Sunday, March 31, 2013

डेंजर शाळेची महाडेंजर वाट


आता एक गुपित सांगावंच लागणार...
शाळेची वाट मी सहसा टाळतो...
पुण्यात कधी येणं झालंच तरी या वाटेकडे पाय वळू देत नाही...
का म्हणून काय विचारता? तुम्हालाही ठाऊक आहे...
ही वाट फार डेंजर आहे...
या वाटेवर कधी पाय वळले, तर काहीतरी अजब गजब होऊ लागतं... दाढीमिशा गायब होतात, अंगावरचे कपडे बदलतात, निळं शर्ट आणि खाकी पँट असा गणवेश चढतो मनातल्या मनात. पाठीवरची `मोठ्ठय़ा माणसा'च्या कामांची-विवंचनांची ओझी उतरतात आणि एका अदृश्य दप्तराचंच ओझं चढतं... पहिल्या वळणावर आता चिकूचं झाड आहे की नाही ठाऊक नाही- पण मला मात्र ते स्पष्ट दिसतं- त्यावर लगडलेल्या भरघोस चिकूंसह. एक गल्ली ओलांडली की टण्णूचं झाड. टण्णू हे त्या परदेशी झाडाचं विचित्र फळ. केसरांच्या गोल घट्ट झुबक्यामुळे टेनिस बॉलसारखं दिसणारं. त्याला एक लांब दांडी. ते केसर काढून टाकले की सिनेमातल्या शेट्टी नामक नटाच्या टकलासारखं तुळतुळीत गोल गरगरीत टक्कल जोडलेली दांडी उरायची. तो टण्णू लक्ष नसताना कोणीतरी टण्णकन डोक्यात हाणायचा आणि डोळय़ातून पाणीच काढायचा.
इथपर्यंत पोहोचेस्तोवर मनाच्या डोळय़ांना आसपास सगळी शाळेची मुलंमुलीच दिसू लागतात. निळं शर्ट, खाकी चड्डी, गर्द निळा फ्रॉक आणि आत पांढरं शर्ट. कुणी एकटा. कुणी घोळक्यात. कुणी मस्त मजेत. कुणी बावरलेला. कुणी सायकलवर टांग टाकून. कुणी सायकल हातात घेऊन. कुणी आपल्या तंद्रीत. कुणी कुणाला शोधतोय... तिकडून येणारा मित्र आता भेटेल का? होमवर्कच्या वह्या कॉपी करायला वेळ मिळेल का? पुस्तकपेटीतलं पुस्तक बरोबर घेतलं का? काल ज्याचं नाव वर्गशिक्षकांना सांगितलं, तो टेंपरवारी शत्रू आज पट्टीने `हल्ला' चढवायला कुठे दबा तर धरून बसला नसेल ना? आपल्याला छान वाटणारी `ती' त्या घोळक्यात असेल का? आपल्याकडे पाहील का? पाहिलं तर हसेल का? एवढय़ाशा जिवाला एक ना अनेक उलघाली.
शाळेत पोहोचल्यानंतर तर हा मोठ्ठा दंगा. शाळेच्या आवारात निळा महासागरच खळाळतोय. प्राथमिकचे वर्ग सुटलेत. त्यांना घ्यायला आलेले पालक. इंग्लिश मिडियमची पोरं दडदडा धावत उतरतायत. त्यांच्याशी `लढाई' करत माध्यमिकची पोरं वर्गांत घुसतायत. घंटा वाजून रेकॉर्डवर `जनगणमन' सुरू होईपर्यंत नुसता हैदोसदुलाबेधुल्ला!
शाळेची वाट डेंजरस यासाठी की त्या वाटेवर गेलं की शाळा लोहचुंबकाप्रमाणे याही वयात खेचून घेईल, अशी भयंकर भीती वाटते... शाळेच्या फाटकाजवळ आलं की आत वर्गात जाऊन बसायची ऊर्मी अनावर होते. अजून असतील का ते बाक? दोन दोन जणांनी बसायचे. समोर पेनसाठी छोटीशी घळ आणि उताराचे डेस्क. खाली दप्तराचा कप्पा. त्या बाकांवर करकटानं काय काय कोरलेलं. कुणाचं नाव. कुणी चोर आहे. कुणी डँबिस. कुणा शिक्षकाचा पाणउतारा. कुठे कुठे बारीक अक्षरात कॉपी उतरवून ठेवलेली.
आपला बाकही ठरलेला आणि शेजारी बसणारा मित्रही.
आता तो कुठे आहे याचा पत्ता नाही, त्याला आपली खबर नाही. तोही येईल का वर्गात? आता कसा दिसत असेल? `ती' कशी दिसत असेल? घणघणघण घंटा वाजली की बाहेरच्या जगाशी संबंध संपला. आता आपण शाळेचे आणि शाळा आपली. हात जोडून प्रार्थनेला उभं राहिलं की शाळेतला दिवस सुरू. सगळय़ा वर्गांमध्ये एकाच वेळी सुरू झालेल्या प्रार्थनेच्या सुरांनी जणू संपूर्ण शाळेवर एक अभेद्य कवच तयार व्हायचं आणि आत असायचं आमचं सुरक्षित जग. इथे खेळायचं, बागडायचं, मजा करायची, मस्ती करायची, हे सगळं करता करता शिकायचं.
