुम्ही सैन्यात का नाही गेलात? इथे दुकानदारी, आय मीन विकानदारी का करत बसला आहात?”
बाबुराव इस्त्रीयुक्त चेहऱ्याने उत्तरले, “आधी आपला अपसमज दूर करा. देशासाठी रक्त सांडायचं ते शत्रूचं, जीव ओवाळून टाकायचा तो शत्रूचा.”
“इथे विकानात बसून? ही भारी आयडिया आहे. तुमच्या वतीने जीव देणार सीमेवरचा सैनिक, शत्रूच्या नरडीचा घोट घेणार तोही सीमेवरचा सैनिक आणि तुम्ही इथे टिळे लावून बसून देशभक्तीची प्रमाणपत्रं विकणार, कमाल आहे.”
बाबुरावांची मुद्रा चक्क प्रसन्न झाली. ते म्हणाले, “आता तुम्हाला आमच्या उदीमाचं सत्य स्वरूप समजलं आहे. तुम्हालाही देशभक्तीचं प्रमाणपत्र हवं असेल तर ते आम्ही बनवून देऊ शकतो. आजकालच्या जगात ते फार उपयोगी पडेल.”
“भगवन्, काय बरे उपयोग आहेत या प्रमाणपत्राचे,” आता आम्हीही पेटलोच होतो.
बाबुराव डबल पेटले होते, ते म्हणाले, “बाळ बित्तमा, सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अचानक देशभक्तांनी गाठून चोपू नये, काळं फासू नये, फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर आपले लचके तोडू नयेत, असं वाटत असेल, तर त्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. आमच्या प्रमाणित विकानातून घेतलेलं हे अखिल हिंदुराष्ट्रीय प्रमाणपत्र पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तानातही चालतं... पण, शहाणी माणसं विद्यमान हिंदुस्तानाच्या हद्दीबाहेर ही प्रमाणपत्रं काढून खिशात ठेवतात... तिकडे फटके पडण्याची शक्यता असते.”
“हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्हता काय असते?”
“खरंतर डोक्यावर टिळा एवढीच अर्हता पुरेशी होती कालपरवापर्यंत. पण, आताच्या काळात हे इतकं सोपं राहिलेलं नाहीये. तरीपण तुमच्यासाठी प्रयत्न करू. मुळात मला सांगा, तुमचा एखादा भरभक्कम गट आहे का? तुमच्या हाकेसरशी बारापंधरा लोक गोळा होऊन एखाद्या माणसावर हिंस्त्र हल्ला चढवू शकतात का?”
“अहो, माझी काय गुंडांची टोळी आहे का? काहीतरीच काय विचारताय बाबुराव?”
“अहो, तशी असती तर तुम्हाला प्रखर देशभक्त म्हणालो असतो. पण, तुम्ही दिल्लीचे वकीलही नाही आहात, हे मला माहिती आहे. सध्या तुम्ही साधे देशभक्त असल्याचंच प्रमाणपत्र जेमतेम मिळवू शकाल. तुम्हाला किमान सोशल मीडियावर एखाद्याच्या चिंध्या करता येतात का?”
“पण, हे सगळं का करायचं?”
“कमाल आहे तुमची? दुसऱ्या कोणाला तरी देशद्रोही ठरवल्याशिवाय तुम्ही देशभक्त कसे ठरणार? अंधार आहे, असं सिद्ध केलं तर प्रकाश आहे, असं सिद्ध होतं ना?”
आमच्या डोक्यातला अंधार या उदाहरणाने आणखी वाढला.
बाबुराव समजावणीच्या सुरात म्हणाले, “हे पाहा. मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, परधर्मसहिष्णुता, विवेकशीलता, बुद्धीप्रामाण्य, नास्तिक्य, धर्मचिकित्सा, विज्ञाननिष्ठा या दुर्गुणांनी सध्या भारतवर्षाला ग्रासलेलं आहे. आपल्या तेजोमय इतिहासाचं लोकांना विस्मरण झालेलं आहे. अशा सद्गुणविकृतीच्या बळींची संख्या कमी नाही. त्यांच्यातला एखादा पकडायचा. तू बुद्धी वापरतोस, तुला चिकित्सा करता येते, कसल्याही बावळटपणावर तू आंधळी श्रद्धा ठेवत नाहीस, भारतीय उपखंडाचा इतिहास, त्यातली गुंतागुंत, कुप्रथा, पुराणांमधील अवैज्ञानिक कल्पनाविलास, महाकाव्यांच्या मर्यादा, विषमतापूरक समाजरचना यांच्यावर प्रहार करतोस, म्हणजे तू देशद्रोही आहेस, असं बजावत त्याच्यावर हिंस्त्र हल्ला चढवायचा. म्हणजे तुम्ही आपोआप देशभक्त बनता. त्याचं प्रमाणपत्र लगेच हजर. प्रखर देशभक्त बनण्यासाठी मात्र प्रत्यक्ष मारामारी करता आली पाहिजे. एकास एक अशा प्रमाणात नाही, बरं का! लोकलमध्ये पाकिटमार सापडला तर त्याला कसे शंभर लोक मारतात, तसं. झुंड करायची आणि चोपायचा. शिवाय फोटोशॉपचाही डिप्लोमा लागतो. इकडचा फोटो आणि तिकडचं बॅकग्राऊंड यांचा समन्वय करून दाखवायला लागतो. एखाद्या नि:शस्त्र वृद्धाचा खून वगैरे पाडू शकलात, तर देशभक्त वीर हुतात्मा ही पदवीही मिळू शकते.” 
“एक छोटीशी शंका आहे चालकमहोदय?” आम्ही धाडस करून बोललो, “तुम्ही देशभक्तीचं प्रतीक म्हणून सगळ्या विद्यापीठांवर राष्ट्रध्वज लावायला निघाला आहात. मग, हे देशभक्तीचं विकान असेल, तर इथे भारतदेशाचा झेंडा न लावता हा वेगळ्याच रंगाचा, डिझाइनचा ध्वज इथे का लावला आहे?”
आता बाबुराव एकदम क्रुद्ध झाले. त्यांनी इकडेतिकडे हाका मारल्या आणि दहाबारा टिळेधारी गोळा केले. म्हणाले, “मुसक्या आवळा याच्या. हा देशद्रोही आहे.”
त्या दहाबाराजणांना आमची गठडी वळणं काही अवघड नव्हतं. त्यांनी आम्हाला काउंटरवर नेऊन आदळलं आणि बाबुरावांनी एक भलामोठा शिक्का आमच्या कपाळावर आपटला.
पलीकडच्या आरशात पाहण्याची गरज नव्हती. कपाळावरचा शिक्का कसला असणार, हे स्पष्टच होतं. 

जय फुल्या फुल्या! जय फुल्या फुल्या फुल्या!

‘नॉनसेन्स, सेक्युलर, पुरोगामी कुठले! आताच्या आता हे गलिच्छ भेंडोळं घेऊन दूर व्हा आमच्या नजरेसमोरून... नाहीतर, नाहीतर मी विचारवंत अशी शिवीही देईन तुम्हाला!’ 
संपादकांचा सात्विक संताप शिगेला पोहोचला होता. सकाळी सकाळीच शेठजींनी काही कारणाने तासलं असावं. 
‘पण, सर, तुम्ही इतके का भडकला आहात? माझ्या बातमीत एवढं आक्षेपार्ह काय वाटलं तुम्हाला?’ आम्ही चाचरत विचारलं. 
‘सिनीयर सहकारी तुम्ही आणि हे विचारताय? तुमच्यापेक्षा ती विनास्टायपेंडची राबणारी ट्रेनी मुलं परवडली, बातम्यांपेक्षा जाहिरातीच जास्त आणणारे आपले गावोगावचे रिपोर्टरही अधिक रिपोर्टिंग स्किल बाळगतात.’
‘असं कसं म्हणता सर, मी तर तुमचा बहिर्जी नाईक?’ इतर कसलाही उपाय राहिला नाही की भावनिक अस्मिता फुलवायची, हा आमचा नेहमीचा हुकमी फंडा. तो आताही लागू पडला. संपादकांचा पारा थोडा खाली उतरला आणि आपण महाराजच असल्याच्या थाटात ते सांगू लागले, ‘होय ना? मग तुम्हीच आमच्या अपेक्षांचा भंग कसे करता? जी बातमी सगळ्या वृत्तसंस्थांनी दिली आहे, तीच नुसती मराठीत अनुवादून आमच्याकडे कशी आणता? तुमची गुप्त कामगिरीची सुरसुरी... आय मीन ऊर्मी कुठे गेली? अपशब्दांमुळे नाटकावर बंदी या बातमीच्या मुळाशी तुम्ही का नाही गेलात? सेन्सॉर बोर्डाचं मत का नाही जाणून घेतलंत? आपल्याकडे खास बातमीचा फटाका का नाही फोडलात?’
