Monday, December 26, 2011

कौन बनेगा उच्छादपुरुष!

मित्रहो, महाराष्ट्रातील जनतेच्या कानामनांचा ‘निकाल’ लावणा-या आमच्या महास्पर्धेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आम्हाला- कोणत्याही स्पर्धेच्या संयोजकांप्रमाणे- हे सांगितलंच पाहिजे की ही स्पर्धा फार म्हणजे फारच टफ होती. काँपिटिशन टेरिफिक होती. कंटेस्टन्ट्स तगडे होते.. नेलबायटिंग फिनिश.. सॉरी सॉरी सॉरी.. टीव्ही चॅनेलवरच्या टॅलेंट हंट काँटेस्ट होस्ट करून करून असं बोलण्याची हॅबिटच होऊन गेलीये.. म्हणजे शुद्ध मराठीत, दूरचित्रवाणी मालिकांच्या गुणवत्ता शोध स्पर्धाच्या सूत्रसंचालनाच्या सवयीमुळे आमचं मराठी हे असं आंग्लप्रदूषित होऊन गेलंय (बाय द वे, प्रोडय़ुसरसाहेब, हे शुद्ध मराठी वाक्य एका दमात बोलून दाखवण्याचीही स्पर्धा घेता येईल. प्लीज नोट.)
 
तर सांगायची गोष्ट म्हणजे ‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’, या आमच्या देशविदेशात अतीव लोकप्रिय झालेल्या स्पर्धेसाठी अपेक्षेनुसार स्पर्धकांमध्ये फार मोठी स्पर्धा होती. यात अर्थातच आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. महाराष्ट्राची एकंदर उच्छादाची परंपराच तेवढी मोठी आहे. वर्षभर न थकता एकापाठोपाठ एक उच्छादी उत्सव करणारा प्रांत ही आपली देशातच नव्हे, तर विदेशातही तयार झालेली गौरवपूर्ण ओळख आहे. महाराष्ट्र हा संगीतरसिकांचा प्रांत काही उगाच झालेला नाही. त्यामागे गल्लोगल्लीच्या उच्छादमहर्षीचे अपरंपार कष्ट आणि सामान्यजनांचा वर्गणीरूपी (कोण रे कोण तो खंडणी म्हणतोय, घ्या त्याला कोपच्यात) आशिर्वाद आहे. बेंजोवादकांची अथक मेहनत, मुक्तशैलीतील नृत्याविष्काराचे दर्शन घडविणारे हौशी पण समर्पित नर्तक, त्यांना ‘ऊर्जा’ पुरवणारे देशी-विदेशी बार या सर्वाचे योगदान विसरता येणारे नाही. स्पीकरच्या भिंतींमधून छातीच नव्हे, तर इमारतींच्या भिंतीही हादरवणा-या ध्वनीलहरींचं प्रक्षेपण करणा-या तंत्रज्ञांचे आभार तर किती आणि कसे मानावेत, हे शब्दात व्यक्त करता येत नाही. करता आलं असतं तरी त्यांनीच निर्माण केलेल्या या गोंगाटात ते किती श्रोत्यांपर्यंत पोहोचलं असतं, याबद्दल शंकाच आहे.
 
आपली परंपरा टिकवण्यासाठी किती झटतात हे लोक. दिवस बघत नाहीत की रात्र बघत नाहीत; किती वाजलेत, लोकांची झोपायची वेळ आहे की जागं राहायची, याची फिकीर करत नाहीत; वाटेत हॉस्पिटल आलंय की शाळा आलीये, याची पत्रास ठेवत नाहीत; शांततेनं जगण्याचा लोकांचा अधिकार धार्मिक ‘जागृती’पुढे य:कश्चित क:पदार्थ मानतात, सायलेन्स झोन वगैरे थेरं थेट फाटय़ावर मारून सरकारच्या जुलमी अमलाला क्रांतिकारकांसारखं ओजस्वी आव्हान देतात; हे सगळं कशासाठी- तर नि:स्वार्थ भावनेनं आवाज निर्माण करण्यासाठी, आपल्या (अ)संस्कृतीचा आवाज सर्वदूर पसरवण्यासाठी.
 जरा विचार करा. या उच्छादाचा या धर्मप्रसारकांवर काहीच परिणाम होत नाही का? या शूरवीरांचे कान फाटत नाहीत का? आवाजाच्या हादऱ्यांनी छाती कंप पावून त्यांचं ब्लडप्रेशर वाढत नाही का? त्यांच्या घरातली तान्ही बाळं झोपेतून दचकून उठून किंचाळू लागत नाहीत का? त्यांच्या घरातल्या मुलांच्या झोपेचं, अभ्यासाचं आणि करीअरचं खोबरं होत नाही का? ज्या हॉस्पिटलच्या बाहेर ते उच्छाद मांडतात, त्यात त्यांच्या रक्तानात्याचं कोणीच कधी अ‍ॅडमिट नसतं का?.. तरीही ते घेतलेलं व्रत सोडत नाहीत. व्यक्तिगत लाभहानीचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यांच्या कानामनात फक्त ‘धतडततडततडततड’चा ठेकाच गुंजत असतो.
इतक्या थोर परंपरेचे पाईक जिथे गल्लोगल्ली आवाजमश्गुल अवस्थेत झिंगून नाचताहेत, त्या राज्यातून कोणीतरी एकच एक उच्छादपुरुष निवडणं, हेच अतिशय अवघड काम होतं. पण, हा काही कोणा व्यक्तीचा सन्मान नाही. तो या परंपरेचा सन्मान आहे. प्रातिनिधिक स्वरूपाचा बहुमान आहे. तो कोणाला लाभतोय याची उत्सुकता आपणा सर्वाबरोबर आम्हालाही आहेच. त्या महाविजेत्याचं नाव घोषित करण्याआधी पाहूयात अंतिम फेरीतील नामांकनं.
 