इतर शाळांचं आपल्याला काही ठाऊक नाही- माहिती करून घ्यायची गरजही पडली नाही. पण, आपल्या शाळेत घोकंपट्टीवाला अभ्यास कधीच कंपल्सरी नव्हता. एखाददुसरे शिक्षक होते कडकबिडक. पण, साक्षात वैद्य संरांसारखे हेडमास्तरच सांगायचे, ``माझ्याकडे एसेस्सीला बोर्डात येण्यासाठी खूप विद्यार्थी आहेत. पण, नाटय़वाचन, वक्तृत्व, नाटक, प्रसंगनाटय़दर्शन, विज्ञान प्रदर्शन या सगळय़ा उपक्रमांमध्ये शाळेचं नाव काढशील, अशी मुलं कमी आहेत. तुला हे सगळं येतं तर ते कर. कशाला दहावीला बोर्डात येण्याच्या फंदात पडतोयस. तुझा मार्ग वेगळा आहे. त्याच मार्गाने चाल.'' आता बोला.
अशा मुख्याध्यापकानं आणि त्याच्याच तालमीतल्या शिक्षकांनी भरलेल्या शाळेनं काय दिलं, हा प्रश्न फिजूल आहे. शाळेनं काय दिलं नाही, ते विचारा. शाळेनं दिलेलं नाही असं आयुष्यात काहीही नाही, असं उत्तर येईल हजारोंच्या मुखातून. आज जे काही आहे, ते शाळेनंच दिलंय.
दहा बाय बाराच्या मातीच्या भिंती आणि सारवलेली जमीन यांच्या ओबडधोबड घरांच्या अंधाऱया वाडय़ांमध्ये वाढलेल्या, शिक्षणाची परंपराही नसलेल्या फाटक्या तुटक्या धुवट कपडय़ांमधल्या पोरांना या शाळेनं मायेनं जवळ घेतलं, पोटाशी धरलं. पुरात घरं बुडाली तेव्हा राहायला आसरा दिला आणि पुढे कोणत्याही पुरात बुडू नयेत अशी भक्कम घरं बांधण्याचा आत्मविश्वासही. मागच्या बाकावरच्या पोरातही काही ना काही गुण असणारच असा विश्वास बाळगणारी ही शाळा. शाळेला उशीर होत असताना कंडक्टर आला नाही म्हणून स्वत: कंडक्टर बनून अख्खी बस शाळेपर्यंत विदाउट तिकीट आणणाऱया मुलाला तंबी देऊन नंतर त्याच्या हिंमतीचं कौतुक करणारी ही शाळा. अभ्यास करायचा, गृहपाठ करायचा, परीक्षा द्यायच्या, या चक्राच्या पलीकडे पोरं जे काही करू मागतील ते आनंदानं करू देणारी, त्यात सहभागी होणारी ही शाळा. कोणत्याही नव्या उपक्रमात उडी मारायला लावणारी, त्यात तोंडावर पडलो तरी पाठीवर कौतुकाचीच थाप मारणारी ही शाळा. माझ्या शाळेतल्या पोरांनी भेळेची गाडी टाकली तरी मला त्याचं कौतुकच असेल कारण तो सचोटीनं, स्वकष्टानं मिळवून खात असेल, असं अभिमानानं सांगणारी ही शाळा. कुठल्या कुठल्या परिसरातले दगडधोंडे गोळा करून त्यांना साफसूफ करून त्यांच्या मूर्ती घडवणारी ही शाळा.
कॉलेजबिलेज पुढचं फार काही लक्षात राहिलेलं नाही. त्यातलं जे काही लक्षात आहे ते शिक्षणबाह्य कारणांकरता.
लक्षात राहिली ती शाळाच. 
आमच्या नसानसांत भिनलेली.
कसोटीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची हिंमत देणारी.
जगाच्या बाजारू बुजबुजाटात ताठ मानेनं जगण्याची ताकद देणारी.
कधी कुठे एकटं पडल्यासारखं वाटलं तर पाठिशी सगळय़ा विद्यार्थ्यांचं अख्खं `अधिवेशन' घेऊन उभी राहणारी.
आता सांगा, कधीही कुठेही मनाचा संपूर्ण ताबा घेणारी अशी शाळा डेंजरस नाही का?
म्हणूनच आजही शाळेची वाट मी टाळतो... कटाक्षानं टाळतो...
त्याचा काही फायदा नाही, हे ठाऊक आहे...
ही वाट टाळली तरी अवचित कधी डोळे मिटल्यावर मनात ती वाट समोर येते आणि बोट धरून शाळेला नेते...
किती मोठे झालो, यानं काहीच फरक पडत नाही. माझी शाळा अशी सॉलिड आहे की अजूनही तिचं बोट सुटलेलं नाही... अख्ख्या आयुष्यात ते सोडायची इच्छाही नाही...