आता भावनिक आवाहनाचा फंडा आम्हालाही लागू होतोच की... आमचेही बाहू लगेच फुरफुरू लागले, मनगटं शिवशिवू लागली. मागच्या खास बातमीसाठी खर्च केलेल्या रकमेची व्हाऊचरं अजून मंजूर झालेली नाहीत, याचा विसर पडला आणि खिशात किती चिल्लर उरली आहे, याचंही भान हरपून आम्ही तडक बातमीच्या शोधात रवाना झालो...
सेन्सॉर बोर्डाच्या कचेरीत आम्ही पोहोचलो आहोत, हे खिडकीतून अंगावर कचरा येऊन पडला, तेव्हा लक्षात आलं. अंगावर पडले ते सगळे शब्द होते. त्यातला एकही अंगाला चिकटू नये, अंगात मुरू नये आणि मुरून जिभेपर्यंत किंवा लिहित्या हातापर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही प्राणांतिक धडपड करून ते सगळे झटकले. आम्ही आत शिरतो न शिरतो तोच मागच्या पावली बाहेर पडत असलेल्या एका खादी झब्बाधारी, दाढीवाल्याशी टक्कर होता होता राहिली. त्याच्या अंगावर एक कागदांची चळत येऊन पडली... त्यातल्या पहिल्या पानावरच्या ‘श्री’नंतर फक्त व्यक्तिरेखांची नावं आणि कंस व कंसातली रंगसूचनांची वाक्यं शिल्लक उरली होती. बाकीचे सगळे शब्द तेच होते, जे मघा आमच्या अंगावर येऊन पडले होते. काही व्यक्तिरेखांची नावंही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून बदलण्याची सूचना करण्यात आली आहे, असं काहीसं कानावर पडलं. तो नाटककार आपलं न-नाटक (आता त्यात उरलं तरी काय होतं) घेऊन बाहेर पडला. 
आम्ही थबकतच आत शिरलो.
‘काढा काढा, तुमचं बाड काढा. दिवसभर फक्त घाण उपसायचंच काम आहे आम्हाला,’ समोरचे नाट्यपरिनिरीक्षक (यापुढे आपण त्यांना सोयीसाठी नापनि म्हणूयात) जिवाजी कलमदान्याच्या आवेशात म्हणाले. 
‘नाही, आमच्याकडे कसलंही बाड नाही.’
‘धन्य, मग आता काय नाटक आमच्यापुढे एकपात्री करून दाखवणार आहात की अभिवाचन करणार आहात. कठीण आहे. अहो स्क्रिप्ट नसेल, तर सेन्सॉर काय करणार आम्ही. फुल्या फुल्या?’
हा फुल्याफुल्या चक्क उच्चारी होता. म्हणजे ते चक्क फुल्या फुल्या, असं जोशात म्हणाले होते. आम्ही ही संधी सोडली नाही. चेहऱ्यावर आमचं सराईत ओशाळवाणं, तेलकट हसू आणत म्हणालो, ‘साहेब, आपण चक्क फुल्या फुल्या असं म्हणालात?’
साहेब तुपकट हसत म्हणाले, ‘म्हणजे काय? नियम म्हणजे नियम. एकदा या खुर्चीत बसलं की आम्ही आमचं बोलणंही सेन्सॉर करतो जागच्या जागी. उगाच्या फुल्याफुल्यांमध्ये फुल्याफुल्या व्हायला नको.’ साहेबाने टाळीसाठी हात पुढे केला.
‘बरोबर आहे फुल्या फुल्या फुल्या फुल्या’ असं म्हणत आम्ही टाळी दिली तेव्हा साहेबाने आमच्या फुल्याफुल्यांचा अर्थ लावण्याची कोशीस सुरू केली. ती कामयाब होण्याच्या आतच साहेबांचं लक्ष वळवण्यासाठी आम्ही म्हणालो, ‘पण साहेब, बाहेर फार गोंधळ सुरू आहे. या सरकारप्रमाणे तुम्हीही असहिष्णु आहात, काहीही कापाकापी करू लागला आहात, असं म्हटलं जातंय.’
‘कोण बोलतो तो फुल्या फुल्या फुल्या फुल्या. आमच्या समोर येऊन बोला म्हणावं फुल्या फुल्या फुल्या फुल्या.’ साहेबाला रोखण्यासाठी आम्ही थेट मुद्द्याला हात घालायचं ठरवलं.
‘साहेब, आताच आपण एका नाटकात फार विचित्र बदल सुचवलेत. फार सामान्य शब्दांना आक्षेप घेतलात. म्हणजे तुम्ही गांडू..’
पुढचं काहीही ऐकून न घेता साहेबाने पेपरवेट, पेन, पेन्सिल, कान कोरायची काडी, दात कोरायची काडी, स्वत:चा चष्मा, तपासण्यासाठी आलेली तीन नाटकांची बाडं, कोरे कागद आणि नंतर नुसतेच हवेचे झोतही आमच्या दिशेने फेकून मारले. आमच्या व्यवसायदत्त कौशल्यामुळे आम्ही हा सगळा मारा चुकवला आणि थरथरत उभ्या असलेल्या साहेबाला म्हणालो, ‘अहो गांडू बगीचा हा शब्दही तुम्ही कापलाय, त्याबद्दल मी बोलत होतो.’
साहेब म्हणाले, ‘त्यात बोलण्यासारखं आहेच काय?’
‘साहेब, या नावाचा एक गाजलेला काव्यसंग्रह आहे दिवंगत ढसाळसाहेबांचा. त्याला राज्य सरकारने पुरस्कार दिला होता. फार नावाजला गेला होता तो.’ 
‘असेल ना, असेल. आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण, म्हणून हे नाव असं चारचौघात उच्चारायचं का? आता तुम्ही माझ्यासमोर म्हणजे माझ्या एकट्यासमोर उच्चारलंत तर केवढा भयंकर प्रसंग ओढवला तुमच्यावर.’ 
बरोबर आहे, आम्ही मनात म्हणालो. साहेबांचा नेम भिकार आहे म्हणून. नाहीतर पेपरवेटाने आम्हाला पेपरांच्या श्रद्धांजलीच्या कॉलमात नेऊन बसवलंच असतं.
‘पण, साहेब. तुम्ही हिंस्त्र झालात, हा तुमचा दोष नाही का?’ त्यांच्यासमोर फेकण्यायोग्य काही उरलेलं नाही, हे लक्षात येताच आम्ही धीर केला.
‘अहो पण हा माझा मूळ स्वभाव आहे का? मी या देशाचा नागरिक आहे. मी जगातल्या सगळ्यात शांतताप्रिय, सहिष्णु धर्माचं पालन करतो. आताचं सोडा पण, माझी संस्कृती आणि परंपरा थोर आहे. आमचा इतिहास उज्वल आहे. आम्ही नैतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आहोत. अशा माझ्यासारख्या माणसातलं जनावर जागं केलंत तुम्ही ते भयंकर शब्द उच्चारून आणि वर माझा दोष आहे म्हणून सांगताय फुल्या फुल्या फुल्या फुल्या. माझ्यासारख्या सत्शील माणसावर ही वेळ आणलीत. आता विचार करा. तुमच्या नाटकाला येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांची ही भावना झाली, तर तुम्ही शिल्लक राहाल का? तुमच्या भल्याचेच निर्णय घेतोय ना मी फुल्याफुल्या?’
‘ठीकाय गां... अं... तो शब्द नको. पण, खैरलांजी, रमाबाई नगर या शब्दांमध्ये नेमकी काय अडचण आहे, ते तरी सांगा.’
‘अहो काय दगड आहात की काय तुम्ही फुल्या फुल्या? हे सगळे शब्द वाईट स्मृती जाग्या करतात. तिथे जे घडलं ते लोकांना आठवतं. त्यांच्या मेंदूला आम्ही केलेली इस्त्री विस्कटते, त्यांना पुन्हा चुण्या पडू लागतात. त्यातून लोक सरकारद्रोही म्हणजे देशद्रोही, देवद्रोही, धर्मद्रोही बनू लागतात. हे असले घाणेरडे शब्द उच्चारायचे कशाला? आता ते जनरल अगदी जनरली कुत्रा म्हणाले कुणालातरी. आता जनरलच ते. त्यांना तसा अधिकार आहे. शेपूट हलवणारे खूप लोक पाहिले असणार त्यांनी. तर मग आपणही तीच आठवण काढायची आणि त्या ‘प्रेस्टिट्यूड’सारखा नितांतसुंदर शब्द निर्माण करणाऱ्या सत्पुरुषाच्या आत्म्याला नाहक यातना द्यायच्या, हे शोभतं का तुम्हा फुल्याफुल्याफुल्यांना?’
‘बरोबर आहे. बरोबर आहे. साहेब, सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर दुष्परिणाम करणाऱ्या ज्या अपशब्दांची यादी तुम्ही काढली आहे, तिच्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठीच आम्ही आज इथे आलो होतो. तुमच्या यादीतला एक शब्द आम्हाला फार पटला, पण तो तुम्ही यादीत कसा घातला, याबद्दल शंका होती. तिचं फक्त समाधान करा.’
‘कोणता शब्द?’
‘हिंदुत्व.’