‘महाराष्ट्राचा उच्छादपुरुष कोण’ या स्पर्धेतलं पहिलं नामांकन आहे ‘खळ्ळ खट्य़ॅक’ या आवाजाचीच ओळख मिरवणारे मनसेराज कृष्णकुंजकर यांचं.. महाराष्ट्रात ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नावर एकेकाळी एकसुरातून उत्तर यायचं, ते दोन सुरांत विभागण्याचं श्रेय कृष्णकुंजकरांना जातं. आता तर या प्रश्नावर गिल्लाच ऐकू येतो ते सोडा. कृष्णकुंजकरांची मूळ परंपराच आवाजी. त्यांच्या काकांनी महाराष्ट्राला आवाजी पुढाऱ्यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. बोलके नेते हे कर्त्यां नेत्यांना भारी पडू शकतात, हे पहिल्यांदा दाखवून दिलं. तीच परंपरा कृष्णकुंजकर चालवत आहेत.
 
दुसरं नामांकन आहे, क्लिकेशकुमार फोटुबहाद्दर यांचं. हे कृष्णकुंजकरांचे चुलतभाऊ आहेत, हा योगायोग नाही. काकांची परंपरा यांना वडिलोपार्जित लाभली आहे. पण, दुर्दैवाने हे जेव्हा जेव्हा आवाज कुणाचा म्हणून हाळी देतात तेव्हा कॅमे-याची क्लिकच ऐकू येते, त्याला ते तरी काय करणार? वाघाची डरकाळी ऐकायला हल्ली यांना जंगलात जावं लागतं.
 
आजच्या स्पर्धेतलं तिसरं नामांकन आहे मीखिल आगळेवेगळे यांचं. यांनी ‘टीव्हीवरील उच्छाद’ असा एक वेगळाच उच्छादप्रकार मराठीत आणला आहे. दिवसा-रात्री-पहाटे कोणत्याही वेळी त्यांचं चॅनेल लावा, ते टीव्हीवर असतातच. हे घरी कधी जातात आणि टीव्ही कधी पाहतात, हे अखिल महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे. त्यांनी स्वत: टीव्ही पाहिला, तर कदाचित आपला उच्छाद कमी करतील, अशी काही प्रेक्षकांना आशा आहे. एक एकटा माणूस निव्वळ बडबड आणि हातवारे यांच्या बळावर किती उच्छाद निर्माण करू शकतो, याचं ते (शब्दश:) चालतंबोलतं उदाहरण आहेत.
 
या सर्व तगडय़ा स्पर्धकांना मागे सारून आजच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले महाराष्ट्राचे उच्छादपुरुष आहेत.. गृहकलहमंत्री आराराबा सांगलीकर ऊर्फ आबा तोंडपाटील. स्पर्धेत शेवटच्या क्षणी येऊन त्यांनी बाजी मारली. काही वर्षापूर्वी आबांनी बोबोबोलून या स्पर्धेत तगडं आव्हान निर्माण केलं होतं. पण, बेभान बोलण्याच्या नादात ‘बडे बडे शहरों मे ऐसे छोटे छोटे हादसे हो जाते है’ असं बोलून गेले आणि तोंडाला कुलूप बसलं ते कायमचंच. विधिमंडळातल्या एका क्रांतिकारक निवेदनानं त्यांना स्पर्धेत आणलं आणि विजयाची माळ त्यांच्या गळय़ात घातली. महाराष्ट्रभूमीचा उच्छादभूमी हा लौकिक कायम राखण्यासाठी आबांनी काय नाही केलं? पुण्यातल्या अनंत चतुर्दशीनंतर 10 दिवस चालणा-या विसर्जन मिरवणुकीवर कारवाई करणा-या धर्मद्रोही पोलिसांचे कान उपटून त्यांनी ती कारवाई मागे घेतली. शिवाय, आवाजबंदीविरोधात आवाज उठवून थेट सर्वोच्च न्यायालयरूपी दिल्लीच्या तख्तालाच आव्हान दिलं. पारंपरिक उत्सवांच्या उच्छादासाठी वर्षातले 12 दिवस कमी पडताहेत, ते आणखी वाढवावेत, अशी शिफारसच त्यांनी केंद्र सरकारकडे केलीये. आबा, तुमच्यासारखे द्रष्टे नेते लाभले तर लवकरच आपल्या राज्यात वर्षातले 365 दिवस रात्रंदिवस बेबंद धांगडधिंगा घालण्यासाठी खुले ठेवता येतील. हवं तर अभ्यास करणारी मुलं, आजारी माणसं, लहान बाळं आणि अल्पवयात (कानामनाने) बधीर होऊ न इच्छिणारे शांतताप्रेमी नागरिक यांच्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात गृहनिर्माण योजना सुरू करता येईल.
 
