Sunday, July 24, 2011

विठुरायाचा खजिना

उन्हं कलली. दिवस सांजावला.
 
खांद्यावर कांबळं घेतलेला, एका गाठीच्या शिसवी लाकडासारख्या घोटीव देहाचा, रापलेल्या कांतीचा सावळा विठुराया राऊळाच्या पडवीत आला. हातापायावर गारेगार पाणी घेतलं, थोडं अंगावर शिंपडून तोंडावरून हात फिरवला, तसं त्याला बरं वाटलं. ‘‘परमेश्वरा, पांडुरंगा..’’ असं आपसूक ओठांवर आल्यावर तो हसला आणि वळला आणि आश्चर्यचकित झाला. आज नेहमीच्या जागी पाण्याचा गडगा तर ठेवलेला होता.. पण, दाराशी ओठंगून उभी राहिलेली हसरी रखुमाई मात्र नव्हती. ‘‘काय गडबड झाली काय जणू..’’ असं स्वत:शीच पुटपुटत त्यानं गडगा उचलला आणि घटघटघटघट एका घोटात घशाखाली रिता केला, तेव्हा जरा थकवा आल्यासारखं वाटलं. आतून भांडय़ांचे आवाज येत होते. नेहमीपेक्षा थोडे जास्त खणखणीत. तेव्हाच विठुरायाच्या लक्षात आलं की गाभा-याचं कोपगृह झालेलं दिसतं.
 
‘‘अहो, ऐकलंत का.. कोपभर च्या मिळेल का?’’
 
‘‘का नाही मिळणार? साखर, दूध, चहाच्या किमती आभाळाला भिडल्या तरी कोपभर च्या देईनच की ढोसायला?’’ रखुमाईनं कप आणून विठुरायासमोर आदळलाच.
 
‘‘च्या जरा कडक झालाय आज..’’ गालातल्या गालात हसत विठुरायानं खडा टाकला.
 
रखुमाईनं लागलीच तोफ डागलीच, ‘‘कडक होईल नाहीतर काय? बायकोचं काय दुखतंय खुपतंय.. आमच्या बाबाला काही चिंता नाही.. त्यांचं ध्यान चहावर.. सुंदर ते ध्यान..’’
 
‘‘एकदम आमच्या ध्यानावर घसरू नका. काय गडबड झालीये ती बैजवार सांगा.’’
 
उत्तरादाखल रखुमाईनं विठुरायांसमोर ताजा पेपर आदळला.
 
विठुरायानं बातमीचं शीर्षक वाचलं, ‘‘विठुराया गरीबच.. यंदाच्या वारीत अवघ्या ८६ लाख रुपयांची कमाई..’’ रखुमाईकडे पाहून चिडवण्याच्या सुरात विठुराया म्हणाला, ‘‘आबाबाबा86 लाख म्हंजे आठावर सहावर किती शून्यं तेही मोजता येणार नाही आपल्याला. फारच श्रीमंत झालो आपण.’’
 
‘‘देवा रे देवा, काय करू आमच्या या भोळय़ा माऊलीला,’’ रखुमाई कडाडली, ‘‘अहो जग कुठं चाललंय आणि तुमचं ध्यान कुठंय? अहो, इतक्या देवांच्या मंदिरांवर सोन्याचे कळस चढले, मी गप्प बसले. कोणाच्या अंगावर किलोकिलोंचे सोन्याचे दागिने चढले, कित्येक देव हि-यामोत्यांच्या अलंकारांनी मढले, मी गप्प बसले. अख्खी हयात ज्यांनी फकिरासारखी घालवली, त्यांना रत्नजडित सिंहासनं मिळाली, मी गप्प बसले. पण, आता नाही हो गप्प बसवत. कोण कुठला हातचलाखीची जादू करणारा बाबा- त्याची हजारो कोटींची संपत्ती. कालपर्यंत हृषिकेशमध्ये सायकल मारत फिरणारा बाबा मंचावर उभा राहून बिनसायकलीचे हातवारे आणि पायवारे करायला लागला- तो गेला हजार कोटींच्या घरात. आता त्या पद्मनाभाच्या मंदिरात तर अख्ख्या देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती सापडलीये म्हणतात. आणि आमचे हे- एवढय़ा मोठय़ा वारीत अवघे 86 लाख रुपये जमा झाले, तर म्हणे केवढी मोठी रक्कम-जसा टिपिकल मराठी माणूस, तसाच त्याचा देव.’’
 
‘‘अगं हळू हळू..’’ विठुरायानं हात रखुमाईच्या तोंडावर नेला, ‘‘त्या मराठी अस्मितावाल्यांच्या कानावर गेलं तुझं बोलणं तर काय होईल. आमचा विठुराया असा गरीब कसा, म्हणून आकाशपाताळ एक करतील. सतत दुख-या आणि किरकि-या मराठी अस्मितेला आवाहन करून माझ्या भाबडय़ा भक्तांना लुबाडतील. आपलं पंढरपूर आहे तसंच राहील आणि यांच्या बंगल्यांवर मात्र सोन्याचे कळस चढतील.’’
 