यानंतर साहेबांच्या तोंडून इतक्या ‘फुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्याफुल्या’ बाहेर पडल्या की काही काळाने आमचा मेंदू भानामती केलेल्या कपड्यासारखा फुल्याफुल्यांनी भरेल, अशी धास्ती वाटून आम्ही हापिसाकडे धूम ठोकली...

व्यर्थच हो बलिदान

हॅलो, तुम्हाला ताबडतोब निघायचंय, लष्कराचे आपले जवान अडकले आहेत बर्फात. त्यांच्यासंदर्भात काही मिळतंय का पाहा. 
संपादकांचा फोन आला की एरवी आम्हाला स्फुरण चढतं. आज मात्र मन हिरमुसलेलं होतं, हृदय कोमेजलेलं होतं. सियाचिनच्या बर्फात अडकणं म्हणजे काय, याची कल्पना होती. आम्ही सियाचिनला पोहोचणं तर शक्यच नव्हतं... स्वत:ला कितीही बहिर्जी म्हणवून घेत असलो तरी जिथे जीवनाची निशाणीच नाही, अशा पांढऱ्या भव्य थडग्यामध्ये जाऊन राहण्याचं धाडस फक्त वीर जवानच करू शकतात, याची आम्हाला कल्पना आहे. 
लष्कराच्या काही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आम्ही दिल्ली गाठली. सगळीकडे गांभीर्याचं आणि शोकाचं वातावरण. अधिकारी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. आपल्या जवानांचं काय झालं असणार, याची स्पष्ट कल्पना त्यांना होती आणि ते झालेलं नसावं, अशी वेडी आशा मनात धरून ते प्रार्थना करत होते. त्याचबरोबर शोधकार्यही सुरू होतं. यथावकाश आपले जवान बचावणार नसल्याचं स्पष्ट होत गेलं आणि दिल्लीची अशीही मरतुकडी, धुरकट झालेली हवा आता मरणरंगी भासू लागली. 
तेवढ्यात चमत्कार झाला. 
हणमंतप्पा कोप्पड नावाचा जवान जिवंत सापडल्याची बातमी आली आणि दु:खाला सुखाची किनार लाभली. 
हणमंतप्पाची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. ईश्वरी चमत्कारच त्याला वाचवू शकेल, असं वाटून लोकांनी प्रार्थना सुरू केल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार होतील, याची काळजी घेतली. पंतप्रधानही या जवानासाठी भावविवश झाले. 
वातावरण बदललंय. आता लोक नऊ जवानांचा मृत्यू विसरलेत. एका जवानाची झुंज ही पॉझिटिव्ह स्टोरी आहे. जरा बोला लोकांशी. मूड पकडा. संपादकांचा आदेश आला. आम्हीही उत्साहाने लष्करी अधिकाऱ्यांना भेटलो. ते नाव न सांगण्याच्या अटीवर मोकळेपणाने बोलले. एवढ्या दिवसांत आज त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत होता. ते म्हणाले, बघा बघा आमचा जवान कसा असतो. हाडं सोडा, आत्माही गोठवण्याची ताकद असलेल्या थंडीत हा पठ्ठ्या जिवंत राहिला. त्याने साक्षात मृत्यूला ठेंगा दाखवला. वुई आर सो प्राउड ऑफ हिम. 
सगळ्या देशाला त्याचा अभिमान आहे सर. पण, झालं काय की तिकडे वृत्तवाहिन्या न पोहोचल्यामुळे, लोकांपर्यंत प्रत्यक्ष दृश्य पोहोचायला उशीर झाला. तुम्ही रेस्क्यू टीमबरोबर एक टीम नेली असती पत्रकारांची, तर... 
व्हॉट नॉन्सेन्स, अधिकारी महोदय कडाडले, तिथे टीव्हीवाले गेले असते, तर त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनचा सत्यानाश करून टाकला असता. आमच्या हणमंतप्पासाठी जीवनमरणाची लढाई होती, ती यांनी टीआरपीची लढाई करून टाकली असती. अब आप को कैसा लग रहा है, असा प्रश्न तिथेही विचारल्याशिवाय राहिले असते का हे दंडुकेधारी? हणमंतप्पाचं सोडा, मला जरी विचारलं असतं तर गोळी घालून तुमचा भेजा उडवावासा वाटतोय, असं मी सांगितलं असतं आणि त्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं असतं. अधिकारी महोदयांचा हात कमरेकडे जातो आहे, हे पाहताच आम्ही उठलो आणि घाईघाईने त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. 
सर्वसामान्य माणसांची नस ओळखण्यासाठी त्यांच्याबरोबर प्रवास करणं महत्वाचं असतं. सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, हे आमच्या संपादकांचं वचन लक्षात घेऊन आम्ही दिल्लीची सुप्रसिद्ध मेट्रो गाठली. शेजारच्या प्रवाशाशी विषय काढला. साहेब, त्या हणमंतप्पाची पण कमाल आहे नाही? 
कमाल म्हणजे काय? अरे आपल्या भारताचा वीर जवान आहे तो? शेर का बच्चा है... 
हा विषय ऐकून बसलेले आणि उभे असलेले अन्य सहप्रवासीही संभाषणात सहभागी झाले. सगळ्यांनी हणमंतप्पाच्या जिगरबाजपणाचं कौतुक केलं. 
आम्ही पुन्हा शेजारच्याला विचारलं, ही बातमी आली तेव्हा तुम्ही काय करत होतात? 
बसलो होतो, तो चटकन बोलून गेला, मग सारवासारव करत म्हणाला, आपले नऊ जवान बर्फात जिवंत गाडले गेले, हे समजल्यामुळे इतकं प्रचंड दु:ख झालं होतं की ते बुडवण्यासाठी बसावंच लागलं. 
बरोबर आहे, बरोबर आहे, असं एकाने झुलत झुलतच सांगितलं... त्याचं दु:ख अजून शमलेलं दिसत नव्हतं. 
ही बातमी तुम्हाला टीव्हीवर समजली, तेव्हा तुमची काय भावना झाली? 
मन भरून आलं, आनंद पोटात मावेना, खुशीत आणखी एक पेग मारला आणि देशभक्तीपर गाण्यांचं चॅनेल शोधू लागलं. कोणत्याही जवानाचं सीमेवर काहीही बरंवाईट झालं की मी लगेच देशभक्तीची गाणी लावतो. 
कोणती गाणी पाहिलीत मग? अहो हे आपले छचोर मीडियावाले. त्यांच्याकडे कुठून येणार देशभक्तीची भावना. सगळेच्या सगळे प्रेस्टिट्यूड बनून बसले आहेत. एकाही चॅनेलला हे सुचलं नाही हो. सगळीकडे उच्छृंखल गाण्यांचा हैदोस चालला होता. शेवटी बायको-मुलं झोपायला गेल्यानंतर मस्तीजादे आणि क्या कूल है हमची गाणी पाहूनच आनंद साजरा करावा लागला. जवान बर्फात अडकल्यापासून त्या रात्रीच तेवढी शांत झोप लागली मला. 
तुम्ही काय केलंत? आता आम्ही शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मोर्चा वळवला. 
अपनी भी कहानी लगभग यही है. फक्त मी काही घेत नाही. नुसता जेवतो. हणमंतप्पाची बातमी ऐकल्यावर पोराला पिटाळून मिठाई मागवली. बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन लावला? 
कशाला? 
डीजे मागवायला. 
रात्रीचा डीजे? कशाला? 
कशाला म्हणजे? देशभक्तीची गाणी वाजवायला. मूर्ख पोलिसांच्या बंदीमुळे रात्री येणार नाही म्हणाला. मग सकाळी सहा वाजता मागवला. सकाळी सगळीकडे झेंडे लावले. सोसायटीच्या खर्चाने नाश्ता करवला सगळ्यांना आणि भारत माता की जय म्हणून आपल्या कामाला लागलो. 
मै क्या कहता हूँ भाईसाब, एकही धमाके मे पाकिस्तान को खत्म करेंगे तो ये सब झगडाही खतम हो जाएगा ना? एकाने तोंड घातले. 
अरे ऐसे कैसे खत्म होगा दुसरा आसपास कुठे दाढी-गोल टोपी दिसते का, हे पाहात म्हणाला, यहाँ भी तो है ना कटेलों की औलादें. त्यांनाही संपवून टाकायचं, तिसऱ्याने निकाल दिला.
आम्ही म्हणालो, असं आहे भावांनो, हणमंतप्पाच्या आधी जे नऊ जवान शहीद झाले ना आपले, त्यात एक मुश्ताक पण होता. 
यावर गप्प झालेल्या जमावाला तुमचं कोण कोण आहे लष्करात, देशप्रेमाला जागून तुम्ही पाठवता का आपल्या मुलांना सैनिकी शिक्षणासाठी हे प्रश्न विचारल्यावर तर पांगापांगच झाली. 
मग आम्ही आमचा मोर्चा युद्धतज्ज्ञांकडे वळवला. नावाच्या पाटीवर बंदूक टांगलेली होती आणि तोफेची नळी हीच घराची बेल बनवण्यात आली होती.
