Tuesday, July 29, 2014

मौजे रिकामटेकडे समाचार

1.  भारतात फुटबॉलवर बंदीची मागणी
हा खेळ संस्कृतीविरोधी असल्याची टीका
फुटबॉल हा खेळ भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्यामुळे त्याच्यावर सरकारने ताबडतोब बंदी घालावी आणि फुटबॉल वर्ल्ड कपचे थेट प्रसारण रोखावे, अशी मागणी मौजे रिकामटेकडे येथील संस्कृतीरक्षक परिवारातर्फे करण्यात येत आहे. भारतात फुटबॉल खेळायला, पाहायला, विकायलाच नव्हे, तर हा शब्द उच्चारायलाही बंदी करण्यात यावी अशी मागणी परिवाराचे प्रमुख स्वामी आचरटानंद यांनी केली आहे.
भारतीय संस्कृती ही कोणालाही पाय लागला तर नमस्कार करण्याची आहे, फुटबॉलच्या खेळामध्ये एवढे खेळाडू मिळून त्या एवढय़ाशा बॉलला दीड तास लाथा घालत असतात. ते जमले नाही, तर एकमेकांनाही लाथा घालत असतात. हा हीन पाश्चिमात्य संस्कृतीतून उद्भवलेला राक्षसी स्वरूपाचा खेळ पाहत लहानाची मोठी होणारी मुले भविष्यात आपल्या आईबापांना लाथा घातल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा स्वामीजींनी दिला आहे. ते म्हणाले, आजकालची मुले चुकून कोणाला पाय लागल्यानंतर नमस्कार न करता नुसतेच `सॉरी' म्हणतात, हा या उर्मट खेळाच्या प्रसाराचाच परिणाम आहे. संस्कृतीरक्षकांनी समाजाच्या व्यापक आध्यात्मिक आणि आत्मिक विकासासाठी समाजाला शिस्त लावण्याचा थोडासाही प्रयत्न केला, तरी लगेच धाव घेणारे समाजवादी विचारवंत, फेसबुकी विचारवंत, काँग्रेसी किडे, पुरोगामी पाखंडी आणि मानवी हक्कांचा पुळका आलेले लोक या हिंत्र खेळाचा प्रसार होत असताना तोंडात मूग धरून का बसलेले आहेत, असा जळजळीत सवालही स्वामी आचरटानंद यांनी केला.
दरम्यान, फुटबॉलच्या लोकप्रियतेमुळे तमाम भारतीयांच्या आवडत्या क्रिकेटकडे कोणी ढुंकूनही पाहात नसल्यामुळे मौजे रिकामटेकडे क्रिकेट नियामक मंडळानेच स्वामीजींना फूस दिली असून ते अकारण या खेळावर दुगाण्या झाडत आहेत, अशी प्रतिक्रिया एका फुटबॉलप्रेमीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे. स्वामीजी आणि त्यांचे चेले फुटबॉलचा कितीही द्वेष करत असले तरी आपल्या विरोधकांना लाथाडण्यात त्यांनाही आनंदच मिळतो, त्यामुळे आपला फुटबॉल होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेत असल्याचे तो म्हणाला.
.................................
2.  बघ्यांमुळेच वाढते देशाचे आत्मिक सामर्थ्य
एखादी हिंसक घटना घडत असताना त्यात हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेणार्यांवर होणारी टीका अनाठायी आणि अन्याय्य आहे. अशा बघ्यांमुळेच देशाचे आत्मिक सामर्थ्य वाढते, असे स्पष्ट प्रतिपादन केवल बघे यांनी आज येथे केले. मौजे रिकामटेकडे येथील एका महिला बस कंडक्टरचा विनयभंग होत असताना त्यात हस्तक्षेप न करता निव्वळ मजा बघत उभे राहिलेल्या बघ्यांचा सत्कार आज येथील रविवारवाडय़ावर करण्यात आला. तेव्हा बघ्यांच्या वतीने प्रातिनिधिक भावना व्यक्त करताना श्री. केवल बघे यांनी हे उद्गार काढले.
ते म्हणाले, ``एक माणूस आपल्यासमोर एका बाईला लाथाबुक्क्यांनी मारतो आहे, तिचे कपडे फाडतो आहे, तिला शिवीगाळ करतो आहे, हे रोजरोज दिसणारे दृश्य नाही. एरवी असे दृश्य पाहण्यासाठी पदरमोड करून सिनेमागृहांमध्ये जावे लागते. असे दृश्य दिसत असताना मनात कितीही राग, त्वेष उसळून आला तरी तो काबूत ठेवून केवळ ते दृश्य पाहात राहणे हे सोपे काम नाही. त्यासाठी उच्च कोटीची आध्यात्मिक साधना लागते, आत्मसंयमन लागते. आपला देश आणि आपली संस्कृती आध्यात्मिकदृष्टय़ा इतकी उन्नत असल्यामुळेच या देशात असे श्रेष्ठ दर्जाचे बघे निर्माण होतात, असे श्री. बघे म्हणाले तेव्हा सभागृहाने नुसते बघत न राहता टाळय़ांचा कडकडाट केला. त्या महिला कंडक्टरला मारहाण होत असताना नुसते बघत उभे राहिलेले लोक षंढ होते, या टीकेला उत्तर देताना श्री. बघे म्हणाले की अशी टीका केवळ तथाकथित पुरोगामी विचारांचे खूळ डोक्यात भरलेले अर्धवट लोकच करू शकतात. त्या महिलेच्या अंगावर हात उचलणार्या माणसाचा उन्माद केवळ पाहात बसलेल्या 40 प्रवाशांनी जर ठरवले असते, तर त्या गुंडाचा क्षणात चट्टामट्टा झाला असता. पण, सगळे प्रवासी शांत बघत उभे राहिले, कारण, त्यांच्या हस्तक्षेपाने ती महिला दुबळी झाली असती. भविष्यात तिच्यावर हल्ला, विनयभंग किंवा बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यास तिने काय दरवेळी मदतीचा धावा करायचा का, तिच्या मदतीला कोणी येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर तिला अत्याचार सहन करावा लागेलच. तिच्यातच या अत्याचाराचा प्रतिकार करण्याची क्षमता येण्यासाठी बाकीच्यांनी मध्ये न पडणेच इष्ट होते, असे ठामपणे सांगून श्री. बघे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी समाजात जास्तीत जास्त संख्येने असे बघे निर्माण होणे आवश्यक आहे.
बाकीचे सर्व प्रवासी आपल्या संस्कृतीला अनुसरून मारहाण पाहात असताना पलीकडून जाणार्या बसच्या चालकाने आणि वाहकाने ती बस चालवण्याचे आपले कर्तव्य सोडून या मारहाणीत मध्ये पडून हस्तक्षेप केला आणि त्या महिला कंडक्टरची सक्षमीकरणाची संधी हिरावून घेतली, त्याबद्दल त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. बसमधील त्या नाटय़मय प्रसंगाच्या- `तिकीट' काढून आलेल्या- प्रेक्षकांचा रसभंग केल्याबद्दल त्या चालक-वाहकांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी मौजे रिकामटेकडे नागरिक महासंघातर्फे एमआरटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
............................................
शाळाशाळांमध्ये लवकरच दिले जाणार
पुस्तके फाडण्याचे प्रशिक्षण
वेगवेगळय़ा पुस्तकांवर वेगवेगळय़ा स्वरूपाच्या बंदी येत असताना आणि खुद्द न्यायालयही पुस्तकांच्या प्रती फाडून नष्ट करून देण्याचे आदेश देत असताना काळाची गरज ओळखून सर्व शाळांमध्ये पुस्तके शात्रशुद्ध पद्धतीने कशी फाडावीत, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री अज्ञानराव अंगठेबहाद्दर यांनी मौजे रिकामटेकडे येथे व्यक्त केले आणि यंदापासून हा अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात असल्याची घोषणाही त्यांनी केली. यापुढे पहिलीपासून सर्व शाळांमध्ये ग्रंथनिर्मूलनाचा तास सुरू होत असून त्यात पुस्तके फाडून त्यांची होळी कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले जाईल.
आजच्या आपल्या समाजाचे सर्व नुकसान पुस्तकांमुळे झाले आहे, असे स्पष्ट मत श्री. अंगठेबहाद्दर यांनी येथील मंबाजी बटॅलियनतर्फे आयोजित पुस्तकहोळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. ते म्हणाले, आपल्या पूर्वजांनी भूर्जपत्रे, दगड वगैरेंवर लिहून ठेवलेला मजकूर आपल्याला पुरेसा असताना नव्याने मजकूर लिहिण्याची काय गरज आहे, हेच मला कळत नाही. आपल्या गुहेत राहणार्या, वल्कले नेसणार्या, पूर्वजांच्यापेक्षा तुम्ही शहाणे आहात का, असा सवाल त्यांनी केला तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी `नाही, नाही' असे म्हणून माना डोलावून त्यांच्या म्हणण्याला रुकार दिला. कोणीतरी उठतो आणि ऐतिहासिक कादंबरी लिहितो, कोणी उठतो आणि आमच्या पवित्र धर्मग्रंथांवर टीका करणारी विश्लेषक पुस्तके लिहितो आणि आपल्याच पूर्वजांना वेडय़ात काढतो, हे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले. पूर्वीच्या काळी पुस्तक लिहिण्याचा, वाचण्याचा अधिकारच मर्यादित होता. पाठांतर हेच ज्ञान होते. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणीही उठून पुस्तक लिहू लागल्यामुळेच आज आपला समाज रसातळाला गेला आहे. ही सर्व पुस्तके पृथ्वीतलावरून नष्ट केल्याखेरीज बटॅलियन स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
देशात व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे खुळे चाळे सुरू झाले आहेत, ते थांबवण्यासाठीच सरकारने आता प्रभावी दगडफेक, घेराव घालून शाई फासणे, झटपट मोडतोड, असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यात न्यायालयाच्या पुढाकाराने नव्या अभ्यासक्रमाची भर पडली आहे. त्याने समाजातील पुस्तकरूपी विषवल्ली नष्ट होण्यास मदत होईल, असे श्री. अंगठेबहाद्दर यांनी सांगितले आहे. शक्यतोवर कोणी तशीच निकड असल्याखेरीज पुस्तके छापू नयेत आणि छापल्यास ती फाडायला सोप्या अशा पातळ कागदाची, विसविशीत बांधणीची असावीत, असे निर्देश सर्व प्रकाशकांना देण्यात आले असून पुस्तकछपाईसाठी खास ज्वालाग्राही शाईच वापरण्यात यावी, असेही बंधन घालण्यात आलेले आहे. एखादय़ा प्रकाशकाचे पुस्तक सहजगत्या फाटत किंवा पेटत नसल्याची तक्रार आल्यास आणि तिच्यात सक्षम प्राधिकार्याने केलेल्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास त्या प्रकाशकाच्या व्यवसायावर बंदी आणण्यात येईल आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 

अच्छे दिन-बुरे दिन

रात्रीच्या अंधारात `बुरे दिन' अंगावर कांबळ ओढून बाहेर पडले, तरी त्यांच्या डोळय़ांना रस्त्यातल्या गाडय़ांचासुद्धा प्रकाश सहन होत नव्हता... त्यांच्या डोळय़ांना प्रकाशाची सवयच राहिली नव्हती... हे साहजिकच होतं म्हणा! कारण, `बुरे दिन' बरेच दिवस अंधारात दडून बसले होते...
...ही वेळ आपल्यावर येणार याची त्यांना कल्पना होती... पण, माणसांप्रमाणेच दिवसांनाही वेडी आशा असतेच. त्यांनाही असं वाटलं होतं की पप्पूची लॉटरी लागेल आणि आपलं राज्य निर्वेध सुरू राहील. पण, पप्पू फेल झाला आणि `बुरे दिन'चे `बुरे दिन' सुरू झाले... एरवीही लोकांना त्यांच्याविषयी प्रेम नव्हतंच, नफरत होती. खरंतर वाईट दिवस माणसाला आयुष्यभर उपयोगी पडतील, असे धडे शिकवतात. पण, तरीही त्यांना कोणी प्रेमाने जवळ करत नाही किंवा आग्रहाने बोलावून घरीही आणत नाही. रस्त्यात कधी बाहेर पडायची वेळ आली तरी `बुरे दिन'ला तोंड लपवून फिरायला लागायचं. सगळीकडे त्यांच्या नावाने लोक कडकडा बोटं मोडताना दिसायचे. नाही नाही ते शिव्याशाप ऐकून `बुरे दिन'चा जीव तळतळायचा. पण, बोलायची सोय नव्हती. तरीही देशात आपला बोलबाला आहे, लोक आपल्याला घाबरतात, देशभर आपलंच राज्य पसरलंय, हे ऐकू यायला लागल्यानंतर `बुरे दिन'ची छाती अभिमानाने भरून बिरून आली होती. हा सगळा परिणाम आपल्या पक्षात, पक्षाबाहेर, देशात, जगात इतर कोणालाही न मोजणार्या नम्मोजी कोतवालांच्या भाषणांचा होता. आधी `बुरे दिन'चा जीव हरखला आणि जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा त्यांना आपल्याविरुद्ध लागलेला सापळा लक्षात आला. हे नम्मोजी कोतवाल आपला उदोउदो करतायत ते आपल्याला हुसकवायला आणि आपली जागा `अच्छे दिन' घेणार आहेत, हे कळल्यानंतर ते पिसाळलेच. पण, आता संतापून काही उपयोग नव्हता. नम्मोजी कोतवालाने निवडणूक खिशात घातली होती आणि देश आपल्या कुर्त्यावर गुलाबाच्या फुलासारखा टाचून घेतला होता.