‘‘कित्ती काळजी गं बाई या देवाला त्याच्या भक्तांची,’’ रखुमाई कृतककौतुकानं म्हणाली, ‘‘पण, भक्तांना त्याची काही कदर आहे का? तिकडे त्या देवांचे भक्त पाहा, आपापल्या देवाला, सत्पुरुषाला सोन्यारूप्यानं मढवतायत, त्याच्यावर नोटा-नाण्यांचा वर्षाव करतायत..’’
 
‘‘..आणि त्याची कृपा विकत घेतायत. हा रोकडा व्यवहार आहे रखुमाई, व्यवहार,’’ आता विठुरायाचा स्वर काहीसा कठोर झाला, ‘‘याला का भक्ती म्हणतात? मला पास कर, तुला अमुक देईन. मला पैसे मिळवून दे, तुला तमुक देईन. माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुला ते वाहीन. अरे, हा देव आहे की कमिशन एजंट? जिकडेतिकडे लाच खाण्याची आणि लाच देण्याची सवय झालेले हे नादान लोक साक्षात परमेश्वराला लाच देऊ पाहतात. ही क्षुद्र लाच त्या विश्वरूप परमात्म्याच्या काही उपयोगाची नाही, हे ऊठसूट अध्यात्माच्या बाता मारणाऱ्या या दगडांच्या ध्यानातही येत नाही की हे निगरगट्ट पैशानं पुण्य विकत घेऊ पाहतायत, हे कोडं आजवर मलाही उलगडलेलं नाही. हा असला देवाचा काळा पैसा मग देवळांचे दुकानदार बनून बसलेल्या दलालांच्या खिशात खुळखुळतो नाहीतर देवळांतल्या अंधा-या खोल्यांमध्ये सडतो. काय उपयोग असल्या भक्तांचा आणि त्यांच्या विकाऊ भक्तीचा? मला माझ्याकडचा खजिनाच पुरेसा आहे..’’
 
‘‘काय सांगताय? तुमच्याकडे खजिना आहे!.. मला कधी बोलला नाहीत ते.. कुठे दडवून ठेवलायत सांगा.’’ रखुमाईनं अधीरतेनं विचारलं.
 
‘‘इथे दडवून ठेवलाय इथे,’’ आपल्या छातीवर वळलेली मूठ आपटत विठुराया म्हणाला, ‘‘माझ्या भोळ्या भक्तांच्या सच्च्या भक्तीभावाचा खजिना. जरा विचार कर. नवससायास, गंडेदोरेताईत, बुवा-बापू-बाबा-महाराज, कर्मकांडं यांनी बुजबुजलेल्या या देशात माझ्यासारखा निरुपयोगीदेव आहे आणि त्याचे भक्तही आहेत, हेच आश्चर्य नाही का? ना मी त्यांच्या नवसाला पावत ना त्यांच्या काही इच्छाआकांक्षा पूर्ण करत. दगडाच्या मूर्तीत बद्ध झालेला कोणताही देव कोणालाही काही देऊ शकत नसतो, याचं भान माझ्या या अडाणी भक्तांना आहे. तरीही ते माझ्यात सखा पाहतात, बाप पाहतात आणि मायही पाहतात. आपल्या शेतात, कामात, औजारात, गाईगुरांत, बायकापोरांत मला पाहतात. कधी सवंगडय़ाशी कराव्यात, तशा सुख-दु:खाच्या चार गोष्टी करतात, कधी कातावून मला बोल लावतात, शिव्याही घालतात. त्यानं त्यांचं मन हलकं होतं. तेवढंच मी त्यांना देऊ शकतो आणि तेवढय़ावरच ते समाधानी आहेत..’’
 ‘‘..आणि तेवढय़ावरच तुम्हीही समाधानी आहात. धन्य तुमचे भक्त आणि धन्य तुम्ही,’’ फाडकन हात जोडून उठत रखुमाई फणका-यानं म्हणाली. अचानक तिचं लक्ष दूर उभा राहून डोळे मिटून कळसाला हात जोडणा-या एका फाटक्या भक्ताकडे गेलं.. संधिप्रकाशात चमकणा-या त्याच्या सात्त्विक चेह-यावर निर्व्याज, निरागस श्रद्धेचं अपरंपार तेज झळकत होतं. ते पाहून तिच्याही अंत:करणात आपसूक आशीर्वचन उमटलं आणि आपल्या भोळ्या नवऱ्याचा खूप अभिमान दाटून आला.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, २४ जुलै, २०११)

Sunday, July 17, 2011

डोकं हलवू नका..

आम्हाला अलीकडे फार म्हण्जे फारच घाई झालेली आहे..  इतकी घाई की ‘म्हणजे’ म्हणायलासुद्धा वेळ नाही, ‘म्हण्जे’त काम भागवायचं आणि पुढे जायचं फटाफट..

