Sunday, April 24, 2011

वाघाचं शेपूट!

‘कान्हा टाइम्स’ची हेडलाइन वाचताच चकोरनं पेपर बाजूला ठेवून अजूनपर्यंत झोपून असलेल्या ज्युनियर चकोरच्या कंबरसदृश भागावर पाय मारला. हडबडून पंख खडबडवत ज्यु. चकोर जागा झाला आणि म्हणाला, ‘‘डॅडा, तुम्ही काय मला मराठी माणसांमधला तो फेमस मोरू आणि स्वत:ला मोरूचा बाप समजता काय? एकदम कंबरेत लाथ घालून जागं करताय ते.’’
 
‘‘डोण्ट वेस्ट टाइम. तीन मिनिटात दाणेबिणे काय ते खाऊन घे. आपल्याला लगेच निघायचंय.’’
 
‘‘कुठे?’’
 
‘‘नेमकं ठाऊक नाही. पण, बहुतेक ईशान्येच्या पाणथळीवर चक्कर मारावी लागेल.’’
‘‘कशाकरता?’’
 
‘‘जंगलात एक वेगळाच प्राणी आलाय. तो पाहायला.’’
 वेगळा प्राणी म्हणताच ज्यु. चकोर आनंदला आणि झटपट आवरून बापाबरोबर त्याने लगेच उड्डाण केलं. थोडय़ाफार फरकानं सगळ्या जंगलात त्या सकाळी हेच घडलं. ज्या कुणाकडे ‘कान्हा टाइम्स’ किंवा ‘कान्हा समाचार’ किंवा ‘खबरें कान्हा’ असे पेपर येत होते, त्या सगळ्याच प्राणीपक्ष्यांच्या घरटय़ांमध्ये-गुहांमध्ये टाकोटाक निघण्याची तयारी झाली. ज्यांच्याकडे पेपर येत नव्हते त्यांना सगळीकडे सुरू असलेल्या लगबगीमुळे आपोआपच खबर मिळाली आणि उत्सुकतेपोटी मंडळी निघाली. ‘कान्हामध्ये आलेला विलक्षण प्राणी’ हाच त्या दिवशी जंगलभर चिवचिवाटाचा, खुसफुशीचा, गुरगुरींचा, हंबरांचा, भेकांचा, चित्कारांचा आणि कलकलाटांचा विषय होता.
चकोरासारख्या पक्ष्यांनी हवेतून, सुसरीसारख्या उभयचरांनी पाण्यातून आणि वाघ, हत्ती, कोल्हे, ससे, लांडगे, माकडं यांनी जमिनीवरून बराच शोध घेतला. पण, वेगळा प्राणी काही दिसेना. ब-याच वेळानंतर चकोरनं ज्यु. चकोराला डोळ्यांनी खूण करत ‘लँडिंग’ची गिरकी घेतली. दोघेही अल्लाद एका झाडाच्या फांदीवर उतरले. चकोरनं जमिनीवरच्या एका झुडपाच्या दिशेनं खूण केली. तिकडे पाहताच आधी ज्यु. चकोरचं डोळे बारीक झाले, मग विस्फारले आणि त्यानं आपल्या इवलाल्या पंखांनी डॅडा चकोरला फटकारायला सुरुवात केली.
 
‘‘यासाठी मला इतक्या लांब घेऊन आलात सकाळी सकाळी घाई घाई करून? यासाठी? एक माणूस पाहायला? मी माणसं पाहिली नाहीत का कधी? नॉन्सेन्स..’’
 
‘‘अरे अरे, हो बाळा’’ आपल्या संतप्त बाळाचे फटकारे चुकवत चकोर म्हणाला, ‘‘शांत हो, आणि माझं ऐकून तर घे. नीट बघ. तो माणूस किती भेदरलेला आहे ते.’’
 
‘‘कमॉन डॅडा! अहो भेदरलेली माणसं मी काही पाहिली नाहीत का जंगलात? मोठे शूरवीर बनून जंगलात येतात आणि दोन मैलांवरून वाघकाकांची डरकाळी ऐकू आली की टरकतात. एखादं रानडुक्कर समोर आलं तर पळता भुई थोडी होते. सापमामा पायात सळसळले तर पांढरे कपडे पिवळे होतात. उडता उडता हे सगळं पाहात असतो मी. भेदरलेला माणूस हा काही आवर्जून पाहायलाच हवा असा वेगळा प्राणी आहे का?’’
 
‘‘अरे बेटा, माझं ऐकून तर घे. हा माणूस भेदरलाय तो जंगलात आल्यामुळे, असा तुझा समज आहे.. करेक्ट. पण, तो भेदरल्यामुळे जंगलात आलाय, असं मी तुला सांगितलं तर?..’’
‘‘भेदरल्यामुळे.. जंगलात?.. साऊण्ड्स इंटरेस्टिंग..’’
 