निकाल लागल्यापासून आपलाही निकाल लागला हे लक्षात आल्यामुळे `बुरे दिन'नी स्वतःला दारं-खिडक्या बंद करून पुरतं कोंडूनच घेतलं होतं. आता कोतवालाचे महाराज बनलेल्या नम्मोजींची फौज कधी कुठून कशी घुसेल आणि आपल्याला हुसकावून बाहेर काढेल, या विचाराने त्यांची झोप उडाली होती. जी काही झोप लागायची, तिच्यातही आपल्याला एन्रॉन प्रकल्पाप्रमाणे समुद्रात बुडवून टाकलं आहे, असा भास त्यांना व्हायचा आणि दचकून जाग यायची. नंतर एन्रॉन प्रकल्पाचं तुकारामाच्या गाथेप्रमाणे तरला, त्याचाच दिलासा त्यांच्या मनाला वाटायचा. दाराबाहेर जरा खुट्ट झालं, जरा पावलं वाजली, जरा आवाज झाला, जरा चाहूल लागली तरी `बुरे दिन'चं हृदय थाडथाड उडायला लागायचं. अंगाचं पाणीपाणी व्हायचं. झाली, आपल्या हकालपट्टीची वेळ झाली, असं वाटून त्यांचं अवसानच गळायचं.
बरेच दिवस अशा भीतीच्या सावटाखाली दिवसरात्र कणाकणाने जळत-झिजत काढल्यानंतर अखेरीस आज त्यांनी `शेंडी तुटो वा पारंबी' असा निर्धार केला आणि रात्र होताच मनाचा हिय्या करून बाहेर पडण्याचा निर्धार केला...
...नजर थोडी प्रकाशाला सरावल्यानंतर `बुरे दिन'च्या मनातली भीती थोडी ओसरू लागली. आपल्याला पाहताक्षणी लोक आपल्यावर चाल करून येतील आणि आपली क्षणात चटणी होईल, असं `बुरे दिन'ना वाटलं होतं. किमान आपल्या पाळतीवर असलेले सरकारी लोक तरी पुढे येऊन आपल्याला ताब्यात घेतील आणि जाळीच्या व्हॅनमधून आपली रवानगी होईल, असंही त्यांना वाटलं होतं. त्यातलं काहीच होत नव्हतं. लोकांचं `बुरे दिन'कडे लक्षच नव्हतं म्हणा किंवा त्यांच्या अस्तित्त्वाचं काही विशेष वाटलं नाही म्हणा; पण संपूर्ण रस्त्यात त्यांना कोणीही हटकलं नाही. नम्मोजी महाराजांच्या महालाच्या दारातले शिपाई तरी आपल्याला अटकाव करतीलच आणि मग आपण त्यांचं कडं तोडून जिवाच्या कराराने आत शिरू आणि नम्मोजींच्या पायावर लोळण घेऊ, असं एक कल्पनाचित्र त्यांनी रंगवलं होतं. पण, तसंही काही झालं नाही. उलट आपलं नाव सांगितल्यानंतर नम्मोजींच्या दारातल्या गर्दीतून त्यांना प्राधान्याने आत सोडलं गेलं. एक सचिव महोदय तर `नम्मोजी केव्हापासून आपली वाट पाहात आहेत' असंही म्हटल्याचं त्यांच्या कानांवर पडलं, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला.
खरंच होतं ते! आत नम्मोजी हसर्या चेहर्याने स्वागताला सज्ज होते. तोंडभर हसून `केम छो' म्हणत त्यांनी `बुरे दिन'चं स्वागत केलं आणि तोंडात सुरती खमणचा घास भरवला तेव्हा `बुरे दिन' चक्रावूनच गेले. मग त्यांच्या मनात विचार आला, हा बनिया माणूस. कोण कधी गिर्हाईक म्हणून समोर येईल याचा भरवसा नसल्याने उगाच कोणाशीही वाईटपणा कशाला घेईल. आपली गच्छंती करतानाही प्रेमानेच केली जाणार. ठीकाय. लाथ खाऊन जाण्यापेक्षा हे बरं!
``बोलो, काय काम काढलंत?''
``निरोप घ्यायला आलो होतो... म्हटलं आता तुम्ही आलाच आहात, तर आमची जाण्याची वेळ झालेली आहे. अपमानित होऊन जावं लागण्यापेक्षा स्वेच्छेने निघालेलं बरं...''
``अरे, शुं वात करू छू? एम कोन बोला?''
``म्हणजे काय? अहो, तुम्हीच तर तुमच्या सगळय़ा प्रचारात जिथे तिथे सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले है, अच्छे दिन आने वाले है... आता अच्छे दिन येणारच असतील, तर आम्हाला जावंच लागेल ना?''
हा हा हा हा! मोठा विनोद झाल्यासारखे नम्मोजी महाराज हसायला लागलेले पाहून `बुरे दिन'चं पित्त आणखीनच खवळलं. कसाबसा संताप आवरून ते म्हणाले, ``महाराज, एक प्रश्न विचारू? तुम्हाला आपल्या देशाचा फार अभिमान आहे. तुमच्या पक्षाला तर आपल्या देशात कधीच नव्हत्या अशाही अभिमानास्पद गोष्टी दिसतात आणि ज्यांची लाज वाटायला पाहिजे अशा गोष्टींचाही गर्व वाटतो. तुम्हाला देशाची फॉरेनर बहू चालत नाही, पण देशात तेवढेच फॉरेनर अच्छे दिन आणण्याची गोष्ट करता... गेल्या कित्येक शतकांमध्ये या देशाने हे अच्छे दिन कधी पाहिलेलेच नाहीत. ते आपल्यासाठी इटालियन बहूपेक्षा जास्त परके आहेत. त्यांना तुम्ही घेऊन येणार आणि स्वदेशी बुरे दिन घालवणार... आम्ही या मातीत जन्मलो, वाढलो, हा देश त्याच मातीत घालण्यासाठी राबलो आणि तुम्ही आम्हाला आमच्या कष्टांचं हे इनाम देणार?'' आता `बुरे दिन'ना शोकसंतप्त हुंदका फुटला.
``अरे, रो मत रो मत. हा रूमाल घ्या. डोळे पुसा. नाक शिंकरू नका. आ पंडित नेहरूना रूमाल नथी फ्रान्समध्ये धुवायला जायला. हा माझ्याकडचा एकमेव ऐतिहासिक रूमाल आहे, जो मी निवडून आल्यावर ठिकठिकाणी भावविवश भाषणं करताना डोळे पुसायला वापरला होता. हं... आता मी काय सांगतो ते ऐका. वात सुनो मारी. ही अच्छे दिनची आयडिया पण मन्नूजी महाराजांची आहे!''
``काय सांगता काय!''
``म्हणजे काय? तेच एका भाषणात म्हणाले होते की जगातली परिस्थिती खराब आहे म्हणून भारताची हालत खराब आहे. आता काही दिवसांनी दुनियेची हालत सुधारेल ने बिजा भारताची पण हालत आपोआप सुधारेल. अच्छे दिन आनेवाले है. आता एवढा मोठा इकनॉमिस्ट माणूस खोटा बोलेल काय?''
``म्हणजे तुम्ही त्यांची लाइन उचललीत?''
``अरे एमां शु बडी बात छे? आम्ही त्यांचे दीडशेपेक्षा जास्त उमेदवार उचलले, त्यांची फॉरेन पॉलिसी, इकनॉमिक पॉलिसी उचलली, एक लाइनने काय फरक पडतो?''
``काय फरक पडतो? अहो, तिकडे देशाची हालत सुधारो ना सुधारो. आमची हालत खराब झाली ना! आम्ही आता गाशा गुंडाळून जायचं कुठे, सांगा जायचं कुठे?''
``कुठेच नाही.''
आता संपूर्णपणे चाट पडून `बुरे दिन' म्हणाले, ``अहो, तुमचं धोरण तरी नेमकं काय आहे? अच्छे दिन येणार असतील, तर आम्हाला जावंच लागेल. गंमत कसली करताय?''
नम्मोजी हात हवेत भिरकावत म्हणाले, ``अरे पण मी अच्छे दिन आणू कुठून?''
`बुरे दिन' आता कोसळायचेच बाकी राहिले होते. नम्मोजी म्हणाले, ``पावसाचा पत्ता नाही. जगातली आर्थिक स्थिती बाराच्या भावात गेलेली आहे. इराकमध्ये गेंधळ चाललाय. तेलाचे भाव वाढतायत. तिजोरीत खडखडाट आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारं काहीच हातात नाही आणि चांगले दिवस येतील कसे? सगळय़ा जगाशी आता आपण जोडलेले आहोत. सगळं जग खस्ता खात असताना आपल्याला मेवा कुठून खायला मिळणार? लोकांनी समजून घेतलं पाहिजे. देशासाठी त्याग करायला शिकलं पाहिजे.''
``अहो, पण मन्नूजी महाराजांच्या सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती. तेव्हा तुम्ही रजनीकांत बनून भलभलती स्वप्नं दाखवत होतात...''
``अरे, पण तो तर सिनेमाच होता... इंडियानी सबसे बडी फिल्म... सौ करोड, दो सौ करोड की नहीं, दो हजार करोड की फिल्म... अब फिल्म तो सुपरहिट हो गयी... पिक्चर देखने के बाद कोई बोलेगा स्टोरीलाइन वीक है, ये नहीं है, वो नहीं है, तो क्या फर्क पडता है... पिक्चर तो सुपरहिट है...''
आता `बुरे दिन'च्या जिवात जीव आला. त्यांनी सावधपणे विचारलं, ``म्हणजे आम्ही कुठे जाण्याची गरज नाहीये. घाबरून जगण्याचीही गरज नाहीये.''
``अजिबात नाही. खुलेआम घूमो. तुम्हाराही राज है.''
``आणि वाटेत अच्छे दिन भेटले तर?''
``कुठून भेटतील? ते इथे आलेत कुठे? त्यांना काय वेड लागलंय काय इतक्या भंपक देशात यायला?''
``अरे बापरे, मग तुम्ही लोकांना काय सांगणार?''
नम्मोजींनी टाळी वाजवली. एक सेवक एक तबक घेऊन हजर झाला. तबकावरचं नक्षीदार कापड दूर करत नम्मोजी म्हणाले, ``कोणाला काही सांगायची गरज काय? अंगातले ते काळे, कुरूप, हिंत्र कपडे काढून टाका आणि हा नवा सुंदर रंगबिरंगी ड्रेस परिधान करा.''
``म्हणजे?''
``म्हणजे काय? या देशात दिवस बदलण्याची गरज नसते. राजवट बदलली तरी लोकांना काही काळ धुंदी चढते आणि त्या धुंदीत त्यांना काहीही सांगितलं तरी पटतं. आता नव्या कपडय़ांमध्ये तुम्हीच लोकांसमोर जायचं आणि आम्ही सांगणार, अच्छे दिन आ गये है...''
``पण, महाराज, सगळे लोक काही मूर्ख नसतात. एखादा तरी शहाणा असेलच. आम्हाला ओळखेलच. तेव्हा काय कराल?''
``सोप्पं आहे,'' डोळे मिचकावत नम्मोजी महाराज म्हणाले, ``तेव्हा आम्ही सांगणार की हा आधीच्या सरकारचा वारसा आहे. काँग्रेसने 65 वर्षांत जी वाट लावली, ती आम्ही लगेच कशी दुरुस्त करणार. अजून 65 वर्षं अच्छे दिन आले नाहीत, तरी हरकत नाही!''
यावर `बुरे दिन'नी नम्मोजींच्या हातावर कडकडीत टाळी दिली आणि ताठ मानेने, गर्वोन्नत माथ्याने ते महालाबाहेर पडले...

तुंबाडचे खोत अर्थात राष्ट्रीय खड्डे मिशन

मुंबई असो की आमचे घोळशिरस बुद्रुक गाव... सार्वजनिक सेवासुविधांच्या बाबतीत दोन्ही एकाच पातळीवर आहेत, याबद्दल आपल्या महाराष्ट्र सरकारचं, मुंबई महापालिकेचं आणि आमच्या ग्रामपंचायतीचं समसमान कौतुक केलं पाहिजे...
...छे छे छे, आमच्या घोळशिरसमध्ये दिवसरात्र वाया घालवायला मुंबईसारखा अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. दिवसातून आठ तास मिळणार्या विजेतून आमच्या आयुष्यात जेवढा पडेल तेवढय़ा उजेडात भागवून घ्यायला लागतं. आमच्या गावकर्यांना पहाटे पहाटे अजूनही वावरच गाठावं लागतं, त्यांच्यासाठी मुंबईसारखी रेल्वेच्या ट्रकची ओपन-एअर सार्वजनिक व्यवस्था नाही. कारण, आमच्या गावात मुळात चेंगराचेंगरीचं अनुपम सुख देणारी लोकलच नाही. साहजिकच मेट्रो आणि मोनोरेलही नाहीत. आमच्या गावचे तंबाखूबहाद्दर अजूनही चालता चालता मातीच्या सडकांवरच पिचकार्या मारतात, त्यांच्यासाठी पक्के प्लॅटफॉर्म, भिंती बांधलेल्या नाहीत, याबद्दल अधूनमधून आम्ही वर्तमानपत्राच्या वाचकांच्या पत्रांमध्ये तक्रार करत असतो. त्यावर, फेरीवाल्यांनी व्यापण्यासाठी आणखी काही रस्ते बांधून झाले की आम्ही तंबाखूच्या पिचकार्या टाकण्यासाठी चांगल्या, स्वच्छ भिंतींचा बंदोबस्त करू, असं आश्वासन आम्हाला स्थानिक प्रशासनाचे अधिकारी देत असतात.
हे आणि असे काही किरकोळ फरक सोडले, तर आमच्या गावात आणि मुंबईत, पुण्यात- कोणत्याही मोठय़ा शहरात तसा काहीच फरक नाही...
विश्वास बसत नसेल, तर हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि स्वर्गीय गोपाळराव बोधेंसारखा कॅमेरा हातात घेऊन ऐन भरात आलेल्या पावसाळय़ात मुंबईतला, पुण्यातला आणि आमच्या गावातला फोटो काढा आणि कोणालाही फरक ओळखायला सांगा... कितीही हुशार माणूस असला, तरी तो हा फरक सांगू शकणार नाही, यावर  बेट आपली! कारण सगळय़ा फोटोंमध्ये काय दिसणार? घरं, इमारती आणि त्यांच्यामध्ये दुथडी भरून वाहणारं पाणी. अहो, पावसाळय़ात मुंबईतला मिलन सबवे तुंबला आणि परळच्या नाक्यावर पाणी जमा झालं की आमचा लोकल केबल न्यूजवाला मुंबईतून फुटेज मिळायची वाट बघत बसत नाही. सरळ आमच्याच गावातल्या गल्ल्याबोळं दाखवतो पाण्याने भरलेल्या आणि `हेच ते मुंबईत तुंबलेलं पाणी' असं बातम्यांमध्ये सांगून मोकळा होतो. मध्ये आम्ही त्याला दोस्तीत विचारलं की हे असं तू का करतोस? आपल्या गल्लीतली चित्रं मुंबईची म्हणून का खपवतोस? तर तो म्हणाला, देव जसा इथे-तिथे सारखाच असतो, तसंच पाणीसुद्धा इथे-तिथे सारखंच. मुंबईतलं पाणी एचथ्रीओ आणि आपल्याकडचं पाणी एचवनओ नसतं. सगळीकडचं पाणी `एचटुओ'च असतं. विषय आमच्या शालेय जीवनातल्या परम आवडीच्या (त्यामुळे तीन तीन वर्षं घोटाव्या लागलेल्या) विज्ञान विषयाकडे गेल्यामुळे आम्ही त्याच्या म्हणण्याला दुजोरा देऊन बाहेर पडलो.