..म्हण्जे माफिया गुंडांनी एखाद्या पत्रकाराला गोळ्या घातल्या किंवा मुंबईत त्रवार्षिक बाँबस्फोट झाले रे झाले की २४ तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांना हुडकून जेरबंद करून आणलंच पाहिजे.. किंबहुना कुणी पिस्तूल घेऊन कुणाला गोळ्या घालायला किंवा कुणी कुठं स्फोटकं दडवायला निघाला असेल, तर पोलिसांनी त्याच्या मागावरच असलं पाहिजे.. इकडे गोळ्या घातल्या की तिकडे अटक. इकडे स्फोट झाला की तिकडे अटक.
 
बरं नुस्तं अटक करून भागायचं नाही.. ताबडतोब त्याचा निकाल लावून मोकळं झालं पाहिजे.. त्या अफजल गुरू किंवा अजमल कसाबच्यासारखं खटलाबिटला चालवून काळकाढूपणा करून त्यांना बिर्याणी खिलवत बसलात, तर अतिरेक्यांच्या बर्थडेला तेच आपल्यालाच भेट देणार.. स्फोटमालिकेची.
 
काय सांगताय? त्या दिवशी कसाबचा बर्थडेच नव्हता? त्याच्या जन्माची खरी तारीख कुणालाच ठाऊक नाही आणि कुठं नोंदलेलीही नाही? अर्र्र्र, आम्ही फार जबाबदार वर्तमानपत्रांमध्ये वाचलं होतं हो! आर यू शुअर? पण, ते काहीही असो. मुळात यांना जिवंत ठेवण्याचं कामच काय? सापडले की लगेच शिक्षा सुनावायची फासावर लटकवायचं. खरं तर अशा दहशतवाद्यांना जाहीरपणे फासावर लटकवलं पाहिजे, म्हणजे चांगली जरब बसेल.
 
काय म्हणताय?.. असं करता येणार नाही? का बरं, का? आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे म्हणून? जो कायदा अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकवू शकत नसेल तो जाऊ द्या चुलीत. कसाब आपल्या हातात असल्यामुळे पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय म्हणताय? पण, आम्हाला खून का बदला खून पाहिजे, त्याचं काय? पाकिस्तानात महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईतल्यासारखे बाँबस्फोट महिन्याला तीन होतात आणि त्यांत पाचपट माणसं मरतात, असं सांगताय? त्याच्याशी आम्हाला काय देणंघेणं?.. पाकिस्तान स्थिर असणं आपल्या हिताचं आहे म्हणताय?.. आधी तुम्हालाच फासावर लटकवलं पाहिजे इतके भयंकर देशद्रोही आहात तुम्ही. हे तुमचं इंटरनॅशनल फालमफोक तुमच्याजवळच ठेवा आणि या दोघांना फासावर लटकावून टाका पटकन.
 
त्या भाडोत्री मारेकरी गुंडांवरही खटलेबिटले भरत बसू नका. हातात सापडले की लगेच गोळ्या घाला. आमचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट कसे खटाखट गोळ्या घालत होते.. अबतक छप्पन, अब सत्तावन, अब अठ्ठावन्न.. सगळी एन्काऊंटर बनावटच असतात, हे आम्हाला माहितीये (आम्हीपण हिंदी सिनेमे पाहतो!).. पण या गुंडांसाठी कशाला करायचीत खरी एन्काऊन्टर?.. उडवून टाकायचे धडाधड!
 
काय सांगताय? हे पोलिस अधिकारी माफिया टोळय़ांच्यासाठी शार्पशूटर म्हणून काम करत होते? त्यांची मोठमोठी प्रशस्त ऑफिसेस आहेत, महागडय़ा गाडय़ा आहेत, कोटय़वधी रुपयांची बेनामी मालमत्ता आहे? हेच आता टोळीवाले होऊन बसलेत? सगळय़ात आधी छप्पन्नचे सत्तावन्न करण्याच्या नादात निरपराधांनाही पकडून गोळ्या घालत होते?.. आता त्याला काय इलाज? सुक्याबरोबर थोडं ओलं जळणारच..
 