‘‘आता त्याच्याकडे नीट बघ.. काय कळलं तुला त्याच्याकडे पाहून..’’
‘‘लग्नाचा फोटोग्राफर दिसतोय.. गळ्यात कॅमेरा आहे..’’
 
‘‘गधडय़ा, लेन्सा बघ त्याच्या कॅमे-याच्या? लग्नात अशा लेन्स वापरल्या तर दारात उभं राहून स्टेजवरची फोटोग्राफी करता येईल.’’
 
‘‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर तर नाहीये ना हा? पण, ते तर कसे स्मार्ट आणि धाडसी दिसतात..’’
 
‘‘अरे, हे सेनापती आहेत सेनापती..’’
 
‘‘हा असला दरदरून घाम फुटलेला सेनापती? आणि यांची सेना कुठंय?’’
 
‘‘ती तिकडे माणसांच्या जंगलात लढतेय..’’
 
‘‘आणि मग हे इकडे कुणाचे कपडे सांभाळतायत?’’
 
‘‘स्वत:चेच. हा अखिल जगतातला असा पहिला सेनापती असेल, जो सेनेला चाल करून जाण्याचा आदेश देतो आणि स्वत: ‘सुपारी’ चघळत मागच्या मागे धूम ठोकतो.’’
 
‘‘आँ.. आणि त्यांची सेना त्यांचा आदेश ऐकते?’’
 
‘‘अरे, माणसांमध्ये हल्ली काय काय प्रकार असतात, तुला ठाऊक नाही. हा त्यातलाच एक आयटम.’’
‘‘पण, यांना स्वत:ला लढायचं नसेल, तर हे आदेश कशाला देतात?’’
 
‘‘कारण त्यांना आदेश द्यायला फार आवडतं. मध्यंतरी तिकडे मुंबईतल्या दादर भागातही त्यांनी असाच एक ‘आदेश’ दिला होता लोकांना. लोकांनी तो उलटटपाली त्यांच्याकडेच परत पाठवला.’’
 
‘‘तरी ते आदेश देतात?’’
 
‘‘असतो एकेकाचा छंद!’’
 
‘‘पण, मला एक कळत नाहीये डॅडा. यांना स्वत:ला लढता येत नाही, तर हे इतरांना कशाला लढवतात?’’
‘‘तीच तर त्यांची स्पेशालिटी आहे. यांची सेना चाल करून गेली की कधी कधी समोरचे घाबरतात. पान-सुपारीचं तबक पाठवतात. यांना सुपारीचा भारी शौक. चांगली सुपारी मिळाली की लढाई खतम.’’
 
‘‘आणि सैनिकांचं काय?’’
 
‘‘त्यांना मिळतो ना.. चुना.’’
 
‘‘अरे बापरे, भलताच विलक्षण प्राणी दिसतोय हा. पण, मग आता हे कशाला आलेत?’’
 
‘‘लपायला. हे इकडे आले की समजायचं, यांचं सैन्य तिकडे लढतंय आणि हे इकडे फोटो काढतायत. लढाई संपली, सगळं वातावरण शांत झालं, तबक पुढे आलं की मगच हे जंगलातून बाहेर पडणार.’’
 
‘‘धन्य ते सैन्य! फोटोग्राफरला सेनापती नेमल्यावर दुसरं काय होणार म्हणा. बाबा, मी मघापासून पाहतोय. सेनापती गळ्यातली दुर्बीण डोळ्याला लावून सारखे जंगलाच्या बाहेरच पाहतायत. ते का?’’
 
‘‘ते लढाईवर बारीक नजर ठेवून आहेत.’’
 
‘‘इथून?’’ ज्युनियर चकोरची हसून हसून पुरेवाट झाली. कसंबसं हसू आवरून तो म्हणाला, ‘‘अहो, हे फोटोग्राफर सेनापती इथून दुर्बीण लावून तिकडे बारीक नजर ठेवत असताना समोर भुकेलेले वाघकाका येऊन उभे ठाकले तर काय होईल?’’
 ‘‘सैनिकांची आणि महाराष्ट्राची सुटका!!!!’’


(चित्र: अरुण मोहिते)

(प्रहार, २४ एप्रिल, २०११)

Monday, April 18, 2011

ऊठसूट उत्सवांच्या देशा...

मुंबईतली एक गल्ली..
 
