Monday, August 29, 2011

अण्णा आणि हजार भ्रष्ट

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल अनेक मतमतांतरं आहेत..
 
आपण म्हणू तेच मान्य करा, नाहीतर प्राणांतिक उपोषण करतो, हा त्यांचा खाक्या अनेकांना मान्य नाही.
 
त्यांचा जनलोकपाल हा कल्याणकारी हुकूमशाहीचाच आविष्कार असल्यामुळे लोकप्रतिनिधित्व आणि संसदीय लोकशाही प्रमाण मानणा-यांना तो मान्य नाही.
 
अण्णा हजारे यांच्या आसपास गोळा झालेल्या गणंगांचा नैतिक श्रेष्ठत्वाचा दर्प तर अण्णांच्या चाहत्यांना आणि समर्थकांनाही मान्य नाही.
 
एक गोष्ट मात्र सर्वाना मान्य आहे.
 
भ्रष्टाचार हा या देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आणि या देशातल्या सामान्यजनांच्या विकासामधला सर्वात मोठा अडथळा आहे, हे अण्णांनी देशाच्या अजेंडय़ावर आणलं. फार मागे नाही, फक्त सहा महिने मागे जाऊन पाहा. त्या काळात भ्रष्टाचार या विषयावर सामान्य माणसांमध्ये कधी साधी चर्चाही होत नव्हती. तो आपल्या जगण्याचा एक भाग आहे, म्हणून स्वीकारला गेला होता. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे, असंच लोक मानत होते.
 
लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरुद्ध खूप खदखद होती आणि ती अण्णांच्या आंदोलनाने बाहेर पडली, म्हणावं, तर या खदखदीचं कोणतंही चिन्ह या देशात आधी कसं दिसलं नाही? स्वातंत्र्योत्तर दोन-तीन दशकांमध्ये भ्रष्टाचारी नेते, लाचखोर अधिकारी यांच्याविषयी समाजात चीड होती. प्रामाणिकपणा, सचोटी या गुणांचं मोल होतं. लाचखोर माणसाविषयी समाजात उघड-छुपी घृणा होती. आणीबाणीनंतरच्या काळात मात्र हळूहळू भ्रष्टाचारी माणसं सुस्थापित होत गेली आणि समाजमान्य झाली. एखाद्या नेत्याचे अनुयायी एका टर्ममध्ये सायबानं 15 पेटय़ा छापल्याअसं कौतुकानं सांगून त्या पेटीतला एखादा खोका आपल्या वाटय़ाला कसा येईल, याचं जुगाड जमवू लागले. अशा नेत्यांबद्दल समाजात अतिव आकर्षण असतं आणि त्याच्या आशीर्वादानं आपल्यालाही अशाच प्रकारे पेटय़ा कमावण्याचा मार्ग सापडावा, अशी लोकांची प्रामाणिक इच्छा असते. नव-या मुलाला सरकारी नोकरी आहे आणि वरकमाईची संधी असलेलं पोस्टिंग आहे, हे वरपिते अभिमानानं सांगू लागले.
कोणत्याही सरकारी कार्यालयात रांग न लावता कामं करून देणा-या एजंटांचा राबता याच काळात उघडपणे होऊ लागला. ही सगळी इथली सिस्टमआहे, ती पाळावीच लागते, कसंही करून काम होणं महत्त्वाचं असं सगळा देश मानू लागला. एखादा नेता-अधिकारी भ्रष्ट आहे, यापेक्षा तो किती कार्यक्षम आहे, हे अधिक महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ही सिस्टम बनू देणा-या, तिचा विनातक्रार भाग बनणा-या, तिचे निर्लज्ज लाभार्थी बनून तिला पोसणा-या सगळ्या माणसांना अचानक भ्रष्टाचार वाईट आहे, याचा शोध कसा लागला, हाच एक संशोधनाचा विषय आहे.
 
उदाहरणार्थ, दिल्लीतल्या व्यापा-यांनी अण्णांच्या समर्थनार्थ बंद पाळला..
 
बरोबर आहे. या व्यापा-यांना भ्रष्टाचाराचा फार त्रास होतो. जकात चुकवताना, ऑक्ट्रॉय बुडवताना पैसे चारावे लागतात, वेगवेगळ्या टॅक्सेसचा ससेमिरा चतुराईनं टाळताना अधिका-यांचे हात ओले करावे लागतात. कोणताही कायदेशीर कर भरण्यापेक्षा तो चुकवण्याकडेच त्यांचा कल असल्यानं या सविनय कायदेभंगांकडे कानाडोळा व्हावा, यासाठी त्यांना जागोजाग पैसे मोजावे लागतात. ते मग शेतक-यांना नाडून आणि गि-हाईकांना लुबाडून उभे करावे लागतात. यात शेवटी नुकसान आम जनतेचंच होतं. त्यामुळे त्यांनाही भ्रष्टाचारविरोधी लढाईत सामील व्हावंसं वाटतं. सगळे कर रद्द करावेत आणि व्यापा-यांना हवा तेवढा नफा कमावू द्यावा, असा त्यांच्या मनातल्या भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचा अर्थआहे.
 
मध्यंतरी एक दिवस मुंबईतल्या लोकलगाडय़ांच्या शेफारलेल्या आणि स्टंटबाज मोटरमन मंडळींनी मी अण्णा हजारे आहेअसं लिहिलेल्या टोप्या घालून रेल्वे प्रशासनाविरुद्ध एक छोटंसं बंड करून दाखवलं. या दिखाऊगिरीमुळे सामान्य प्रवाशांच्या मनात आपल्याविषयी प्रेमभाव नाही, तरी किमान आत्मीयता निर्माण होईल, अशी त्यांची अपेक्षा असावी. एक अपघात घडवून हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या आपल्या एका व्यवसायबंधूचं निलंबन टाळण्यासाठी हे महानुभाव आंदोलन करणार आणि वर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार!!! आपली व्यावसायिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडणं हेही भ्रष्ट वर्तन आहे, हेच या मंडळींना मान्य नाही- मग सार्वजनिक सेवेत असणा-यांनी जो अंगी बाणवलाच पाहिजे, त्या सेवाभावाचं तर नावच नको.
 
वांद्रय़ातून जुहूला लाखभर लोकांचा मोर्चा निघाला. त्यानं आसमंत कसा थरारून गेला आणि जुन्या पिढीला कसे स्वातंत्र्यलढय़ाच्या आठवणींचे कढ येऊन राहिले होते, याची वर्णनं मेणबत्तीबाज वर्तमानपत्रांनी स-फोटो छापली. या मोर्चात सहभागी व्हायला निघालेले तरुण लोकलमध्ये बिनधास्तपणे फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये चढले. डोक्यावर अण्णा हजारे टोपी’, हातात ध्वज आणि ओठांवर भ्रष्टाचारविरोधाच्या घोषणा असताना सहप्रवासी हटकणार नाहीत वा टीसी पकडणार नाही, याची त्यांना खात्री होती. रीतसर तिकीट-पास काढून त्या वर्गानं प्रवास करणा-यांची आपण गैरसोय करतो आहोत आणि हा एक प्रकारचा भ्रष्ट व्यवहार आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं.
 