असा अकारण गोळी घातला जाणारा कुणी आपल्या घरातला, ओळखीतला, नात्यातला असता तर..
 तर आम्ही निरुत्तर..
पण तात्पुरतेच.. कारण काहीही झालं तरी एक पक्कं आहे.. आम्हाला सगळं काही ताबडतोब हवं आहे..
तुमच्याच्यानं होत नसेल, तर आम्ही ते करू शकतो.
बघायचं असेल, तर या पनवेलला. रात्री उशिरानंच या. कोणत्याही वाहनानं या, चालत या. ज्या गावांच्या परिसरात दरोडे पडतायत, त्या भागात आलात की गस्त घालणारे आम्ही दिसूच तुम्हाला. दिसू म्हण्जे काय, घेरूच की तुम्हाला सगळे मिळून. तुम्ही ओरडाल, गयावया कराल, हातापाया पडाल, ओळख सांगू पाहाल. आम्ही काही म्हण्जे काहीही ऐकणार नाही. दरोडेखोरांना लाजवेल अशा क्रूरपणे आमच्या लाठय़ा तुमच्या मस्तकांच्या चिरफाळ्या करतील.. लाठय़ांनी नाही भागलं तर आम्ही दगड घालू डोक्यात आणि संपवून टाकू तुम्हाला!
 आमच्या भागात दरोडे पडत असताना इथल्या- सर्वासाठी सर्वकाळ खुल्या- रस्त्यांवरून जाण्याची, वाट चुकण्याची किंवा कुणाकडे पाहुणे म्हणून येण्याची चूक तुम्ही करूच कशी शकता? त्या चुकीची आम्ही कठोर शिक्षा देणार म्हणजे देणारच. भविष्यात तुम्ही अशी चूक पुन्हा करताच कामा नये, यासाठी आम्ही तुम्हाला चूक करायला शिल्लकच ठेवणार नाही. जमाव नावाचं जनावर बनून आम्ही जेव्हा जेव्हा निघतो, तेव्हा तेव्हा पाकिटमार, भुरटे चोर यांचा आम्ही असाच पक्का ‘बंदोबस्त’ करतो. आता तुम्ही दरोडेखोर नाही, निरपराध सामान्य माणूस आहात, हा एक छोटासा, दुर्लक्षणीय, दुर्दैवी योगायोग आहे.. अगदीच बिनमहत्त्वाचा. हवंतर नंतर त्याबद्दल आम्ही मनातल्या मनात (तुमची नाही, परमेश्वराची) क्षमा मागू, शिर्डीला-सिद्धीविनायकाला उलटं चालत जाऊन पापक्षालन करू, सोन्याचा छोटा माणूस बनवून काशीला दान करून येऊ. पण, आधी तुमचा सफाया पक्का!
घाबरू नका.. आमच्याकडे असे भेदरून बघू नका. आम्ही काही कोणी दहशतवादी नाही, माफिया गुंड नाही किंवा दरोडेखोर नाही.. आम्ही सामान्य माणसंच आहोत तुमच्यासारखी. सगळं जग ‘उत्तिष्ठ जाग्रत’ करत असताना शतकानुशतके कर्मविपाकाच्या कुंभकर्णी काळनिद्रेत घोरत पडलेल्या शांत निवांत देशाचे भयग्रस्त आणि भयगंडत्रस्त नागरिक. आम्ही ऐहिक-पारलौकिकाच्या भोव-यांमध्ये गटांगळय़ा खात असताना जग पुढे गेलं.. आमच्या ‘इंडियन स्टँडर्ड टाइम’ दाखवणा-या ब्रह्मदेवाच्या घडय़ाळात ‘आता वाजले की बारा’चा अलार्म वाजू लागल्यानंतर जागे होऊन आता आमची घाईगडबड सुरू झाली आहे.. आठ बावन्नची लोकल पकडायची असताना आठ अठ्ठावीसला जाग आलेल्या माणसासारखी. लेटमार्क पडू नये म्हणून आम्ही देश चालवण्याच्या, समाजरचनेच्या सगळ्या यंत्रणा, कायदेकानू, व्यवस्था वगैरे डायरेक्ट इम्पोर्ट केल्या.. त्या व्यवस्थित चालवण्यासाठी माणसं व्यवस्थित तयार करणं, त्यांच्यात राष्ट्रीय चारित्र्य, स्वत:पलीकडे पाहण्याची वृत्ती, आपलं काम इमानेइतबारे, चोख करण्याची संस्कृती रुजवणं, समाजाविषयी, देशाविषयी व्यापक आस्था निर्माण करणं ही फुटकळ कामं घाई-गडबडीत राहूनच गेलीयेत....त्यामुळे आता यंत्रणा काम करतात की नाही, आम्हाला काही कळत नाही. त्यांचं कामकाज कसं चालतं, तेही आम्हाला कळत नाही. त्यामुळे आमची चिडचिड होते. चिडचिड झाली की आम्ही..
..
 ....डोकं सरळ ठेवा, सारखं हलवू नका.. दांडकं हाणायचंय.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, १७ जुलै, २०११)

Tuesday, July 12, 2011

स्वान्तसुखाय सिनेमा?

 स्थळ : पुण्यातल्या फर्गसन महाविद्यालयाचं अँफीथिएटर
 
प्रसंग : आशय फिल्म क्लब आयोजित इंडियन पॅनोरमामधील चित्रपटांचा महोत्सव, साल 1990.
 
खास आकर्षण : नजर, दिग्दर्शक- मणी कौल
 
एक तर हा सिनेमा दस्तोयवस्कीच्या गोष्टीवर आधारलेला. दुसरं म्हणजे या सिनेमाचं पोस्टर एकदम आकर्षक. त्या काळातले बुद्धिवादी- विशेषत: बुद्धिवादी बायका ज्याच्यावर फिदा होत्या तो शेखर कपूर नायकाच्या भूमिकेत. तो आडवा पडलाय आणि त्याच्या डोक्याजवळ कोणीतरी पिस्तूल लावलंय, असं पोस्टरवरचं चित्र. हा काहीतरी थ्रिलर वगैरे असावा अशी मणी कौल या नावाशी आणि त्याच्या सिनेमाशी फारशी ओळख नसलेल्या नव्या दमाच्या उत्साही रसिकांची समजूत झाल्यानं फिल्म सोसायटीचा शो असूनही तो हाऊसफुल्ल आहे. आत जाणा-यांची लगबग पाहून फिल्म क्लबचे बुजुर्ग मेंबर गालातल्या गालात मिष्कीलपणे हसतायत.. विचारलं तर हसू आवरत सांगतात, मणी कौलचा सिनेमा म्हणजे काय चीज असते, ते आम्हाला ठाऊक आहे मित्रा!
 सिनेमा सुरू होतो. पाण्याच्या छोटय़ा पाइपलाइनच्या एका जॉइंटचं दृश्य. पार्श्वसंगीत म्हणून विचित्रवीणा किंवा तत्सम एक वाद्य वाजतंय. ते एकसलग वाजत नाही.
टय़ँवढँव’.. शांतता.. टय़ँवढय़ँवढय़ँवढय़ँवढय़ँव’.. शांतता
 