टिपिकल कामगारवर्गातली, निम्नस्तरीय वस्ती.. रस्त्याच्या एका बाजूला बैठी घरं, दुस-या बाजूला वेगवेगळ्या योजनांमध्ये झोपडय़ा-चाळी पाडून उभ्या राहिलेल्या इमारती.. वस्तीत विखुरलेली काही प्रार्थनास्थळं, काही चकाटय़ा पिटण्याची स्थळं (या दोहोंमध्ये अलीकडे फार गल्लत होऊन राहिली आहे), किरकोळ किराणा दुकानं, चहाच्या टप-या, पानबिडीचे ठेले, हेअर कटिंग सलून, देशीचा गुत्ता आणि विदेशीचा बार हे सगळं नेहमीचंच नुक्कडछाप नेपथ्य.. त्यात दिवसरात्र वावरणा-या व्यक्तिरेखाही नुक्कडमधल्यासारख्याच, पण अधिक अस्सल असल्यामुळे त्यांची तिखटजाळ कारी आणि कारी भाषा कानात शिशासारखी ओतली जाऊन मेंदूला झिणझिण्या आणत असते..
 
या नेहमीच्या कामगार वस्तीच्या सीनमध्ये हल्लीच्या काळात काही पर्मनंट भर पडत चालली आहे.. काही घरांवर, इमारतींवर वेगवेगळय़ा पक्षांचे ध्वज, सोबत काही पक्षांचे आडवे कापडी बॅनर, रस्त्याकडेला ठिकठिकाणी स्थानिक कामांचे श्रेय ओरबाडण्याची अहमहमिका दाखवणारे नेत्या-कार्यकर्त्यांचे बटबटीत फ्लेक्स, समस्त भंपकराव भुस्कुटेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणा-यांचे फलक, रस्त्यावर अस्ताव्यस्त सांडलेले मांडव, त्यांत (कधी कधी एकमेकांच्या समोरासमोर वेगवेगळी गाणी वाजवणारे) मोठमोठे स्पीकर आणि रस्त्याच्या दुतर्फा पताकांच्या माळा आणि रात्री झगमगणारी विजेच्या माळांची रोषणाई..
 
आता हे कोणत्याही वस्तीतल्या कोणत्याही उत्सवाच्या वेळी दिसणारं सर्वसामान्य दृश्य एवढं रंगवून सांगण्याची काय गरज आहे?..
 
.. कारण, यातली गंमतीची गोष्ट अशी आहे की या आणि इथल्या अशा बहुतेक सगळय़ा वस्त्यांमध्ये ऑल्मोस्ट वर्षाचे 365 दिवस हेच दृश्य दिसतं.. म्हणजे बारा महिने तेरा काळ कोणते ना कोणते उत्सव सुरू असतात..
 
गणपती, नवरात्र हे तर नेहमीचे यशस्वी सामाजिक जागृती करणारे उत्सव (इथे जागृतीच्या पुस्तकी अर्थाकडे वळायचं नाही, माणसांना जागे ठेवणेएवढाच अर्थ पाहायचा).. या दोन्ही उत्सवांना हल्ली वन्समोअर मिळालेला आहे, त्यामुळे, गणेशोत्सवाला माघी गणपतीची जोड मिळालीये आणि नवरात्र तर 18 रात्रींचं होऊन गेलंय. अन्य सर्व धर्मामधले पवित्र दिवस, नववर्षदिन, मग विविध देव आणि देव्यांचे जन्मोत्सव (नशीब त्यांच्या पुण्यतिथ्या नसतात), पंचम्या, सप्ताह, नवम्या, दशम्या, आधुनिक भारतातल्या महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या, असंख्य बाबा-बुवा-बापूंचे भंडारे, प्रकटदिन, अंतर्धानदिन वगैरे.. या आणि असल्या उत्सवांनंतरही काही दिवस कोरडे उरलेच, तर उत्सवबाज मंडळी सत्यनारायणाच्या पूजा, लग्नं आणि बारशांचे दणकेबाज सोहळे करून वर्षातला एकही दिवस भाकड जाऊ देत नाहीत..
 
आता कुणी म्हणेल की असतो एखादा समाज उत्सवप्रिय, त्यात काय बिघडतं?..
 
बिघाड काय आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर यातल्या कोणत्याही उत्सवाचं स्वरूप पाहा.. सगळय़ा उत्सवांमध्ये मांडव, पताका, लायटिंग आणि सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत आणि अनेकदा त्यानंतरही ढणाढणा वाजत असलेले स्पीकर कॉमन. सणासुदीला, जनरल उत्सवांना हिंदी-मराठी सिनेमातली प्रसंगाशी असंगत नाचरी गाणी वाजतात आणि धार्मिक उत्सवांना धार्मिक गाणी- म्हणजे काय तर हिंदी मराठी सिनेमातल्या असंगत गाण्यांच्या चालींवर बेतलेली, गीत-संगीत-गायन या सर्वच पातळय़ांवर सुमार दर्जाची गाणी वाजतात, एवढाच काय तो फरक. धार्मिक उत्सव असेल, तर भंडारा, प्रसाद किंवा तीर्थप्रसाद आणि सामाजिक उत्सव असेल तर कार्यकर्त्यांचा रात्रीचा तीर्थप्रसाद’- असे सगळे उत्सव सारख्याच निर्बुद्धपणे साजरे करायचे. बुद्धिदात्या गणपतीच्या उत्सवाशी बुद्धीचा संबंध नाही, धम्मदात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्सवात शिक्षण-वाचन-अभ्यासाचा संबंध नाही, उलट बाबासाहेबांना अप्रिय अशी त्यांचीच मूर्तीपूजा मांडलेली.
 
