Sunday, March 27, 2011

गांधी नावाचे गारुड


महात्मा गांधीजींची जन्मतिथी किंवा पुण्यतिथी असली की त्यानिमित्ताने लिहिताना, आज गांधीजी हयात असते, तर ते किती वर्षांचे असले असते, याचा हिशोब करण्याची आणि आजच्या राजकारणावर, समाजकारणावर त्यांचा नेमका किती प्रभाव पडला असता, याचे विवेचन करण्याची एक पद्धत आहे. गांधीजींची हत्या झाली नसती आणि त्यांना दीर्घायुरारोग्य लाभले असते, तरी आज ते हयात नसते, हे तर स्पष्टच आहे. आयुष्याचे शतक त्यांनी गाठले असते तरीही ते जवळपास 40 वर्षांपूर्वीच निवर्तले असते. गांधीजींना तसे नैसर्गिक मरण लाभले असते, तर आज गांधीजींना जागतिक पटलावर जे स्थान मिळाले आहे, ते लाभले नसते असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदात फाळणीचे विरजण पडले, त्याच काळात गांधीजी त्यांच्या अनुयायांमध्ये आणि काँग्रेस पक्षातही एकाकी पडण्याची सुरुवात झाली होती. त्यांचे आदर्शवादी राजकारण धूर्त आणि `व्यवहारी' काँग्रेसजनांना परवडले नसते; त्यांनी गांधीजींना पत्करले होते ते त्यांचा जनमानसावरील प्रभाव लक्षात घेऊन. गांधीजींच्या हयातीतही त्यांचे अनुयायी म्हणविणारे काँग्रेसजन `गांधीवादी' होते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.  

गांधीजींनी फाळणीच्या वेळी पराकोटीचा मुस्लिम अनुनय आणि पाकिस्तानधार्जिणेपणा केला, या पद्धतशीर अपप्रचाराच्या परिणामी हिंदुबहुल जनमानसावरील त्यांच्या प्रभावाला हादरे बसू लागले होते. नथुराम गोडसेच्या गोळीने त्यांचा वेध घेतला नसता, तर ते हळुहळु निष्प्रभ होऊन विझून गेले असते आणि त्यांच्याबरोबर गांधीविचार संपला असता, असे मानणारे अनेकजण आहेत. आश्चर्य म्हणजे यात गांधीजींच्या `संपण्यात' रस असलेले प्रखर, कट्टर गांधीद्वेष्टे जसे आहेत, तसेच गांधीविचारांचे अनुयायीही आहेत. नथुरामने गांधीजींना अमर केले, असे मानणाऱयांना गांधीजी कळले नाहीत, असे म्हणावे लागेल. गांधीजींची हत्या झाली नसती, तर वर उल्लेखिलेली प्रत्येक गोष्ट घडण्याची शक्यता होती आणि ते त्यांच्या हयातीत दुर्लक्षिले गेले असते किंवा त्याहून वाईट म्हणजे मखरात बसविले गेले असते, यात शंकाच नाही. तरीही त्यामुळे गांधी नावाचे गारुड संपले असते आणि आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरही असलेला त्यांचा प्रभाव शिल्लक राहिलाच नसता, असे मानणे भाबडेपणाचे आहे. गांधीजी हे व्यक्तिगत आयुष्यात अतिशय कर्मठ अशा कर्मकांडसदृश हेकेखोर आग्रहांसाठी प्रसिद्ध होते. तरीही, त्यांची प्रतिमा मात्र कमालीची अनाग्रही, लवचिक आणि सर्वसमावेशक राहिली आहे. त्यांचे विचार मानणारे अनुयायी जगभर आहेत, पण, त्यांच्याविषयीच्या भक्तीचे ऊग्र प्रदर्शन मांडणारे भक्त नाहीत.  

अन्य महापुरुषांची जराशानेही विटंबना होते आणि त्यावरून हळहळय़ा भावना दुखावण्याचे निमित्त करून रणधुमाळय़ा झडतात. गांधीजींवरून मात्र कोणाच्या भावना दुखावल्याचे आणि त्यातून काही हिंस्त्र उन्मादी घडल्याचे कानी येत नाही, हा गांधीजींच्या प्रतिमेचा विजय आहे. गांधीजींचे `सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्रपर पुस्तक आजही भारतातील बेस्टसेलर पुस्तक आहे. त्यातील त्यांच्या प्रयोगांची बेधडक चिरफाड करणारे, त्यांच्या लैंगिक आयुष्याचीही चिकित्सा करणारे लेखन होत असते. त्याने कोणाच्या भावना दुखावून रस्त्यांवर राडे झाल्याचे उदाहरण नाही. असा चिकित्सेला खुला असलेला दुसरा महापुरुष भारतवर्षाच्या इतिहासात सापडणे कठीण आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना महाकाव्यांमधील ज्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात होत्या की ती निव्वळ मिथके आहेत, याचा एकमुखी पक्का निर्वाळा देता येत नाही- ज्यांच्या संदर्भात सप्रमाण कालनिश्चितीही करता येत नाही- अशा श्रद्धेयांच्या कथित जन्मभूमीवरून झालेले रणकंदन पाहता गांधीजी भाग्यवानच म्हटले पाहिजेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि हिंदू जीवनपद्धती (`धर्म' नव्हे) यांच्यातील साम्य पाहिले, तर हिंदू जीवनपद्धती आजवर का टिकली आणि गांधीजी यापुढेही का टिकतील, याचा अदमास येऊ शकतो

रामाला देव मानणाऱयाबरोबरच रावणाला देव मानणाऱयाला सामावून घेणारी, इतकेच नव्हे, तर देव नाहीच असे मानणाऱया नास्तिकालाही जागा देणारी ही गंगेसारखी विशाल जीवनपद्धती आणि अनेक अंतर्विरोधांसह जगणारे, आपले `मर्यादित पुरुषोत्तम'त्व स्वीकारून त्यात सतत सुधारणा करू पाहणारे गांधीजी यांच्यातील अद्वैत ज्याला समजेल, त्याला यापुढेही अनेक पिढय़ांच्या भेजामध्ये `केमिकल लोच्या' घडवून आणण्याची गांधीजींच्या प्रतिमेची, विचारांची क्षमता लक्षात येईल.

(प्रहार)

No comments:

Post a Comment