पण, त्याचं म्हणणंही काही संपूर्णपणे नाकारता येणार नाही. पावसाळय़ात मुंबईकर असो की पुणेकर असो की घोळशिरसकर- कोणालाही पत्ता सांगताना तो `तलावाएवढय़ा मोठय़ा खड्डय़ाला वळसा घालून डावीकडच्या दोन छोटय़ा खड्डय़ांनंतर तिसर्या खड्डय़ाच्या काठावरच आहे आमचं घर' असाच सांगतो. सगळय़ा महाराष्ट्राचं असं अर्ध्या बुडालेल्या स्थितीतलं एकात्मिक रूप पाहिलं की विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांच्यातला आणि शहरं, महानगरं आणि खेडय़ापाडय़ांमधला भेद आपल्या अफाट कर्तबगारीतून बुजवून टाकणार्या, सर्वांना समान पातळीवर आणून कृतीतून समतेचा संदेश देणार्या आपल्या राज्यकर्त्यांचं परमकौतुक वाटतं. त्यांनी महाराष्ट्र अजूनही अर्धाच बुडवलेला आहे, याबद्दल मनी कृतज्ञताही दाटून येते.
अहाहा! काय ते दृश्य! ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, लोकांची वाहनं बंद पडलेली आहेत. ऑफिसांकडे जाण्यासारखी परिस्थितीच न उरल्यामुळे लोकांना घरीच थांबण्यावाचून (आत पाणी शिरलेलं नसल्यास आणि इमारत डोक्यावर कोसळून रामनाम सत्य झालेलं नसल्यास) गत्यंतर उरलेलं नाही. मस्त पाऊस पडत असताना सरकारने जाहीर न करता अशी कल्पकतेने दिलेली सुटी सार्थकी लावण्यासाठी घरोघर भज्यांचे खमंग दर्वळ पसरलेले आहेत. वाफाळत्या चहासोबत गरमागरम भज्या आणि त्यांच्यावर तळलेल्या मिरच्या चेपत खमंग चर्चा सुरू आहेत... पुढच्या पावसाळय़ात आपण कोणती होडी घ्यायची, शिडाची, वल्हय़ांची का स्वयंचलित? कोणतं मॉडेल घ्यायचं? एसी मॉडेल फार महाग पडेल का? डिझेल व्हर्जन आहे का? मायलेज किती देत असेल? पाण्यात मायलेज कसं मोजतात? पावसात होडी आणि पाऊस ओसरल्यावर गाडी असं काही वाहन नाही का?... बजाज, टाटा, महिंद्रा यांच्या कारखान्यांमध्ये अशा वाहनाची निर्मिती गुप्तपणे सुरू असणार, याबद्दल आम्हाला शंका नाही.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे पावसाळी पर्यटन राज्य जाहीर केल्यास आणि मुंबई मेट्रोप्रमाणे एकहाती कारभार देऊन उभारणी खर्च, भाडं यात मनःपूत वाढ करण्याचं स्वातंत्र्य दिल्यास आपण महाराष्ट्राचं व्हेनिस करून दाखवू, असा प्रस्ताव ढिलायन्सच्या दोन्ही भावंडांनी सरकारला दिलाय म्हणे! पर्यटकांना छोटय़ा छोटय़ा ऍम्फिबियन (म्हणजे जमिनीबरोबरच पाण्यातही उतरू शकणार्या) विमानांमधून विमानतळांवर साचलेल्या पाण्यातच उतरवायचं आणि तिथून बोटींमध्ये बसवूनच मुंबईचं, इतर शहरांचं सौंदर्य दाखवायचं आणि पुन्हा विमानांमध्ये बसवून परत पाठवायचं, अशा योजना पर्यटन खात्याने आखलेल्या आहेत. फक्त या साचलेल्या पाण्यातून फिरताना पर्यटकांना ओकार्या होऊ नयेत म्हणून त्यांच्या नाकाला रूमाल तेवढे बांधावे लागतील आणि धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या इमारतींचे परिसर टाळावे लागतील, एवढंच.
आता तुम्ही म्हणाल, असा पाऊस धोधो दोन पाच वर्षांतून एखादवेळी पडतो, कधीतरीच एवढं पाणी तुंबतं. जेव्हा पाऊस कमीच पडेल, तेव्हा या योजनेचा काही उपयोगच नाही. आपल्या प्रशासनाला आपणच कमी लेखणं बरं नाही. गेली अनेक वर्षं सर्व ठिकाणची प्रशासनं मिळून महाराष्ट्रवासीयांना `तुंबाडचे खोत' बनवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यादृष्टीने अनेक पथदर्शक उपक्रम (यांना इथे `पथदर्शक' म्हणणं चुकीचं आहे, `पथ-न-दर्शक' म्हणावं लागेल- कारण रस्ता दिसू न देणं, हीच तर त्यांची खासियत आहे) आधीपासूनच सुरू आहेत. सगळय़ात मोठी योजना आहे ती राज्यव्यापी खड्डे मिशन. ही मुळात केंद्र सरकारची योजना आहे. राष्ट्रीय योजना आहे. पण, इतर अनेक केंद्रीय योजनांप्रमाणे तिची महाराष्ट्राइतकी उत्तम अमलबजावणी कुठेही झालेली नाही. गुजरातमध्ये तर बिल्कुलच नाही. ही खर्या अर्थाने क्रांतिकारक योजना आहे. सार्वजनिक सेवासुविधांच्या संदर्भात जगभरात असलेल्या सगळय़ा समजुतींना छेद देणारी, स्वतंत्र विचार रुजवणारी ही योजना आहे. जगभरात शहरांमध्ये रस्ते असतात, रस्त्यांमध्ये खड्डे असतात. ते बुजवून रस्ता सपाट करण्याचा वेडपटपणा सगळय़ा जगात चालतो. आपल्या राष्ट्रीय खड्डे मिशनच्या अंतर्गत शहरांमध्ये रस्ते असतात, हेच सूत्र बाद करण्यात आलेलं आहे. शहर म्हणजे अनेक खड्डय़ांचा समुदाय. या खड्डय़ांना शक्यतोवर धक्का न लावता त्यांच्या अलीकडून, पलीकडून रस्ते बनवायचे, जे खड्डे खूपच जास्त मोठे असतील, तिथे आयता पाया मिळाला म्हणून मोठय़ा इमारती बांधायच्या, असं नगरनियोजनाचं एक `पर्यावरणस्नेही' धोरण सरकारने आखलेलं आहे. त्याचीच अंमलबजावणी सगळीकडे कटाक्षाने सुरू असते. त्यामुळेच सगळीकडच्या प्रशासनाच्या यंत्रणा प्राणपणाने खड्डय़ांचं रक्षण करताना दिसतात आणि या मिशनबद्दल काहीही कल्पना नसलेले लोक उगाचच आमच्या रस्त्याला किती खड्डे पडले आहेत, महापालिका झोपली आहे काय, वगैरे पत्रं लिहीत बसतात. खड्डे हेच फ्यूचर आहे, हे या लोकांच्या लक्षात येत नाही.
अहो, एकेक खड्डा किती बहुउपयोगी असावा, त्याला काही लिमिट! आता महाराष्ट्रात उसासारखी पाण्याला हावरी पिकं घेतल्यामुळे भूजलपातळी खालावलेली आहे. तिची भरपाई करायची, तर जमिनीत पाणी मुरायला नको? सगळीकडे सपाट रस्ते करून ठेवले, तर पाणी मुरणार कुठे? ठिकठिकाणच्या खड्डय़ांमधून जलसंधारणाचं केवढं मोठं काम होतंय, ते पाहा ना! शिवाय गुळगुळीत रस्ता असेल, वाटेत एकही खड्डा नसेल, तर वाहनचालक बेमुर्वतखोरपणे गाडय़ा चालवून स्वतःचा, आपल्या गाडीतल्यांचा, इतर गाडीतल्यांचा आणि रस्त्यावरच्या माणसांचा जीव धोक्यात घालतात. रस्त्यात खड्डे असले की वाहनचालक सावध राहतो, 10च्या वर स्पीडच जात नसल्यामुळे अपघातांची शक्यताच उरत नाही. शिवाय अशा रस्त्यांमधून प्रवास केल्यास सगळी हाडं मोकळी होऊन जातात, मसाजचा खर्च वाचतो, सगळा शीण निघून जातो, हा एक वेगळाच फायदा आहे. जगप्रसिद्ध राजवैदय़ श्री श्री घोळाजी भांगे यांनी तर गाडीत बसण्याआधी अंगाला चोळण्याचं सुगंधी तेलही तयार केलेलं आहे. ते तेल लावून गाडीतून प्रवास केल्यावर चंपी तेलमालिशचं सुख मिळतं. गर्भवती त्रियांनी अशा वाहनांतून प्रवास केल्यास त्यांची प्रसूती सुलभ होते आणि ती गाडीतच झाल्यास ती फुकटातही होऊन खर्च वाचतो, असं त्यांनी `भांगेंची गोळी' या आपल्या साप्ताहिक सदरात म्हटलेलं आहे.
एकदा आपल्या राष्ट्रीय खड्डे मिशनला यश आलं की राज्यात पावसाळय़ात पडलेलं पाणी खड्डय़ांमध्ये उन्हाळय़ापर्यंत राहील आणि पर्यटनाचा सीझन वाढेल, असा महाराष्ट्र सरकारचा होरा आहे. गरज पडल्यास आपण कालव्यांमधून हवं तेवढं पाणी सोडून पाण्याची लेव्हल वर्षभर पावसाळय़ाइतकीच राखू, असं माननीय जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केलंय (कालव्यांमध्ये पाणी कुठून येणार, असा त्यांच्या बाबतीत प्रश्नच संभवत नाही). नाहीतरी पाइपांमधून नागरिकांना दिवसातून अर्धा-एक तास जे पाणी दिलं जातं, ते याच लायकीचं असतं, तर तेच त्यांना घरांच्या अवतीभवती वाहणारं किंवा साचलेलं मिळालं, तर केवढा फायदा होईल. नळाला पाणी येण्याची वाट बघायचंच काही कारण उरणार नाही.
महाराष्ट्राने या सगळय़ा योजना मनावर घेण्याचं एक खास कारण आहे. आपल्या सरकारच्या भविष्यवेधी द्रष्टेपणाचं दर्शन त्यातून घडतं. `नासा'ने जारी केलेल्या एका गुप्त अहवालानुसार 2397 सालापर्यंत पृथ्वी हाऊसफुल झालेली असणार आहे. त्यानंतर चंद्र आणि मंगळ या ग्रहांकडे माणसाचा होरा वळणार आहे. या ठिकाणी राहण्याची ज्या भागातल्या माणसांची क्षमता असेल, त्यांचा तिथे पहिला नंबर लागेल. चंद्रावर आणि मंगळावर रहिवासासाठी पहिलं पाऊल मराठीच पडावं (नंतर बाकीचे तिकडे येण्याच्या फंदात पडणार नाहीत, हे उघड आहे) यादृष्टीने ही आखणी करण्यात आलेली आहे. नाहीतरी राज्यातल्या जनतेला खड्डय़ांचा, पाणी नसण्याचा, वीज नसण्याचा सराव आहेच- त्यामुळे आपल्याच राज्याला पहिली संधी मिळेल, अशी राज्य सरकारची अटकळ आहे...
...म्हणूनच आता या राज्यात राहताना अधूनमधून श्वास गुदमरला, तरी घाबरून जाऊ नका... भविष्यात चंद्र आणि मंगळावरच्या विरळ वातावरणाची सवय व्हावी म्हणून आपल्या सरकारनेच आपल्या हवेतला ऑक्सिजन शोषून घेतला असण्याची शक्यता अधिक असेल.

मुन्ना, बापू आणि आपू!

बापूंच्या तसबिरीला नमस्कार करून मुन्नाने खादीच्या कुर्त्यांचा गठ्ठा उचलला आणि स्कूटरच्या साइडकारमध्ये बसलेल्या सर्किटच्या हातात आणून ठेवला. किक मारून दोघे निघाले. रस्त्यात काहीतरी लोचा असल्याची जाणीव त्यांना झाली. नेहमीची वाहतूक कमी झाली होती. दुकानं बंद झाली होती. अचानक मागून कसले कसले ध्वज घेतलेल्या मोटरसायकलस्वार तरुणांचा एक जथ्था अर्वाच्य घोषणाबाजी करत गेला. त्यांच्यातल्या दोनचारजणांनी मुन्नाची स्कूटर साइडला दाबली आणि तोंड उचकटशील तर फोडून टाकू, अशा आशयाच्या खुणाही केल्या. मुन्ना हा जुना मुन्ना असता तर त्याने अशा पोरांना तोंड रिपेअर करण्याच्या पलीकडे कसं फोडायचं, याचं प्रात्यक्षिक त्यांच्याच तोंडावर करून दाखवलं असतं. पण...
...सण्णकन् दोन दगड आले आणि मुन्ना-सर्किटच्या डोक्यात बसले, तेव्हा मुन्नाची तंद्री भंग पावली. एका हाताने रक्ताळलेली जखम दाबत त्याने गाडी साइडला केली न केली, तोच वाँव वाँव करत पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी या दोघांनाच उचललं.
``अरे साहेब, आप का कुछ मिसअंडरस्टँडिंग हो रैला है... आम्ही दंगा केलेला नाही... उलट आम्हालाच दगड लागलाय, हे बघा...'' मुन्नाने भळभळती जखम दाखवली.