वाद्याचा झाला वेगवेगळा, असंगत. मधली शांतताही किती वेळाची असेल, ते पक्कं नाही. मागे कोणीतरी एकसुरी आवाजात काहीतरी बोलतंय.. हे स्वगत अतिशय बोजड, दुबरेधतेकडे झुकणा-या भाषेतलं आहे आणि ते बोलणा-याच्या आवाजात काहीही आरोह-अवरोह नाहीत, त्यामुळे काहीही कळत नाहीये. कॅमेरा आता हलून त्या पाइपलाइनवरून ती पाइपलाइन धरून पुढेपुढे जातोय, ही एखाद्या टेरेसवरची पाण्याची पाइपलाइन असावी.. आता कॅमेरा एका माणसाच्या पायावर, तिथून वर.. हा शेखर कपूर कपूर आहे आणि तोच बोलतोय.. मागे मधूनच वाजणारं पार्श्वसंगीत आहेच..
 
यापुढे सिनेमात काय घडतं?
 
ठाऊक नाही.
 
कारण, पुढचा सिनेमा पाहिलाच नाही.
 
सुरू झाल्यानंतर तिस-या मिनिटाला सोडलेला हा एकमेव सिनेमा. तिस-या मिनिटापासून दहाव्या मिनिटापर्यंतच्या काळात संपूर्ण थिएटर रिकामं होऊन जातं. काही कट्टर चित्रपटकंडून (हा चित्रपट चळवळीतला खास शब्द) वगळता बाकी सगळे बाहेर. सगळ्यांच्या चेह-यावर एकाच वेळी सुटकेचा भाव आणि आपण आपल्या मठ्ठपणामुळे फार भारी सिनेमाला मुकतोय की काय याबद्दलचा संभ्रम. फिल्म सोसायटीचे सदस्य असताना वेगळासिनेमा सहन करण्याची आपली शक्ती इतकी कमी कशी, याबद्दलची शरमही काहीजणांच्या चेह-यांवर दिसते.. काही बेशरम लोक मणी कौलच्या आबाचा ढोलम्हणून सिग्रेटी फुंकत कटिंग मारायला नाक्यावर निघून जातात..
 
फिल्म सोसायटीचा ऑडियन्स तसा अगदीच नवख्या मंडळींचा नसतो. सिनेमातून मनोरंजन झालं पाहिजे, ही बालबुद्धीची अपेक्षा मागे सोडून आलेले लोकच त्या फंदात पडतात. सिनेमा कळलाच पाहिजे, अशीही त्यांची अपेक्षा नसते. मात्र, समोरच्या दृश्य-ध्वनीच्या मेळातून आत काहीतरी पोहोचलं पाहिजे, ही एक माफक अपेक्षा असते. उदाहरणार्थ, तारकोवस्कीच्या स्टॉकरनावाच्या सिनेमात एका रेल्वे लाइनच्या कडेनं दोन माणसं एकमेकांशी बोलत चालत राहतात.. संपूर्ण सिनेमाभर फक्त हेच घडतं. त्यांचं बोलणं तत्त्वप्रचुर असल्यानं फारसं कळत नाही- सामाजिक संदर्भ परके- तरीही सिनेमा सोडवत नाही. गोदारच्या वीकेण्डमधला सुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅमचा सीन सलग आठ मिनिटांचा आहे.. एका रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला आहे आणि कॅमेरा कडेकडेने त्या जॅमची क्षणचित्रं टिपत एका संथ लयीनं चाललाय.. चाललाय.. चाललाय.. तो सीनही सोडून उठावंसं वाटलं नव्हतं..
 
मग नजरका पाहवला नाही? शेखर कपूर आणि ते पोस्टर फारच मनावर घेतलं? त्यातून चुकीच्या अपेक्षा निर्माण झाल्या?
 
नंतर या सिनेमाबद्दल वाचल्यानंतर त्यातला प्रयोग समजला. तो असा होता की कोणत्याही व्यक्तिरेखेने संवादांमध्ये आवाजातून, चेहऱ्यावरच्या भावछटांमधून नाटय़मयता आणायचीच नाही. बातम्या वाचल्याप्रमाणे एका लयीत, को-या चेह-याने, निर्जीवपणे संवाद वाचायचे’. म्हणजे प्रेक्षकाचा वाचक करायचा. पुस्तक वाचत असल्याप्रमाणे अनुभव द्यायचा. भावपरिपोषाची जबाबदारी ज्याची त्याची!
 