हणमंतप्पाची बातमी आणि त्यावरच्या आनंदाची प्रतिक्रिया याबद्दल सगळं नेहमीसारखंच बोलून झाल्यानंतर त्यांना विचारलं, सर, नऊ जवान कामी आले आपले. नऊ घरांमधले नऊ कर्ते पुरुष गेले. नऊ कुटुंबांमधला एक माणूस संपला, ती उद्ध्वस्त झाली. हे टाळता नाही का येणार? 
तज्ज्ञ म्हणाले, धिस इज वॉरफेअर माय बॉय. इथे भावुक होऊन चालत नाही. हे गृहीत धरावं लागतं सैन्यात. ही नोकरीच मुळी जिवावर उदार होऊन करण्याची.
 सर, युद्ध सुरू असताना असं काही झालं असतं तर समजण्यासारखं होतं. पण, एका बंजर, मृत्युलोकासारख्या भयाण प्रदेशावर कब्जा राखण्यासाठी जवानांना तैनात करण्यापेक्षा वेगळे, राजनैतिक स्वरूपाचे मार्ग नाहीत का काही? 
यू फूल, तुमचं मत आहे की आपण शत्रूबरोबर वाटाघाटी करून माघार घ्यावी आणि त्यांच्यावर भरवसा ठेवावा. त्यांनी आपल्यावर भरवसा ठेवावा. असा भरवसा तयार झाला, तर सियाचिनमध्येच कशाला, देशाच्या कोणत्याही सीमेवर एकही जवान तैनात करण्याची गरज पडणार नाही. पण, वास्तव हे अशा आदर्शवादी कल्पनांपेक्षा नेहमीच वेगळं असतं. 
बरोबर आहे सर. पण, हे वास्तव नेहमी जवानांनाच भोगावं लागतं. त्यांचं ते कामच आहे असं म्हणून आपण मोकळे होतो. आपलं काम काय आहे मग? आमचं सोडा, तुम्ही तर सरकारला सल्ला देणारे तज्ज्ञ. तुम्ही का नाही दोन्हीकडची प्राणहानी टाळणारा काही उपाय सुचवत? 
असा एकच उपाय आहे माय बॉय. तो काय? आसिंधुसिंधु हिंदुराष्ट्र! 
अरे बापरे, आपण पत्ता चुकलो आहोत, हे लक्षात येऊन आम्ही तज्ज्ञ महोदयांच्या घरातून पळ काढला...
...बाहेर पडल्यानंतर हणमंतप्पाच्या कुडीतून प्राण निघून गेल्याची भयंकर बातमी आमच्या कानावर आली... 
पाठोपाठ ठिकठिकाणच्या स्पीकरांमधून देशभक्तीचे नळ गळू लागले... 
दोन दिवसांतल्या घडामोडींच्या नोट्स लिहिलेल्या वहीकडे पाहताना आमच्या तोंडून अचानक शब्द निघून गेले, 
सुटला बिचारा.

...तरी हे शनिदेवाचे छळण

आमच्या कानावर सूर आले... झोपेतही आमच्या चेहऱ्यावर हसू फुललं असणार... आमचं जाम आवडतं गाणंय हे... 
निसर्गराजा, ऐक सांगतो.... 
एकतर राम कदमांचं म्युझिक टॉप, जगदीश खेबूडकरांचे शब्द टॉप, त्यात दिसणारा तरणाबांड रवींद्र महाजनी टॉप आणि रंजनासाठी तर आमच्याकडे शब्दच नाहीत... 
झोपेतही आम्ही खूश झालो, त्यामुळे थोडी झोप उडाली असणार आणि मग गाण्याचे खरे शब्द कानावर आले... 
शनिदेवाची कथा सांगतो... 
आमच्या डोस्क्यावर कोणीतरी वाण्याकडच्या पूजा स्पेशल कळकट तेलाचा अभिषेक केल्यासारखा चेहरा झाला आमचा आणि खाडकन् जागेच झालो. 
कानांनी मनाला मात्र पुढच्या गाण्यात गुंतवून टाकलं होतं. त्यामुळे झक मारत पुढचे शब्द ऐकत होतो. 
ते पाहा, तुमचं मनही भिजलेलं, 
कशानं, प्रेमानं प्रेमानं प्रेमानं प्रेमानं 
ही खास जागा आमच्या विशेष पसंतीची, कलिजा खल्लास करून जाणारी. 
या प्रेमगीताचं तुपकट भक्तिगीत करून टाकल्यानंतर या खास जागेचं या गीत-चकलीकाराने नेमकं काय केलं असेल, याची उत्सुकता होती. त्या ओळींच्या जागी 'ते शनिदेवांचं रूपही भिजलेलं' असं रूपांतर, पुढे 'कशानं' हा सवाल आणि त्यावर उत्तर 'तेलानं, तेलानं, तेलानं, तेलानं' असं आलं आणि आम्ही कोसळलोच...
प्रत्यक्षातही आम्ही शनि शिंगणापुरात थांबलेल्या भक्तवाहनातील आयाबायांच्या लोंढ्याबरोबर बाहेर फेकलो गेलो होतो आणि तोल न सावरून खरोखरचे कोसळलो होतो... 
आमच्याकडून आमच्याही नकळत घडलेलं हे साष्टांग दंडवत आसपासच्या भाविकांनी फारच सिरीयसली घेतलं हो. सगळे आमच्याकडे बोट दाखवून सांगू लागले, बघा बघा, भक्ती असावी तर अशी. देवाच्या दारात पोहोचताक्षणी बाबा आडवा झाला. लोकलाजेची तमा नाही बाळगली. त्या नास्तिक बायांना काय कळणार या श्रद्धेचं मोल. आम्ही उठून उभे राहिलो, तेव्हा दोनपाच जण आमच्याही पाया पडून गेले. आमच्या रूपाने कोणता देव, कोणता साधू किंवा कदाचित साक्षात् शनिदेवच अवतरले असतील, तर काय घ्या. एक नमस्कार हाणून ठेवलेला बरा, ही भावना. 
आता तुम्ही विचाराल, आमच्यासारखा नास्तिकशिरोमणी, देवधर्मनालस्तीअग्रणी बोरूबहाद्दर साक्षात शनिदेवाला साष्टांग प्रणिपात करायला कसा काय पोहोचला?
तर मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या गुप्त कामगिरीवर होतो. आमचे असंख्य येरू पत्रकारू बांधव ओबी व्हॅना लावून, कॅमेऱ्यासमोर माइकचे बोंडूक घेऊन कंठशोष करीत शनि शिंगणापुरात होऊ घातलेल्या रणकंदनाचे लाइव्ह रिपोर्टिंग करत होते. छापील माध्यमांचे पत्रवीर विविध संघटनांच्या, देवस्थानच्या प्रतिनिधींना पकडून पकडून त्यांच्याकडून खबर काढत होते. काही मंडळी सावलीचे कोपरे पकडून आपल्याला भेटलेल्या काल्पनिक भक्त-भक्तिणींच्या, आंदोलनकर्त्या महिलांच्या प्रतिक्रिया मनानेच लिहीत होते. आम्ही मात्र इथे संपादकांनी खास सोपवलेल्या कामगिरीवर होतो. या सगळ्या गदारोळामागचे राज काय आहे, शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिल्या-न दिल्याने राज्याच्या, देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे, शनिमहाराजांची कोणावर कृपा होणार आहे आणि कोणावर ते कोपणार आहेत, कोणाची साडेसाती सुरू होणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही येथे गुप्त वेषात पोहोचलो होतो. 
कपडे झटकून आम्ही कामाला लागलो. अशा मोहिमांमध्ये गरमागरम मिसळ, वडापाव, उसळपाव, शँपलपाव देणाऱ्या हाटेलांमधले पोऱ्ये, मालक आणि गिऱ्हाइकं यांच्या माहितीचा फार उपयोग होतो, असा आमचा अनुभव असल्याने आम्ही तडक अशा एका उपाहारगृहाचा रस्ता धरला. आता सकाळच्या वेळी आम्हाला कडाडून भूक लागला होता आणि चुर्रर्रर्र आवाज करत तापल्या तेलात पडलेल्या कांदाभज्यांच्या घाण्याने आमच्या घ्राणेंद्रियात अदृश्य लगाम ओवून आम्हाला तिकडे खेचले होते, हेही खरेच. पण, आमच्या दृष्टीने काम अधिक महत्त्वाचे.
म्हणूनच तीन प्लेट मिसळी, दोन प्लेट भज्या, दोन पाव चापल्यानंतर वडा-शँपलच्या जळजळीत रसायनात पावाची स्लैस बुडवत आम्ही सवाल केला, थ्या शोणैवाशं क्वा प्रोकर्न आ. 
आमची गरगरीत चेहरेपट्टी, भज्यासारखं नाक, रात्रभराच्या प्रवासाने झालेला अवतार आणि ही भाषा ऐकल्यानंतर मालक म्हणाला, चायनीजची गाडी दोन चौक फुडं लागते. तिकडं हायेत तुमचे चिंकी लोक. त्यांना इचारा. 