धतडततडततडततड
 
उच्छादपुरुष आबा, आगे बढो
 
धतडततडततडततड
 
हम तुम्हारे साथ है
 धतडततडततडततड

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २५ डिसेंबर, २०११)

Monday, December 19, 2011

सामर्थ्य आहे वंगणाचे!

शहाणा माणूस कोर्टाची पायरी चढत नाही म्हणतात.. अधिक शहाणा माणूस सरकारी ऑफिसचीही पायरी सहसा चढत नाही..
 
..रया गेलेली कळकट्ट इमारत, पोपडे उडालेल्या भिंती, करकरत गरगरणारे पंखे, बाबा आदमच्या काळातल्या टेबल-खुर्च्या, फायलींच्या चळती, भकास, उदास, दुर्मुखलेलं कुंद वातावरण, काम करण्याची शिक्षा शक्य तेवढी टाळण्याच्या प्रयत्नात असलेले तुसडे कर्मचारी, कामानिमित्त केल्या जाणा-या विचारणांवर त्यांचं करवादून वसकन अंगावर येणं किंवा मख्ख चेह-यानं नकारघंटा वाजवणं.. इकडून तिकडे तिकडून इकडे हेलपाटे मारायला लावणं, लहानातल्या लहान कामासाठी तासन्तास बसवून ठेवणं, कामं बाजूला ठेवून दात कोरत चकाटय़ा पिटणं, कधी थेट तर कधी आडून लोचटपणे किंवा निगरगट्टपणे लाच मागणं.. हे ओकारी आणणारं, शिसारी आणणारं दृश्य पाहून कोणत्याही शहाण्या माणसाचं रक्त उकळतं..
 
रक्त उकळून उकळून आता त्याची लाल बासुंदीच होते की काय, अशी असह्य परिस्थिती होते, तेव्हा शहाणा माणूस बाहेर पडतो, ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ची टोपी घालून रामलीला मैदानावरच्या गर्दीत मिसळून जातो, भ्रष्टाचारविरोधाच्या घोषणा देतो, अण्णांची प्रवचनं ऐकतो, बेदीबाईंचा नाच पाहतो, मेणबत्तीवाल्यांची भाषणं ऐकतो आणि त्याची खात्रीच पटते की आता देशातून भ्रष्टाचार कायमचा हद्दपार होणार. सगळे खाबूबाज बाबू आता सुतासारखे सरळ येणार..
 
..अशा गोड स्वप्नरंजनात रमलेल्या बा शहाण्या माणसा, आज आपण तुला एका वेगळ्याच सरकारी ऑफिसात घेऊन जाऊ या. या ऑफिसचा फेरा सहसा कुणाला चुकलेला नसतो. पण, तरीही, थोडय़ा वेगळ्या नजरेने ते पाहण्यासाठी आज पुन्हा वाट वाकडी कर..
 
ये ये ये. हे सरकारी ऑफिस आहे, असा विश्वासच बसत नाहीये ना?
 
कसा बसेल? स्वच्छ चकचकीत इमारत. पायतळी सुरेख टाइल्स. नव्याने रंग काढलेल्या सतेज भिंती. नवंकोरं सुबक फर्निचर. टेबलाटेबलावर कम्प्यूटर. न कुरकुरता थंड हवेचे लोट सोडणारे पंखे, क्वचित कुठे चक्क एसी. अभ्यागत कक्षात गादीच्या बैठका. फ्लॅट स्क्रीन टीव्ही. पाण्याचं पिंप. या सगळ्यापेक्षाही अविश्वसनीय गोष्ट म्हणजे सरकारी ऑफिस असूनही कामाच्या वेळी सुरू असलेली कामाची लगबग..
 