पांडू हवालदार म्हणाला, ``ए, ज्यादा शानपना करशील तर...'' पुढचं वाक्य त्याने हातातल्या दांडूच्या साहय़ाने ऍक्शन करून सांगितलं. मुन्नाला ती भाषा पूर्वेतिहासामुळे अवगत होतीच. तो गप्प बसला. पोलिसांना सर्वसामान्य माणसांशी याच भाषेत बोलण्याचं खास शिक्षण दिलं जातं, त्यामुळेच या खात्याविषयी लोकांच्या मनात खास ममत्व आहे, याची त्याला कल्पना होती. दंगलीच्या ठिकाणी पळून गेलेल्या दंगलखोरांच्या मागे लागून कोण डोक्यात दगड खाईल? त्यापेक्षा पडले-झडलेले जखमी लोक दंगेखोर म्हणून पकडले की संख्या भरते आणि पोलिसांनी समाजकंटकांना ताब्यात घेतल्यामुळे किती वेगाने दंगल आटोक्यात आली, हे दुसर्या दिवशीच्या पेपरात छापून येण्याची सोय होते. त्यामुळे आता आजची रात्र लॉकअपमध्येच, हे दोघांनाही कळलं. त्यात पोलिस स्टेशनातला इन्स्पेक्टर जुन्या `ओळखी'चा निघाला, ``क्या यार मुन्ना, बापू का नाम बदनाम करता है तू?'' छद्मीपणे हसत इन्स्पेक्टर म्हणाला, ``खादी का कपडा पहनताय और ये दंगाफसाद करता है, मुझे लगा था तू सुधर गया, लाइनपे आ गया, पण, कुत्र्याचं शेपूट सहा महिने नळीत ठेवलं तरी वाकडंच.''
खर्रखटॅक आवाज करत लॉकअपचा दरवाजा बंद झाला. संतापलेला सर्किट मुन्नाला म्हणाला, ``क्या भाय, कितना इन्सल्ट किया वो इन्स्पेक्टर. तुम्ही ऐकून घेतलंत? खरीखोटी सुनवून टाकायची ना. साला अच्छा आदमी बनने को जाओ, तो भी लॉकअप छूटता नहीं है.'' मुन्ना शांतपणे म्हणाला, ``अरे यार, तू भी क्यूं इतना टेन्शन लेता है. कल सुबह तो अपुन बाहर रहेगा. आपल्याला तर वैसेभी आदत आहे इथे राहण्याची. बर्याच दिवसांत जेल बघितलं नव्हतं. ये देख, दीवारों पे नया रंग निकालेला दिखता है...''
``क्या भाय, तुमको तो कोई भी सिच्युएशन मे मजाक सूझता है,'' सर्किटचा पारा जरा उतरला, ``लेकिन भाय ये शहर मे बवाल किस चीज पे हो रैला है?''
``अरे, वो इंटरनेटपे कोई कुछ किसी महापुरुष के बारे मे गलत लिख दिया, तो इनका सर खिसक जाता है, शुरू हो जाता है दंगा!''
``बोले तो अजीब येडे लोग है भाय ये तो. जो लिखा वो सहीसलामत और इधर ये एकदूसरे के सर फोड रैले है?'' सर्किटला आपलं नाव इतरच माणसं सार्थ करतायत, याचं फार आश्चर्य वाटलं, ``लेकिन भाय, एक चीज मेरे समझ मे नहीं आयी,'' सर्किटच्या डोक्यात भुंगा पोखरत होता, ``ये अपने बापू पे कभी बवाल नही होता है, वो क्यू? बापू का फॉल्ट क्या है? हमलोग तो खालीपिली उसको बडा मानते है. आजकल के जमाने मे उसका कोई व्हॅल्यूही नहीं है...''
मुन्ना हसून म्हणाला, ``ए सर्किट, ये इतना बडा बडा सवाल का जवाब देने के लिए भेजा मंगताय रे! वो अपुन के पास होता तो अपुन आज इधर होता क्या? तू सीधा बापूसेच पूछ ना! वो देख कोने मे खडा कब से मुस्करा रहेला है.''
सर्किटने डोळे चोळून पाहिलं. खरोखरच एका कोपर्यात बापू शांतपणे हसत उभे होते.
``बापू, इसमे हसनेवाली कोई बातही नही है, साला अपुन का कोई प्रेस्टिजही नही है दुनिया मे. आम्हाला कधीच असं ऐकायला मिळत नाही की बापूंच्या तसबिरीची विटंबना झाली, शंभर बस फोडल्या, 200 टॅक्सी तोडल्या, शहर बंद, नाके नाके पे कर्फ्यू, साला अभी तो यही नौबत आ गयी है के बापू के साथ कोई खिलवाड ही नही करता... हर किसी को मालूम है इंडिया मे इसका कोई व्हॅल्यू ही नही है...''
बापूंच्या चेहर्यावरचं स्मित मावळलं नाही. ते पुढे आले, सर्किटच्या पाठीवर हात ठेवून, त्याला शेजारी बसवून घेत म्हणाले, ``कोई मुझे माने या न माने, इससे मुझे कोई फर्क नहीं पडता बेटा. आता हा मुन्ना बघ. याने कधी माझं नावही ऐकलं नव्हतं. त्याला कधीतरी मला हाक मारावीशी वाटली. मी त्याच्या मदतीला धावलो. माझ्याकडून जमेल तशी मदत केली. त्याला माझा मार्ग सांगितला. तो त्याने आपखुशीने पत्करलाय. माझं काम असंच चालतं. कोणी हाक मारली, तरच मी जातो.''
``बापू, लेकिन तुम्हारा व्हॅल्यू ऐसा कम होते जाएगा, तो एक टाइम ऐसा आयेगा के कोई तुमको पुकारेगा नही. फिर क्या करोगे?''
``चरखा चलाऊंगा. सफाई करूंगा, कोई भी छोटा मोटा काम करते रहूंगा. मला सतत कोणीतरी हाक मारलीच पाहिजे, असाही माझा आग्रह नाही. उलट माणसांनी आतून इतकं ताकदवान व्हावं की त्यांना मलाच काय, कुणालाही हाक मारायची गरज भासू नये, अशी माझी इच्छा आहे. या जगात जे जे जन्माला येतं ते ते मरण पावतं. मग मी आणि माझं तत्त्वज्ञान तसं असावं, असा माझा आग्रह कशाला असेल? कधी ना कधी एखादा माणूस माझ्यापेक्षा मोठं तत्त्वज्ञान सांगेल आणि मला अडगळीत टाकेल. तेव्हा मी आनंदाने अडगळीत जाईन.''
``येहीच प्रॉब्लेम है तुम्हारा बापू. तुम खुद ऐसी बात करते हो तो तुम्हारे नाम पे कोई पत्थर कैसे उठायेगा, कोई किसी की माँ-भैन कैसे एक करेगा, कैसे सब की वाट लगा डालेगा? तुम्हारे प्रेस्टिज के वास्ते कैसे लडेगा?''
``बेटा सर्किट, लेकिन मुझे ऐसा प्रेस्टिज चाहिएही क्यूँ? तुला काय वाटतं? माझ्या बदनामीचे प्रयत्न होत नाहीत? खूप होतात. बनावट फोटो तयार करून मला मुलींबरोबर नाचताना दाखवतात, शिव्या देतात, टकल्या म्हणतात, थेरडा म्हणतात, अचकट पाचकट विनोद करतात. पण, जो मला खरोखर मानतो, तो माणूस असलं काही वाचून बिथरत नाही. ज्यांनी हे केलं, ते आजारी आहेत, त्यांना उपचारांची गरज आहे, हे त्या माणसाला माहिती असतं. काही माणसांचा आजार तर क्रॉनिक असतो, संस्कृतीचा जप करत ते आयुष्यभर ते या द्वेषाच्या विकृतीने पछाडलेले राहणार असतात. पण, त्यांच्याशी लढण्याचा एकच मार्ग असतो. प्रेमाचा. माझ्या नावाने कधी कोणी कोणाचं डोकं फोडलं तर मला जास्त वाईट वाटेल सर्किट. त्यापेक्षा घालूदेत की मला शिव्या, होऊन जाऊदेत त्यांचाही निचरा. त्याने काही माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत की मी खोटा ठरत नाही आणि मी खोटा ठरायला घाबरतही नाही. अरे, मी स्वतःच स्वतःची इतकी चिकित्सा केलेली आहे की इतरांनी केलेल्या चिकित्सेला मी कशाला घाबरेन?''
``अभी एक बात मेरे समझ मे आयी बापू, तुम्हारा आयडिया मैने पैचान लिया,'' सर्किटचे डोळे चमकत होते, ``साला कोणाचा पण अपमान करायला मजा कधी येते, जेव्हा सामनेवाला गरम होतो, तेव्हा. तू तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेतलेला माणूस. तुझी मस्करी करून तू गरमच होत नाहीस, चिडत नाहीस, म्हणजे समोरच्याचा सगळा मजा किरकिरा. बोले तो सॉलिड आयडिया बापू! मान गये तेरेकू.'' सर्किटने दिलेली टाळी स्वीकारून बापू गायब झाले. तोवर मध्यरात्र होऊन गेली होती, मुन्ना आणि सर्किट- दोघांच्याही डोळय़ांवर झापड आली होती...
....................
``ए सर्किट, उठ ना रे सर्किट, अरे, ये देख ये असली केमिकल लोच्या, ये कौन आ गया देख'' सर्किटला मुन्नाने हलवून हलवून जागं केलं. मुन्नाच्या बोटाच्या दिशेने सर्किटने पाहिलं तर त्याचीही झोप उडाली. कोठडीमध्ये हुबेहूब बापू होता, पण तरुणपणातला. तसाच चेहरा, तशीच मिशी, तसाच चष्मा, डोळय़ांत तसेच भाव. बापूला या रूपात आपल्याला भेटायची काय गरज आहे, असा प्रश्न दोघांनाही पडला. एकदम डोक्यात प्रकाश पडून सर्किट म्हणाला, ``भाय भाय, ये बापू नही, आपू है...''
``आपू... मतलब?''
``अरे भाय ये आप का बापू है...''
``ए सर्किट, तू क्या पावशेर मार के आया है क्या? मेरा बापू तो एकही है, वो तो तेरा भी बापू है, पूरे देश का बापू है...''
``अरे भाय, ये वैसे आप का बापू नहीं है, आप का मतलब आम आदमी पार्टी का बापू है, अरविंद बापू. आप का बापू है इसलिए इसका शॉर्टफॉर्म है आपू.''
 ``तेरेकू क्या मालूम? तू कैसे पहचानता है इसको?''
``भाय पूरा देश पैचानताय इसको. टीव्ही देखा करो तुम. जितना अपना नरेंदरभाय छाया रहताय टीव्हीपे उतनाच ये अरविंद भाय भी दिखता रहता है.''
``ये रात दिन टीव्हीपे रहता है तो काम कब करता है?''
``अच्छा सवाल है भाय. उसी से पूछते है ना! ए चिरकुट, इधर आ. डरने का नै. भाय अभी सुधर गयेले है. बोल ना, ये क्या पूछ रहे है.''
``मै कोई टीव्ही पे आने के लिए काम नहीं करता हूँ, मै जो करता हूँ वो टीव्ही पे आता है,'' आपूंनी बाणेदारपणे उत्तर दिलं. ते सकाळी दातही बाणेदारपणेच घासतात, सगळं बाणेदारपणेच करतात.
मुन्नाभाई हसला आणि म्हणाला, ``अरविंद भाय, तू अच्छा आदमी दिखता है. मैने इतने लोग देखे, जो दूसरे को टोपी पहनाते है. हमारे बापू ने भी सब को टोपी पहनाया, खुद के नाम का टोपी खुद नहीं पेहेना. पण, तू बापूची टोपी इतरांना घालताना स्वतःपण घातलीस. लेकिन भाय, तू ये हररोज लफडा क्यूं करता रहता है?''
``म्हणजे काय, मी सिस्टमच्या विरुद्ध लढतोय. लढतच राहणार. सगळा भ्रष्टाचार निपटून काढणार.''
``कैसे करेगा ये? जेल मे आके? भाषण दे के? अरे, पब्लिकने तुमपर भरौसा किया, तुमको दिल्ली मे चुन के दिया. तूने क्या किया? राज्य चालवून दाखवण्याऐवजी सत्ता सोडलीस आणि लोकसभेच्या रिंगणात उतरलास माती खायला. अब तुम को कौन वोट देगा? और किसलिए देगा?''
``गलती हो गयी वो हमसे. हर किसीसे होती है.''
``लेकिन जो हमेशा हर किसी की गलती दिखाते रहता है, उसकी गलती को लोग माफ नहीं करते है, समझ. अब भी सुधर जा. ये टीव्ही पे चमकते बैठेगा, तो पब्लिक टीव्हीस्टार बना देगी तेरे को! दो दिन की चांदनी, फिर जिंदगी भर का अंधेरा.''
``लेकिन सिस्टम से लडने मे क्या बुराई है, या देशातल्या जनतेला भ्रष्टाचाराचा कंटाळा आलाय, तिला बदल हवाय.''
``सही बोल रहा है भाई तू, लेकिन जनता ने वो बदलाव कर दिया है. तूने गाडी को धक्का तो दिया था, लेकिन स्टीअरिंग व्हील संभाला नही. उधर नरेंद्रभाईने चान्स मारा और अभी वो गाडी लेके फुर्रर्र हो गया है!''
``बेटा गांधी टोपी पहनने से कोई बापू नही बन जाता,'' सर्किट म्हणाला.
``लेकिन तुमको बापू नही, आपूही बननेका है,'' मुन्नाने त्याला जोड दिली, ``बापू तर विदेशी सत्तेविरुद्ध लढले होते. त्यांची लढाई सोपी होती. तुला तुझ्याच देशातल्या माणसांबरोबर लढायचंय. त्यांच्या वृत्तीबरोबर लढायचंय. यांना दुसर्याचा भ्रष्टाचार दिसतो आणि खुपतो, ते स्वतः त्याच यंत्रणेचा भाग असतात आणि त्यांच्या सोयीसाठी ती सिस्टम त्यांना हवी असते. तेरी लडाई भौत बडी है मेरे बाप, तू जेल मे टाइमपास मत कर और ये कॅमेरावालोंको अपने दिल-दिमाग से निकाल दे. भगा दे. बापू को याद कर, सोच तेरी जगह बापू होता, तो क्या करता. फिर जो केमिकल लोच्या होगा, उससे तुझे पता चलेगा क्या करना है, कहाँ जाना है.''