एखाद्या माणसानं समोरच्याशी बोलताना फक्त एवढंच म्हणावं की आधी असं झालं (मोठ्ठा पॉझ) आणि मग तसं झालं.. कळलं ना?’ तर समोरच्याला काय कळणार? त्यात बोलणा-याला आपण काय म्हणणार होतो, हे त्याच्या पॉझमधल्या मौनात त्याच्या मनात उमटून गेल्यामुळे माहिती असते.. त्याच्या दृष्टीनं संवादाची प्रक्रिया पूर्ण झाली.. समोरच्याला ते मौनातूनच कळलं नाही तर तो त्याचा प्रॉब्लेम. अशी काहीशी सिनेमाची ढब.
 आता विचार करा. एकदम वेगळं, मेंदू झिणझिणवणारं असंच काहीतरी पाहायची तयारी करून गेलो असतो, तर तो सिनेमा संपूर्ण पाहता आला असता का?
कारण, तुमचा मेंदू झिणझिणवणं हेही माझं काम नाही, असं मणी कौलचं म्हणणं असू शकतं. तसं असेल तर काय करायचं?
 
मी प्रेक्षकांसाठी सिनेमा बनवतच नाही, असं- एकेकाळी अतिशय गाजलेलं विधान त्यानं केलंच होतं..
 कोणत्याही कलाकाराची कलात्मक निर्मिती ही तो सोडून कोणाच्या ना कोणाच्या आस्वादनासाठी नसेल, तर ती स्वत:त परिपूर्ण असू शकते का?
एखाद्या लेखकानं एखादी गोष्ट लिहून संपवली, तर तो पेन उचलेल तिथे लेखनाची प्रक्रिया संपली असेल; पण, सर्जनाची प्रक्रिया आस्वादनाशिवाय कशी पूर्ण होऊ शकेल?
 
सर्जकानं माझिया जातीचे..असं म्हटलं तर ठीक आहे..माझी कला माझ्यापुरतीच, असं कसं होऊ शकतं?
 
त्यात सिनेमा ही कला म्हणजे तर अनेक कला आणि तंत्रं यांचा समुच्चय, एका संघाची एकत्रित कामगिरी. दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप. सिनेमा त्याच्या मनाच्या पडद्यावर आधी उमटतो, नंतर त्याबरहुकूम आकार घेतो हे खरं असलं तरी तो आकार देणारे हात अनेक. त्यातला प्रमुख माणूसही सिनेमा प्रेक्षकांसाठी नाही, असं कसं म्हणू शकेल?
 
बरं सिनेमा ही निव्वळ कला नाही. तो कलाआधारित व्यवसाय आहे. कारण, हे स्वस्त माध्यम नाही. सगळे ओव्हरहेड्स म्हणजे अवाजवी खर्च टाळले तरी सिनेमा बनवायला त्या काळातही काही लाख रुपये लागत होते. किमान खर्चाची वसुली होण्याइतपत व्यवसाय होणार नसेल, तर सिनेमा काढणाऱ्याला सिनेमा काढायला पैसे कोण देणार?
 त्यात तो तो सिंगल स्क्रीन थिएटरांचा काळ. एका वेळी पाच-सातशे माणसांनी एकत्र सिनेमा पाहण्याचीच व्यवस्था. त्यामुळे सगळ्यांच्या बुद्धीचा मसावि काढून (तो साधारण पाचवी ते सातवीपर्यंतचा येतो) त्यांना रुचेल असा सिनेमा काढला नाही, तर काढणारा आणि त्याच्या सर्जनासाठी पैसे देणारा हे दोघेही बुडालेच.
अशा काळात, मी प्रेक्षकांसाठी सिनेमा काढत नाही, असं म्हणणं हे अनेकार्थानी धाडसच होतं.. पण, ते मणी कौलच्या सिनेमानिर्मितीसाठी फायनान्स करण्याच्या धाडसापेक्षा मोठं धाडस नसणार.. मणी कौलचा सिनेमा पाहण्याचं धाडस हा आणखी एक वेगळा प्रकार होताच..
 भारतासारख्या लांगूलचालनाच्या पातळीवर जाणा-या प्रेक्षकानुनयी चित्रपटक्षेत्राच्या देशात अशा पद्धतीचा स्वान्तसुखाय सिनेमाकरणा-या दिग्दर्शकाला तब्बल 11 चित्रकृती तयार करता आल्या, ही मोठी गोष्ट म्हणायला हवी. कमी संख्येच्या अतिविशिष्ट प्रेक्षकवर्गालाही सिनेमा पाहण्याची सोय पुरवणा-या मल्टिप्लेक्सेसच्या काळात मणी कौल यांचे सिनेमे रिलीज झाले असते, तर कदाचित मणी कौलना त्यांच्या प्रेक्षकापर्यंत नेमकेपणानं पोहोचता आलं असतं आणि आपला सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला तरी हरकत नाही, इतपत तरी त्यांचं मत सौम्य झालं असतं.