..पत्ता चुकला बहुतेक म्हणून चपापून मागे सरकू नकोस, बा शहाण्या माणसा. हे सरकारी ऑफिसच आहे. मात्र, इथे कामाची लगबग करणारे, काम घेऊन आलेल्याचं हसतमुखानं स्वागत करणारे, त्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे जे लोक दिसताहेत, ते सरकारी कर्मचारी नाहीत (अंदाज बरोबर आल्याचा आनंद तुझ्या चेह-यावरून ओसंडून वाहतोय रे बाबा!).. दलाल आहेत दलाल.. कामाच्या फायली घेऊन कागद नाचवत ते टेबलोटेबली ज्यांच्यापाशी जाताहेत, ती मख्ख चेहऱ्याची माणसं म्हणजेच आपले परमप्रिय बाबूलोक आहेत.. पण, जरा त्यांच्याही चर्येकडे नीट पाहा.. सुबत्तेनं आलेली तुकतुकी त्वचेला कशी फेअर अँड लव्हली शाइन देतेय पाहा.. अंगातले कपडे पाहा.. डोळ्यांवरचे गॉगल पाहा.. खाली उभ्या गाडय़ा पाहा.. बंगले पाहा, फार्म हाऊस पाहा.. बाथरूमच्या टाइल्स फोडून पाहा.. गाद्यांचा कापूस उपसून पाहा.. जिकडे तिकडे श्रीमंती थाट कसा झळकतोय.. आपल्या दृष्टीनं सगळय़ात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच तुसडय़ा चेह-याने का होईना, हे सगळे मान मोडून काम करतायत.. ओव्हरटाइम मिळेल की नाही, याची फिकीर न करता वेळेच्या आधी उघडणारं आणि वेळेच्या नंतर बंद होणारं सरकारचं कदाचित एकमेव कार्यालय असेल हे..
 डबडबले ना डोळे तुझे पाण्याने?
भरून आला ना ऊर, अभिमानाने?
एकतरी सरकारी कार्यालय असं कृतीशील आहे, या विचारानं सद्गतित होण्याचा तुझा मानस असेल मित्रा, तर तो अंमळ रहित कर आणि शोध घे की हा सगळा चमत्कार कसा घडून येतो?
ये बाहेर आणि पाहा पाटी.
हे आहे सहकारी निबंधकांचे कार्यालय. म्हणजे आपल्यातुपल्या भाषेत रजिस्ट्रार ऑफिस.
इथे मुख्यत: व्यवहार होतात जमिनीचे, प्रॉपर्टीचे, रियाल्टीचे. जो जो फ्लॅट घेण्याचा व्यवहार करतो तो एकदा तरी या ऑफिसाची पायरी चढतोच. ती चढण्याआधीच ‘बिल्डरचा माणूस’ आपल्याकडून ‘फी’ म्हणून काहीएक रक्कम घेऊन ठेवतो.. आपल्या व्यवहाराच्या कायदेशीर स्टँप डय़ूटी आणि फीच्या पलीकडची. तीच आपल्या कैकपटीत बिल्डरकडूनही दिली जातेच. हेच इथल्या कार्यकुशलतेचं रहस्य आहे, हेच इथलं वंगण आहे. नियमित तेलपाणी झाल्यावर इथली सगळी यंत्रणा कशी न कुरकुरता झपाटय़ानं अहोरात्र काम करते, ते पाहण्यासारखं आहे.
 
अद्भुत आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो कोणी वंगणाची बुधली बरोबर आणत नाही, त्या नतद्रष्ट इसमाच्यासाठी हे सगळं ऑफिस- वरकरणी किती चकाचक असलं तरी- नेहमीच्या रटाळ सरकारी ऑफिसचं रूप घेतं. लाजाळूचं रोप कसं स्पर्शानं मिटतं, तसं हे ऑफिस लक्ष्मीदर्शनाविना मिटून जातं.. अशा लुख्ख्या माणसाच्या मदतीला कोणी येत नाही, सहर्ष स्वागत करत नाही, आपलं काम कुठे आणि कसं होईल, हे कळेकळेपर्यंतच त्याचा अर्धा दिवस गेलेला असतो, कळतं तेव्हाही त्याला कळतं काय, तर आता हे काम आज होणारच नाही.
 