आपूच्या चेहर्यावरचे नेहमीचेच मख्ख भाव पाहून त्याला हे कळलंय का, पटलंय का, काही कळायला मार्ग नव्हता. तेवढय़ात लॉकअपचा दरवाजा खटखटवून हवालदाराने मुन्ना-सर्किट दोघांना बाहेर काढलं आणि आपूला म्हणाला, ``साब, आप की जमानत हो गयी है...''
``मी जामीन घेणार नाही. मी लढणार. मी आतच राहणार.'' आपूने निर्धाराने उत्तर दिलं.
मुन्ना-सर्किट दोघांनीही कपाळावर हात मारला आणि `ये कभी नही सुधरेगा' असं म्हणून दोघेही निघणार, तेवढय़ात मुन्नाचं लक्ष कोपर्यात गेलं...
...तिथे आपूकडे पाहात बापू शांतपणे हसत उभे होते.

मुखवटे आणि मुखवटे

आजकाल आमचा मूळचा दृष्टीदोष बळावलेला आहे, यात शंकाच नाही.
``डोळय़ांच्या खाचा आधीच झालेल्या होत्या, आता डोळे उघडले, एवढाच याचा अर्थ,'' असा आवाज मागून आला, तो बायकोचा तरी असणार किंवा एखादय़ा फेसबुक फ्रेंडचा, यातही काही शंका नाही. इतरांबद्दल इतकी खात्री इतर कोणाला असत नाही. असो.
ज्याला पाच नंबरचा चष्मा आहे आणि ज्याचे त्या चष्म्याआडचे डोळे पाहिल्यावर अधूनमधून त्याची भार्याही घाबरते, अशा माणसाने दृष्टीदोषाबद्दल जरा जपूनच बोलायला हवं. (लगेच चेहरा पाडू नका हो, तुम्हाला एवढा मोठा नंबर लागला आणि तुमचे डोळेही असे बटाटय़ासारखे दिसायला लागले, तर घाबरेल की तुमचीही बायको- तेवढय़ासाठी डोळय़ांच्या खाचा करून घेणं परवडतं का, ते बघा म्हणजे झालं.) म्हणूनच आम्ही आधी आमच्या दोषाची खातरजमा करून घेतली आणि नंतरच या विषयाला हात घातला. आम्हाला अत्र-तत्र-सर्वत्र मोदीच दिसून राहिले आहेत, हा आमचा नवा दृष्टीदोष. तुम्ही म्हणाल, यात नवेही काही नाही आणि दृष्टीदोषही काही नाही. आनंदी आनंद गडे, या गाण्यातही मुळात `इकडे तिकडे मोदी भरे' अशीच ओळ होती की काय, असं वाटण्याजोगं मोदीमय वातावरण खास निर्माणच करण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला सर्वत्र मोदी दिसतात, यात आश्चर्य काय! तुम्हाला चुकून कुठे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी दिसले असते, तर मात्र डोळय़ांची तातडीने तपासणी करून घ्यायला लागली असती. तुमचंही हे म्हणणं बरोबरच आहे. पण, आमच्या चित्तचक्षुंना जे मोदी दिसतायत ते वेगळेच आहेत. निवडणुकीच्या आधी आम्हाला मोदी-मुखवटे घातलेल्या माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त सभास्थानी दिसायच्या. आता निवडणुकीनंतर हे मो-मु घातलेली इतकी माणसं इतक्या ठिकाणी दिसतायत की हे खरोखरचे मुखवटे आहेत की आमचा भास, हेही कळेनासं झालंय. सर्वात वाईट भाग असा की या गदारोळात खरे मोदी समोरून गेले तरी आम्हाला पत्ता लागायचा नाही आणि आम्ही `हेर मोदी' अशी सलामी दय़ायला विसरायचो आणि भलताच गंभीर प्रसंग ओढवायचा. (गेली वर्ष-दोन वर्षं देशाच्या पंतप्रधानांची यथेच्छ निंदानालस्ती करणारी मंडळी एकदम आता किती संवेदनशील झाली आहेत आणि जनमताचा आदर शिकवू लागली आहेत, ते आठवा जरा!)
आपल्या दृष्टीचं आणि या जिथे तिथे दिसणार्या मोदींचं समीकरण दुरुस्त करण्यासाठी विश्वसनीय `चेहरा'च गाठायला हवा, या भावनेने आम्ही आमचे (दादर-शिवाजी पार्क भागातील) एकमेव मार्गदर्शक राजराजेश्वर राजजींकडे कृष्णभुवनात पातलो. (कंपोझिटर, `त'वर लक्ष ठेवा, नाहीतर... असो.) कृष्णकुंज असे काही अडाणी लोक या इमारतीला म्हणतात. आम्ही `कृष्णभुवन'वाले असल्यामुळे थेट आत प्रवेश मिळाला.
``केम छो,'' हे मान्यवर नरेंद्रभाईंच्या मुखातील मधाळ शब्द इथे कानी पडल्यानंतर आम्ही उडालोच.
``सारू... सारू छू'' असं प्रत्युत्तर देऊन आम्ही आमच्या भाषापांडित्याचं दर्शन घडवत असतानाच एकुलत्या एका कोटाच्या त्यातल्या त्यात धडक्या कोपर्याच्या- हिंदी च्यानेलांच्या भाषेत- धज्जिया- उडाल्याचे आमच्या लक्षात आले आणि कशीबशी पाटलोण सावरत आम्ही पळू लागलो. आम्हाला केम छो असे वाटलेले शब्द हे बहुधा `जेम्स छू' असे असावेत. थोडय़ाच काळात आम्ही सपाट आडवे, विक्राळ दंतपंक्ती दाखवणारा कुत्रा- आमच्या चष्म्याआडच्या बटाटय़ा डोळय़ांमुळे मंत्रमुग्ध होऊन - आमच्या छाताडावर पाय रोवून स्तब्धावस्थेत उभा अशा स्थितीत कानावर शब्द आले, ``किती दचकवलंत त्याला? केवढा घाबरलाय तो!''
आवाजाच्या दिशेने मान फिरवून पाहिलं तर साक्षात मोदी उभे! अरेच्चा, हे बडोदय़ाच्या बाहेरही मराठीत बोलतात? पण, आवाज का असा सर्द वाटतोय... मग हाफ बाहय़ांचा रणबीर कपूर छाप स्वेटर पाहिल्यावर लक्षात आलं, हे तर खुद्द राजराजेश्वर... त्यांच्या चेहर्यावरचा मोदींचा मुखवटा मात्र संसदेत ढसढसा रडणार्या मोदींसारखा होता. त्यांनी हाताच्या खुणेनेच कुत्र्याला हटवलं, आम्ही बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे मुखवटय़ाकडे निर्देश करून हाताच्या खुणांनीच विचारलं, ``हे काय आणि हे असं कसं?''
``तुमच्यामुळे झालंय हे सगळं!'' रडक्या मुखवटय़ातून चिडका आवाज काढत राजराजेश्वर म्हणाले, ``च्यायला, आम्हीही येडबंबूच! (त्यांच्या ओठांवर आलेले मूळ शब्द परतवून त्याजागी सभ्य शब्दप्रयोग करताना त्यांच्या ओठांचा झालेला चंबू आमच्या नजरेतून निसटला नाही.) नाहीतरी लोक आपल्याला काकाची झेरॉक्स कॉपीच मानतात, तर ऍक्शन रिप्लेच करू, म्हणून सुरुवातीची काही वर्षं त्यांचा मुखवटा चढवला. तुम्ही लोक साले असे हरामी, त्यांच्या सभांनाही लाखालाखांची गर्दी करून फुकटचा टाइमपास करून हसत-खिदळत घरी जायचात आणि शिक्का गायवासरावरच मारायचात. माझ्याही सभांना गर्दी करून, टीव्हीवाल्यांचा टीआरपी वाढवून शिक्का मारायचात तो हातावर नाहीतर घडय़ाळावर! आता माझा प्रिंटर बिघडलाय आणि ब्लूप्रिंट बाहेर पडता पडत नाहीये, हा काय माझा दोष! जरा धीर नाही तुम्हा लोकांना! आत्ताच्या आत्ताच करा नवनिर्माण! अरे काय पाणीपुरी आहे का ती भय्याची? (भय्या हा शब्द उच्चारताच त्यांना भय्या आणि भाऊ या दोघांची आठवण झाली असावी. चेहरा भलताच आंबट झाला होता.) शेवटी म्हटलं यांना विकासच हवाय तर मोदींचा मुखवटा चढवूयात. दादिटल्याच्या आधी मी हा मुखवटा चढवला. तरी तुम्ही माझ्या मुखवटय़ाची ही अवस्था केलीत आणि त्याच्या मुखवटय़ाला गोंजारलंत, त्यांना निदान गायीबरोबर गोचिडाचा प्रवास घडतोय... आमचं इंजीन डायरेक्ट भंगारात? एकही मारा, लेकिन क्या सॉलिड मारा, हा माझाच डायलॉग माझ्यावरच उलटवलात... कुठे फेडाल हे पाप?...''
राजराजेश्वर पुढेही बरंच काही बोलत राहिले असणार. पण, ते ऐकायला थांबण्याइतके आम्ही वेडे थोडेच आहोत. नाशकात सत्ता दिली, तिथे काय केलं? मुंबईतल्या नगरसेवकांनी काय दिवे लावले? याला कानफटव आणि त्याला चोप, याच्यापलीकडे यांच्या आमदारांनी काय केलं? हे सगळे प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती. सगळं बिल आमच्यावर फाडून (वर यांच्या कुत्र्याने कोट फाडला तो वेगळाच) आमच्याकडून साडेपाच फुटी बुकेचे पैसे वसूल करण्याचा त्यांचा कावा आमच्या लक्षात आला आणि आम्ही तडक वांद्रय़ाच्या दिशेने धूम ठोकली.
वांद्रे पूर्वेतील आमचे एकमेव आदरस्थान उद्धोबाळाजी आणि एकमेव आशास्थान आदित्यराजे यांच्या दरबारात आम्ही प्रवेश केला आणि छद्मीपणाने हसणार्या कुत्सित आवाजात सिंहासनाकडून शब्द आले, ``आले आले, चालते बोलते बुके आले.'' आता आमच्या उंचीचा (म्हणजे तिच्या अभावाचा) असा उपमर्द करण्याचं काही कारण नव्हतं. पण, मर्द-उपमर्दाचं त्यांना भारी आकर्षण. आम्हीही लगेच संधी साधून ``आज सिंहासनात खुद्द तुम्हीच आहात वाटतं, एरवी हरहमेश मिलिंदनारोजीच बसलेले दिसतात, पुसता पुसता बसून घेतात,'' असा टोला हसत हसत लगावला आणि सिंहासनाकडे पाहिलं तो झटकाच बसला. उद्धोबाळाजींच्या चेहर्यावर डबल मुखवटा! एक पुढे- एक मागे! पुढे दिवंगत शिसेप्रहिंहृस थोरले बाळाजी आणि मागे नम्मोजी! हा काय चमत्कार! बाहेर शिवबंधनात बद्ध सैनिक उद्धोबाळाजींचा मुखवटा चढवून उभे आहेत आणि आत हे!
``हा काय प्रकार?'' आम्ही पृच्छा केली.
``ही सगळी तुमची कृपा,'' उद्धोबाळाजींनी हात जोडले आणि म्हणाले, ``आता महाराष्ट्रात ही बाजू आणि बाहेर ती बाजू, अशी कसरत करणं आलं. तुम्हीही काय खट लोक आहात. थोरल्या साहेबांना जागा कमी दिल्यात, पण परिस्थिती अशी निर्माण केली की त्यांनी इथून आवाज दिला, तरी दिल्लीचं तख्त हललं पाहिजे, तिथला मोठय़ात मोठा सिंहासनाधीश्वर झक्कत उठून, मागे हात बांधून इथे बोंबलत आला पाहिजे. इथला-तिथला दोन्हीकडचा रिमोट कंट्रोल त्यांनी झोकात बाळगला. आमचं नशीब असं फुटकं की त्यांनी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या एवढय़ा जागा आम्हाला दिल्यात मात्र दिल्लीत विचारतो कोण? महाराष्ट्र सदनाचा शिपाई! त्यालाही लखोबाची ओळख सांगायला लागते, तेव्हा तो रजिस्टर उघडते. इथून आम्ही मारे डरकाळय़ा फोडतो, उग्रलेख लिहितो. पण, ते लागली सवय जात नाही म्हणून. आता आदेशाचे दिवस गेले, `संदेश'चे दिवस आले. दात विचकत उभे का आहात? आवजो.''
नम्मोजींमुळे आम्हाला `आवजो'चा अर्थ `या' असा नसून `जा' असाच आहे, याची माहिती होती, त्यामुळे आम्ही तात्काळ निघालो. एन्रॉन बुडणार होती, दाऊद फरपटत येणार होता, त्याचं काय झालं? प्रभूकाकांनी आणलेला जैतापूर प्रकल्प घातक कधी झाला आणि आता तो अचानक पावन कसा काय ठरला? ज्यांच्याविरुद्धच्या आंदोलनात सेनेच्या रणरागिणीचा डोळा फुटतो, त्यांची जाहिरात तिसर्या दिवशी मुखमार्जनपत्रात कशी झळकते? ज्या शाखाशाखांवर लोक विश्वासाने आपली गार्हाणी घेऊन यायचे, तिथे मांडवली कशा सुरू झाल्या, ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नव्हतं, ते पेटय़ा-खोक्यांची भाषा कशी बोलायला लागले, वगैरे प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती. त्यामुळे आम्ही तात्काळ पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि थेट मंत्रालयाचीच बस पकडली.