शतकी परंपरा असलेल्या एका महान वर्तमानपत्राने अण्णांच्या लढय़ाला वाहून घेतलंय. या अण्णा टाइम्समध्ये आंदोलनांच्या बातम्यांबरोबरच संपादकांनी संसदेला पाजलेले अकलेचे डोसही असतात. झटपट भ्रष्टाचारनिर्मूलनाचे दहा सोपे उपाययांचे संपादक बद्धकोष्ठ टाळण्याचे दहा मार्गसांगावेत, तसे पहिल्या पानावरून सांगत असतात. ही मंडळी खासगी कराराच्या अवगुंठनातून लाखो रुपयांच्या जाहिराती बातम्या म्हणून छापत असतात. यांच्या अशा जाहिरातदारांविषयी कोणतीही वादग्रस्त बातमी अधिकृतपणे दाबली जाते. यांनी आणि अशा अनेक वर्तमानपत्रांनी समाजप्रबोधनपर उपक्रम चालवत असल्याच्या नावाखाली सरकारकडून मोक्याच्या ठिकाणांवरचे भूखंड नाममात्र भाडय़ाने किंवा सवलतीच्या दरांत विकत घेतले आहेत आणि तिथे सगळे व्यावसायिक उपक्रम चालवून हजारो कोटी रुपये कमावले जातात. वर हे सरकारला भ्रष्टाचारविरोधाचे डोस पाजतात. भाबडे वाचक पेपर पेटवायच्या ऐवजी मेणबत्ती पेटवतात.
 
ही सगळी उदाहरणं काय सांगतात?
 
भ्रष्टाचाराविरोधात अण्णांच्या नेतृत्वाखाली आरपारची लढाई वगैरे करायला उतरलेल्या मंडळींच्या मते भ्रष्टाचार फक्त पैसे खाणं.
 
भ्रष्ट आचरणहे इतकं छोटं आहे?
 
त्यातही सर्वात मोठा रोष आहे तो सर्वपक्षीय राजकारणी मंडळींनी केलेल्या हजारो कोटींच्या लाचखोरीवर. काहींचं भ्रष्टाचाराचं वर्तुळ यापेक्षा थोडं मोठं. त्यात- त्यांच्या जवळचं कुणी सरकारी नोकर नसल्यामुळे असेल कदाचित- सरकारी नोकरशाहीचाही समावेश होतो. बाकी सगळे जणू स्वच्छच. जे स्वच्छ नाहीत, ते नाईलाजानं अस्वच्छ आहेत आणि समाजातला वरिष्ठ वर्ग कधी भ्रष्टाचार थांबवतोय याची चातकासारखी वाट पाहतायत. एकदा वरच्यांचं खाणं थांबलं, त्यांना जरब बसली की हेही भ्रष्टाचाराच्या नावानं आंघोळ करून संपूर्ण स्वच्छ व्हायला मोकळे.
 
सगळ्या व्याख्या इतक्या सोप्या आणि कृती इतक्या ढोबळ असल्या की लढेही प्रतीकात्मक आणि सोपे-सोपेच होतात.. अशा सोप्या लढय़ांमधून ना क्रांती घडते ना उत्क्रांती..
 
सध्याच्या या भ्रष्टाचारविरोधी लढय़ातल्या एकाही ठिकाणी, एकाही माणसानं, समूहानं आजपासून मी लाच देणार-घेणार नाही, भ्रष्ट वर्तन करणार नाही आणि खपवून घेणार नाही’, अशी साधीशी प्रतिज्ञा केल्याचं ऐकलंयत तुम्ही?
 तसं झालं असतं तर ती ख-या अर्थानं एका क्रांतीची नांदी ठरली असती.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, २८ ऑगस्ट, २०११)

Sunday, August 21, 2011

डोकी ठेवा, टोप्या घाला!

आम्ही जागे झालो होतो, तेव्हाची गोष्ट.
 जागे म्हणजे काय अगदी टक्क जागे झालो होतो..
आम्हाला कोणीही पुन्हा झोपवू शकणार नाही, इतके जागे झालो होतो..
 
काय विचारताय? आम्हाला आधी कोणी झोपवलं होतं?
 
खरं सांगायचं, तर कोणीही नाही.. आमचे आम्हीच झोपलो होतो.. ती एक आम्हाला देणगीच आहे देवदत्त.. आजूबाजूला कितीही कोलाहल असो, गोंधळ असो, खुद्द आमच्या बुडाखाली आग लागलेली असो- झोपायचं ठरवलं की आमचे कान आपोआप पडतात, डोळे जड होतात आणि आम्ही कोणत्याही स्थळी बसल्याजागी मनोमन आडवेहोतो..
 
परवा असेच आम्ही शवासनात असताना एक पांढ-याधोप कपडय़ांतील गांधीटोपीधारी गृहस्थ समोर आले.. मागे प्रखर प्रकाश.. आम्हाला वाटलं निरमाची नवी जाहिरात.. पण नाही, चेहरा ओळखीचा वाटला.. अरे, हे तर आपले अण्णा!.. नमस्कार अण्णा!.. नमस्कार न स्वीकारता उग्रकठोर मुद्रेनं करारी सुरात अण्णा म्हणाले, ‘‘इथे देश भ्रष्टाचाराच्या आगीत होरपळतोय आणि तुम्ही झोपा काढताय? पाऊणशे वयोमान झालेलं असताना मी तुमच्या मुलाबाळांसाठी, पुढच्या पिढय़ांसाठी उपोषण करतोय आणि तुम्ही झोपा काढताय? जागे व्हा, जागे व्हा,’’ आता अण्णांचा आवाज म्हणजे देशातल्या 120 कोटी जनतेचा आवाज. विचार करा. तब्बल 120 कोटी लोक तुमच्या उशाशी उभे राहून बंडोपंत, झोपून काय राहताय, जागे व्हाम्हणून ओरडू लागले, तर तुम्ही कुंभकर्ण असलात तरी झोपू शकाल काय?.. शिवाय, आपण जागे झालो नाही, तर अण्णा आपल्याविरोधात उपोषण करायला बसतील, ही भीती..
 
शिवाय भानगड अशी की, तुम्ही मला जागं का केलंत? माझ्या झोपून राहण्याच्या अधिकारावर गदा का आणलीत? याचा जाब आपण अण्णांना विचारू शकत नाही..
कारण अण्णांना विरोध म्हणजे भ्रष्टाचाराला पाठिंबा. अण्णांना विरोध म्हणजे डायरेक्ट देशद्रोह. दुसरी प्रॅक्टिकल अडचण अशी की, झोपून राहण्याच्या अधिकारासाठी अण्णांच्याविरोधात उपोषण करायचं ठरवलं तर त्यासाठी जागं राहावंच लागणार.. झोपेत उपोषण करण्याची काही सोय नाही.. त्यापेक्षा जागं होणंच बरं, या विचारानं जागे झालो आणि जागे झाल्याबरोब्बर जे करणं क्रमप्राप्त, ते करायला चिंतनकक्षात रवाना झालो..
 
तिथेही टीव्ही, टीव्हीसमोरची बिवी आणि खिडकीतून तिची शेजारणींशी चाललेली माहितीची देवाणघेवाण यांचे संमिश्र आवाज कानी येत होते..
 
‘‘अहो, इथे शाळेतली मुलंमुली बघा काय सुंदर नटून आलीयेत..’’ (शाळांना राष्ट्रीय सुटी दिलीये की काय बेमुदत? की आमरण?.. आमच्या नतद्रष्ट मनात विचार!)
 