घोटाळा लक्षात घेऊन आम्ही घास नीट गिळला, वर पाणी प्यायलो आणि डोळ्यांना लागलेल्या धारा पुसत विचारलं, अहो, मी मराठीच आहे. ते शनिदेवाच्या चौथऱ्याचं काय प्रकरण चाललंय, ते विचारत होतो. 
त्यावर गल्ल्यावरच्या मालकाने सावध होऊन विचारलं, तुम्ही काय प्रेसवाले का काय? 
आम्ही म्हणालो, छया ब्वॉ, आम्ही शनिदेवाचे भक्त आहोत. 
आसं आसं, मालक बोलला खरा, पण, त्याचा विश्वास बसला नव्हता. तो म्हणाला, अहो, हितं चार दिवस उपास करून आल्यासारखे बका बका येवड्या मिसळी चापणारे फकस्त पेपरवालेच असतात, म्हून इचारलं. आणखी एक शँपलपाव मागवण्याचा विचार मनातच रद्द करून आम्ही त्याला पुन्हा चौथऱ्यावर आणलं. तेव्हा तो म्हणाला, ह्यो चावनटपना का चाल्लाय काय समजत नाय. अवो, इक्ती वर्षं शनिदेवाच्या चौथऱ्यावर बायामान्सांना येन्ट्री न्हवती, तर कुनाचं काय अल्डं नव्हतं. आताच येकदम उठाव सुरू झालाय, तर त्यामागं शंबर टक्के डाव असनार. 
कुणाचा? 
त्या इशिसवाल्यांचा. 
अहो काय बोलताय काय, डायरेक्ट इसिस? त्यांना काय करायचंय आपल्या धर्माचं. त्यांचं त्यांना झालंय थोडं. 
आसं कसं? आपला धर्म खराब हय, असं शिद्द केल्याशिवाय त्यांच्या धर्माची पापुलारिटी कशी वाढंन? हाये का नाय पॉइंट. 
पण, मला सांगा, आपल्या धर्माची पापुलॅरिटी कायम ठेवायची असेल, तर बायांना द्यावी की एन्ट्री. इशिसवाल्यांचा डावच उलटून जाईल. 
आमची चर्चा पलीकडच्या टेबलावरनं ऐकणाऱ्या आणखी एका गिऱ्हाईकाने व्हॉट्सअॅपमधून डोकं बाहेर काढलं आणि ते म्हणाले, इसिस वगैरे काही नाही हो, हे सगळं लबाड फुरोगाम्यांचं कारस्थान आहे. मला सांगा मुळात त्यांना काय करायच्यात या धर्माच्या भानगडी? तुमचा विश्वास नाहीच्चै ना देवाधर्मावर. मग तुम्हाला कशाला हवाय चौथऱ्यावर प्रवेश? 
अहो, पण काका, नास्तिक पुरुष आणि बाया कशाला पडतील या लाखो मैल दूरवरच्या जळत्या वायुगोळ्याच्या भानगडीत? इथे नास्तिक पुरुषांनाही चौथऱ्यावर प्रवेश आहे आणि आस्तिक बायकांना नाही, असा प्रॉब्लेम आहे. काकांनी उत्तर न सुचल्याने आउचओई असे काहीतरी उद्गार काढले आणि आता काहीतरी बोलतील, आता काहीतरी बोलतील, असं वाटत असताना एकदम व्हॉट्सअॅपात डोकं खुपसलं. 
तेवढ्यात पलीकडच्या टेबलावरच्या दोन ताया सरसावल्या. आम्ही मुळीच माजू देणार नाही असला अनाचार देवाच्या दारात. देवावर श्रद्धा ठेवायची, तर देवाचे नियम पाळायलाच लागतात. शनिमहाराज हे पॉवरफुल देव आहेत याच्यावर श्रद्धा आहे ना त्यांची. मग त्या शनिमहाराजांनी घालून दिलेला नियम का नाही पाळायचा? 
अहो, पण शनिदेवाचा असा काही नियम नाहीये. सगळ्या शनिमंदिरांमध्ये नाहीये अशी प्रवेशबंदी. आम्हीही फेसबुकज्ञान पाजळलं. 
अहो, पण, स्थानमाहात्म्य नावाची काही गोष्ट असते की नाही? गणपती सगळ्या मंदिरांमध्ये सारखाच असतो की नाही? पण, एकीकडचा राजा नवसाला पावतो, दुसरीकडचा प्रसिद्धीविनायक सेलिब्रिटींना फळ देतो, असा कृपेमध्ये फरक असतोच की नाही? अहो, आमच्या धर्मात ढवळाढवळ करायला निघालेल्या त्या बायांनी आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या बाप्यांनी आधी मशिदीत जाऊन दाखवावं, मग मंदिरप्रवेशाला यावं, तिथे कशी दीड हात फाटते, ते पाहा. एक उग्र रूपाचे टिळेधारी हातातल्या काठीच्या अर्थपूर्ण हालचाली करत म्हणाले. 
हिंदू महिला मशिदीत कशाला जातील? त्यांना आपल्या देवाच्या चौथऱ्यावर प्रवेश नाही, तर मशिदीत कोण घेईल? त्यांना काय मुसलमान धर्म स्वीकारायला सांगताय का काय? त्यांचा धर्मावर विश्वास आहे, देवावर विश्वास आहे, शनिदेवाच्या देवत्वावर पण विश्वास आहे. पण, शनिदेवाच्या दरबारातला हा भेदभाव काही देवाने केलेला नाही, त्याच्या नावाने पोळी भाजून घेणाऱ्या लबाड माणसांनी केला आहे, अशी त्यांची भावना आहे. तो भेदभाव दूर करा, ही त्यांची मागणी आहे. 
अगं बाबौ, अवो काय बोलताय काय पावणे. भक्त म्हणायचे तुम्ही का शेकुलर फुरोगामी? द्येवाच्या दारात बायांना प्रवेश न्हाई कारन द्येवाची किरनं लय पावरफुल असतात, ती बायामान्सांना सहन व्हायची न्हाईत. भुसनळ्यासारख्या पार पेटून जातील राव बाया जागच्या जागी चौथऱ्यावर. लय पावरफुल हायेत शनिम्हाराज. त्यांच्या ज्ञानाचे किरण हे व्हॉट्सअॅपवरच्या भंगड फॉरवर्ड पोष्टींमधून उमटले होते आणि त्यांचीच दिव्य प्रभा त्यांच्या मुखावर फाकली होती, हे स्पष्टच होतं. 
आसंय होय. मग तर या द्वाड बायांची खोड मोडण्याची पण ही नामीच संधी आहे की. ज्यांना एवढी हौस आलेली आहे आपलं भस्म करून घेण्याची. त्यांना सरळ चढू द्यावं चौथऱ्यावर. लाइव्ह कॅमेऱ्यासमोर भस्म झालं की आपल्या देवाची, आपल्या धर्माची, आपल्या परंपरांची, आपल्या किरणांची पावर सगळ्या जगाला एकदमच कळून जाईल. बरोबर का नाय? 
यावर मंडळी जरा बुचकळ्यात पडली. 
पण, समजा, या बायांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्यावर कसलाही वाईट परिणाम झाला नाही, तर? 
असं कसं होईल, देवाची ताकद दिसणारच, आज नाही तर उद्या फळं भोगायला लागणार, त्यांना कुठली भोगायला लागतायत, आपल्याला स्थानिक ग्रामस्थांना भोगायला लागतील, अशा आरोळ्या उठायला लागल्या. 
आम्ही पाताळविजयम सिनेमातल्या रावणासारखे खदखदा हसू लागल्यामुळे सगळा गलका शांत झाला. 
मालकाने रागीट मुद्रेने विचारलं, आमी काय येडे हाओत काय पावणे, हासताय कशापायी? 
अहो, वेडे नाही तर काय? इतकी वर्षं इथे कुलूपच नसतं, सगळं सेफ राहतं, या श्रद्धेने सामान ठेवणाऱ्यांच्या वस्तू तेवढीच वर्षं व्यवस्थित चोरीला जातायत, त्या चोरणाऱ्यांवर आजवर कुठे कसला कोप झालाय, सांगा सांगा...
...शनिमहाराजांचं माहिती नाही, पण, भक्तांचा कोप काय असतो, हे आम्हाला चांगलंच कळून चुकलंय. असो. 
आता शरीराचे यच्च्यावत सगळे अवयव रगडण्याशिवाय गत्यंतर नाही...
कशानं?
तेलानं, तेलानं, तेलानं...

एक शून्य बाजीराव!

आम्ही संतापाने थरथरतच थिएटरात शिरलो...