या असल्या उत्सवांमधूनच कार्यकर्ते घडतात, म्हणे. आसपास असली करयसोडून काहीही अर्थपूर्ण घडत नसेल, तर राजकीय पक्षांना लागणा-या अल्पमती उत्साही वीरांच्या फौजाच तयार होणार. उत्सवांच्या मुशीत तयार झालेले हे टिपिकल कार्यकर्ते मग दरसाल विद्यार्थ्यांना वह्यावाटप आणि गरजू महिलांना शिवणयंत्रवाटपासारखे तेच तेच कल्पनाशून्य कार्यक्रम सदासर्वकाळ घेत राहतात.. आधी गल्लीतल्या एकाही पोराचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, इतक्या मोठय़ा आवाजात स्पीकर लावून त्यांच्या अभ्यासाचा, शैक्षणिक कारकिर्दीचा कायमस्वरूपी खेळखंडोबा करायचा आणि मग त्यांना वह्या वाटायच्या? कशाला? कोणत्या तरी बुवा-बापू-महाराजाचं नाव गिरगटवून भंपक पुण्य कमावायला?
 
रोज ही गल्ली चालावी लागते.
 
रोज या गल्लीत उत्सव सुरू असतो.
 
रोज या गल्लीतून चालताना प्रश्न पडत राहतात..
 
..हा समाज सतत इतके उत्सव का साजरे करत असतो?
 
हे सगळे उत्सव तो इतक्या एकसाची बथ्थडपणाने का साजरे करतो?
 
आपल्याकडे रोज साजरं करण्यासारखं काहीतरी आहे, असं घसा खरवडून, लाइटमाळांचा झगमगाट करून तो कोणाला सांगत असतो?
 
असल्या कोणत्याही उत्सवात समाजाचं ख-या अर्थाने प्रबोधन करणारं, त्याची सद्यस्थिती मांडून दाखवणारं, समाजाच्या व्यापक हिताचं कोणतंही ठोस काम कधीच का घडताना दिसत नाही?
 
समूहाला कशाचा विसर पडावा म्हणून हे मेंदूला झिंग आणणारे अफूचे डोस दिले जातात?
 या बारमाही उत्सवांमधून समाजभान, एकोपा वगैरे वाढीला लागतो म्हणतात, मग, एवढे उत्सव साजरे करूनही हा समाज इतका चिरफाळलेला, विभागलेला, पराकोटीचा स्वार्थी आणि आप्पलपोटा कसा?  

(प्रहार, १७ एप्रिल, २०११) 


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

Sunday, April 10, 2011

अय्या, कित्ती अश्लील!

‘‘अय्या, कित्ती अश्लील!’’
 
पलीकडच्या कोप-यातून आवाज आला आणि आमची मान गर्रकन 180 अंशाच्या कोनात वळली.
 
मुळात कोठूनही नाजूक स्त्रैण आवाज आला, कांकणे वाजली, गजरा दरवळला, यंत्रफवारित सुवासिक अंगगंध परिमळला की आमची मान- प्रसंगी 360 अंशातसुद्धा- वळते आणि डोळे- ज्यांना आमचे कलत्र बटाटय़ाची उपमा देते- ते रताळ्याच्या आकाराचे होतात.. ‘‘..आणि जीभही हातभर लोंबू लागते..’’ हे उद्गार अर्थातच आमच्या कलत्राचे.. तिकडे लक्ष न देणेच इष्ट.
 
तर सांगण्याचा मुद्दा असा की ‘‘अय्या कित्ती अश्लील’’ हे उद्गार कानांवर पडताच आमची मान गर्रकन वळली आणि मनात अत्युच्च कोटीचा आपुलकीचा भाव दाटून आला.. ‘‘..बाई दिसली की पाघळलेच..’’ हे आमच्या कलत्राचे विश्लेषण हे सांगायला नकोच. पण, या आपुलकीच्या भावनेमागची आमची कारणमीमांसा वेगळीच आहे. आम्ही होतो ते पहिली ते चौथीच्या मुलांच्या बालचित्रकला स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चित्रांच्या प्रदर्शनात. मुलांनी नेहमीचीच- म्हणजे दोन डोंगरांच्या आडून उगवणारा सूर्य, एका वाहत्या नदीच्या काठी असलेलं कौलारू घर, झाड, पान, गुलाबाचं फूल, सफरचंद वगैरे चित्रं काढली होती. त्यातल्याच एका चित्रासमोर उभ्या राहिलेल्या भगिनीच्या तोंडून हे उद्गार निघाले आणि आमचे कान धन्य झाले. शेजारच्या दुस-या भगिनीला उद्देशून ती बोलत होती, ‘‘बघ ना गं ते दोन्ही डोंगर कित्ती अश्लील दिसतायत.’’
 