त्याच्या कागदपत्रांमध्ये शेकडो चुका, त्रुटी निघणारच.
 त्या गलिच्छ खरखरीत आवाजात आणि थोतरीत मारावी अशा स्वरात ऐकवल्या जाणारच.
त्याला खेटे घालावे लागणारच.
त्याचं रक्त आटणारच.
तेच काम तो दलालाकडे गेला की अर्ध्या दिवसात पूर्ण होतं. सामर्थ्य आहे वंगणाचे!
 या यंत्रणेला वंगणाची सवय कुणी लावली?
आपणच.
घाई कुणाला असते?
आपल्यालाच.
इतरांच्याआधी आपला नंबर लागावा, अशी इच्छा कुणाची असते?
आपलीच.
कागदपत्रांमध्ये जरा कमी-अधिक असेल, ते सावरून घेतलं जावं, अशी अपेक्षा कुणाची असते?
आपलीच.
थोडक्यात, इथल्या यंत्रणेने नियमानुसार आणि तिच्या गतीनुसार काम करू नये, यासाठी आपणच तिला भ्रष्ट करतो.
म्हणूनच कोणीही अण्णा किंवा ‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ इथे कधी आंदोलन करत नाही, कोणताही चॅनेल इथलं स्टिंग ऑपरेशन करत नाही, कोणताही सचोटीचा मंत्री-अधिकारी इथली व्यवस्था बदलून पारदर्शक वगैरे बनवण्याच्या फंदात पडत नाही.. ही आपल्या सर्वाच्या गरजेतून, सहकारातून, समन्वयातून, बंधुभावातून उभी राहिलेली यंत्रणा आहे, त्यामुळे आपल्या भंपक भोंदूपणाप्रमाणेच तीही अजरामर आहे.
तेव्हा, बा शहाण्या माणसा, जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारविरोधाचा अतीव ज्वर चढेल, तेव्हा तेव्हा या ऑफिसात जरूर येऊन जा.. उघडय़ा डोळ्यांनी इथला कारभार पाहून जा.. तुझ्या प्रकृतीला उतार नक्कीच पडेल.

(प्रहार, १८ डिसेंबर, २०११)

Monday, December 12, 2011

खळ्ळ खटय़ॅक पेपर फटय़ॅक

आगामी निवडणुकीसाठी आमचे येकमात्र (एकावेळी आमचे एकच साहेब असतात, या अर्थी) साहेब, आ. रा. रा. रा. (हे त्यांच्या कृत्यांनी आणि वक्तव्यांनी उद्वेगाने मुखातून अनाहूतपणे निघणारे उद्गार नसून ‘आदरणीय राजमान्य राजेश्री राजसाहेब’चे लघुरूप आहे.) यांनी लेखी परीक्षा घेण्याचे प्रयोजन जाहीर केले आणि आमची तीक्ष्ण शोधपत्रकारक नजर भिरभिरू लागली (‘ती सारखी भिरभिरतच असते, लोचट मेले’ हे सैपाकघराच्या दिशेने आलेले शब्द कानावेगळे करून अवधान एथ्थे रख़्ख- सुपर मामा!). काहीही करून या परीक्षेचा पेपर आपल्या पेपरात फोडायचाच, असा चंग आम्ही बांधला. ज्येष्ठ शोधपत्रकार आणि आमचे रिटायर्ड हर्ट ज्येष्ठ परंमित्र जे की   साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून (ते खासगीत सांगतात की ‘पायावर पाय देऊन’) आम्ही पत्रकारिता करीत असल्याने लगोलग आम्ही चाणाक्षपणे शिवाजी पार्काची वाट धरली (‘हुंगायला जातात सकाळ-संध्याकाळ’ या ‘त्या’ दिशेने आलेल्या कुत्सितोद्गारांकडे बा वाचका दुर्लक्ष कर). ‘कृष्णकुंजा’च्या परिसरात- ज्याअर्थी की ते मराठी हृदयसम्राटांचे निवासस्थान आहे, त्याअर्थी- एकतरी भेळवाला भय्या असणारच, अशी आमची खात्रीच होती. तसा तो सापडलाच. मग आम्ही भेळ खाण्याच्या मिषाने तिथे उभे राहिलो (‘जीभच चटोर यांची’- दुर्लक्ष दुर्लक्ष). थोडय़ाच वेळात आमच्या तीक्ष्ण नजरेला भेळवाल्याच्या गठ्ठय़ातली हस्तलिखित पाने दिसली आणि आम्ही हात पुढे करून भेळवाल्याच्या पुढय़ात उभे राहिलो. ‘‘तीख्खा बनाना हौर उपर से लिंबू पिळना, जरा जास्ती पिळना’’ अशा सूचना देऊन आम्ही जो भेळयज्ञ सुरू केला, तो 17 हस्तलिखित कागद जमवूनच थांबला.
 प्रत्यक्ष परीक्षेत कोणता पेपर आला होता, याचा आम्हाला पत्ता नाही. प्रंतु पेपर सेटरनी पेपर काढताना काय काय विचार केला होता आणि मूळ पेपर काय होता, यावर आमच्या हातातील दस्तावेजातून निश्चितच प्रकाश पडेल. तर अशी आहे मूळ प्रश्नपत्रिका....

 
प्र. १. आपल्या पक्षाचे नेमके ब्रीदवाक्य काय आहे?
 
  • अ. खळ्ळ खटय़ॅक
  • ब.  खळ्ळ पटय़ॅक
  • क.  खळ्ळ सटय़ॅक
  • ड.  खळ्ळ फटय़ॅक
 (‘खट्य़ॅक’ या आवाजाचा कॅमेराच्या क्लिकशी असलेला संबंध लक्षात घेता ‘खळ्ळ खटय़ॅक’ हे ब्रीदवाक्य उद्धोजी वांद्रेकरांनी त्यांच्या पक्षासाठी घेण्यास हरकत नाही.) 
 