‘‘त्यापेक्षा या चॅनेलवर पाहा.. इकडे नंदेश पोवाडा गातोय..’’
 
‘‘वहिनी, ते सोडा, चटकन ते चॅनेल लावा.. किरण बेदी झेंडा घेऊन नाचतायत..’’
 
अण्णांच्या उपोषणावर इतक्या लगेच म्युझिक व्हिडीओही तयार झालाय की काय, ही उत्सुकता दाटून आल्याने चिंतन आटोपतं घेऊन, त्वरेनं हात प्रक्षाळून आम्ही टीव्हीसमोर येऊन ठाकलो, तर तोवर मूळच्या न्यूज चॅनेलचा जो म्युझिक चॅनेल झाला होता, त्याचा आता संस्कारचॅनेल झाला होता. म्हणजे समोर बुवा-बाबा-अम्मा-बापू-महाराजांपेक्षा तुपकट चेह-यानं भ्रष्टाचार थांबवण्याचे उपायया विषयावर प्रवचन सुरू होतं.. स्वत:ला बातमीदार म्हणवणारे, पंतप्रधान असो की मुख्यमंत्री- कोणालाही कशावरही जाब विचारल्याच्या सुरात उर्मट प्रश्न विचारणारे आक्रस्ताळे दंडुकेधारी इथे मात्र सत्संगाला आल्यासारखे मवाळ मुद्रेनं लीन-दीन होऊन जणू ज्ञानकण वेचत होते.. ‘‘नवरा घरी आला आणि त्याच्या खिशात त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम सापडली, तर बायकोने त्याला जाब विचारायला हवा..’’ अरेच्चा, हा प्रयोग तर आमच्या घरात दर रविवारी होतो.. आम्हाला दोस्तदारांबरोबर रमीचे चार डाव टाकण्याचा शौक आहे.. रुपया पॉइंट.. कधीतरी हात लागतो, आम्ही शीळ घालत घरी येतो, कपडे खुंटीला लटकवले रे लटकवले की बायको लगेच खिशात हात घालून नोटा नाचवत विचारते, ‘‘सकाळी खिशात मी माझ्या हातांनी त्रेसष्ट रुपये ठेवले होते, त्याचे एकशे बहात्तर रुपये कसे झाले? काय धंदे करता, कुठे उकिरडे फुंकता देव जाणे! कितीदा सांगितलं, असा हरामाचा पैसा पचत नाही..’’ असं म्हणून ती त्या रकमेतले शंभर रुपये हातोहात पचवते’.
 
भ्रष्टाचार संपवण्याचा हा इतका सोपा उपाय आपल्याला ठाऊक नव्हता आणि अण्णांनी आंदोलन करण्याच्या आधीपासून आपण नकळत का होईना त्या आंदोलनात खारीचा वाटा उचलत आहोत, या जाणीवेनं आमची छाती दीड वीत फुगली.. आंदोलनाचं निमित्त साधून टीव्हीपुढे फतकल मारण्याची शतकानुशतकांतून एखादवेळी लाभणारी सुसंधी आम्ही साधणार, तेवढय़ात खिडकीतून शेजारचे गजाकाका खेकसले, ‘‘बंडोपंत, बाहेर केवढी लढाई चाललीये आणि तुम्ही टीव्हीसमोर काय बसताय मेंगळटासारखे! चला, उठा, सामील व्हा..’’
 
हा हा म्हणता आमच्या अंगावर सदरा-पाटलोण चढली, डोक्यावर मी अण्णा आहेअसं लिहिलेली गांधी टोपीही चढवली गेली, ‘‘अहो, पण मी बंडोपंत आहे.. जसा असेन तसा मी मी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे..’’ आम्ही कातावून गजाकाकांना म्हणालो, तर मागून टप्पू मारत घारूअण्णा म्हणाले, ‘‘हे अहंकार विसर्जित करून टाका आता समष्टीमध्ये. आता आपण सगळेच अण्णा.’’
 
‘‘तुमचं बरं आहे, तुम्ही आधीपासूनच अण्णा आहात.’’
 
‘‘बंडोपंत, क्रांती करायची असेल, तर डोकं बाजूला ठेवायचं आणि टोपी चढवायची. ती महत्त्वाची.’’
 
आमच्या चार चाळींमधली चाळीस टोपीधारी टकली भ्रष्टाचार मिटायेंगे, सरकार को हटायेंगेवगैरे घोषणा देत चालली होती. त्या दिंडीत पाय ओढतओढत चालताना आम्ही आसपास पाहून घेतलं.. हा किराणेवाला मारवाडी.. तागडीत किलोतले 50 ग्रॅम हातचलाखीनं मारतो.. हा पोलिसमामा.. दिवसाची- साहेबाचा हप्ता देऊन- कमाई किमान हजारभराची.. हा बाळू महापालिकेत कामाला आहे, याच्या टेबलावरची फाइल हजाराच्या वजनाशिवाय पुढे सरकत नाही- चाळक-यांना पाचशे रुपये डिस्काऊंट.. हा आरटीआय कार्यकर्ता, तळमजल्यावरचा गाळा विकत घेऊन एअरकंडिशन्ड ऑफिस काढलंय यानं, एरियातल्या बिल्डरांची माहिती काढून ती न वापरण्याचे लाखांत पैसे घेतो हा- परवाच तिसरी गाडी आली दारात.. हा मंत्रालयातला शिपाई, साहेबाची हमखास भेट घालून देण्याबद्दल पगाराच्या दहापट कमाई करतो, गावाला बंगला बांधलाय ऐसपैस..
 
सगळे जोशात घोषणा देत होते, ‘अण्णा, आगे बढो, हम तुम्हारे साथ है..
  ..उन्ह तसं फारसं नसतानाही आम्हाला कसं कुणास ठाऊक पण एकदम गरगरायलाच लागलं.. आम्ही हळूचकन मोर्चातून काढता पाय घेतला.. आडोसा बघून आधी टोपी काढून टाकली.. नशीब डोकं अजून शाबूत होतं.. टोपीला चिकटून गेलं नव्हतं.. आता गरगर कमी झाली.. आम्ही घटकाभर उभ्याउभ्याच डोळे मिटून चिंतन केलं.. आतला आवाज काय म्हणतोय, ते ऐकलं.. आतून आवाज आला, ‘‘बंडोपंत, झोपा आता.’’.. अण्णांप्रमाणेच आम्हीही आतल्या आवाजाला फार महत्व देतो..
पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही खोली गाठून ताणून दिली.. माणूस जागा होतो, तो पुन्हा झोपी जाण्यासाठीच, हे जीवनसूत्र आम्हाला निद्राधीन होता होता गवसलं.. आणि स्वानुभवावरून सांगतो, अर्धवट जागृतीपेक्षा गाढ निद्रा अधिक श्रेयस्कर आणि आरोग्यकारी!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २१ ऑगस्ट, २०११)