(पूर्व-प्रसिद्धी : आपटे हायस्कूल स्मरणिका)

Tuesday, March 12, 2013

न कथा क्र. 7 : उत्सवप्रिय


सिनेमात नट म्हणाला, ``बिहडमें तो बागी होते हैं, डकैत बैठते है पार्लमेंटमे...''
...आम्ही शिटय़ांचा कल्लोळ केला.
भरसभेत महानेता म्हणाला, ``संसदेत बसलेल्या भ्रष्ट निठल्ल्यांना गोळय़ा घातल्या पाहिजेत...''
...आम्ही टाळय़ांचा कडकडाट केला.
पत्रकार परिषदेत गृहमंत्री म्हणाले, ``संसदेवर हल्ला करणाऱयांच्या मास्टरमाइंडला आज आम्ही गुपचूप फाशी देऊन टाकले...''
आम्ही शिटय़ांचा जल्लोष केला, टाळय़ांचा कडकडाट केला, फटाके वाजवले, पेढेसुद्धा वाटले...

न कथा क्र. 8 : शांतता


``बास झाला गोंगाट तुमचा, शांततेने प्रवास करण्याचा आम्हाला हक्क आहे की नाही,'' त्याने लोकलमध्ये कर्कश्श केकाटणारा एकाचा चायना मोबाइल भांडून बंद करवला आणि हुश्श करून तो जागेवर बसला, तेव्हा समोरचे इयरफोनवाले काका त्याच्याकडे पाहून मिष्कील हसत होते. `तुमचं बरं आहे, कानाला इयरफोन लावले की सुटलात, पण, सगळय़ांना कर्कश्श आवाजावर कर्कश्श आवाजाचा उतारा नको असतो...' तो वैतागून काय बडबडला ते हातवाऱयांवरून काकांना कळलं.
त्यांनी इयरफोन काढले आणि त्याच्या हातात दिले. त्याने इयरफोन कानात घातले आणि चमकून म्हणाला, ``अहो, यात तर कसलाच आवाज नाही.''
``असेल कसा? मी हिमालयातून तासाभराची शांतता आणली आहे रेकॉर्ड करून. लोकलमध्ये तीच ऐकत बसतो. त्रास कमी होतो.''


Thursday, March 7, 2013

जाओ गोरख, मच्छिंदर तो ‘गया’!


चलो मच्छिंदर, गोरख आयाअशी हाक कधीतरी कानी येईल आणि आपल्याला स्त्रीराज्यातून बाहेर पडावं लागेल, असं ज्याच्या घरात स्त्रीराज्य प्रस्थापित झालेलं आहे, अशा प्रत्येक पुरुषाला वाटतं...

...या राज्यातली पहिली स्त्री म्हणजे बायको. ती प्रत्येक विषमलिंगी आकर्षण असलेल्या पुरुषाने केलीच पाहिजे, असा समाजाचा आग्रह असतो. तो स्वत:ला समाजपुरुष आणि समाजस्त्री समजणारे मित्र, नातेवाईक वगैरे वेळोवेळी करत असतात. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाने किंवा भावाने लग्न केल्यानंतर ज्यांच्या त्याच्यावरच्यास्वामिनीत्वहक्कांवर थेट टाच येणार असते, अशी आई आणि बहीण या मोहिमेत सर्वात जास्त आघाडीवर असतात. नंतर कौटुंबिक रणधुमाळीच्या प्रसंगीतुला हौसेने सून म्हणून घरात आणली हेच चुकलंअसे ज्वलज्जहाल उद्गार निघतात खरे; पण तोवर त्यांची धार आणि चूकदुरुस्तीची वेळ या दोन्ही गोष्टी निघून गेलेल्या असतात.