प्र. २. आपल्या ब्रीदवाक्यातील फटय़ॅक्’ हा आवाज कशाचा आहे?
 
  • अ. भय्याला चोपटवल्याचा
  • ब. भय्यांनी चोपटवल्याचा
  • क. पोलिसांनी कानफटवल्याचा
  • ड. पब्लिकनी लगावल्याचा
 
प्र. ३. संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
 
  • अ. विठ्ठल आणि बडवे
  • ब. कावळे आणि मावळे
  • क. वसंतसेना आणि अशोकसेना
  • ड. ट्रॅक्टर आणि जीन्स
 
प्र. ४. पुढील विषयावरील प्रांजळ मनोगत लिहा.
 
‘आणि मी चुकीच्या माणसाला काळे फासले..’
 (उपप्रश्न : कोणते काळे अधिक काळ टिकते? शाई, रंगपंचमीचा रंग, केमिकल कलर की कोळशाची उगाळी?)  

प्र. ५. एखाद्या व्यक्तीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या घरावर हल्ला कसा चढवाल? नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार करून द्या. 

 किंवा  

दहा बाय बाराच्या रूममध्ये एका टेबलासमोरच्या खुर्चीत बसलेल्या टार्गेटवर दहा जणांच्या साथीने हल्ला कसा कराल? त्याला काळे कसे फासाल? ‘टीव्ही माझा’च्या टीमला उत्कृष्ट चित्रीकरण मिळण्याच्या दृष्टीने (त्यांनाही दिवस भरायचा असतो) कोणता अँगल द्याल? याचा नकाशा आणि डावपेचांसह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार करून द्या. 

प्र. ६. ज्यांच्या नावाने आपण अहोरात्र घसाफोड करतो, बोटे मोडतो, खडे फोडतो, त्यांच्याचसोबत पालिकेत जाहीर किंवा गुप्त युती करतो.. हेच महाराष्ट्राच्या व्यापक हिताचे कसे आहे, हे पटवून देणारे प्रभावी भाषण तयार करा.  


 किंवा  

 
आपल्याला दिवसरात्र नाडणारे, व्यापाराच्या नावाखाली लुटणारे, आपल्याच राज्यात आपल्याला घरही नाकारण्याची हिंमत करणारे सर्व धनदांडगे परप्रांतीय हे आपले मित्र आणि बांधव आहेत; फक्त कानफटवायला सोपा असा कष्टकरी गरीब भय्याच तेवढा मुजोर परप्रांतीय आहे, हे प्रभावीपणे पटवून द्या.

(इथे ‘द्या’ खोडून ‘घ्या’, ते खोडून ‘द्या’ अशी बरीच खाडाखोड केलेली दिसते.)  

यानंतरची पाने बा वाचका, तुझ्या सेवेत हजर करता येत नाहीत, असे सखेद जाहीर करावे लागत आहे. पत्रकारितेच्या परमकर्तव्यापोटी एवढय़ा आणि अशा जहाल भेळी हादडल्यानंतर पुढे कोठून कळा सुरू झाल्या आणि शोधपत्रकारितेचा अंत कशाच्या शोधात झाला, हे बा वाचका तुला फोडून सांगण्यात हशील नाही. उपरोल्लेखित मजकूर एका हाताने पोटावर ओव्याची गरम पुरचुंडी दाबत लिहिलेला आहे, हे समजून घे...
... 
खळ्ळ खळ्ळ...
...
अरे देवा, हा आवाज कुठून आला?
 
पेपर यशस्वीपणे सोडवलेल्या ‘विद्यार्थ्यां’ना ज्येष्ठ शोधपत्रकाराच्या घराचा शोध लागला की काय?
 बा वाचका, आता यापुढील सुप्रसिद्ध ‘फटय़ॅक’ आमच्याच कर्णसंपुटाखाली ऐकू येण्याच्या आतच फडताळात दडणे क्रमप्राप्त आहे. इत्यलम!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ११ डिसेंबर, २०११)

Monday, December 5, 2011

'ऊह'लोकीची अप्सरा...

ऊ ला ला ऊ ला ला (हे काय आहे, असा प्रश्न पडला असेल, तर सावधान.. तुमचं मानसिक वय 18 वर्षापेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे.. ताबडतोब हा मजकूर वाचणं थांबवा..)
 
आ ऊ ललिता.. (हे काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाय, म्हणजे तुम्ही आधीचा इशारा ऐकला नाहीत.. आता भोगा आपल्या कर्माची फळं! हे विलक्षण प्रमुदित झालेल्या स्थितीतील शक्ती कपूर नामक रावडय़ा नरपुंगवाचे चित्कार आहेत..)
 