बोगस क्रांती



ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणनाटय़ामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनांत भ्रष्टाचाराच्या विरोधात खदखदत असलेल्या रोषाला वाट मिळाली. त्याचे दर्शन अण्णांच्या समर्थनार्थ उत्स्फूर्तपणे रस्तोरस्ती उतरलेल्या जथ्यांमधून घडते आहे. मात्र, सामान्य माणूस आता जागा झाला आहे आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त केल्याखेरीज तो स्वस्थ बसणार नाही, असा जो काही क्रांतीचा नारा काही प्रसारमाध्यमांनी दिला आहे, त्यात अर्थ नाही. अण्णांच्या या तथाकथित ऑगस्ट क्रांतीची घोषणा करणारे कोण आहेत, हे पाहिले तरी ती बोगस क्रांतीठरण्याची सगळी चिन्हे दिसू लागतात. टीआरपीसाठी कोणत्याही थराला जाणा-या वृत्तवाहिन्या, कोणत्याही विषयातील आपल्याला काही कळते का याचा विचार न करता त्यावर अखंड तोंड वाजवायला तयार असलेले टीव्ही-विचारवंत, संसदीय लोकशाही आणि राजकीय प्रणालीविषयी प्रचंड तुच्छताभाव असलेली इंग्रजी वर्तमानपत्रे आणि मतदानाचेही कष्ट न घेता लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवू पाहणारे उच्चभ्रू मेणबत्तीबाज, हे या कथित क्रांतीचे उद्गाते आहेत. टीव्ही वाहिन्यांवरील बोलभांडांना आणि मुद्रित माध्यमांतील त्यांच्या साहेबी भावंडांना काही प्रमुख शहरांमध्ये पद्धतशीर प्रचारातून कॅमे-यांसमोर जमवलेली गर्दी म्हणजेच सगळा देश आहे, असे वाटू लागले आहे. उद्या सचिन तेंडुलकरचे शंभरावे शतक किंवा ऐश्वर्या रायला अपत्यप्राप्ती होऊन अधिक टीआरपीखेचक स्टोरीमिळाली की कॅमेरे तिकडे वळतील; या उथळ माध्यमांचा अख्खा देशआनंदीआनंद साजरा करू लागेल आणि त्या धांदलीत क्रांती करण्याचे राहूनच जाईल. अण्णांची सध्याची लोकप्रियता वादातीत आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे सामान्यजनांमध्ये त्यांच्याबद्दल अतीव आदर आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल आत्मीयता आहे. लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचा मुद्दा देशासमोरील प्राधान्यक्रमांमध्ये सर्वात वर आणून ठेवण्याचे श्रेयही नि:संशय अण्णांनाच जाते. भ्रष्ट राज्यकर्त्यांना कोणीतरी चाप लावलाच पाहिजे, या सर्वाच्या मनात खदखदत असलेल्या संतापाचा उद्गार म्हणजे अण्णांचे आंदोलन. या उद्गाराला सनदशीर मार्गाची आणि संसदीय डावपेचांची जोड देऊन त्याचे रूपांतर भ्रष्टाचाराच्या भरतवाक्यात करण्याची सुवर्णसंधी अण्णांना लाभली होती. ती त्यांनी टीम अण्णानामक टाळीबाज हितसंबंधी टोळक्याच्या नादी लागून गमावली आहे. अन्यथा, आपला आवाज हाच देशातील 120 कोटी जनतेचा आवाज आहे आणि आपण सांगू ती प्रत्येक गोष्ट लोकनियुक्त सरकारने बिनशर्त मान्य केलीच पाहिजे, असे हुकूमशाहीला साजेसे दबावतंत्र त्यांनी चालवले नसते. भारतीय जनता सरंजामशाही मानसिकतेतून संपूर्णपणे बाहेर आलेली नाही. तिला अशा अवतारसदृश कल्याणकारी हुकूमशाहीचे आकर्षण आहे. इंदिरा गांधींपासून बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींपर्यंत अशा सर्वोच्च सर्वेसर्वाची जनमानसावर भुरळ पडते ती त्यामुळेच. अण्णांच्या प्रतिमेत या हुकूमशाहीला महात्मा गांधीजींच्या नि:संग फकिरीची जोड असल्याने हे आणखी घातक कॉकटेल झाले आहे. म्हणूनच लोकपाल म्हणजे काय ते माहिती नसताना, केवळ अण्णांसारखा सज्जन माणूस या वयात एवढय़ा ताकदवान सरकारशी झुंज देत असेल, तर आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, अशी काहीशी भाबडी, बरीचशी बालिश आणि शंभर टक्के आळशी भूमिका अण्णावाद्यांनी घेतली आहे. देशातील भ्रष्टाचाराला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असे मानायचे, तर त्याचा सर्वात मोठा दोष लोकांचाच आहे. कारण, कसलाही सारासार विचार न करता त्यांनी आपले प्रतिनिधी निवडून दिले आहेत, असा याचा अर्थ होतो. आता अण्णांच्या आंदोलनातून काय साध्य होणार, त्याची पुढची दिशा काय असणार, याचा जराही विचार न करता त्यांच्या भजनी लागणे म्हणजे तीच चूक पुन्हा करणे आहे. अशा दिशाहीन, धोरणहीन आणि विवेकशून्य आंदोलनांमधून क्रांती नव्हे, फक्त अनागोंदीच निर्माण होऊ शकते. हा धडा 1977 सालच्या आणीबाणीविरोधातील ओरिजिनल दुस-या स्वातंत्रलढय़ातून आपण शिकलो नसू, तर आपले एकूणातच कठीण आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, १९ ऑगस्ट, २०११)

Monday, August 15, 2011

४० साल बाद..

..वा-यावर लहरणा-या सरसोंच्या शेतामधून जाणा-या गुळगुळीत रस्त्यावर ट्रॅक्टरचा आवाज आला, तसे शेतघरातून आदित्यआजोबा बाहेर आले. ‘यशराज फार्म्स, चोप्रा अँड सन्स’चा डिजिटल बोर्ड लावलेल्या ट्रॅक्टरमधून उडी मारून त्यांचा नातू राज उतरला आणि थेट त्यांच्यासमोर येऊन म्हणाला, ‘‘ग्रँपा, मै आप से बहोत नाराज हूँ..’’
 
आजोबांनी त्याला जवळ घेतलं, राणीआजीनं लस्सीचा ग्लास त्याच्या हातात देत विचारलं, ‘‘का रे बाळा? का रूसलास आजोबांवर?’’
 
‘‘तुम्ही दोघांनी मला कधी सांगितलंच नाहीत की एकेकाळी, म्हणजे अवघ्या 40 वर्षापूर्वीपर्यंत भारतात सिनेमे निघत होते आणि ग्रँपा मोठे फिल्म डायरेक्टर होते, तू मोठी हिरोइन होतीस, हेही माझ्यापासून लपवून ठेवलंत. दॅट मस्ट हॅव बीन सो एक्सायटिंग! तो ग्लॅमरस प्रोफेशन सोडून, मुंबई सोडून तुम्ही इथे या शेतावर येऊन राहताय. देअर इज नो फिल्म बिइंग मेड इन इंडिया फॉर लास्ट थर्टी-थर्टी फाइव्ह इयर्स.. व्हाय, व्हाय ग्रँपा, व्हाय?’’
 