दारावरच्या गुरखाछाप दिसणाऱ्या इसमाने आमच्या गबाळ्या वेषाकडे पाहून हा तंबू थिएटरवाला १५० रुपये तिकिटाच्या थेटरात कसा घुसतोय म्हणून पुणेकरांना लाजवेल इतक्या तुच्छतेने तिकिटाची पृच्छा केली आणि आम्ही (हपीसाच्या खर्चाने काढलेले) २०० रुपड्यांचे सोफाखुर्चीचे तिकीट दाखवले, तेव्हा ते खरे आहे की डुप्लिकेट हे सगळ्या दरवानांनी आणि नंतर म्यानेजरानेही दस्तुरखुद्द येऊन चेक केले, ही गोष्ट आमच्या काळजाला लागली, यात काही शंका नाही. पण, ही गोष्ट संतापाने थरथर व्हावी एवढी दिलावर घेण्याइतके आम्ही क्षुद्र मनोवृत्तीचे नाही. आमच्या कामामुळे आम्हाला ठिकठिकाणी वेषांतरे करावी लागतात, त्या आमच्या कौशल्याला मिळालेली ही पावतीच मानतो आम्ही. सिनेमातले तमाम खलनायक नाही का रस्त्यात एखाद्या माताभगिनीने पापी, चांडाळ, नीच, बलात्कारी असा उद्धार करत श्रीमुखात भडकावून दिली, तरी ती पावतीच मानून घेतात... त्यातलाच हा प्रकार. 
पाहा, पुन्हा सिनेमातलंच उदाहरण सुचलं आणि आमचा संताप पुन्हा अनावर झाला... मग त्या दिवशी तो किती झाला असेल याची तुम्हाला कल्पना नाही...
आमच्या संतापाला तो नतद्रष्ट सिनेमाच कारणीभूत होता, हे आता सांगायला हरकत नाही... आम्ही हपीसातून खास खर्च मंजूर करवून घेऊन (तिकीट प्लस ट्याक्सी मिळून २७२ रु. मात्र) या खास मोहिमेवर आलो होतो... सिनेमागृहाच्या दारात पोहोचताच आमची जी निराशा झाली ती आत प्रविष्ट होईपर्यंत घनघोर निराशेत रूपांतरित झाली...
सिनेमागृहाच्या दारात कोणत्या दृश्याची कल्पना केली होती आम्ही! 
थिएटराबाहेर कट्टर देशभक्त, इतिहासप्रेमी मरहट्ट्यांची गर्दी असेल... जोरजोराने घोषणा सुरू असतील... आत जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेमाने (आठदहाजण मिळून एकाला प्रेमाने विचारतात तेव्हा त्याचा प्रेमातिरेकाने जो थरथराट होतो, तो पाहण्यायोग्य असतो) विचारतायत, तुम्ही कोणता सिनेमा पाहायला जाताय? त्यात आपल्या वीरपुरुषाची काय विटंबना केली आहे, आपल्या पूर्वजांचे काय चारित्र्यहनन केलं आहे, याची तुम्हाला जराही कल्पना नाही काय? असा घाणेरडा सिनेमा पाहून आपण कोणत्या अघोरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याला उत्तेजन देत आहोत, याचा विचारही तुमच्या मनाला शिवला नाही काय? कुठे फेडाल हे पाप? साडेआठ फूट उंचीच्या, ७५ किलोची तलवार लिलया पेलणाऱ्या आणि ४१ लढाया जिंकलेल्या राऊंच्या ओजस्वी इतिहासावरचे हे छटेल शिंतोडे तुम्ही कसे काय सहन करत आहात? 
कुठाय तुमचा पुरुषार्थ? 
कुठाय तुमचा धर्माभिमान? 
कुठाय तुमचं ते हे? कुठाय तुमचं ते ते? 
बाजीरावभक्तांच्या या प्रश्नसरबत्तीपुढे हतबल होऊन प्रेक्षक स्वहस्ते तिकीट फाडत असेल आणि भोवतालच्या गर्दीत सहभागी होऊन राऊंच्या इतिहासाचे डोस येणाऱ्या नव्या गिऱ्हाइकाला पाजत असेल (एवढे पैसे मोजल्यानंतर तीन तास काहीतरी टाइमपास नको का), असं आम्हाला वाटलं होतं... पण, इथे अजबच दृश्य होतं...
थिएटरबाहेर तुफान गर्दी होतीच, पण ती हा सिनेमा चवीचवीने पाहणाऱ्यांची... 
जोरजोराने हाकारे सुरू होते... पण, ते गर्दीत आपल्या मित्रपरिवाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी (त्यातून काही अपरिचितांचं लक्षही वेधलं जात होतं... अंगठ्यावर समोरच्याच्या बुटाचा जाड सोल पडला आणि अंगठा चिरडला की त्याला भलतीकडे लक्ष दिल्याचा पश्चात्ताप व्हायचा ते सोडा... अजून बँडेजातच आहे आमचा अंगठा...). लोक एकमेकांशी बोलत होते, ते सिनेमाबद्दलचे कौतुकोद्गार होते. ते ऐकून आमच्या कानात शिसं ओतलं जात असल्यासारखी भावना होत होती. 
आम्ही काही मंडळींशी संवाद साधून हा अनाचार थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोनतीनजणांनी काढता पाय घेतला, काहींनी छुट्टा नही है, असं सांगितलं आणि एकाने (पैसा नहीं मिलेगा, असं सांगत) शेजारच्या स्टॉलवरून प्रेमाने वडापाव आणून दिला. असेल हा वडापाववाल्याच्या प्रमोशनचा भाग म्हणून आम्हीही तो तोंड पोळत असताना बकाणे भरभरून खाल्ला... नंतर त्याच्या त्या कृतीचा अर्थ उलगडल्यानंतर आम्ही शरमेने काळवंडणार तेवढ्यात लक्षात आले की ही तर आमच्या वेषांतर-कौशल्यालाच मिळालेली पावती. आम्ही संतापाने खदखदत आत शिरलो आणि विचार केला की आपल्या या वेषांतरात आपण दरवानालाही या सिनेमाच्या घातक परिणामांची माहिती सांगायला जाऊ, तर तो कदाचित तिकीट असूनही धक्के देत बाहेर काढेल. त्यापेक्षा थिएटरच्या अंधारात प्रबोधन केलेले बरे.
आम्ही आत शिरलो तेव्हा जाहिराती सुरू झाल्या होत्या. दिवे मालवले गेले होते. अंदाजाने ठेचकाळत, धडपडत आम्ही सीटवर जाऊन पोहोचलो आणि दोन्ही बाजूंनी दोन सुगंध आमच्या नाकात शिरले. आम्ही जातिवंत खबरी. आमचं नाकही तीक्ष्ण. क्षणार्धात आम्हाला कळलं की डावीकडून येणारा सुगंध हा मस्क प्रकारातला म्हणजे रांगडा मस्क्युलाइन आहे आणि उजवीकडून येणारा सुगंध हा फ्लोरल म्हणजे फुलांच्या सुगंधाजवळ जाणारा नाजुक गंध आहे. याचा अर्थ डावीकडे कोणीतरी पुरुष बसलाय आणि उजवीकडे महिला. आमचा कल लगेचच उजवीकडे झाला. तशी आमची विचारसरणीही तीच. त्यामुळे झुकाव तिकडेच. पण, झुकता झुकता एकदम खरखरीत दाढीच लागली गालाला, तेव्हा एकदम झटका बसल्यागत आम्ही सरळ झालो. मग सवय नसताना, आशा अमर असते म्हणून डावीकडे झुकू लागलो... तिथे गालाला गालाचा झुळझुळीत स्पर्श होतो ना होतो तोच एक जबरदस्त पंच गालावर बसला आणि तीन दातांनी स्थान सोडलं हे जीभ घोळवल्यावर लक्षात आलं. सीधे बैठो हा दोन्हीकडून आलेला आदेश आता शिरसावंद्य मानण्यावाचून गत्यंतर नव्हतं. 
ठणका थोडा कमी झाल्यानंतर आम्ही कसेबसे उद्गारलो, का असला घाणेरडा सिनेमा बघताय तुम्ही? 
घाणेरडा? ... डावीकडच्या मेरी कोमचा प्रश्न. 
तुमको कैसे मालूम? तुमने पयले देखा है क्या? ... उजवीकडच्या गुंड्याची पृच्छा. 
देखनेको कायकू पडता है... हम मराठी है... हमकू सब मालूम है ये गुज्जूभायने कैसा वाट लगायेला है हमारे वीर बाजीराव का? 
तुमको कैसे मालूम? तुम बाजीराव के साथ स्कूल जाते थे क्या? ... पुन्हा उजवीकडून प्रश्न. 
आम्हीही मर्द मराठ्याचे बच्चे. महाराज म्हणजे आमचा पंचप्राण. महाराष्ट्राचा त्यांच्यानंतरचाच इतिहास आम्हाला तोंडपाठ. यत्ता चौथी ते दहावीपर्यंत शिकलेला. आधीचं काही माहिती नसलं म्हणून काय झालं? आम्हीही बाणेदारपणे, त्वेषाने उत्तरलो, अरे म्हणजे काय, हमने भी इतिहास पढ्या है? 
कुठे वाचलात तुम्ही काका? ... डावीकडची मस्कसुगंधित कन्या... 
(काका? का का?) म्हणजे काय, शाळेत होता आम्हाला? झालंच तर ते आपलं ते हे, ते काय ते कोण ते इनामदार का काय होते, त्यांचं पुस्तकही वाचलंय आम्ही ... दिलं ठोकून आम्ही अंदाजपंचे. 