‘‘हो ना आणि त्यांच्याआडून उगवणारा तो सूर्य.. तो तर कित्ती भयंकर अश्लील दिसतोय!’’
 
‘‘ते लालचुटुक सफरचंद पाहिलंस ना? केवढं भयंकर अश्लील आहे ते.’’
 
‘‘टीव्ही-सिनेमे पाहून लहान वयातच कित्ती बिघडतात नै मुलं?’’
 
‘‘आणि मग असली चित्रं काढतात काहीबाही.’’
 
‘‘हो ना, म्हणून परवा आम्ही टीव्हीची एक शो रूमच फोडून टाकली सगळ्याजणींनी मिळून.’’
 
हे अमृतमय शब्द कानी पडताच आम्ही लगेच पुढे सरसावलो. आमच्या अशा पुढे सरसावण्यात नेमकी काय गडबड असते, देव जाणे, पण, सहसा तदनंतर ज्यांच्या दिशेने आम्ही सरसावतो त्या भगिनीवृंदाची प्रतिक्रिया काही फारशी प्रोत्साहक नसते.. याही वेळी तसेच झाले. आमच्या सरसावण्याउपरांत ती भगिनी खाली- बहुधा पायताण काढण्यासाठी- वाकली. प्रसंग ओळखून आम्ही तिला परवलीच्या शब्दांनी संबोधित केले, ‘‘जय भोंदू!’’
 
तीही ताबडतोब पायताण सोडून सरळ झाली आणि आश्चर्यचकित स्वरांत उद्गारली, ‘‘जय भोंदू!’’
 
कुठले कुठले भोटमामा भरतात आपल्या संघटनेत, असा काहीसा भाव आम्ही तिच्या नजरेत पाहिला. पण, त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही म्हणालो, ‘‘तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलतात. इतकं कुसंस्कारी, चित्रकलेची विटंबना करणारं, अत्यंत अश्लील अशा चित्रांनी भरलेलं हे प्रदर्शन आपण बंद पाडलंच पाहिजे.’’
 
हे एक आमचं फारच भारी आहे बरं का. आम्ही एकटे असलो की तोंडावरची माशी उडेल की नाही, अशी शंका येते. मात्र, आणखी दोन टिळेवाले भेटले की आमच्या अंगात अनामिक स्फुरण चढतं. तसंच झालं. आम्ही तिघांनी मिळून प्रदर्शन बंद पाडलं.
 एक थोर पुण्यकर्म केल्याच्या सात्त्विक आनंदानं थबथबलेल्या मनानं आणि चेह-यानं आम्ही नाक्यावरच्या उपाहारगृहात तेवढाच सात्त्विक आणि थबथबलेला साबुदाणावडा खाल्ला आणि टिळेवाले शाळेकडे निघालो. तिथेच आमच्या संस्थेचे अश्लीलता प्रशिक्षण वर्गभरतात ना! अ‍ॅक्चुअली खरं सांगायचं तर हे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात जो विचार आला, त्याच विचारानं आम्हीही सुरुवातीला या वर्गाकडे ओढला गेलो होतो. इथे अश्लीलतेचं नव्हे तर अश्लीलता कशी ओळखायची, याचं प्रशिक्षण दिलं जातं, हे कळेपर्यंत बराच उशीर झाला होता. असो.  
अहाहा, काय तो वर्गाचा देखावा!
 
एक टिळेवाले बंधू हातात खडू घेऊन उभे होते. त्यांनी फळ्यावर एक रेघ मारली.
 
‘‘बाई गं, कित्ती अश्लील?’’ समोरची एक भगिनी अशा काही अदेनं म्हणाली की ते पाहून आम्हाला- अं.. अंऽ  आम्हालाही ती रेघ अश्लील वाटू लागली.
 
‘‘मग ताई, शेजारी दुसरी रेघ काढतो.’’ बंधूंनी आणखी एक रेघ काढली.
 
‘‘बाई बाई, हे तर फारच अश्लील.’’ दुसरी भगिनी चित्कारली.
 
‘‘मग या रेषा जोडू का?’’
 
‘‘नको नको. ते तर बघवणारही नाही.’’ तिसरी भगिनी डोळे झाकून घेत म्हणाली.
 
चौथी उठली आणि बंधूंच्या अंगावर धावून जात म्हणाली, ‘‘आधी तो खडू फेकून द्या. बुटाखाली चिरडून टाका. तोच सर्वात अश्लील दिसतोय. अशा भयंकर अश्लील आकाराचे खडू घेऊन शिक्षक शाळाशाळांमध्ये मुलांना शिकवतात. मग, मुलं वेगळं काय शिकतील?’’
 