‘‘वो एक बहुत लंबी कहानी है बेटा..’’ आदित्यआजोबा कॅमे-यासमोर नटानं वळावं तसं वळले आणि सूर्यप्रकाशाचा लाइट घेत पुढे आले, ‘‘..चालीस साल पुरानी.’’
त्यांनी नजरेनंच राणीआजीला खूण केली. तिनं आत जाऊन कुठल्याशा संदुकीतून एक जळमटं लागलेली, पिवळय़ा पडलेल्या कागदांची फाइल आणली. ती हातात घेऊन आदित्यआजोबा पुढे सांगू लागले, ‘‘उस जमाने मे हम लोग फिल्में बनाया करते थे.. लेकिन एक दिन एक प्रोडय़ुसर को एक खत आया.. उसके बाद एक डायरेक्टर को एक चिठ्ठी आयी.. फिर एक हीरो के नाम कुरियर आया.. पत्रांचा हा ओघ वाढतच गेला..’’
 ‘‘कोणी पाठवली होती ही पत्रं? काय होतं त्या पत्रांमध्ये?’’ राजनं उत्सुकतेनं विचारलं. आदित्यआजोबा फाइल त्याच्या हातात सोपवत म्हणाले, ‘‘तूच वाचून पाहा.’’ राजनं थरथरत्या हातांनी एकेक पत्र काढून वाचायला सुरुवात केली.. त्यातल्या निवडक पत्रांचा हा मराठी तर्जुमा. 
पत्र क्र. १
 
माण्णीय डायरेक्टर सायेब,
 
आपल्या चीत्रपटात आपन राजकीय णेत्याच्या फुल्या फुल्यांवर लोक लाथा घालत आहेत, अशे दाखवले आहे, अशे समजते. आपन काय पिच्चरबिच्चर फाहात नाही. आपल्याला तस्ले शोक नाहीत. जे हाहेत ते हिथे सांगन्यासारखे नाहीत. तर सांगन्याचा पॉइंट असा की राजकीय नेत्याच्या फुल्याफुल्यांवर लाथा घालन्याच्या द्रुष्याला आमचा काही आक्षेप नाही. मात्र, त्या लाथा घालणा-या पायांमध्ये आपन आमच्या शेरात बननारी पायतानं दाखवली आहेत, अशे समजते. आमच्या गावची पायतानं म्हण्जे आमची आस्मिता, माणबिंदू, आमच्या गावाची आभिमाणास्पद ओळख. तिचा असा गैरवापर केल्याचे दाखविल्याणे आमच्या भावणा आत्यंत दुखावल्या आहेत. आपण ही पायताणं काढून त्या पायांमध्ये दुसरी कोन्तीही पायताणं घालावीत किंवा अनवाणी पायांनी लाथा घालण्याचे द्रुश्य चीत्रीत करावे अण्यथा आपल्या चीत्रपटावर बंदी घालण्याची मागणी आम्ही करू आणि आमच्या गावच्या पायताणांचा तुमच्या फुल्याफुल्यांवर योग्य वापर करू.
 
आपला णम्र,
 संभा नामा भुस्नळे 
पत्र क्र. २
 
माननीय चुंबनसम्राट नटवर्यास,
 
भारतीय संस्कृतीरक्षक संघटनेच्या वतीने आपणास अशी कायदेशीर नोटिस देण्यात येते की आपल्या चित्रपटांमध्ये फारच असभ्य, अश्लील दृश्ये असतात. खासकरून चुंबनदृश्यांचा तर भडिमार असतो. शिवाय वेगवेगळय़ा चित्रपटांमध्ये आपण वेगवेगळय़ा हिंदू तरुणींची वेळोवेळी, वेगवेगळय़ा मिषाने आणि वेगवेगळय़ा पद्धतींनी प्रदीर्घ चुंबने घेता असे आम्ही स्वत: प्रत्येक चित्रपटाची किमान तीन-चारदा उजळणी करून खात्री करून घेतली आहे. हे आपल्या धर्मात चालत असेल पण आमच्या देशाच्या उदात्त, उन्नत (अं अं.. हे तुमच्या चित्रपटातल्या कशाचंही वर्णन नाही) अशा संस्कृतीला शोभणारे नाही. आपल्याला आपले ओठ प्यारे असतील आणि त्यांचा भविष्यात (कोणत्याही कामाकरिता) वापर होत राहावा, असे वाटत असेल, तर आपल्या ‘गर्डर-2’ या चित्रपटातील सर्व चुंबनदृश्ये काढून टाकावीत आणि नायिकांचे अंगप्रदर्शनही वजा करून टाकावे. असे केल्यानंतर चित्रपटाची लांबी फक्त सव्वाअकरा मिनिटांचीच उरेल, याची आम्हाला कल्पना आहे. त्यात चित्रपटाच्या सुरुवातीला हनुमानस्तोत्र आणि रामरक्षा, भोजनाच्या दृश्यांमध्ये ‘वदनि कवळ घेता’, संध्याकाळच्या दृश्यांच्या पुढे ‘शुभंकरोती’ आणि शेवटी ‘जयोस्तुते’ यांची भर घालून आपला चित्रपट पवित्र, मंगल आणि उदात्त करावा, अशी विनंती आहे. अन्यथा आपल्यावर देशभरातल्या 789 न्यायालयांमध्ये खटले गुदरले जातील, जेथे केवळ हजेरी लावता लावता आपण चुंबन घेणे तर सोडाच ओठांनी पाणी पिणेही विसरून जाल.
 
आमच्या विनंतीला आपण योग्य प्रतिसाद द्याल, याची खात्री आहे.
 
जय हिंदुस्तान
 
आपला नव्हे, अखंड हिंदुराष्ट्राचा,
 बजरंग लंगोटे 
पत्र ३
 
महोदय,
 आपला सिनेमा आम्ही पाहिलेला नाही. त्याचं नावही आम्हाला ठाऊक नाही. त्याची कथा काय आहे ते ठाऊक नाही. मात्र, त्यात काही ना काही वादग्रस्त असणारच यात आम्हाला शंका नाही. आपल्या मते काही वादग्रस्त नसेल, तर आम्ही ते आपल्याला शोधून देऊ. आपल्या चित्रपटात एकही दृश्य नसेल, तीन तास पडद्यावर फक्त मुंग्याच दिसणार असतील किंवा पडदा पांढराधोप दिसणार असेल, तरीही या चित्रपटामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडणारच, याची आम्हाला खात्री आहे; कारण आम्हीच ते बिघडवणार आहोत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमा विनाकट पास केला आहे, या आपल्या युक्तिवादात काहीही तथ्य नाही. सेन्सॉर बोर्डाला काय कळतं? आम्ही सोडून या देशात कुणालाही कसलंही काहीही कळत नाही, हे तुम्हाला कसं कळलं नाही, हेच आम्हाला कळत नाही. थिएटरच्या काचांवर दगड आणि तुमच्या घरांवर आगीचे बोळे पडल्यानंतरच हे कळणार असेल, तर आम्ही तुमची ही ‘शिकवणी’ घ्यायलाही तयार आहोत, कारण आम्हाला तेवढीच एक शिकवण आहे.
त्यापेक्षा आपण आमच्या नेत्यांना, अनुयायांना प्रदर्शनाआधी हा सिनेमा दाखवा. त्यात आम्ही सुचवू ते कट मान्य करा, म्हणजे कटकट मिटेल.
 