ना. सं. इनामदारांची राऊ वाचलीयेत का तुम्ही? त्यावरच आधारलाय हा सिनेमा ... डावी बाजू कुजबुजली. 
अहो, पण त्यात काय बाजीराव नाचताना दाखवलाय का? काशीबाई आणि मस्तानी एकत्र पिंगा खेळताना दाखवल्यात का? ... आमचा सात्विक संताप अनावर झाला की तोंडातले दात पडल्याच्या दु:खाचाही विसर पडतो आम्हाला. 
लेकिन वो नाचे नहीं, ऐसाभी तो लिखा नहीये ना इनामदार साबने? एक इतना बडा योद्धा इतनी लडाइया करने के बाद अपने जाँबाज सिपाहियों के साथ थोडा मस्ती करता है, तो आपको क्या परेशानी है?... उजवा शेजारी फार प्रश्न विचारतो बोवा. 
राव लढाईला गेल्यानंतर विरंगुळा म्हणून काशीबाई आणि मस्तानी आल्या एकत्र खेळायला तर तुमचं काय बिघडलं हो? ... डावा प्रश्न. 
अहो, पण इतिहासाला धरून नाहीये ते? ... आम्ही कळवळलो. 
ज्या राऊमधून तुम्ही इतिहास शिकलात, तीसुद्धा एक कादंबरी आहे, काल्पनिक, इतिहासाचा आधार घेऊन लिहिलेली, पण खराखुरा इतिहास नसलेली, आता मागच्या रांगेतून कोणीतरी कानाशी येऊन खसफसला, दाढी टोचली हो, उद्या कोणीतरी हा सिनेमा पाहील आणि त्यातून इतिहास शिकेल, तेव्हा कदाचित खऱ्या इतिहासाचं पुस्तक जाळतील लोक संतापून... सिनेमाबरहुकूम नाहीये म्हणून. 
या तिहेरी माऱ्याने आम्ही जेरीला आलो असताना अचानक सगळीकडून आवाज येऊ लागले, अरे गप्पा मारायच्यात तर बाहेर निघून जा, आम्हाला शांतपणे सिनेमा बघू द्या. 
काय करणार? आम्हीही तो अनैतिहासिक सिनेमा चवीने पाहात बसलो आणि पाहता पाहता गुंगलो. नाचरा बाजीराव आणि पिंगा घालणाऱ्या काशी-मस्तानी यांना पाहून उठून ओरडावेसे वाटेना, लोकांचा रसभंग करावासा वाटेना... इतकी सहिष्णुता दाटून आली की तब्येत बिघडली हे आम्ही समजून जातो... दातदुखीचा परिणाम असावा... सिनेमा संपल्यानंतर दिवे पेटले...
आमच्या डोस्क्यात दिवे पेटवणारे महानुभाव कोण, म्हणून डावीउजवीकडे पाहिले आणि मागेही नजर टाकली... आणि तीन ताड उडालोच...
डावीकडे साक्षात काशीबाई, उजवीकडे साक्षात बाजीराव आणि मागे होते साक्षात भन्साळी. 
आमचा वासलेला आ शून्यवत दिसत होता, असं नंतर डोअरकीपरने हाताला धरून बाहेर काढताना सांगितलं.

Saturday, February 20, 2016

अ-मन की बात

वन, टू, थ्री... माइक टेस्टिंग... 
आम्ही न राहवून बोललो आणि जीभ चावली. 
समोर कोणतंही रेकॉर्डिंगचं यंत्र आलं आणि कानावर हेडफोन आले की आमच्याकडून नकळत हे शब्द बाहेर पडतात आणि काहीवेळा गोची होते... 
एकदा सार्वजनिक स्वच्छतागृहात गाणी ऐकत देहधर्म करण्याचा तांबेगुर्जींचा सल्ला अमलात आणत असताना हाच घोळ झाला आणि बाहेरचा हास्यस्फोट ऐकल्यानंतर आम्हाला तसंच बाहेर यावं लागलं होतं... म्हणजे काही न करता हो, तसंच नाही. 
आता मात्र आम्ही न राहवून बोललेलं समोर कोणालाही ऐकू जाणार नसल्याने बचावलो. आमच्या कानावर होती ती गुप्त रेकॉर्डिंग ऐकवणारी यंत्रणा... सीबीआय आणि रॉ यांनी मोसादकडून मागवलेली ही यंत्रणा अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण, आम्ही मात्र एफबीआयमधल्या ओळखींचा वापर करून ती खास मोहिमांकरता मागवून घेतली आहे. ही यंत्रणा आज सुरू करण्यासाठी कारणही तसंच घडलं.
संपादकांनी अर्जंट बोलावून घेतलं... म्हणाले, काय हे बहिर्जी? आप से हमे ये उम्मीद नहीं थी. 
संपादक हिंदीत बोलायला लागले की आमच्या लक्षात येतं, हे एक तर अमन की आशा कार्यक्रमाला तरी जाऊन आलेत, नाहीतरी जिंदगी चॅनेलवर पाकिस्तानी मालिका तरी पाहून आलेत. 
नूर पाहून प्रतिप्रश्न केला, नाचीज से कोई गुस्ताखी हुअी क्या? 
ते सुस्कारा सोडत म्हणाले, भारत-पाकिस्तान संबंधांचं काय चाललंय ते तुम्हाला दिसत नाहीये का? 
दिसतंय की. 
मी बोललो नरूला... हे ऐकताच लालपिवळे होत्साते संपादक गर्जले, खामोश, असली सबनिशी मिजास माझ्याकडे चालणार नाही. जीभ हासडून ठेवेन. एकेरीतला उल्लेख खपवून घेतला जाणार नाही. 
साहेब, अहो पण माझ्या बालमित्राला मी अहोजाहो केलं तर तो मला चपलेने सडकेल. 
आता तर संपादकांनी पेपरवेटच हातात घेतला, बालमित्र?... देशाचा सर्वोच्च नेता तुमचा बालमित्र? तुम्ही त्या एफबीआय आणि मोसादच्या नावाने फेका मारता, त्या ऐकून घेतो म्हणून काहीही बरळाल. 
स्वसंरक्षणार्थ एक जाडजूड पुस्तक उचलून चेहऱ्यासमोर धरून आम्ही कळवळून ओरडलो, अहो, पण मी कुठे म्हणालो की देशाचा सर्वोच्च नेता माझा बालमित्र आहे. मी तुम्हाला माँटेसरीपासून माझ्यासोबत असलेल्या नरवणेबद्दल सांगत होतो. 
प्रचंड फुगलेल्या फुग्याला टाचणी लागावी, तसे संपादक चुरमडून खुर्चीत कोसळले. ग्लासभर पाणी आणि कपभर चहा पाजून त्यांना माणसांत आणल्यानंतर आम्ही भीत भीत त्यांना म्हणालो, त्या संभाव्य चर्चांचे वृत्तांत सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये येतायत. आपणही एजन्सीच्या बातम्या वापरतोय. दिल्लीतले प्रतिनिधी काम करतायत? 
अहो, पण तुम्ही काय करताय? या सगळ्या कोरड्या बातम्या झाल्या. या बातम्यांच्या मागे काय घडामोडी घडतायत, तेच जर आपल्या वर्तमानपत्रात येणार नसेल, तर या वर्तमानपत्रात साक्षात बहिर्जी असून उपयोग काय? 
स्वत:ला थोरले महाराज कल्पून संपादक आम्हाला चावी मारतायत हे आमच्या लक्षात आलं आणि आम्हीही पावशेर स्फुरण चढवून घेतलं आणि लगोलग घरी आलो. 
आलात वाटतं हाफ डे टाकून? आता पोटमाळ्यावर काम करतोय असं सांगून घोरत पडाल रात्रीपर्यंत, हे पत्नीचं स्वागतपर भाषण कानावेगळं करत आम्ही तडक पोटमाळा गाठला आणि दार लावून घेतलं. घोरण्याच्या आवाजाची टेप चालू केली आणि जुनाट कात्रणांच्या ट्रंकेतून आमचा गुप्त रिसीव्हर बाहेर काढला. त्याचे हेडफोन कानाला लावल्यानंतर काय झालं, ते आम्ही तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर जीभ चावून आम्ही फ्रिक्वेन्सी ट्यून करायला घेतल्या. काही पाकिस्तानातल्या आणि काही भारतातल्या फ्रिक्वेन्सी होत्या. जुन्या काळातला रेडिओ आठवतो का तुम्हाला व्हाल्व्हचा? त्यात जसं नॉब अगदी अल्लाद फिरवून दोन परदेशी स्टेशनांच्या मधलं रेडिओ सिलोन जसं हळुवारपणे ट्यून करायला लागायचं, तशाच प्रकारे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींच्या जंजाळामधून आम्ही वाट काढत होतो... दोन्ही देशातल्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर डासाच्या पायाएवढ्या आकाराच्या मशकाच्या रूपात भिरभिरणारे आमचे मायक्रोफोन एचडी क्वालिटीचा साऊंड आमच्या कानावर आणून आदळवत होते... ट्यूनिंग करता करता कानावर काय पडलं, ते बा वाचका, खास तुझ्यासाठीच पेश करतो आहोत.