(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

Monday, July 4, 2011

पावली कम

चांगली गोष्ट अशी की आता चवली-पावलीचे हिशोब ठेवायला लागणार नाहीत..
 
वाईट गोष्ट अशी की आता कोणीपण आपल्याला म्हणजे आपल्या देशालाच पावली कम म्हणू शकतो..
 
आपण स्वखुशीनेच आपल्या पावलीचा त्याग केला आहे. पंचवीस पैसे ऊर्फ चवली ऊर्फ चार आणे हे आता नाणेरूपाने चलनातून अधिकृतपणे बाद झाले आहेत. ते पैसारूपाने व्यवहारातून आणि त्यामुळे लोकांच्या स्मरणातून तर केव्हाच बाद झाले होते. आता निधनाची अधिकृत घोषणा झाली, इतकंच.
 
एखादे पंच्याण्णव वर्षाचे महामहोपाध्याय92 वर्षाची थोर लेखिका किंवा 98 वर्षआंचे तत्त्वज्ञ मरण पावल्याची बातमी वाचल्यानंतर जशी, ते हयात होते हीच बातमी आधी समजते आणि अरेच्या, ते होते का, इतके दिवस मला वाटलं होतं की कधीच गेले असतीलअशीच भावना मनात येते, तसंच पावलीचंही झालं.
 
सहाजिकच आहे म्हणा! लाकडं योग्य जागी पोहोचून पार सुकून गेली असतानाही राजकारणात काडय़ा घालण्यात सक्रिय वयोवृद्ध नेते आणि भगवं कातडं पांघरून अध्यात्माच्या गुहेत भक्तजनांची कळपांनी शिकार करणारे बुवा-बापू-महाराज-माँ आणि स्वघोषित चौथी नापास जगद्गुरू यांच्यासारखे गणंग कोणत्याही वयात मरण पावले तरी पब्लिक मेमरीला त्यांचं विस्मरण होत नाही. हे म्हटलं तर वरदान आणि म्हटलं तर शाप. वरदान अशासाठी की प्रसिद्धीचा भस्म्या रोग जडलेल्या या मंडळींना ती अखेपर्यंत लाभते. शाप अशासाठी की त्यांचे मरणोत्तर वाभाडेही बातमीमूल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत राहतात आणि भाबडे अंधभक्त वगळता बाकीच्यांना त्यांच्या भंपकपणाची मरणोत्तर का होईना खूण पटत जाते.
 
सरळ मार्गाने जगून सरळपणे मरण पावलेल्या कोणाच्याही नशिबात अशी प्रसिद्धी नसते. पावलीही बिचारी इमानाने जगली आणि इमानाने संपली. पावलोपावली तिची आठवण यावी अशी पावलीची स्थिती हल्लीच्या काळात राहिली नव्हती. विचार करा, पावली चलनात होती, याला अलीकडच्या काळात काय अर्थ होता? काय मिळत होतं पावलीला? काहीही नाही. डिझेल-पेट्रोल-गॅसच्या भावात रूपयांमध्ये वाढ होते, तेव्हा सरकार एखाद्या चवली-पावलीची भरघोस सवलत देतं, तेवढय़ापुरता आणि तसल्याच आर्थिक चालूगिरीपुरता तिचा उपयोग होता. बाकी ही चवली अनेक र्वष कोणाच्याही गिनतीत नव्हती.
 
एकेकाळी याच पावलीचा काय रूबाब होता! तिला खास किंमत होती ती देवाधर्मामुळे. कुठेही मध्यस्थाला दक्षिणादिल्याखेरीज काम पुढे सरकत नाही, या सनातन सिद्धांताची सुरुवातच मुळात आपल्याकडे देवळापासून होते. कुठूनही भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून प्रार्थना केली तर ती देवापर्यंत पोहोचतेच, हे नुसतं सांगायला. देवाकडून आडमार्गानं काही पदरात पाडून घ्यायचं, तर वजनठेवावंच लागतं. मग देवाला अभिषेक, वस्त्र, अलंकार, श्रीफळ, धूप-दीपाचं आमिष आणि देवाच्या एजंटापुढे रोकड दक्षिणा हा व्यवहार कोणत्याही व्यवहारी भक्ताने कधी चुकवलेला नाही. या दक्षिणेत सव्वाकीला फार महत्त्व. नुसता एक रुपया म्हणजे झाली साधी रक्कम. सव्वा रुपया- दक्षिणा. अकरा रुपये ही नुसतीच रक्कम. सव्वा अकरा रुपये दक्षिणा. डोळ्यांपुढे चित्र आणून पहा. तबक, तबकात अक्षता, हळद, कुंकू, दिवा आणि नुसतीच एक नोट किंवा अनेक नोटा.. चित्र अपूर्ण वाटतं. त्या सगळय़ा नोटांवर एक रुपयाचं एक आणि चार आण्याचं एक अशी दोन नाणी आली की चित्र कसं सुफळ संपूर्ण होतं. ही सव्वाकीची दोन नाणी म्हणजे जणू देवाच्या दरबारातलं वजन.
 