ज्याच्या घरात आई आणि बहीण किंवा बहिणी असं स्त्रीराज्य आधीपासूनच अस्तित्वात असतं, तो माणूसहीमालकीत बदल हाच त्यातल्या त्यात विरंगुळाम्हणून की काय, पण पत्नीनामाचा अदृश्य सिंदूर भांगात भरून घ्यायला तयार होतो. कथानायक हा निर्णय घेऊन संस्कृतिरक्षण आणि वंशसातत्य या दोन महान जबाबदार्या पार पडत असल्याने इथपर्यंत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया खुश होऊन विकट हास्य करत असतात. ते हास्य लुप्त होऊन त्यांचा चेहरा खर्रकन उतरतो, तो स्त्रीराज्यातला दुसरा मेंबर म्हणजे दुसरी मेंबरीण घरात अवतरते तेव्हा.

जुन्या पिढीतल्या लोकांचं एक बरं असतं. ते आपले थेट शब्दांत आपले जुनाट आणि बुरसटलेले विचार मांडतात, त्यामुळे त्यांच्याचसमोर ते कोळिष्टकासारखे झटकून तरी टाकता येतात. ‘आम्हाला पहिला नातूच हवा बरं काअसं अतीव कौतुकानं तोंडभरून हसून बोलून दाखवणार्या कोणाही काका-मामा-मावशीलातुमची ऑर्डर नोंदवून घेतलेली आहे, बघतो आता कसं जमतं ते,’ असं सांगून वाटेला लावता येतं. पण स्वत:ला आधुनिक म्हणवणारी मंडळी आडून आडून आपला कल काय आहे, याचा अंदाज घेऊन त्यानुसार शुभेच्छांची पुडी बांधायला घेतात. वर पुन्हाआजकालच्या जगात मुलगा काय, मुलगी काय, सारखेचअसंतुम्हाला मुलगी झालीच, तर असू द्या हा ॅडव्हान्स शोकसंदेशअशा थाटात   सांगतात, तेव्हा हे ठोंबे डोक्यात जातात. अरेच्या, माणसं कायआता एक मुलगाच घालतो जन्माला, मस्तपैकी गोरापान, बुद्धिमान आणि ताकदवानकिंवाएक गोड गोजिरी मुलगीच घालतो जन्मालाअसं ठरवून मुलांचा निर्णय घेतात का? आता बाळ हवं, एवढंच ठरलेलं असेल, तर उभयतांत काहीतरी दोष आहे, अशा नजरेने कशाला बघायचं? मुलगा हवा की मुलगी हवी, यातलं काहीतरी एक पक्कंच असायला हवं आणि ते एक काय हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे... मुलगा, मुलगा, मुलगा.

त्यामुळेच अर्धवट ग्लानीत असलेल्या नवप्रसूत मातेला डॉक्टरमुलगी झालीहे सहसा अशा गांभीर्याने सांगतात की ते पाहून हिंदी सिनेमातले उलटा स्टेथास्कोप लावलेले मख्ख चेहर्याचे बावळट डॉक्टर नायकाला सांगतात ना कीहमने बहुत कोशिश की लेकिन आपके बच्चे को बचा नहीं पाये’, त्याचीच आठवण होते. त्यात जरमुलगी झालीहे ऐकल्यावर नवप्रसूत मातेने तोंडात बोट घालून एक शिट्टीच मारली आनंदाची तर डॉक्टरीणबाई बेशुद्ध पडायच्याच बाकी राहतात आणि तिला चुकीचं ऐकू गेलं असावं अशा समजुतीनेमुलगी झालीये मुलगीअसं सांगतात. त्यानंतरही तिचा आनंद तसाच राहिला तरप्रसूतीच्या वेळी होतं असं कधी कधी, येईल भानावरअसं मानून डॉक्टरीणबाई मुलीच्या वडिलांना ही वार्ता सांगायला जातात. तो जर ही खबर ऐकून आनंदाने चित्कारला तर डॉक्टरीणबाई, मघाशी रहित केलेला, बेशुद्ध पडण्याचा बेत आता मात्र अमलात आणतातच. त्या तरी किती सहन करू शकतील?