स्थळ पहिले 
हे पाकिस्तानातले स्थळ असावे. संवादाची सुरुवात सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलामने झाली, त्यावरून आम्ही चाणाक्षपणे हा अंदाज काढला.
आवाज एक : एक बुरी खबर है जनाब.
आवाज दोन : क्या दुश्मन ने हमारे जिहादी सिपाहियों को फिर से मार गिराया है?
आवाज एक : नहीं जनाब, उस से भी बुरी खबर है?
आवाज दोन : क्या खबर है, बोलो तो.
आवाज एक : जनाब, वो हम से अच्छा रिश्ता बनाने की पहल कर रहे है.
आवाज दोन (इथून पुढे मराठी भाषांतर, तुमच्या आणि आमच्या हिंदीची किती परीक्षा घ्यायची?) : काय बोलताय काय? डोकं ठिकाणावर आहे ना त्यांचं? ते काँग्रेसवाले असले येडचाप उद्योग करत बसायचे. आता हे आलेत तर परिस्थिती जरा बदलेल असं वाटलं होतं. पण, हे तर त्यांच्यापेक्षा भोळसट दिसतायत.
आवाज एक : जनाब, अटलजींना विसरलात वाटतं. तेही यांचेच होते.
आवाज दोन : हं... तेही खरंच म्हणा. केवढा उद्योग झाला होता तो प्रेमप्रसंग निस्तरताना. असो. आपले गुड्डे मियाँ आताही लगेच गुलाबी गुलाबी झाले असतील माशुका भेटायला आल्यासारखे. 
आवाज एक : क्यूं नहीं होंगे जनाब? त्यांना जोडीने नोबेल पीस प्राइझ स्वीकारण्याची स्वप्नं पडत असतात.
आवाज दोन (कठोर स्वरात) : नींद गहरी होने से पहले ही सपना टूट जाए यही अच्छा होगा.
आवाज एक : जो हुकूम जनाब.
***
अचानक स्टेशन खरखरायला लागल्यामुळे आम्ही नॉब आणखी थोडा फिरवला. हुईंचकिर्रक्रुत्रिकिश्श्शसससूंसूंसूंच्युईं असा काहीतरी अर्वाच्य आवाज काढत काढत सुई पुढच्या स्टेशनावर पोहोचली.
स्थळ दुसरे 
आवाज एक : बधाई हो सर.
आवाज दोन : किस चीज की भाई?
आवाज एक : आप ने तो दुश्मन के छक्के छुडा दिये. वो ये सोच रहे थे कि आप अब उनकी करारी खबर लेंगे, आप ने प्यार की झप्पी दे दी. उन्होने सोचा था की आप उन की ईंट की ईंट बजा देंगे, आप ने तो ये दोस्ती हम नहीं तोडेंगे की सीडी बजा दी. सिक्सर लगा सर सिक्सर.
यानंतर बराच काळ क्लिकक्लिकाट ऐकायला येतो. हा फोटोग्राफरांच्या कॅमेऱ्यांचा आवाज असावा. कदाचित सेल्फ टायमर लावलेल्या सेल्फी काढणाऱ्या मोबाइलचा.
आवाज दोन : अरे भाई मै तो बचपन से ये चाहता था कि दोनों देश भाईचारे से एक दुसरे के साथ रहे...
आवाज एक : तुम्ही समझौता एक्स्प्रेसमध्येही चहा विकायचात का सर?
आवाज दोन : अरे नहीं भाई, ट्रेन टु पाकिस्तानवाली ट्रेन होती ना स्वातंत्र्यपूर्व काळातली, तिच्यात. 
आवाज एक : आप तो तक्षशीला मे भी चाय बेच चुके है, तो आप के जनम के पहले चलनेवाली ट्रेन कौन सी बडी बात है आप के लिए? लेकिन सर, तुमचे चाहते थोडेसे नाराज आहेत. त्यांना वाटतंय की काँग्रेसींप्रमाणे तुम्हीही सापाला दूध पाजताय. आप को अटलजी बनने का चस्का लगा हुआ है, ऐसा भी कहते हैं अपनेही परिवार के लोग. तुम्ही दीड वर्षाआधी शत्रूशी चुम्माचाटी करणाऱ्या काँग्रेसवर कसे तुटून पडला होतात, ती भाषणंही ट्विटरवर ट्रेंडिंग आहेत...
आवाज दोन (अगदी रिलॅक्स स्वरात) : कहने दो उन्हे जो कहना है... जोवर भक्तगण आहेत, तोवर मला पर्वा नाही, चिंता नाही... मुझे कल अगर निशान-ए-इम्तियाझ भी मिल जाए तोभी भक्त यही कहेंगे की यह नमोका पाकिस्तान को सबक सिखानेकाही तरीका है... हे पाहा, आतापर्यंत मी अर्धं जग फिरून आलोय, पण नॉर्वे अजून बाकी आहे... का?... कारण मी ठरवलंय की नॉर्वेला जाईन, तर नोबेल घेऊनच येईन... एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै अपने आप की भी नहीं सुनता.
आवाज एक : लेकिन सर... आपल्याच परिवारातले लोक तुमच्या या अमनपसंदीच्या विरोधात आहेत... नागपुरात काही गडबड झाली तर?
यावर आवाज दोन अशा काही गर्भित स्वरात हसला की आम्ही ताबडतोब मॅन्युअल हुडकून, ट्यूनिंग तंत्र पणाला लावून नागपूर स्टेशन गाठायचा प्रयत्न सुरू केला.पुन्हा हुईंचकिर्रक्रुत्रिकिश्श्शसससूंसूंसूंच्युईं. मग स्टेशन लागलं.
***
स्थळ तिसरे
इथे पिनड्रॉप शांतता.
आवाज एक : प्रणाम गुरुजी.
आवाज दोन : प्रणाम.
पुन्हा जीवघेणी शांतता.
आवाज एक (चुळबुळत) : काही चुकलं का गुरुदेव?
खाकरण्याचे, चुकचुकण्याचे आवाज. 
बऱ्याच वेळानंतर.
आवाज दोन : तुमच्या अंगात खूप शौर्य संचारतंय सध्या. असा धडा शिकवायला हवा, तशी वेदना द्यायला हवी. हिंदी सिनेमे कमी पाहात जा जरा.
आवाज एक : गुरुदेव, गोव्यात राहून मला भलती व्यसनं नाहीत. सिनेमा पाहण्याची तर आमची संस्कृतीच नाही. मी देशवासीयांची भावना व्यक्त करत होतो. माफ करा गुरुदेव, पण मला वाटलं होतं की परिवाराचीही भावना हीच असेल. कोणालाही उठसूट मिठ्या मारणं ही आपली संस्कृती नाही. त्यांना मिठ्या मारणं, ही तर नाहीच नाही.
आवाज दोन : पण म्हणून तुम्ही शांततेची प्रक्रिया डहुळवणारी प्रतिक्रिया देणार? हिंस्त्र शब्द वापरणार? 
बुब्बुळे खोबणीत गरगरल्याचाही आवाज येतो बरं का... आईशप्पथ!
आवाज एक (भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत) : सोटे आणि लाठ्याकाठ्या घेऊन फिरणारे आपण शस्त्रपूजक. शस्त्रे अजूनही शमीच्या झाडावरच ठेवून द्यायची होती तर देशरक्षणाचा जिम्मा माझ्यावर सोपवला नसता, तर बरं झालं असतं. गोव्यात मी काही उंडा, मिरचीभजी आणि फज्याँवच्या उसळीला महाग झालेलो नाही अजून.
आवाज दोन : आता बरोबर बोललात. देशाचं रक्षण ही तुमची जबाबदारी आहे... भावंडांवर हल्ला ही नाही.
आवाज एक : मी राष्ट्र सेवादलाच्या कचेरीत तर आलो नाही ना चुकून? भावंडं? तुम्हीही जादू की झप्पीवाल्या मुन्नाभाईच्या नादी लागाल, असं वाटलं नव्हतं गुरुदेव.
आवाज दोन : मुन्नाभाई जे करतायत ते आमच्या आदेशानुसारच करतायत... तुम्ही आपलं अंतिम ध्येय विसरला आहात आणि अंतरिम ध्येयात अडकून पडला आहात... हे पाहा आपलं अंतिम ध्येय.
यानंतर कागदाची फडफड ऐकू आली, त्यामुळे कसलातरी कागद उलगडून दाखवला गेला असावा, असा कयास आहे. पाठोपाठ धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज क्र. एकच पडल्याचा आवाज असावा... त्या आवाजातून शेवटचे शब्द घरंगळले... अखंड हिंदुस्तानचा नकाशा... अरे बापरे, नंतर आर्यावर्त आणि मग सगळी वसुंधरा... 
यापुढे फक्त खरखर खरखर खरखर ऐकू येत होती...
...
...ती आमच्याच घोरण्याच्या आवाजाची होती, असं- तांब्याभर पाणी आमच्या डोसक्यावर उपडं केल्यानंतर- सौभाग्यवतींनी सांगितलं!