‘‘ठरलं.’’ टिळेवाले शाळेचे मोठे टिळेवाले मुख्याध्यापक पुढे सरसावले, ‘‘यापुढचं आंदोलन खडूविरोधी आंदोलन करायचं. अख्ख्या भारतवर्षातल्या सर्व शाळांमधले हे खडू वापरण्यावर आपण बंदी आणायची. जो शिक्षक किंवा जी शिक्षिका हातात खडू घेईल, त्याला छडीनं मारायचं.’’
 
‘‘अय्या नक्को!’’ आणखी एक भगिनी चित्कारली.
 
‘‘का हो ताई?’’
 
‘‘इश्श! अहो, छडी हातात घ्यायची म्हणजे.. तीही कित्ती अश्लील असते!’’
 
‘‘हो ना बाई, माझ्या अंगावर तर शहाराच आला.’’
 
..अखेरीस अश्लीलताप्रसारक शिक्षकांवर डस्टर फेकून मारण्याचे ठरले आणि आमची सभा बरखास्त झाली.
 
जड अंत:करणाने भगिनीवृंदाचा निरोप घेऊन महान राष्ट्रकार्य केल्याच्या सात्त्विक आनंदात आम्ही स्वगृही पधारलो, तर घरात वेगळाच प्रसंग. आमचे पाऊल घरात पडताच चिरंजीव शंकर याने गळामिठी घालून स्फुंदायला सुरुवात केली, ‘‘बाबा, आज माझ्या चित्राला पहिला नंबर मिळाला होता. पण, शाळेच्या प्रदर्शनात एक बाप्या आणि दोन बायकांनी मिळून नासधूस केली. माझं चित्र फाडून टाकलं..’’
 
..आमचं डोकं गरगरायला लागलं..
 
‘‘भेटूदेत ते भेकड भोंदू एकदा समोरासमोर.. नाही तापल्या कालथ्यानं डाग दिला त्यांच्या फुलीफुलीवर तर नावाची भीमाबाई नाही.’’
 
गळामिठी सैलावताना शंकरनं आमच्या चेह-याकडे पाहिलं.. मग खूप निरखून पाहिलं.. त्याला बहुधा प्रदर्शनातली ओळखपटली.. मग त्याच्या चेह-यावर आश्चर्य, संताप, लाज, घृणा असे भाव क्रमाक्रमाने उमटत गेले..
 ..अतिशय अश्लील, ओंगळ आणि अमंगळ असं काही पाहिल्यावर एखाद्याच्या चेह-यावर उमटावेत तसे!  

(प्रहार, १० एप्रिल २०११)

Sunday, April 3, 2011

आपण, ते आणि जननीबाय

वर्ल्ड कपची कोणती मॅच पाहण्यासाठी तुम्ही जिवाचा आटापिटा केलात? 
कोणती मॅच पाहताना तुमचे प्राण डोळय़ांत गोळा झाले होते?
 
काही मोजके दळभद्री नतद्रष्टवगळता या प्रश्नांवर तमाम भारतवर्षाचं एकमुखी उत्तर एकच असेल.. अर्थातच भारत-पाकिस्तान सेमी फायनल.
 
का? तीच मॅच का?
 
कारण ही मॅच पाकिस्तानबरोबर होती.. सिंपल.
 
असेल. पण, तीच इतकी महत्त्वाची कशी? पाकिस्तान हा जगातला नंबर वन क्रिकेट खेळणारा देश आहे का?
 
नाही.
 
पाकिस्तानला हरवणं हा अशक्यप्राय पराक्रम ठरावा इतकी ती बलाढय़ टीम आहे का?
 
नाही.
 
मग, ‘ही मॅच जिंकलीच पाहिजे, फायनल हरलो तरी फरक पडत नाही, आपल्यासाठी हीच फायनलअसा युद्धोन्मादी उत्साह निर्माण करणारं त्या मॅचमध्ये असं काय होतं?
 
ती मॅच पाकिस्तानबरोबर होती, ठोंब्या! तो आपला शत्रू नंबर वन आहे..
 
का? आपल्या सीमेलगत इतर जेवढी शेजारी राष्ट्रं आहेत, त्यापैकी कोण आपला मित्र आहे? कोणाशी आपले संबंध शंभर टक्के सौहार्दाचे आहेत? पाकिस्तान शत्रू नंबर वन असेल, तर चीनचं काय? तो काय परममित्र नंबर वन आहे?
 
ओ भाऊ, ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स, एक्स्टर्नल अफेअर्स वगैरे जडजंबाल गोष्टी शिकवू नका.. पाकिस्तान हा शत्रू नंबर वन आहे, कारण तशीच आपली सगळ्यांची भावना आहे. तसंच बाळकडू आपल्याला सतत मिळालं आहे. पाक- डय़ांचे उद्योग दिसत नाहीत का तुम्हाला? अतिरेकी हल्ले, कारगिल, बाँबस्फोट वगैरे विसरलात का?
 