प्रस्तुत लेखकाला हा शक्ती कपूरी (म्हणजे साध्या भाषेत आसुरी) आनंद का बरे झाला असावा, असा प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर पहिल्या प्रश्नातच दडलेलं आहे..
 ‘ऊ ला ला ऊ ला ला’ या तडकभडक, दिलखेचक, चाबूक आणि अशाच अन्य दर्जानिदर्शक विशेषणांना सुपात्र गाण्यामुळे, त्यातल्या विद्या बालनच्या (जुग जुग जियो) उन्मत्त अदाकारीमुळे आणि त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय.. भारत देश बदलला, माणसं बदलली, 80 च्या दशकात जी पिढी तरुण होती ती मध्यमवयीन झाली, 80 च्या दशकात जन्मली ती उत्तरतारुण्यात पोहोचली, 80 च्या दशकानंतर जन्मली ती तरुण झाली; पण, एक गोष्ट कायम राहिली.. जवाँदिल भारतीयांची फँटसी.. ती मात्र 80 च्या दशकात होती तशीच घसघशीत, गरगरीत, टमटमीत वगैरे पुष्टतानिदर्शक विशेषणांना सुपात्रच राहिली आहे.. हीच ती चित्कारपात्र खूषखबर!
मध्यंतरीच्या काळात भारतीय पुरुषांची मानसिकता बदलते आहे वगैरे वावडय़ा उठवल्या जात होत्या.. त्यानुसार परदेशांत (तरी कसं काय कोण जाणे!) विशेष पसंतीपात्र होत चाललेलं झीरो फिगरचं फॅडही भारतीयांवर लादण्याचा प्रयत्न झाला. तोही नव्या ‘डॉन’मध्ये ‘ये मेरा दिल’च्या जुन्याच चालीवर हेलनच्या लहानपणीचे कपडे घालून सर्वागझटकक् आणि दिलखेचक (या शब्दाला आणि त्यामागच्या भावनेला पर्याय नाही, हे जाणून पुनरुक्तीदोष पदरात घ्यावा) मनमुक्त नृत्य करणा-या, भरलेल्या कणसासारख्या दिसणा-या करीना कपूरच्या माध्यमातून करण्यात आला. त्या कुठल्याशा सिनेमात तिनं बिकिनी नेसलेली असूनसुद्धा पब्लिक जाम फिरकलं नाही. बिकिनी नेसलेली असली तरी शेवग्याची सुकली शेंग बघायला कोण जाईल? त्या सिनेमाबरोबरच ते फॅडही आपटलं आणि आटोपलं हे बरं झालं!
 
भारतीय प्रेक्षकांच्या (मानसिक वय वर्षे 14 ते 15 वर्षे अर्थात ‘अक्षय-कुमार’!) आवडींचा प्रच्छन्न मसावि 80 च्या दशकात दक्षिणेत निघाला होता.. सावळी, भरदार यष्टी, अपरं नाक, धनुष्याकृती ओठ आणि आवाहक, आमंत्रक, संमोहक, मादक टप्पोरे डोळे, अंगावर कपडय़ांचा तिटकारा, आत्यंतिक काटकसरी स्वभाव.. या सगळ्या सरंजामाला जोड होती संभावित आणि दुटप्पी मूल्यांनी बुजबुजलेल्या रूपेरी पडद्यावरच्या नटय़ांमध्ये फार अभावानंच दिसलेल्या उन्मुक्त लैंगिक अभिव्यक्तीची. हे समजून घेणं फार कठीण वाटत असेल (तसं ते आहेच) तर कमलहासन आणि श्रीदेवीच्या अभिनयासाठी गाजलेला ‘सदमा’ पाहा. किती लोकांनी तो कमल आणि श्री यांच्यासाठी पाहिला असेल, याची रास्त शंका मनात निर्माण होईल ती कमलवर (लकी गाय) शब्दश: झडप घालण्यासाठी टपलेली बुभुक्षित सिल्क स्मिता पाहिल्यावर. तिचं ते भावमुद्रेपासून सर्वागाने-अंगांगाने अद्भुत प्रकारे ‘व्यक्त होणं’ पाहून कानातून धूर नाही निघाला, तर तिकिटाचे पैसे परत.
 