कमळपक्षाचे गलितगात्र लोह-पितळ-कथीलपुरुष (हा धातूबदलाचा अनुक्रम आहे) लालकृष्णजींनीही जिथे नरेंद्रभाईंची कृपा मान्य करून या वयात नम्मोजींचा मुखवटा चढवून घेणं मान्य केलं, तिथे बाकीच्यांची काय कथा असणार, हे आम्हाला ठाऊक होतं. तिथे असेही `चेहरे' सापडतच नाहीत. त्यामुळे आम्ही तिकडे वेळ न दवडता थेट मंत्रालयात शिरलो. आघाडीवीरांकडे मुळात तोंड दाखवायला जागा नाही, तिथे मुखवटा दाखवायला जागा कुठून असणार, असा आमचा होरा होता. दारापासूनच चेहरा उतरलेल्या काकाश्रींच्या आणि मातोश्री-बेटाश्रींच्या मुखवटय़ांचा खच पडलेला होता. काम संपलं किंवा काम झालं नाही तर राजकारणात लोक बापालाही बाप म्हणत नाहीत. काका-अम्मा-ताई-दादा-पप्पूभय्या ही तर फार लांबची नाती झाली. नाही म्हणायला एका कोपर्यात दोनचार टाळकी दादा-मुखवटा चढवून पाहताना दिसली.
``हाच आता तरुण-तडफदार मुखवटा आपला.'' एकजण उसासून म्हणाला.
``बंद थोडे सैलच ठेवा. हवा बघून निर्णय घ्यायला सोपं,'' दुसर्याने व्यवहारज्ञान सांगितलं.
दुसर्या कोपर्यात बहना-मुखवटा चढवण्याच्या तयारीत तीन-चार टकली दिसली.
``आता प्रियंका मुखवटाच आपली लाज वाचवू शकतो,'' त्यांच्यातला एकजण म्हणाला.
``बच्चा, नया है तू! प्रियंकाचं आडनाव काय आहे? गांधी-वड्रा! हा वड्राच आपली लाज काढू शकतो... जरा जपून,'' दुसर्याने पोक्त सल्ला दिला.
शिमग्याचे मुखवटे घातलेले कोकणसम्राट, मफलरीआड चेहरा झाकलेले टक्कामंत्री, गप्प पोपट, कटी पतंग या सगळय़ांना पालांडून आम्ही मामुमंच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिरलो.
``या या या,'' भरघोस स्वागत झालं. उत्साही आवाजामुळे आम्ही चमकलो आणि खुर्चीत नम्मोजींना पाहून दचकलो. आम्हाला `भॉक्' करून पृथ्वीपतींनी मोदी-मुखवटा उतरवला. आम्ही भौंचक्के होऊन हे काय, अशी हातानेच पृच्छा केली.
ते म्हणाले, ``तुम्हीच ही वेळ आणलीत. अहो, आम्ही घसा कोरडा करून तुम्हाला सांगत होतो, सगळय़ात नंबर वन आपणच आहोत. ते फेकतायत, नुसती बंडलं मारतायत. पण, तुम्ही कुठले ऐकायला. तुम्हाला याच तोंडातून सगळं ऐकायला आवडतं तर तेच दाखवतो.''
आम्ही कपाळावर हात मारून घेतला आणि चालते झालो. गेल्या दहा वर्षांत यांनी राज्याची काय स्थिती केलीये, याबद्दल बोलण्याची ती वेळ नव्हती. आता आम्हाला पडलेल्या प्रश्नांचा उलगडा देशातल्या एकमेव चेहर्याशिवाय म्हणजे `मी न मोजी कुणाला' अशा नमवीत भूमी ऐटीत चालणार्या साक्षात नम्मोजींशिवाय केणीही करू शकणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तडक दिल्लीकडे कूच केली आणि गुजराथ भवन गाठले. बडोदय़ाहून आलोय, असं सांगितल्यानंतर कोणाची टाप झाली नाही अडवायची. तडक नमोजींसमोर जाऊन उभे राहिलो. त्यांना काही विचारणार, तेवढय़ात समोरचं दृश्य पाहून घेरीच यायची बाकी राहिली...
आमचे आखिल भारतातील एकमेव आदर-प्रेरणा-गर्वस्थान असलेले विकासपुरुष नम्मोजीच एका मुखवटय़ाशी झटापट करत होते...
``नम्मोजी, तुम्हाला मुखवटय़ाची काय गरज?'' आम्ही जवळपास किंचाळलोच.
``मित्रों, या देशावर राज्य करायचं असेल, तर कोणत्याही पक्षाला काँग्रेस बनावंच लागतं आणि बहुमताने सत्ता मिळाली तरी हा मुखवटा चढवायलाच लागतो...''
नम्मोजींनी तो प्रेमळ, आश्वासक, ऊबदार, दिलदार मुखवटा चढवला आणि आपण अब की बारीही (संवेदनशील, कविमनाचे, पाकिस्तानप्रेमी) अटलबिहारीच निवडून दिले आहेत, हा अद्भुत साक्षात्कार आम्हाला झाला!

हिरवळ, उरवळ आणि दरवळ

(टीव्हीवरच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचं एकदम हळुवार, पचपचीत, रटाळ, रेंगाळवाणं संगीत वाजतं. पाप्याचं पितरच दिसणारा एक अगदी पोरसवदा, भेदरलेल्या सशासारखा निवेदक डोळे चोळत पेंगुळल्या स्वरात जांभया देत निवेदन सुरू करतो.)
निवेदक ः नमस्कार, मी नितीन नवखे आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो आहे, आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे (जांभई देत) `उरवळ आणि दरवळ'! आता निवडणुकीच्या काळातली पेड न्यूजची हिरवळ संपून गेल्यामुळे आम्हाला हे असले कार्यक्रम करण्यावाचून गत्यंतर उरलेलं नाही. (चपापतो, कॅमेर्याकडे पाहतो, इकडे तिकडे पाहतो, तंत्रज्ञांना विचारतो) अर्रर्र, एडिट नाही का होणार हे? ओह, लाइव्ह आहे नाही का? असूदेत. दोनपाच महिने आपण इलेक्शनच्या बातम्यांचा रतीब घालून इतकं बधीर करून टाकलंय प्रेक्षकांना की आता त्यांना आपण काय ऐकतोय हे कळतही नसेल... असो (पुन्हा सावरून)... निवडणुका संपून निकालही लागलेले असल्यामुळे आता आमच्या सगळय़ा प्रमुख अँकरांना म्हणजे निवेदकांना ओरडून ओरडून बोलण्यासारखं आणि हातवारे करण्यासारखं काही उरलेलं नाही. त्यामुळे ते सगळे रजेवर गेले आहेत. निम्म्यांचे घसे सुजलेले आहेत आणि अर्ध्याजणांचे हात सांध्यांमधून निखळल्यामुळे प्लास्टरमध्ये ठेवलेले आहेत. तीन-चार चॅनेलवर चर्चेत तीच तीच तुणतुणी वाजवून वाजवून भ्रमिष्ट झालेल्या पॅनेलवरच्या पत्रकारांना आणि पक्षप्रवक्त्यांनाही सुटी मिळालेली आहे. त्यांच्यातल्या निम्म्याजणांना आपण नेमक्या कोणत्या पक्षाचे समर्थक आणि प्रवक्ते आहोत, हेच कळेनासं झाल्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणार्या तीन डॉक्टरांना यांचं बोलणं ऐकून तेच भ्रमिष्ट झाल्यामुळे मनोरुग्णालयात भरती करावं लागलं आहे. शिवाय, नवीन सरकारने नवीन घोटाळे करेपर्यंत आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज काय दय़ायची, हा प्रश्न आहेच. त्यामुळे लवकरच आम्ही तुम्हाला, एका कुत्रीने एका सशाला जन्म दिल्याची आणि अंतराळातून उडत्या तबकडय़ा येऊन कोकणातले पिकलेले हापूस चोरून नेत असल्याची ब्रेकिंग न्यूज देऊच. तोपर्यंत आम्ही सगळे शिकाऊ लोक मिळून तुम्हाला बोअर करण्याची जबाबदारी पार पाडणार आहोत. त्याच मालिकेतला आजचा हा कार्यक्रम आहे उरवळ आणि दरवळ. निवडणुकीची  फुलं कोमेजून गेल्यानंतर आता उरलाय तो दरवळ आणि मतदारांपासून वर्तमानपत्रं-चॅनलवाले आणि अन्य कोणाकोणाच्या पंक्ती उठून गेल्यानंतर भांडय़ांमध्ये उरली आहे ती उरवळ. `प्रतिभा आणि प्रतिमा'च्या चालीवर कार्यक्रमांना आकर्षक शीर्षकं देणारे आमचे इनपुटचे हेडही निवडणुकीच्या काळात भलभलतं काही पुटपुटू लागल्यामुळे रजेवर गेले आहेत आणि ट्रेनी मंडळींवरच शीर्षकं देण्याची जबाबदारी आली आहे, हे आपल्या लक्षात आलं असेलच.
आशा आहे की आजचा आपला कार्यक्रम आपण स्वतः पाहात असाल, एखादय़ा शिकाऊ प्रेक्षकाला त्यासाठी बसवलं नसेल.
असो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, पडदय़ामागच्या कलावंतांना. अंहंहंहं, उठून टीव्ही बंद करायला येऊ नका. हा सिनेमा किंवा टीव्ही कार्यक्रमांच्या पडदय़ामागच्या कलावंतांबद्दलचा कार्यक्रम नाही. हा निवडणुकीशीच संबंधित कार्यक्रम आहे. बसलात ना लगेच? पक्के भारतीय प्रेक्षक आहात. ज्याच्यातून आपल्याला कसलाही बोध होणार नाही, ज्याचा आपल्याला काडीचाही फायदा नाही, असे कार्यक्रम पाहायला फार आवडतं तुम्हाला, नाही का? असो. आमचं काय, तुमची जी आवड असेल, तसे कार्यक्रम करून दाखवायचे, हे आमचं काम! आम्हाला टीआरपीशी मतलब. इथे चीअरलीडर दाखवण्याची पद्धत नाहीये म्हणून. नाहीतर आम्ही तुम्हाला तेही दाखवलं असतं मस्त चवीचवीने. काय म्हणालात? आम्ही सगळे कोण आहोत? (ओशाळं हसत) तेही बरोबरच आहे म्हणा तुमचं. आम्ही जो मतामतांचा नाच करून दाखवतो, तो त्या पोरींना साताजन्मात जमायचा नाही. असो. आता आजच्या कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळूयात. आजचा कार्यक्रम आहे निवडणुकीच्या पडदय़ामागच्या कलावंतांची ओळख करून देणारा. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत, प्रसिद्ध फेसबुकी विचारजंत (जीभ चावून) सॉरी, विचारवंत म्हणायचं होतं मला, पण एका सरसंघसंपादकांचे अग्रलेख वाचून वाचून माझी शब्दसंपदा नको तिथे संपन्न झालेली आहे, तर हे आहेत प्रख्यात फेसबुकी विचारवंत ना. ना. चेहरे. आपले आजचे दुसरे पाहुणे आहेत व्हॉट्सऍप कामगार स. दा. कष्टी आणि तिसरे पाहुणे आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ आय. टी. तिरंदाज. नमस्कार.
(चेहरे लॅपटॉपमधून, कष्टी फोनमधून डोकं वर काढून नमस्कार करतात. तिरंदाज मात्र फोन आणि लॅपटॉपमधून डोकं वर काढतच नाहीत. त्यांना हलवून सांगितल्यानंतर ते कानातली इयरफोनची बोंडकं काढून नमस्कार करतात आणि पुन्हा डोकं खाली घालतात.)
नवखे ः अरे वा वा वा! आपण सगळे लोक अजूनही कार्यरत आहात, इथे या कार्यक्रमात आल्यानंतरही तुमचं काम थांबलेलं नाही, हे पाहून मला फार आनंद झाला. आज देशाला तुमच्यासारख्याच लोकांची गरज आहे.
नाना ः तुमचं हे बोलणं ऐकून मला फार गहिवरून आलं.
सदा ः हो ना, माझेही डोळे पाण्याने डबडबले.
नवखे ः का हो का?
नाना ः अहो, रिकामटेकडे आहोत, असाच सगळय़ांचा समज असतो. घरात तर आम्हाला फार हिडीसफिडीस केलं जातं.
सदा ः बरोबर आहे नानांचं. मला तर आता हेही आठवत नाहीये की घरात हिडीसफिडीस होते म्हणून मी व्हॉट्सऍपवर असतो की मी व्हॉट्सऍपवर असतो म्हणून मला हिडीसफिडीस होते.
नाना ः मलाही सगळे फेसबुकवर पडीक असतो म्हणून हिणवतात हो!
(या सगळय़ा भानगडीत आयटी मात्र डोकं वर काढत नाही. त्याला नवखे पुनःपुन्हा विचारतो, तेव्हा तो उत्तरतो.)
आयटी ः माझा हा पोटापाण्याचा धंदा आहे. हे घरातल्यांना माहिती आहे. बरं, मी कायम कुठेही गेलो तरी असाच असतो. लग्न झालं तेव्हा त्या अंतरपाटाच्या मागेही असाच उभा होतो. त्यामुळे मी काम कधी करतोय आणि टाइमपास कधी करतोय, हे कुणाला कळण्याची शक्यताच नसते.
नवखे ः आणि तुमचं बरचसं काम टाइमपाससारखंच असतं नाही का? (आपल्याच विनोदावर हहहह करत हसून) मला सांगा नाना, तुम्ही विचारजंत... आय मीन विचारवंत कधी झालात?
नाना ः विचारवंत होता येत नाही. जन्मच विचारवंत म्हणून व्हावा लागतो. ठाम आणि स्पष्टपणे मतं मांडता यावी लागतात. फेसबुकच्या जन्मानंतर मला एक माध्यम सापडलं, बस.
नवखे ः माणूस जन्मजातच विचारवंत असतो, असा एक नवा विचार तुम्ही दिलेला आहेतच नाना! पण, पुढे काही अभ्यास वगैरे तर करावा लागत असेल ना?
नाना ः अभ्यास? तो करून काय करायचंय? इथे काय दहावी-बारावीची परीक्षा दय़ायचीये अभ्यास करून? काहीतरीच काय! अभ्यास करण्यात वेळ घालवला तर मतं व्यक्त कधी करायची? असं आहे नवखे, मी मुळातच बुद्धिमान असल्यामुळे मला उपजतच काही मतं आहेत. ती माझी मतं आहेत, त्याअर्थी ती बरोबरच आहेत. ती मी फक्त मांडतो आणि त्यांचं समर्थन करत राहतो. जे त्या मतांच्या विरोधात बोलतो, विरोधी मत व्यक्त करतो तो मूर्ख आणि जो माझ्या हो ला हो करतो, तो हुशार असा सिंपल फंडा आहे.