छे छे! ते कोण विसरेल? पण, एकशे एकवीस कोटींचा हा बलाढय़, सुपरपॉवर होत्साता आपला देश उत्तर प्रदेशापेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला इतका टरकतो, हे अजब नाही का?
 
ओ भाऊसाहेब, तोंड सांभाळून बोला. टरकतोबिरकतो बोलायचं काम नाही. अरे, आपला देश एवढा बलवान आहे की आपण सगळे मिळून वाघा बॉर्डरवर नुसतं अं अं केलं, तरी तो टिंपुकला देश सगळाच्या सगळा वाहून जाईल, आहात कुठं!
 
हेही बरोबर! आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत आपण हरवलंय त्या देशाला. म्हणूनच तर प्रश्न पडतो की इतक्या मरतुकडय़ा देशाशी कोणत्याही मैदानावरची लढाई इतकी महत्त्वाची का वाटते आपल्याला? पाकिस्तानला हरवलंच पाहिजे, असा घोषा लावणं म्हणजे पाकिस्तानला अनावश्यक महत्त्व देणंच नाही का?
 
म्हणजे मुद्दा पुन्हा तोच. अख्ख्या देशाला भारत-पाकिस्तान मॅच हीच विश्वचषकाची खरी फायनल वाटणार असेल, तर आपल्याला पाकिस्तानफोबिया झालेला आहे, हे मान्य केलं पाहिजे.
 
आपल्याला पाकिस्तानला हरवणं इतकं महत्त्वाचं वाटतं कारण तो त्यांचा देश आहे, हेही मान्य केलं पाहिजे.
 
तेम्हणजे मुसलमान.
 पाकिस्तान भारतातून मुस्लिमबहुल प्रांताचा लचका तोडून बनवण्यात आलेला आहे आणि भारतातल्या बहुसंख्य हिंदूंना मुस्लिमद्वेषाचा बूस्टर डोसच दिला जात असल्याने या देशातल्या प्रत्येकाला पाकिस्तानचा पराभव हा वर्ल्डकपपेक्षा मोठा विजय वाटतो. इथल्या प्रत्येक मुस्लिमालाही तसंच वाटलं पाहिजे (नाहीतर जा लेको पाकिस्तानात!) असा आपला आग्रह असतो. भारतातल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये मुस्लिम बांधवभारत विजयी व्हावा, यासाठी अल्लाहची करुणा भाकताहेत, असे फोटो छापून येतात सगळय़ा पेपरांत. हे राष्ट्रीय मुस्लिमअसल्याचं सर्टिफिकेट त्यांना दर मॅचला मिळवावंच लागतं. (इंग्लंडचे नागरिक झालेले हिंदू मात्र तिकडच्या मॅचमध्ये त्या देशाला नव्हे, तर भारतीय संघाला चीअरअप करतात, तो देशद्रोह नसतो, ते फक्त वेळीअवेळी उफाळून येणारं संधिसाधूंचं मातृभूमीप्रेम असतं.)
भारतावर पाकिस्तानातून अतिरेकी हल्ले झाले आहेत.
 
भारताशी पाकिस्तानने लढाया केल्या आहेत.
काश्मीरसारख्या प्रश्नांच्या जखमा तो देश आंतरराष्ट्रीय पातळीवर चिघळत ठेवतो आहे.
 
भारतद्वेषाच्या आसाभोवतीच गरगरणारी तिथली राजवट आणि लष्करशाही घृणेला पात्रच आहे. पण, तिथल्या सामान्य माणसांनी काय घोडं मारलंय? इकडची आणि तिकडची सामान्य माणसं- आपला विश्वास बसणार नाही इतकी- एकमेकांसारखी आहेत, हे आपल्या भेज्यात कधी शिरणार? त्यांची नाळ- कुणी कितीही उपटून अरबस्तानात नेऊन उम्माला (म्हणजे इस्लाम हेच एक राष्ट्र, ही थियरी) चिकटवायचा प्रयत्न केला तरी- इथल्याच मातीत पुरलेली आहे.. ती नाळ मुंबई-अमृतसर-दिल्लीशी जुळलेली आहे, दुबई-कैरो-तेहरानशी नव्हे.
 
त्यांनी आणि त्यांच्या हिरव्या आकांनी कितीही नाकारलं तरी पाकिस्तानातले बहुसंख्य मुसलमान हे संस्कारांनी भारतीय मुसलमान आहेत.
 
भारताशी हरलो, तर एवढे काय भुंकताय? आपण सिनेमेही त्यांचे पाहतो, त्यांच्याकडचेच रीतीरिवाज पाळतो, तर त्यांच्या- बद्दल नफरत कशाला,’ असं परवाच्या मॅचनंतर तिकडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दरडावणारा आफ्रिदी तरी वेगळं काय सांगत होता.
 