सिल्क स्मिता (हे तिच्या एका भूमिकेमुळे मिळालेलं नाव- वरना मऊ मुलायम तलम ‘सिल्क’चा या दणकट गोणत्याशी नावाचाही संबंध असायचं कारण नव्हतं!) हा विशेषत: हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना बसलेला 440 व्होल्टचा शॉक होता. हिंदीतल्या नायिका (माला सिन्हा, मुमताज, झीनत यांच्यासारखे अप-या नाकाचे सन्माननीय अपवाद वगळता) उघडपणे देहबोलीतून शारीर श्रृंगारभावना व्यक्त करण्यातल्या नव्हत्या. जिकडेतिकडे राज कपूरी चालूगिरी. म्हणजे, नायिकेच्या चेह-यावर निरागस, पवित्र, सोज्वळ भाव.. आता ती पांढरी पारदर्शक साडी घालून धबधब्याखाली नाहात असल्यामुळे तुमचं लक्ष चेहरा सोडून वेगळ्याच ठिकाणी जातंय, हा तुमचा दोष! हा खास भारतीय पुरुषी संभावित दुटप्पीपणा झुगारून थेट लैंगिक एक्स्प्रेशन देणारी एकमात्र नटी म्हणजे हेलन. त्यामुळेच ती कायम व्हँप आणि नर्तिकाच राहिली- नायिका बनली नाही. सिल्क स्मिताही ‘बी ग्रेड’ किंवा ‘सी ग्रेड’चे ‘खुली खिडकी’, ‘मचलती जवानी’छाप ‘सॉफ्ट पॉर्न’ सिनेमे सोडले- तर नायिका बनू नाही शकली. इतकी अट्टल ‘मांसाहारी’ नायिका कोणत्याही नायकाला परवडली नसती. तिनं हिरोला सर्वार्थाने कच्चा खाऊन टाकला असता आणि ते पाहताना प्रेक्षागृहातल्या समस्त पुरुषवर्गाचं मनोमन पाणीपाणी झालं असतं.
 
हे सगळं फक्त लैंगिक नाही. त्यापलीकडे जाणारं आहे. भारतीय समाजाची रचना (मातृसत्ताक केरळ आणि ईशान्य भारताचा अपवाद वगळता) स्त्रीच्या भुकांची दखल घेत नाही. जिथे ‘बचाखुचा खानाही गृहिणी का धर्म है’ अशी शिकवण असते; पुरोगामी घरांतही मुलाला इंग्रजी माध्यमाची शाळा आणि मुलींना मातृभाषेची शाळा असा न्याय असतो; मुलाचा पुरुष बनतो, तेव्हा त्याला ताठ मानेनं, छाती काढून चालायला शिकवलं जातं आणि मुलीची युवती बनते तेव्हा तिला खांदे पाडून पोक काढून चालावं लागतं; ऑफिसमध्ये काम करून आल्यावर सोफ्यावर पसरून (ऑफिसमध्ये काम करूनच आलेल्या) बायकोच्या हातचे चहापोहे चापणे हा जिथे ‘अधिकार’ असतो, तिथे बायकांना श्रृंगाराची काही भावना असते, वासना असते, इच्छा असते, अपेक्षा, भूक असते, याची दखल कोण घेणार? गंमत म्हणजे अशी इच्छा, अपेक्षा, वासना, भूक असणारी आणि ती थेटपणे अभिव्यक्त करणारी स्त्री ही समस्त भारतीय पुरुषवर्गाची ‘फँटसी’ असतेच असते- रिअ‍ॅलिटी (पक्षी : पत्नी) असू शकत नाही. जिथे लग्नानंतर स्लीवलेस सोडा- अंगभर जीन्स- टी शर्ट पेहरणंही ‘फारच बाई फॉरवर्ड’ वाटतं तिथे सिल्क स्मिता टाइप ‘फास्ट फॉरवर्ड’ कोणाला झेपायची?
 ‘ऊ ला ला ऊ ला ला’मधल्या विद्या बालनने ही फास्ट फॉरवर्ड सिल्क तिच्या स्वत:च्या पद्धतीनं उभी केलीये.. तिची भुकेली नजर परफेक्ट पकडलीये.. त्यावेळी सिल्क स्मिताच्या गळाला लागलेले सगळे म्हावरे हिच्याही गळाला लागणारच होते.. पागल होणारच होते.. ‘तू है मेरी फँटसी’ म्हणून चीत्कारणारच होते.. तिचे- विशेषत: कमरेवरचे झटके पाहून ‘आ ऊ ललिता’ असे शक्ती कपूरी चेकाळणारच होते..
त्यात नवं काहीच नव्हतं.. मग नवं काय आहे?
 
‘ऊ ला ला ऊ ला ला’ हे गाणं टीव्हीवर फक्त बाप्ये एंजॉय करत नाहीत, तरुण मुली आणि मध्यमवयापर्यंतच्या बायकाही त्यातली विद्या बालन मनसोक्त न्याहाळतायत.. तिच्या एक्स्प्रेशनमध्ये स्वत:चं एक्स्प्रेशन शोधतायत.. कुठे कुठे ते व्यक्तही होत असेल.. आजवर पुरुषांनाच ‘डर्टी’ बनण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा जन्मसिद्ध अधिकार होता.. आता तोच अधिकार बुंबाट बायकाही बजावतायत..
 .. काळ खरोखरच बदललाय, बदलतोय..

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ४ डिसेंबर, २०११)