आपला,
 भंपकराव भुस्कुटे 
..पत्रं वाचण्यात गुंगून गेलेल्या राजच्या खांद्यावर हात ठेवून आदित्य आजोबा म्हणाले, ‘‘अशी पत्रं येतच गेली. आमचे सिनेमे प्रदर्शनाआधी फुकट खेळांतच सुपरहिट होऊ लागले. कोणत्याही सिनेमावर कोणाचाही आक्षेप नको म्हणून आम्ही सर्व खेळांना काही खुर्च्या राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी, पाळीव विचारवंत, संस्कृतीरक्षक यांच्यासाठी राखून ठेवायला लागलो. पुढे पुढे तर प्रेक्षक तिकीट खिडकीवर येऊन ‘माझा या सिनेमाला विरोध आहे,’ असं सांगून 20-25 तिकीटं फुकट घेऊन जाऊ लागले. दोन तीन वर्षातच सिनेमा हा तिकीट काढून पाहायचा असतो, हेच इथले प्रेक्षक विसरून गेले. सामोसे आणि पॉपकॉर्नसुद्धा निर्मात्याच्या खर्चाने फुकटच मिळालं पाहिजे, या मागणीसाठी जेव्हा देशभरात तीव्र आंदोलन झालं, तेव्हा मी डायरेक्टरच्या खुर्चीतून उठलो आणि ट्रॅक्टरवर येऊन बसलो..’’
 
ही सुन्न करणारी कहाणी ऐकल्यानंतर डोळे पुसत राज बाहेर पडला, तेव्हा मागून राणीआजीची हाक आली, ‘‘बेटा, गावात चाललाच आहेस, तर अभिषेकआजोबांच्या मिठाईच्या दुकानातून रेवडय़ा घेऊन ये पावशेर आणि शाहरुखआजोबांच्या डेअरीतून दोन लिटर दूध.’’
 ‘‘बेटा, त्या झा काकांच्या पानठेल्यावरून दोन कलकत्ता एकसोबीस तीनसोही घेऊन ये माझ्यासाठी आणि आजीसाठी मसाला पान,’’ आदित्यआजोबांनीही ऑर्डर सोडली, ‘‘आणि शेतावरून जाताना उदयआजोबांना म्हणावं, तुटलेलं बुजगावणं दुरुस्त होऊन आलंय, आता दोन्ही हात खाली करून घरी परत या!!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, १४ ऑगस्ट, २०११)

Monday, August 8, 2011

खा खा खासदार सुरेशभाई कलमाडी यांस...



आदरणीय आद्य विस्मृतीवीर,
 
राजकारणाच्या खेळातले पट्टीचे खेळाडू
 
आणि खा खा खासदार सुरेशभाई कलमाडी यांस,
 
सदाशिव नारायण कसबेकराचा साष्टांग दंडवत
 
कोणाचीही कसलीही पत्रास न ठेवता मायन्याची लंबीचवडी लांबण लावून टोपणनावाने परखड पत्र लिहिण्याच्या आमच्या पेप्रातल्या कॉलमाची जागा ही नव्हे, शेजारची आहे, याचा विसर पडून चुकून आमच्याकडून हे पत्र लिहिले गेले आहे की काय, अशी आपल्याला शंका आली असेल. (अर्थात आपल्याला आधीपासून पेपरवाचनाची सवय असेल आणि तिचा अलीकडे विसर पडला नसेल तरच हे शक्य आहे म्हणा.) शिवाय, पत्रलेखकाचं नाव वाचून ‘हा कोण बुवा?’ असा प्रश्न पडून तुम्ही डोकंही खाजवू लागला असाल, तर थांबा. मेंदूला इतका ताण देण्याची गरज नाही. माझं नाव तुम्ही विसरला असाल, अशी शक्यताच नाही, कारण ते मुळात तुमच्या लक्षात असण्याचं काही कारण नाही. आपला साधा परिचयही नाही. माझ्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्ही ज्या पुण्यनगरीचं संसदेत प्रतिनिधित्व करता, तिचाच मी रहिवासी आहे. या दोहोंचाही तुम्हाला विसर पडलेला नाही, याची खात्री आहे. कारण, संसद अधिवेशनात हजर राहण्याची परवानगी मागणारी याचिका तुम्ही नुकतीच केली होती. आणि पुण्याची महती काय वर्णावी? होनोलुलूहून टिंबक्टूला निघालेलं एखादं विमान पुण्यावरून उडत असताना एखाद्या प्रवाशाचं लक्ष खाली गेलं, तर तोही ‘पुणे पुणे’ म्हणून आनंदभरित होतो आणि आयुष्यभर पर्वती, पेशवे पार्क, शनिवारवाडा यांच्या आठवणी सांगतो, असं- पुण्यात- म्हणतात! तुम्ही तर तिथले खासदार! तुमचं कार्यकर्तृत्व किती मोठं! ज्या शहरातून लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राला गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव दिले, त्या पुण्याला तुम्ही ‘गणेश फेस्टिवल’ दिलात. ज्वालाग्रही पेट्रोलच्या टाकीवर तीन मजली बांधकाम असलेला जगातला एकमेव पेट्रोल पंप उभारून पुण्याचं नाव गिनीज बुकात नेलंत. अजून त्यांनी या विक्रमाची नोंद केलेली नसली म्हणून काय झालं? आपल्या देशात अशी मनातल्या मनात गिनीज बुकात जाण्याची मोठी परंपरा आहे.
 तर ते सगळं जाऊदेत. ओळखदेख नसताना लिहीत असलेल्या या पत्रास कारण की, तुम्हाला डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश या नावाचा विस्मरणाचा विकार झाला आहे, ही बातमी कानावर आली आणि वाईट वाटलं. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीही दाढीला कलपबिलप लावून, मॅरेथॉन धावून तरुण-तडफदार असल्याच्या थाटात वावरणाऱ्या कलाक्रीडाप्रवीण नेत्याला एखादा आजार झाला, तर कोणालाही वाईटच वाटेल. माणुसकीचा भाग आहे तो! आता ज्यांचं नाव ‘मो’नं सुरू होतं आणि ‘न’ने संपतं किंवा ज्यांचं आडनाव ‘प’ने सुरू होतं आणि ‘र’ने संपतं, अशा काही लोकांना तुम्ही आजारी असल्यामुळे आनंदही झाला असेल. तो त्यांच्या वृत्तीचा भाग आहे. आम्हाला मात्र तुमच्या आजाराचं ऐकून वाईटच वाटलं. त्यापेक्षा वाईट वाटलं ते ठिकठिकाणी तुमच्या आजाराची जी काही टिंगलटवाळी चालू आहे ती ऐकून.तुम्हाला खरोखरचा आजार झाला असेल, यावर कुणाचा विश्वासच नाही. बरं तरी तुमच्या ना छातीत दुखू लागलं ना ब्लडप्रेशर वाढलं ना शुगर शूटअप झाली. एकदम वेगळा, नव्या नावाचा, नव्या लक्षणांचा फ्रेश आजार झाला तुम्हाला. तर हे नादान लोक म्हणतात, किती सोयीचा आजार शोधून काढला कलमाडींनी. आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या संदर्भात कोणीही कोणताही प्रश्न विचारला की ते शून्यात नजर लावून सांगणार, ‘मुझे कुछ याद नहीं आ रहा है.. डॉक्टर, मुझे ये क्या हो रहा है?’ मग ‘डॉक्टर’ खेकसून म्हणणार, ‘ओ, मैं डॉक्टर नई हूं, वॉर्डबॉय हूं. कितनी बार बोला की जो सफेद कपडे मे है वो डॉक्टर है, मगर इनको कुछ यादच नई रहता..’
आता यात कांगावा काय आहे, हेच आम्हाला कळत नाही. अहो, काल आपण काय बोललो होतो, हे ज्याच्या आज लक्षात राहतं, असा एक तरी राजकारणी नेता आहे का आपल्याकडे? उलट काही लक्षात ठेवण्याची भानगडच नको म्हणून काही राजकीय नेत्यांनी तर सिलेक्टिव्ह श्रवणशक्तीचं इंजेक्शन टोचून घेतलंय. त्यांना जे सोयीचं असतं, तेच ऐकू येतं, गैरसोयीचं ऐकूच येतच नाही. मग ते लक्षात ठेवण्याची तर भानगडच नाही.
 