तिकडे तो तसं सांगतोय आणि इकडे आपण मात्र मॅचच्या उन्मादात इकडच्याही मुसलमानांना ते पाकिस्तानीअसल्याप्रमाणे वागवतोय..
 ते किती भारतीयआहेत, यावर विश्वास बसत नसेल, तर बाय जननीबायला विचारा. 
बाय जननीबाय
 
काली श्री कालकाय
 
पाच दिवस खेलाय निगालीस
 
ही रोशन तुझ्या चरणाशी आलीय
 
हिची लेक..
 
(कुलसुम कुलसुम, नाव घे तिचा आयसमोर..)
 
हां.. तर हिची लेक कुलसुम
 
(रोह्याला असते ती, भायेरगावी असतो तिचा नवरा..)
 
आता हे काय नवसात सांगू? अगं मेन नवस काय आहे ते सांग पटापट. मागं मान्सा खोलंबलीत.
(तिचा नवरा आता आलाय परत, तिला प्वॉर नाय, प्वॉर होऊदे)
 
अगं नवरा आलाय ना आता परत. मग आता होईलच की पोर. नवस कशाला बोलायला पायजेल.. हा हा हा
 
(परत बोल नवस समदा..)
 
बाय जननीबाय
 
काली श्री कालकाय
 
पाच दिवस खेलाय निगालीस
 
ही रोशन तुझ्या चरणाशी आलीय
 
हिची लेक कुलसुम, रोह्याला असते, तिला पोर नाय, तिची इच्छा पूर्ण कर, तिला पुढच्या वर्षीच पोर होऊ दे,
 
तिच्या पाठिशी सादर आस.
 पुढच्या वर्षी ती तिच्या मनाप्रमाणे काय तुझ्या भेटीला देईल, पाच नारळांची ओटी, सव्वाशेर पेढे आणील. तेव्हा तिची इच्छा पूर्ण कर. पाठिशी सादर आस. हरहरहर.. महादेव!
असे कित्येक नवस होळीच्या आगेमागे कोकणाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या आय-बाय-मायच्या समोर बोलले जातात.. कपाळावर कुंकू आणि गळय़ात मंगळसूत्र नसलेल्या कितीतरी रेहाना, रुक्साना, शबनम भक्तिभावानं देवीची ओटी भरत असतात.. भक्तिभावानं देवीचं कुंकू कपाळावर लावून घेत असतात.. कोकणातल्या गावांमधली मुस्लिम वस्ती म्हणजे मोहल्ला’.. त्या मोहल्ल्यातला कोणीही शाळकरी अर्शद, अस्लम, शारूक सर्दीपडशानं गांजला, तर याच आय-बाय-मायचा अंगारा त्याच्या भाळी लागतो, मुखात पडतो, क्वचित ताईताच्या रूपानं श्रद्धेचं कवचही बनतो..
 मूर्तीपूजा मान्य नसलेल्या इस्लाममध्ये ही देवपूजा म्हणजे धर्मद्रोहच.. पण, या मातीशी एकरूप झालेला प्रत्येक मुसलमान तो इतक्या भोळ्या श्रद्धेने करतो, की त्याचे त्या अल्लातालालाही कौतुक वाटावे.. मुस्लिमांचेच का? बाय जननीबायपुढच्या श्रीफळांप्रमाणेच कोणत्याही दग्र्यावरच्या चादरी आणि मोतमाऊलीपुढच्या मेणबत्त्याही धर्माची मर्यादा ओलांडूनच वाहिल्या जातात.. धर्माचा ऊग्र दर्प चपलेप्रमाणे बाहेर ठेवून तिथे करुणा भाकण्यासाठी झुकलेला असतो निखळ माणूस..
याचं भान न ठेवता दरवेळी भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर कोठूनतरी सणसणत येणाऱ्या दगडानं मोहल्ल्यातल्या अन्वरच्या घराची खिडकी फुटणार असेल, अमीनाबीने खपून भाज्या लावलेल्या परसात लवंगीचे सर तडतडणार असतील, विजयोत्सवी मिरवणुकीत अर्शद, अस्लम, शारूक यांना तेच हरले आहेतअशा मिजाशीत टपल्या, ठोसे, बुक्के खावे लागणार असतील, दरवेळी भारत पाकिस्तानविरुद्ध जिंकेल तेव्हा आपण आपल्या मोहोल्ल्यात पाकिस्तानचं प्रतिबिंब पाहणार असू.. तर आपल्याला पिडण्यासाठी पाकिस्तानची गरज काय?
 ..आपणच आपल्या मोहोल्ल्यात पाकिस्तान तयार करतो आहोतच.

(प्रहार, ३ एप्रिल, २०११)