हे वजन देवाच्या दरबाराबाहेरही चांगलंच वजनदार होतं. चार चवल्या फेकल्या की फडावर नटरंगी नारही नाचू लागायची. घरोघरची पोरं मिसरूड, आवाज आणि शिंगं एकसमयावच्छेदेकरून फुटण्याच्या वयाची होऊन वाडवडिलांच्या वरचढ आवाज चढवून बोलत्साती झाली की मोठय़ा माणसांकडून हुकमी बार निघायचा, ‘‘चार चव्वल कमावण्याची अक्कल नाही आणि निघाले मोठय़ा माणसांना शहाणपणा शिकवायला.’’
 चार चव्वल म्हणजे सोळा आणे म्हणजे एक रुपया. त्या एका रुपयात किमान एका माणसाचं दोन वेळचं पोट भरण्याची सोय होती. असा तो काळ..
..कोणत्याही लेखात तो काळअसा शब्दप्रयोग आला की वाचक एकदम स्तब्धप्रयोगात जातो. आता पुढे फुसकट आणि फुळकट स्मरणरंजनाच्या गढूळ डबक्यात नाकातोंडात पाणी जाईपर्यंत गटांगळ्या खाव्या लागणार, अशी भीती वाचकाच्या मनात दाटून येते आणि ती बव्हंशी खरी ठरते. एकदा चार आणेहा दळणविषय ठरला की चार आण्यात पाच किलो गहू दळून मिळत होते, चार आण्यात २५ साखरगोळ्या मिळत, दोन पेरू किंवा चार चिंचा मिळत, इथपासून ते चार आण्याचे तीन आणले, काय गं तुम्ही केले?’ (संदर्भ : दादा कोंडके यांचे काशी गं काशीहे प्रौढशिक्षणपर लोकगीत) इथपर्यंतचे सगळे संदर्भ लेखात कांडून काढता येतात. (दादा कोंडके यांच्या गीताच्या उल्लेखाने शैक्षणिक उत्सुकता चाळवली गेली असणारच- चार आण्याचे तीनही तेव्हा सरकारने लोकप्रियकरायला घेतलेल्या गर्भनिरोधकांची किंमत होती आणि दादांच्या काशीने ते फुगे समजून पोरांना वाटलेअशा आशयाचे उत्तर देऊन रसिकांच्या तोंडाला फेस आणला होता.) मोले घातले रडाया, अशा आविर्भावातला पावली आमची गेली हो, कित्ती चांगली होती, किती आनंदाचे दिवस दाखवले होते तिनं,’ अशा आकं्रदनाचा पावलीला पसाभर मजकूर हुकमी रडवय्ये लेखक बुंदी पाडाव्या तसा पाडतात. अशा मजकुराची चार आण्याचीही पत नसते आणि चार आण्याला पत असण्याचा काळही कधीच इतिहासजमा झाला.
 
पावलीला पत आणि किंमत होती, तो काळ गेला तर काय बिघडलं? पावलीला शेरभर दूध आणि दोन शेर साखर कशी मिळायची वगैरे स्वस्ताईच्या कहाण्या किती ऐकवायच्या? दोन पावल्यांमध्ये वडा पाव मिळत होता, त्या काळात पाचशे रुपये पगारात पाच माणसांच्या निम्नवर्गीय कुटुंबाचा महिन्याचा खर्च भागत होता. आता वडापाव पाच-सात रुपयांवर आला असला, तरी कमीत कमी पगारही पाच-दहा हजार रुपयांच्या घरात आले आहेतच की! उगा कशाला हळहळून रडून गागून दाखवायचं?
 
बरोबर आहे. माणसांचे पगार हजारांमध्ये गेले आहेत, हे खरंच आहे. पण, एक लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माणसालाही मुंबईत तीन खोल्यांचं घर घेता येत नाही, त्याचं काय? माणसांच्या हातात किंवा बँकेच्या खात्यात एकावर अनेक वाढत्या शून्यांचे पगार-मेहनताने जमा होतात पण त्यांच्या विनियोगातून जीवनमान काही उंचावत नाही. मग त्या चलनाचा आणि ते भरपूर मिळण्याचा उपयोग काय? झिंबाब्वे नामक देशात एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात त्या देशातले     16 लाख डॉलर मिळतात, तशीच गत व्हायची. आपल्या देशाच्या प्रगतीची अशीच गती राहिली, तर आजच लक्षाधीश झालेले पगारदार हळूहळू कोटय़धीशही होतील. मात्र, तेव्हा मुंबईतलं घर मात्र 100 कोटी रुपयांचं झालं असेल.. आपल्या आटोक्याच्या बाहेरच.
 
तेव्हा 25 रुपयांना पावलीची किंमत असेल आणि 10 रुपयांची नोट चलनातून बाद होत असल्याच्या बातम्या छापून येत असतील..
 ..बिचारे रुपये आणि त्याहून बिचा-या त्यांच्या कागदी नोटा.. स्मरणरंजनाच्या बाजारात त्यांना चवली-पावलीची सोडा; एक-दोन नया पैशांचीही किंमत नाही.

(प्रहार, ३ जुलै, २०११)