नवखे ः फारच सुंदर सांगितलंत नाना! पण, निवडणुकीसारख्या विषयात आधीच्या निवडणुका, मतदानाचे ट्रेंड, जातपातीची समीकरणं वगैरे गोष्टींची थोडीफार माहिती तरी असावी लागत असेलच ना?
नाना ः नवखे तुम्ही भारतीय आहात की बांगलादेशी?
नवखे ः अर्थातच भारतीय. पण तुम्ही असं का विचारताय?
नाना ः माहिती, अभ्यास वगैरे काहीतरी भयंकर कुणी घुसवलंय तुमच्या डोक्यात? अहो, भारतात राहतो आपण. मला सांगा तुमचा आवडता खेळ कोणता?
नवखे ः अर्थातच क्रिकेट.
नाना ः तुम्ही कधी मैदानात पॅडबिड लावून क्रिकेट खेळला आहात, सीझन बॉल कधी हातात घेतलाय? हाफ व्हॉली, फुल लेंग्थ, गुड लेंग्थ, मिड ऑन, लाँग ऑन, शॉर्ट लेग वगैरेंमधला फरक तुम्हाला माहिती आहे का?
नवखे ः नाही.
नाना ः तरी काल संध्याकाळी तुम्ही याच वेळी विराट कोहलीने त्याच्या बॅटिंगचं तंत्र सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या टिपा देतच होतात ना? तसंच असतं ते! मला ठेंगा पक्ष आवडतो. या पक्षाने सगळय़ा भारतवर्षाला गेली साठ वर्षं ठेंगा दाखवलाय, असं विरोधक म्हणतात. तो ठेंगा नसून ती प्रोत्साहनाची, प्रगतीची खूण आहे, असं मी म्हणतो. काही झालं तरी देशात ठेंग्याला पर्याय नाही, असं माझं मत आहे. तेच मी मांडतो, ठासून मांडतो. देशातल्या सगळय़ाच्या सगळय़ा जागा याच पक्षाला मिळतील, असं भाकीत करून मोकळा होतो.
नवखे ः नानांसारख्या विचारवंतांची विचारप्रक्रिया आपण पाहिली. आता वळूयात स. दा. कष्टी साहेबांकडे. तुम्ही सतत मोबाइल फोनला चिकटलेले असता. काय करत असता तुम्ही?
सदा ः मी सतत व्हॉट्सऍपवर असतो. आमच्या गुलाब पक्षाचा आणि जितेंद्रभाईंचा प्रचार करत असतो. 
नवखे ः म्हणजे तुम्हीही तेच करत असता, जे नाना करत असतात. पण, तुम्हाला लोक विचारवंत म्हणत नाहीत. तुम्हाला याचं वाईट नाही वाटत?
सदा ः कमाल झाली. तुम्ही मला असं विचारताय की नानांना लोक आईवरून शिवी देतात आणि मला देत नाहीत, तर मला वाईट नाही का वाटत? अहो, विचारवंत, सेक्युलर, समाजवादी, अंधश्रद्धा निर्मूलक या सगळय़ा शिव्या आहेत आजकालच्या काळातल्या. त्या लोक मला देत नाहीत, याचा मला आनंदच होतो. शिवाय, नाना डोकं वापरत असतील. मी ते वापरत नाही. मी एक सैनिक आहे. लढाई कुणाची आहे, तिच्यात फायदा कुणाचा होणार, मुळात लढाई करत बसण्यात काही अर्थ आहे का, या सगळय़ा भानगडींमध्ये मी पडत नाही. आदेश आला की काम करतो.
नवखे ः काय काम करता तुम्ही?
सदा ः शिवीगाळ, बदनामी, चारित्र्यहनन, खोटे दावे, खोटे आरोप, मस्करी, टिंगलटवाळी, शेरेबाजी, अश्लील टिप्पणी असं काहीही करून मी विरोधी पार्टीचं आणि विरोधी पार्टीच्या लोकांचं हसं उडवत असतो. प्रतिपक्षाच्या बायकांविषयी असभ्य उद्गार ही माझी स्पेशॅलिटी आहे.
नवखे ः अहो, पण, तुम्ही तर खूप संस्कारी संघटनेचे सदस्य आहात...
सदा ः म्हणजे काय? आमच्यावरचे संस्कारच आहेत तसे. आम्ही बोलू ते परखड आणि इतर करतील ती शिवीगाळ असा आमचा खाक्या आहे. आमच्या वेगवेगळय़ा शाखांचे लोक काय काय भारी प्रकार करतात, ते एकदा व्हॉट्सऍपवर पाहा. चक्रावून जाल. आमच्या प्रातःस्मरणीय यादीत खूप लोक आहेत. पण, आमचे खरे आदर्श दोनच. एक हिटलर आणि दुसरा गोबेल्स.
नवखे ः गोबेल्सच्या प्रचारतंत्राचे धडे तर आम्हीही शिकलेलो आहोतच सदाभाऊ. फक्त आम्ही तुमच्यासारखे नॉटपेड नाही, प्रिपेड, पोस्टपेड आहोत. असो. आता वळूयात आयटी तिरंदाज साहेबांकडे. नेहमीप्रमाणे त्यांची मान खालीच आहे. मला कुतूहल आहे, आत्ता तुम्ही नेमकं काय काम करताय या कार्यक्रमात बसून?
आयटी ः फेसबुकवर पोस्ट करत होतो, ट्वीट करत होतो, एसेमेस पाठवत होतो, व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवत होतो...
नवखे ः तुम्ही लोक जे बोलताय त्याचे. नाना बोलले ते आमच्या एका क्लायंटसाठी चांगलं वाटलं. सदाभाऊ बोलले ते दुसर्या क्लायंटच्या उपयोगाचं होतं. तुम्ही बोलताय ते माझ्या उपयोगाचं होतं. फटाफट तुमच्या बोलण्याची स्टेटस झाली, ट्वीट झाली, एसेमेस बनले. आतापर्यंत काही लाख लोकांपर्यंत पोहोचलेसुद्धा असतील तुमचे विचार.
नाना ः एक्स्क्यूज मी, पण, तुमचं अकाउंट मी पाहिलेलं नाही फेसबुकवर. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये नाही आहात तुम्ही.
आयटी (हसून) ः मी? अहो मी कोण? माझं एक अकाउंट नाही आणि माझा एक नंबर नाही. माझी म्हणजे आमच्या टीमची हजारो फेक अकाउंट आहेत फेसबुकवर आणि व्हॉट्ऍप-ट्विटरवर. गरजेप्रमाणे आम्ही हवी तेवढी अकाउंट बनवू शकतो. या सगळय़ा अकाउंट्सचं काम हेच असतं. प्रचार, प्रचार आणि प्रचार. जी पार्टी पैसे देईल तिचा प्रचार.
नवखे ः पण मला सांगा तुमची विचारधारा कोणती?
आयटी  (हाताने नोटांची खूण करत) ः जी तुमची आहे तीच आमची विचारधारा. ये सब चोर है! यांच्यातला कोणीही सत्तेत आला तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही. यांचे चेहरे बदलतात, बॅनर बदलतात, नावं बदलतात, पण सगळे शेवटी एकच आहेत. सगळे मिळून आपल्याला उल्लू बनवत असतात. मग पाच वर्षांतून एकदा यांना पिळून घेण्याची संधी का सोडायची? जो पैसे देईल त्याचा प्रचार करायचा. सिंपल.
नवखे ः अहो, पण ठेंगा पार्टीचाही प्रचार तुम्ही करणार आणि गुलाब पार्टीचाही प्रचार तुम्हीच करणार?
आयटी ः त्याने फरक काय पडतो? अहो इकडे लिहिलेला मजकूर चार शब्द फिरवून तिकडे जसाच्या तसा वापरता येतो. आपली पार्टी वेगळी आहे, आपले विचार वेगळे आहेत, हे नाना आणि सदाभाऊंना वाटतं. हा वेगळेपणा पाटर्य़ांमध्ये नाही, यांच्या डोक्यात आहे. यांच्या पाटर्य़ा म्हणजे पैसेवाल्यांच्या गळय़ातले टाय आहेत किंवा खिशातले नाक पुसायचे रूमाल- पाच वर्षं हा वापरला, कंटाळा आला की पाच वर्षांनी दुसरा वापरला.
नवखे (आपली जागा सोडून घाईघाईने आयटीकडे जातो आणि चक्क त्याचं तोंड दाबून कॅमेर्यापुढे वेगवेगळे हातवारे करून) ः हरे राम, याला कोणी बोलावला रे! हा आपलीही ट्रेड सिक्रेट फोडून टाकेल आता. तर प्रेक्षकहो, आपण पाहात होतात आमचा खास कार्यक्रम उरवळ आणि दरवळ. काही अपरिहार्य कारणामुळे तो आम्ही मध्येच बंद करत आहोत. पण, चिंता करू नका. हा चॅनेल सोडून कुठेही जाऊ नका. तुमच्यासाठी `अंधश्रद्धा निर्मूलन झालेच पाहिजे' हा कार्यक्रम थोडय़ाच वेळात सादर होणार आहे. त्याआधी पाहा ही सर्वसंकटनिवारक शनिमंत्राची जाहिरात.

गरीबनगर गरीबच राहिलं, त्याची गोष्ट!

गरीबनगराला श्रीमंत होण्याची संधी फक्त पाच वर्षांतून सरासरी तीन वेळा मिळते.
प्रत्येक वेळी ही श्रीमंती फार फार तर अडीच दिवस टिकते. म्हणजे पाच वर्षांतून साडेसात दिवसांची श्रीमंती.
हे साडे सात दिवस प्रत्येक गरीबनगरवासी बादशहा असतो. त्याची बादशहा असण्याची संकल्पना फारच सोपी असल्यामुळे हे शक्य असतं म्हणा! `टाकी फुल' असावी, खायला कोंबडीची तंगडी, भेजा मसाला, खिमा फ्राय नाहीतर हाडवळीचा रस्सा मिळावा, आठ दिवसांच्या खर्चीला एखादा गांधीबाबा खिशात असावा की झालाच तो बादशहा! गरीबनगराची हीच श्रीमंतीची व्याख्या आहे. रोज सकाळी कुठेतरी अंगमेहनतीचं काम मिळवून, दिवसभर घाम गाळून पाच-पन्नास रुपये हाती लागण्याचीही शाश्वती नसलेल्यांची श्रीमंतीची व्याख्या काय वेगळी असणार?
प्रत्येक निवडणुकीत एकगठ्ठा निकाल फिरवू शकेल, इतकी मतं या विस्तीर्ण झोपडपट्टीत आहेत. म्हणून गरीबनगरात श्रीमंतीच्या या पंचवार्षिक लाटा येतात आणि जातात. शंभर टक्के निखळ, भेसळमुक्त गरीबीच राहिली तर गरीबनगरातला प्रत्येकजण आपल्या गरिबीचं कारण शोधायला लागेल आणि ते देशातल्या श्रीमंतांना महागात पडेल म्हणून अधून मधून गरीबनगरात अशा लाटा उसळवण्यात सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी वर्गाला रस असतो. त्यामुळे सभेला श्रोते म्हणून भाडय़ाने जाण्यापासून मोर्चे-दंगलींसाठी मनुष्यबळ पुरवण्यापर्यंत वेगवेगळय़ा संधी गरीबनगरात सतत उपलब्ध असतात. साई भंडारे, दही हंडी, जयंत्या, गरबे, गणपती यांना कधी पैसा कमी पडत नाही. पण, गरीबनगरात सर्वांना समान लाभ देणारी संधी म्हणजे निवडणूक. त्यामुळेच गरीबनगरातल्या रहिवाशांना बहुमतातलं सरकार आलं की जाम वाईट वाटतं. असलं सरकार पाच वर्ष टिकाव धरून राहतं आणि पुढची निवडणूक पाच वर्षांनीच येते. सरकार अस्थिर असलं की गरीबनगर खुशीत असतं. कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल, नव्याने निवडणूक लागेल. जो थोडक्यात हरला तो जिंकण्यासाठी आणि जो थोडक्यात जिंकला तो परत जिंकण्यासाठी गरीबनगरावर कॅश, दारू, दागिने, साडय़ा, कपडे यांचा वर्षाव करील आणि आपल्याला जास्त दिवस बादशहा बनायची संधी मिळेल, असं त्यांना वाटतं त्यात चूक काय?
****
यावेळी मात्र ठेंगा पक्षाने आघाडीचं सरकार दोन वेळा फुल पाच-पाच वर्षं चालवून दाखवलं, त्यामुळे गरीबनगरात त्याविषयी फार खुन्नस होती.
``अस्लम मिया, इस बार ना ये ठेंगावालोंको सबक सिखाते है,'' पानवाला अण्णा कलकत्ता पानावर किवामाची चटणी चोळत चोळत म्हणाला, ``गुलाबवाल्यांनाच व्होट टाकू सगळय़ांनी.''
``येडा का खुळा तू,'' तंबाखूची चिमटी दाढेखाली सरकवत रंग्या न्हावी म्हणाला, ``यंदा गुलाब पार्टीचा जोर आहे. आपणपण त्यांना व्होटिंग केलं तर मेजॉरिटीत येतील ते. मग बस पाच वर्षं बोंबलत. आपण ठेंगाच हाणायचा.''
रंग्याच्या डोकॅलिटीला सगळय़ांनीच दाद दिली. गुलाब पार्टीचा जोर असल्यामुळे तिकडून, ठेंगा पार्टीचा जोर नसल्यामुळे तिकडून आणि या दोघांमध्ये कालाकांडी करण्याची संधी पाहिजे म्हणून खंजीरवाल्यांकडून यंदा गरीबनगरावर पाऊस पडणार यात शंकाच नव्हती. खर्या पावसाळय़ाची जेवढय़ा आतुरतेने वाट पाहिली जात नसेल, तेवढी या पावसाची वाट पाहिली जात होती.
****
``आग लागू गं त्या विलेक्शन कमिशनला'' हौसाबाय नळावर पाणी भरताभरता सँड्राआँटीला म्हणाली.