मुलगी झाली होअशी द्वाही फिरवायला घेतल्यानंतर येणार्या प्रतिक्रिया तर फारच गमतीच्या असतात. अनेकांचे चेहरेअरेरे, इतकं करून तुमच्याकडे उंदराचं पिल्लूच आलं जन्माला!’ इतक्या वाईट भावांनी भरलेले असतात. थोडाफार पाचपोच असलेली मंडळीपहिली बेटी, धनाची पेटीअसं म्हणून वेळ मारून नेतात. जणू पैशाचं आमिष नसतं, तर बापाने लेकीचा गळाच घोटला असता. बहुसंख्या असते तीमुलगा काय, मुलगी काय, आजकालच्या काळात सारखीचअसं आतमध्ये उकळ्या फुटत असताना दु:खाने मान हलवत सांगणार्या गणंगांची.


खरा बाँब फुटतो तो स्त्रीराज्यात तिसरा मेंबर दाखल होतो तेव्हा. आधी मुळातदुसरा चान्सहाच अनेकांसाठी धार्ष्ट्याचा विषय. ज्या अर्थी तो घेतला आहे, त्या अर्थी हे लोक वेळ निघून जाण्याआधी वंशाचा दिवा पेटवून त्रिखंडात उजेड पाडायला सिद्धच झालेले आहेत, अशी अधिकृत समजूत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया करून घेतात. आता उघडपणेफाटला बरं का टरटरा तुमच्या स्त्रीधार्जिण्या पुरोगामित्वाचा बुरखाअसा कुत्सित चेहरा करूनकाळजी करू नका, या वेळी मुलगाच होईलअसा खवचट आशीर्वाद दिला जातो. घरात मुलगा आणि मुलगी असे दोन्ही असले कीबॅलन्सराहतो, असं एक संशोधनही गंभीर चेहर्याने ऐकवलं जातं. ‘आम्हाला दोन वेण्या घातलेल्या दोन पर्याच हव्या होत्याकिंवाआता ताईला भाऊ हवायापैकी काय तो एक संवाद निवडा, असा या मंडळींचा आग्रह असतो. दुसरं मूल हेहीजे होईल ते आपलंइतक्या स्वच्छपणे आणि आनंदाने स्वीकारता येतं, यावर कुणाचाच विश्वास बसलेला दिसत नाही.

दुसरीही जेव्हा मुलगीच होते, तेव्हा डॉक्टरीणबाई, आपल्या हातून असं कसं घडलं, अशा पश्चात्तापदग्ध चेहर्यानेधरणीमातेने आपल्याला पोटात घेतलं तर बरंअशा कावर्याबावर्या होत्सात्या ही वार्ता बाबांच्या कानावर घालतात. कडेवर घेतलेल्या बालिकेला टाळी देऊन दोन्ही बापलेक जेव्हाबेबी झालीम्हणून खुश होतात, तेव्हा डॉक्टरीणबाई व्यवसाय बदलून दुपटी शिवण्याचा कारखाना टाकावा काय, याचा विचार करू लागल्याचं स्पष्ट दिसतं. समाजपुरुष आणि समाजस्त्री यांचा तर इतका विरस होतो की त्यांना काय बोलावं हेच सुचत नाही. त्यात दोन मुलींची आई आणि बाप हे दोघेही खरोखरचे खुश दिसत असले, तर कलियुग कलियुग म्हणतात ते हेच, याची त्यांना खात्री पटते. असं चौकोनी कुटुंब दिसलं की हेच तोंड लपवू लागतात. हे हतभागी समाजपुरुषा आणि गे कन्यासुखवंचित समाजस्त्रिये, रडण्याच्या श्रमांनी क्लांत झालेली छोटी कन्या बाबाच्या गुबगुबीत हातावर गाल टेकवून आणि गादीसारख्या गरगरीत पोटावर विसावलेली आहे आणि त्याच वेळी कानाशी चिमणीसारखी चिवचिवत मोठी कन्या त्याला 1171 व्या वेळेलाछोटा भीमची साडेतीन ओळींची गोष्ट रंगवून रंगवून साभिनय सांगते आहे, या दृश्यातली गोडी तुम्हाला कुठून कळणार?
जाओ गोरख, या जन्मात तरी मच्छिंदर तोगया’!

पूर्व-प्रसिद्धी : मधुरिमा, दिव्य मराठी 
(महिला दिन विशेष, ८ मार्च २०१३ )