यांच्या तुलनेत तुम्ही किती सरळ! तुमच्या मेडिकल रिपोर्टमध्ये स्मृतिभ्रंशाचा उल्लेख असताना तुम्ही मात्र एक दिवस ‘आपलं मन आणि मेंदू शाबूत आहे’ असं ठणकावून सांगितलंत आणि आपल्याला स्मृतिभ्रंश झालाय, याचा निर्णायक पुरावा दिलात. स्मृतिभ्रंश झाल्याचा तुम्ही कांगावाच करत असता तर विस्मरणाचं नाटक करत बसला असतात, तेच तुमच्या सोयीचं होतं. पण, तुम्हाला विस्मरणाचंच विस्मरण झालं आणि आपल्याला काहीही झालेलं नाही, असं तुम्ही गरजून सांगितलंत, तिथं आमच्यापुरती तरी शंका फिटली. शिवाय, ‘माझं मन आणि मेंदू शाबूत आहे’ असं (भले स्मृतिभ्रंशामुळे का असेना!) अभिमानानं सांगू शकणारा एक राजकीय पुढारी या देशात आहे आणि तो चक्क आपला खासदार आहे, हे ऐकल्यावर आमच्या मनात अभिमान दाटून आला आणि डोळ्यातून घळघळा आनंदाचे अश्रूच वाहू लागले, ते वेगळंच.
 
काही म्हणा कलमाडीसाहेब. तुम्ही भाग्यवान खरे. पुण्यनगरीचे खासदार म्हणून जे काही पुण्यकार्य तुमच्या हातून घडलं असेल, त्याची पावती म्हणूनच तुम्हाला हा विस्मृतीचा विकार जडला, यात शंकाच नाही. अहो, आज केलं ते उद्या लक्षात राहू नये, रोज कोऱ्या पाटीने सुरुवात व्हावी, यालाच मोक्ष म्हणतात! त्यासाठी ष्टद्धr(7०)षी-मुनींना कठोर तप:श्चर्या करावी लागली होती आणि आम्हाला शेंबडय़ा पोटोबाच्या बोळातल्या ‘मोक्षा’ नावाच्या विस्मृतीवर्धक अपेयपान केंद्रात दरहप्त्याला जाऊन कडुझार औषधी द्रव प्राशन करावे लागतात. त्याने विस्मृतीवर्धन होण्याच्या ऐवजी ज्या विसरलो आहोत, अशी समजूत होती, त्याच गोष्टी प्राधान्यानं आठवू लागतात, असा आमचा अनुभव आहे.. असतात एकेकाचे भोग!
 
पण, तुम्हाला मात्र या दैवी विस्मरणशक्तीचा लाभ झाला याचा आनंद आहे.
 
बाकी तब्येतीला जपावे. जास्त धावाधाव करू नये. ती केल्याने होणारे टळत नाही, याचा अनुभव तुम्हाला आतापावेतो आलेला असेलच.
 तुम्ही आमचे खासदार आहात, याचा आम्हाला लवकरात लवकर कायमचा विसर पडावा यासाठी फेस्टिवल गणेशाला नवस बोलण्याच्या तयारीत असलेला,
आपला मतदार,
 स. ना. कसबेकर

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ७ ऑगस्ट, २०११)

Monday, August 1, 2011

‘बुद्धिवादी’ सेन्सॉरशिप

चित्रपट बघणारी भारतात सुमारे 60 कोटी जनता आहे. हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. झा हे गल्लाभरु निर्माते आहेत. अतिशय भडक, सनसनाटी आणि ऊच्च मध्यमवर्गिय संवेदनेचे चित्रपट ते काढतात. त्यांच्या आरक्षण या चित्रपटातुन जर त्यांनी आक्रस्ताळी आरक्षणविरोधी भुमिका मांडली तर या देशातील दुबळ्या, मागासवर्गियांचे न भरुन येणारे नुकसान होईल. आरक्षण हा त्यांच्यासाठी ‘अस्तित्वाचा’ प्रश्न आहे, केवळ बौद्धिक चर्चेचा, किंवा झोपाळ्यावर झुलत मारलेल्या शिळोप्याच्या गप्पांचा विषय नाही.
 
ऊच्चभ्रु व्यवस्थेचे येथिल सांस्क्रुतिक विश्वावर नियंत्रण आहे. तो आरक्षण प्रश्नावर घटनाही मानीत नाही. त्यामुळे प्रदर्शनपुर्व चित्रपट दाखवण्याची ही ‘अपवादस्वरुप’ भुमिका नाईलाजाने घ्यावी लागत आहे. निखळ स्वातं-यप्रेमी बुद्धीवादी आमचा हा नाईलाज समजुन घेतील अशी आशा आहे.
 
‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्यात आलेले हे स्टेटस अपडेट आहे. (व्याकरण, शब्दरचना मुळाबरहुकूम आहे.) हे अपडेट टाकणा-या सदगृहस्थांनी ‘आरक्षण’ हा चित्रपट पाहिलेला नाही. कारण तो अद्याप रिलीजच झालेला नाही. त्यात आरक्षणाच्या प्रश्नाविषयी नेमकी काय भूमिका आहे, काय मांडणी आहे, हे त्यांना ठाऊक नाही. ‘दामुल’, ‘गंगाजल’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ काढणारे प्रकाश झा हे त्यांना ‘गल्लाभरू’ दिग्दर्शक वाटतात. हे चित्रपट त्यांना ‘भडक, सनसनाटी, उच्च मध्यमवर्गीय संवेदनेचे’ वाटतात. झा यांनी ‘आरक्षण’मध्ये ‘आक्रस्ताळी आरक्षणविरोधी भूमिका’ मांडली, तर देशातील दुबळ्या मागासवर्गीयांचे नुकसान होणार असल्याने अपवाद म्हणून हा चित्रपट सेन्सॉरबाह्य सेन्सॉरकडून संमत करून घेतला पाहिजे, असे या सदगृहस्थांना वाटते.
 
अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना, त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनाही हा चित्रपट प्रदर्शनाआधीच पाहून ‘क्लिअर’ करण्याची इच्छा आहे. झा यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व खेळांसाठी तिकीट लावलं, तर कदाचित हा चित्रपट रिलीजच्या आधीच सिल्व्हर ज्युबिली करेल आणि झा यांचा सगळा पैसा वसूल होईल.. चित्रपट ख-या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधीच.
 