``व्हॉट मॅन, व्हॉट प्रॉब्लेम. उसने तेरा क्या घोडा मारा रे?'' सँड्राने आपली बादली पुढे सरकवत विचारलं.
``आगं लई कडक काम केलंय सगळीकडं. पयले कशे विलेक्शन आली की सदाभाऊ, पीटरदादा, शेट्टी अण्णा लगोलग कायनुबायनु आणून दय़ायचे. आता लय बंधनं घातली गं खर्चावर? आमची रिक्षा पण यंदा लागली नाय प्रचारात?''
``मैं तो बोलती गवर्मेंटवालोंकू क्या मिलता है बीचमें टांग अडाकर?'' अमीनाबीबी हात ओवाळत म्हणाली, ``अरे, हमलोग किसीको चुनकर भेजते है तो भरपूर खाने के वास्तेही भेजते है ना? वो खायेगा, उसका पेट भरेंगा, तो हम को भी खिलायेंगा ना? उसको खाने से नै रोकती है ये गवरमेंट. हम को देने से रोकती है. ये कैसा इन्साफ हुआ?''
``इसीलिए बोलती हूँ, इस बार गुलाबकाच बटण दबाओ, ये ठेंगेवालोंको माती चखाओ,'' जोशीकाकूंनी प्रचाराचीही संधी साधून घेतली आणि आपली बादली तीन नंबरांनी पुढे सरकवण्याचीही.
****
यंदा आपल्याला श्रीमंत होण्याची संधी मिळणार की नाही, या विवंचनेने गरीबनगरातले काही गरीब अधिकाधिक गरीब होत चालले होते. विलेक्शन लागून महिना उलटून गेला तरी ना पत्ती आली ना खंबा म्हणून चिंतेने आणि निराशेने त्यांचा रोजचा कोटा वाढत चालला होता.
 ``कितना भी कडक बंदोबस्त होने दो भौ, अपना पक्यादादा माल लेकर आयेगा और सुमडीमे सबको खुश करेगा, सबर करो, धीरज रखो,'' असा दिलासा प्रत्येक पार्टीचा माणूस कोणा ना कोणा पक्या/जग्या/अन्वर/मुश्ताकच्या हवाल्याने देत होता. मध्यरात्रीच्या वेळी कधी दारावर चोरटी थाप पडली, तर घरोघरच्या बायाबापडय़ा खूष व्हायच्या. पण, दारात तर्राट अवस्थेत आपला नवरा किंवा त्याला झोपवल्यानंतर बोलवायला येणारा यार पाहून आनंद होण्याऐवजी त्यांना वाईट वाटायचं. दहा वर्षांपूर्वी मिळालेली सोन्याची फुलं, एकदा नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये देशीच्या जागी आलेले विंग्लिशचे खंबे, शंभर रुपडय़ांमध्ये मत टाकायला आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय, एकेक गांधी काढा, असा कणबर्गी अप्पाने आवाज टाकल्यानंतर गरीबनगरात पसरलेली अस्वस्थ शांतता (ही नोटही जायची, म्हणून) आणि खंजीरवाल्याने `दिले, पण विलेक्शन हारली, तर तुला या चौकात चामडी पट्टय़ाने सोलीन आणि मिठात घोळवीन' असं सांगितल्यानंतर `आम्ही गरीब आहोत, पण नीच नाही' असा अप्पाने हाणलेला डायलॉग यांच्या रसभरीत आठवणी निघायला लागल्या. कोणत्या इलेक्शनमध्ये आपण काय मज्जा केली, याच्या चर्चांनी वातावरण हलकं व्हायचं, पण या आठवणींचा रस्सा करून कोरडय़ास घेता येणार नव्हता. त्यासाठी खरोखरची बोटी भगुण्यात पडायला हवी होती, त्यासाठी नोट खिशात यायला हवी होती आणि घशात जळजळता घोट.
****
``आजची रात्र जागे राहा. मध्यरात्रीचा दरवाजा वाजला तर बोंबटू नका, चटकन् दार उघडा, पटकन् माल घ्या आणि झटकन् हात आत घ्या,'' सगळीकडे निरोप गेला आणि मिटल्या दिव्यांच्या अंधारात, सापटीसांदरींमधून झिरपणार्या प्रकाशावर डोळे लावून सगळं गरीबनगर जागं राहिलं, उत्तररात्रीपर्यंत टक्क जागं राहिलं, पहाटेपहाटे दमून-थकून-चिडून झोप लागली, त्याआधी निरोप देणार्यांच्या सात पिढय़ांचा उद्धार करून झाला होता.
भल्या सकाळी पेपर आला आणि सगळय़ांना कळलं...
``गरीबनगरात पैसे वाटायला निघालेली गाडी पोलिसांनी पकडली, तपास चालू.''
****
या घटनेवर गरीबनगरात काय प्रतिक्रिया उमटली असेल, हे पाहण्याची काही गरज नाही. ती काय असेल, ते स्पष्टच आहे. गरीबाला गरीब राहिल्याचं फक्त दुःखच होतं आणि रागच येतो. शिवाय गरीबाच्या गरीब राहण्यात तो गरीब घरात जन्मला यापलीकडे त्याचा फार वाटाही नसतो. गरीबनगराची गरिबी दूर होता होता राहिली ती कशी, हे समजून घेण्यासाठी गरीबनगर सोडायला हवं.
****
``साहेब, घोटाळा झाला, गरीबनगरमध्ये वाटायच्या नोटा वाटेत पकडल्या गेल्या... आता काय करायचं?'' गुलाब पार्टीच्या उमेदवाराच्या सेक्रेटरीने साहेबाला विचारलं.
``अरे काय वेडा का खुळा तू? आपला साधनशुचितावाला पक्ष आहे. असले धंदे नाही करत आपण. ती गाडी आपली नव्हती, कार्यकर्ते आपले नव्हते, आपण त्यांना ओळखत नाही, हा आमच्या बदनामीचा कट आहे... कळलं ना पेपरांना काय खुलासा करायचा ते. चॅनेलांना मी बाइट देतो. (खासगी आवाजात) गरीबनगरात खबर पोहोचली का?''
``पोहोचली साहेब. सगळे हळहळतायत...''
``फुकटे साले भडवे. त्यांना सांगा, एक करोड पाठवले होते. पोलिसांनी हरामखोरी केली नसती, तर घरटी चार चार हजार रुपये मिळणार होते...''
``चार चार? आपले तर एकेकच ठरले होते...''
``मेल्या म्हशीला पाच शेर दूध ही म्हण कधी ऐकली नाहीत का? जे पैसे पोहोचलेलेच नाहीत, ते किती होते, याने काय फरक पडतो? आता एक काम करा. गरीबनगरात निरोप पाठवा. सध्या शांती राखली पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो, तर नंतर दुप्पट भरपाई करू, म्हणावं. निघा आता... (सेक्रेटरी गेल्याची खात्री करून फोन लावतो.) इन्स्पेक्टरसाहेब, खबर बरोबर निघाली ना? तुम्हीही भारी आहात राव! पन्नास लाख पकडलेत आणि वीस लाखाची रोकड जप्त म्हणून फोटो काढून झळकवलेत पेपरात? आता दहा तुम्हाला, तुमच्या टीमला ठेवून घ्या आणि ठरल्याप्रमाणे वीस पाठवून दया परत.'' फोन ठेवून दिल्यावर बायकोला बोलावून, ``इन्स्पेक्टर सोळंकींचा माणूस पैसे घेऊन येईल, ते कपाटात ठेवून दय़ा... इलेक्शनच्या कपाटात नाही, घरच्या कपाटात.''
****
``साहेब, साहेब, आनंदाची बातमी... गरीबनगरमध्ये मतदारांना वाटण्यासाठी पाठवलेली कॅश पकडली गेली...'' खंजीरवाल्या उमेदवाराच्या सेक्रेटरीने आनंदाने आरोळी ठोकली.
`` त्यात एवढा आनंद वाटून घेण्यासारखं काय आहे...''
``साहेब, ऑपॉझिशनची कॅश पकडली गेली आहे. आता तुम्ही खरमरीत प्रतिक्रिया दय़ा. लोकशाहीच्या गळय़ाला कसं नख लावतायत, म्हणून इलेक्शन कमिशनकडे तक्रार करा. चांगली संधी आहे या गुलाबाच्या पाकळय़ा खुडायची.'' सेक्रेटरी काल्पनिक खंजीराने काल्पनिक गुलाबाच्या पाकळय़ा खुडू लागला.
``कार्यकर्ते त्यांचे होते हे आयडेंटिफाय झालं का?'' साहेबाने सावधपणे विचारलं.
``छया, त्यांच्या **त कुठे ** आहे. ***नी कानावर हात ठेवलेत, हे आमच्या पक्षाचे नाहीत, यांचा आमचा काही संबंध नाही म्हणून...''
बेरक्या साहेबाने विचार करून बोलायला सुरुवात केली, ``सेक्रेटरी, वर्तमानपत्रांसाठी प्रतिक्रिया लिहून घ्या आणि हाच बाइट दयायला चॅनेलवाल्यांना बोलवा. करा सुरुवात... पकडली गेलेली माणसं कोणीही असोत, आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. ते पोलिसांच्या आणि निवडणूक आयोगाच्या दंडेलशाहीचे बळीही असू शकतात. ते राजकीय कार्यकर्ते होते का आणि कॅश कशासाठी नेत होते, हे अजून स्पष्ट व्हायचं असताना प्रसारमाध्यमांनी त्यांच्याबद्दल न्यायाधीशाची भूमिका घेणं हे लोकशाहीच्या दृष्टीने इष्ट नाही. आजकाल व्यापारी-व्यावसायिक, एवढंच काय- ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे अशा सामान्य माणसांनाही रोख रक्कम किंवा दागिने घेऊन जाण्या-येण्याची भीती वाटू लागली आहे. याचीही नोंद सगळय़ांनी घेतली पाहिजे. पैशांचं राजकारण रोखलंच पाहिजे, पण त्यासाठी सामान्य माणूस भरडला जाता कामा नये.''
गोंधळलेला सेक्रेटरी म्हणाला, ``साहेब, अशी प्रतिक्रिया दिलीत तर पकडले गेलेले कार्यकर्ते आपलेच होते, अशी समजूत होईल लोकांची.''
``नाहीतर कशाला देतोय ही प्रतिक्रिया? राजकारणात लोकांची आपल्याला हवी तशी समजूत होणंच महत्त्वाचं असतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय निष्पन्न व्हायचं ते होईलच निवडणुकीनंतर. हा खुलासा दिल्यानंतर आपली कॅश पाठवायची गरज उरणार नाही. गरीबनगरात तशी खबर फिरवा. गुलाबवाले गप्प बसणार नाहीत. पण, आपण कन्फ्यूजन क्रिएट केलं की काम झालं. इकडची कॅश दुसरीकडे फिरवून घ्या.''
****
``खजिनदार साहेब, नमस्कार. आजची बातमी वाचलीत का आमच्या मतदारसंघातली?'' ठेंगा पक्षाचा उमेदवार विनम्रपणे विचारता झाला.
``गरीबनगरची? वाचली ना. तुमचं काय म्हणणं?''
``आता आपल्याला संधी आहे चांगली.''
``कसली संधी?''
``साहेब गुलाबवाल्यांची कॅश पकडली गेली आहे. खंजीरवाल्यांनी हात आखडता घेतला आहे. आपण जरा मूठ उघडलीत तर जादू होईल. पारंपरिक मतदार आहे तो आपला.''
``पारंपरिक मतदार असेल, तर गुलाबवाल्यांकडून कॅश घेऊनही त्याने आपल्यालाच मतदान केलं असतं, आताही करेल.''
``ते बरोबर आहे साहेब. पण थोडं प्रोत्साहन मिळालं तर बरं वाटतं लोकांना.''
``उमेदवार साहेब, तुम्ही किती मतांनी हारणार आहात ते मी आता कोर्या कागदावर लिहून देऊ का सीलबंद लखोटय़ात? आपण सत्तेत आहोत. थोडीथोडकी नाही, 10 वर्षं. एवढय़ात तर बायकोही नवर्याला कंटाळते आणि नवराही बायकोला. आता आपली मधल्या सुट्टीची वेळ झालेली आहे. आपण कितीही टिमक्या वाजवल्या, कितीही प्रचार केला तरी आपल्या हक्काच्या जागा सोडल्यास बाकीच्या जागा निघणार नाहीत. हायकमांडलाही हे माहिती आहे. ही इलेक्शन आपण सोडून दिलेली आहे. पुढे दोन-अडीच वर्षं तरी आपल्याला ऑपोझिशनमध्ये काढायची आहेत. दहा वर्षांतली पुण्याई आता पुरवून पुरवून वापरायची आहे, आलं ना लक्षात. जिथं पार्टी जिंकणार्या घोडय़ावर पैसा लावत नाही, तिथे हरणार्या घोडय़ावर कसा हो लावेल? गरीबनगरातून जेवढी मतं तुम्हाला पडायची ती पडणारच आहेत. हवं तर तुम्हीही तिकडे योग्य ते संदेश धाडा. `गांधीबाबा' आपल्याच पक्षाचे आहेत हे लोकांना माहिती आहे. त्यांचा विश्वास बसेल. अडीच वर्षानंतर या. तेव्हा आपण गरीबनगराचं अमीरनगर करून टाकू.''
****
तर अशा रीतीने यंदाची निवडणूक आली आणि गेली, टीव्हीवाल्यांची, चॅनेलवाल्यांची, संपादकांची, आयटीवाल्यांची, फेसबुकवाल्यांची, व्हॉट्सऍपवाल्यांची, जाहिरातवाल्यांची चांदी झाली, पण गरीबनगर मात्र यंदा गरीबच राहिलं. आता राजकीय पक्षांना गरीबनगराला गरीबच ठेवण्याचा नवा फंडा सापडला, हे अधिक वाईट झालं की आपल्याकडे यायला निघालेली कॅश नेमकी कुणाची होती, याचा तलासच लागला नाही, हे अधिक वाईट झालं, हे सांगता येणं मुश्कील आहे.
गरीबनगर गरीबच राहिलं, यात आश्चर्य काहीच नाही.
पाच वर्षांतून साडेसात दिवसांच्या श्रीमंतीनेही ज्यांचं पोट भरतं, त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकारच आहे.