गंमत सोडा आणि महागंमत ऐका.. वर उद्धृत केलेल्या मजकुराचे लेखक आहेत हरि नरके. हे महाराष्ट्रातील एक सामाजिक विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे, ते असं फेसबुकवर का होईना, लिहूनबिहून नाईलाज तरी व्यक्त करतात. ज्यांना विचारच करण्याचा महाकंटाळा आहे, अशा माणसांचा या देशात सुकाळ आहे. (त्यामुळेच इथे विचारवंतांचाही सुकाळ आहे.) ती माणसं त्यांच्यावतीनं विचार करण्याची जबाबदारी काही पुढा-यांवर, संघटनांवर सोपवतात. ही मंडळी आणि संघटनाही विचार करताना फारसा विचार करत नाहीत. त्यांना जे पटेल त्याचा उदोउदो करतात. जे पटत नाही, ते थेट उद्ध्वस्त करतात. नरके यांच्याप्रमाणेच मूळ कलाकृती काय आहे किंवा त्यासंदर्भात मूळ प्रश्न काय आहे, हे त्यांना ठाऊक नसतं. अनेकदा तर आपण कोणत्या भूमिकेसाठी एखाद्याला काळं फासतोय, एखाद्याचं नाटक बंद पाडतोय, थिएटर तोडतोय, हेही या ‘सैनिकां’ना ठाऊकही नसतं. कोणत्याही सैनिकांप्रमाणे त्यांना फक्त आदेश कळतो. एरवी अशा हिटलरी, फॅसिस्ट प्रवृत्तींचा निषेध करणारे हरि नरके ‘आरक्षण’च्या संदर्भात मात्र त्याच प्रवृत्तींची भूमिका मवाळ शब्दांत वैचारिकतेच्या गोषात मांडताहेत आणि स्वत:च स्वत:ला परमसहिष्णु म्हणवून पाठ थोपटून घेणा-या या समाजाच्या हाडामांसात रुजलेली असहिष्णुता कशी विचारवंतांमध्येही संक्रमित झालेली आहे, याचं खेदजनक दर्शन घडवताहेत.
 
घटकाभर आपण नरके यांच्या आर्ग्युमेंटच्या अंगाने विचार करूयात.
 
म्हणजे, प्रकाश झा हे गल्लाभरू दिग्दर्शक आहेत.. असतील. असे खूप दिग्दर्शक आहेत.
 
ते सनसनाटी सिनेमे काढतात.. नरके यांनी ‘मर्डर टू’, ‘दिल्ली बेली’ हे चित्रपट पाहिले तर झा यांचे सिनेमे त्यांना ‘वहिनीच्या बांगडय़ा’ किंवा ‘माहेरची साडी’सारखे वाटतील, हा भाग अलाहिदा. पण, झा यांना सनसनाटी सिनेमे काढण्याचाही अधिकार आहेच.
 चित्रपटासारखं प्रभावी माध्यम वापरून झा यांनी जर आरक्षणाविरोधातली भूमिका मांडलीच, तर त्यातून दुबळ्या, मागासवर्गीयांचं न भरून येणारं नुकसान होईल.
हे मात्र अनाकलनीय आणि अपचनीय आहे. समजा, ‘आरक्षण’मध्ये सनसनाटी पद्धतीने, अगदी टोकाची आरक्षणविरोधी भूमिका मांडली गेली असेल, तरी त्यातून कोणत्याही वर्गाचं नुकसान कसं होईल?
 
कारण, हा सिनेमा पाहून कोणतंही सरकार (उच्चरवानं आरक्षणविरोधी भूमिका मांडणा-यांपासून ‘मुंह मे राम, बगल मे छुरी’वाल्या राजकीय पक्षांपर्यंत कोणाचंही सरकार आलं तरी) आरक्षणाची सवलत रद्द करण्याची हिंमत करणार नाही.
 
हा सिनेमा पाहून आरक्षणाचे समर्थक एका दिवसात मत बदलून आरक्षणविरोधक होतील, अशीही शक्यता नाही. कारण, कोणतेही समर्थक आणि विरोधक हे नेहमीच कट्टर असतात. कट्टरतेला साध्या विचारांचंही जिथे वावडं असतं, तर ती दुमताची किंवा थेट विरोधी मताची काय पत्रास ठेवणार!
 
मग नुकसान कोणाचं आणि कसं होणार?
 
बरं या सगळ्या तर्कटामध्ये नरके आणि त्यांच्यासारखे उघड-छुपे-जहाल-मवाळ फॅसिस्ट सिनेमा पाहणा-या 60 कोटी भारतीयांना-सिनेमा पाहून मतं बनवण्याइतके मूर्ख समजतात, हे वेगळंच. आज घरोघरची लहान मुलंही ‘डी. के. बोस’च्या तालावर नाचतात आणि त्यात त्यांच्या आईबापांना काही गैर वाटत नाही. अशा काळात प्रेक्षकांना शाळकरी मुलं समजून त्यांच्यावर ‘कुसंस्कार’ होऊ नयेत, यासाठी झटण्याचा अधिकार कोणी दिलाय या सगळ्या मंडळींना?
 
नरके यांनी खरं तर या गोष्टीचा विचार करायला हवा की किमान झा यांच्यासारखा एक दिग्दर्शक ‘आरक्षण’ या विषयावरचा सिनेमा तरी काढतोय. आपल्या देशातले सिनेमे- विशेषत: मुख्य प्रवाहातले स्वच्छ-सुंदर-र्निजतुक सिनेमे पाहिले तर या देशात जातीयवाद, धर्माधता, भाषावाद, सामाजिक विषमता, नागरीकरण, खासगीकरण-जागतिकीकरण-उदारीकरणाचे बरेवाईट परिणाम या आणि अशा काही समस्या, काही ‘वातावरण’, काही अभिसरण आहे की नाही, असा प्रश्न पडतो. निर्माते-लेखक-दिग्दर्शक तरी काय करतील? देशाच्या-समाजाच्या जिवंतपणाच्या खुणा असलेल्या या समकालीन विषयांवर सिनेमा काढायचा तर कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारधारेच्या किंवा मुखंडाच्या शेपटावर पाय द्यावाच लागणार. मग आहेच ‘खळ्ळ फटय़ॅक’.. अशा वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाता मारणा-या कोणत्याही सरकारची कोणतीही यंत्रणा कोणत्याही कलावंताच्या पाठीशी कधीही उभी राहात नाही.
 
वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळे विचार मांडण्याचा, प्रसृत करण्याचा अधिकार सर्वाना आहे. आपल्या थेट विरोधातला विचार मांडण्याचा विरोधकाला अधिकार आहे. त्याच्या त्या अधिकाराचा आदर केला पाहिजे आणि सभ्यता न सोडता ठामपणे त्याचा प्रतिवाद केला पाहिजे, हे आज ना उद्या सर्वाना शिकावंच लागणार आहे. नरके यांचेच शब्द वापरायचे तर ‘निखळ स्वातंत्र्यप्रेमी बुद्धिवादी’ होण्यावाचून समाजाला तरणोपाय नाही. हे काम अतिशय अवघड आणि लांब पल्ल्याचं आहे, पण अपरिहार्य आहे. सेमीफॅसिस्ट शॉर्टकट वापरून बुद्धिभेद आणि आत्मवंचना करण्यात वेळ वाया न दवडता विचारवंतांनी चिकाटीनं हेच काम केलं पाहिजे. नाहीतर त्यांची गरज काय आणि उपयोग तरी काय?

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ३१ जुलै, २०११)