Saturday, May 9, 2020

पुलंच्या कालबाह्यतेच्या गफ्फा!



महात्मा गांधी आणि पु. . देशपांडे यांच्यात काही साम्यं आहेत.

दोघांनाही कोणीही उठून टिचकी मारून जाऊ शकतो.

गांधींची कोणीही टिंगलटवाळी करू शकतो, पुलंनाही कोणीही उठून कालबाह्य ठरवू शकतो, त्यांच्या मध्यमवर्गीय जाणीवांच्या मर्यादा अधोरेखित करू शकतो.

हे एक साम्य आहे.

गांधींवर टीका केली म्हणून त्यांचे अनुयायी कधी अस्मिताबाज राडे घालत नाहीत, कुठे काही मोडतोड, पेटवापेटवी करत फिरत नाहीत. पुलंचे चाहतेही असल्या हुच्चपणाचा प्रतिवाद करता पुलंचं एखादं जुनं पुस्तक उघडून बसतात आणि त्यांच्या ४१७ वेळा वाचलेल्या विनोदावर ४१८व्या वेळेलाही खळखळून हसतात. टिकायचे असतील तर दोघेही टिकतील नाहीतर आपल्याबरोबर संपून जातील, की फर्क पैंदा, असा दोघांच्याही चाहत्यांचा सोपा हिशोब असतो.

हे दुसरं साम्य.

गांधींच्या किंवा पुलंच्या लोकप्रियतेला किंवा महत्तेला या अशा टीकेने किंवा चिकित्सेने किंचितही उणेपणा येत नाही, हे तिसरं साम्य.

गांधी आजही जगभर वंदनीय आहेतच. पुलंच्या निधनाला १८ वर्षं झाल्यानंतर आणि त्यांनी शेवटचंताजंपुस्तक लिहिल्याला तर तब्बल ३८ वर्षं उलटल्यानंतर त्यांच्या साहित्याला, आठवणींना आणि परफॉर्मन्सेसना वाहिलेली दोनतीन संकेतस्थळं सुखनैव सुरू आहेत. पुलंच्या आधीच्या, समकालीन अथवा नंतरच्या कोणा लेखकाच्या नावाने असं काही ठसठशीतपणे सुरू असलेलं दिसत नाही, अपवाद काही फेसबुक पेजेसचा.

गांधीजींचं तत्त्वज्ञान सार्वकालिक आहे, हे ते पटणारा माणूसही मान्य करील. पुलंच्या लेखनाला काळाची, जाणिवांची, विनोदाची मर्यादा आहे, हे बाकीचे सोडा, खुद्द पुलंनाही व्यवस्थितच माहिती होतं. आपलं लेखन काही ज्ञानदेवांच्या ओव्यांप्रमाणे, तुकारामांच्या अभंगांप्रमाणे चिरकाल टिकणारं नाही, याचं अगदी व्यवस्थित भान पुलंना होतं. पु. . हे लेखक म्हणून कसे मध्यमवर्गीय मर्यादेत फिरत राहिले आणि त्यांचं लेखन कसं काळाच्या कसोटीवर टिकणार नाही, यावर अनेक लेखक-समीक्षकांनी पोती भरभरून लिहून झालं आहे. पुलंवर यांनी टीका केली होती, हीच यांच्यातल्या काहींची ओळख असेल. ही टीका करणाऱ्यांपैकी कोणी आपापल्या भावविश्वापलीकडे किंवा अभावविश्वापलीकडे उडी मारून, आपल्या चाकोरीबाहेरचं भावविश्व धुंडाळून काही लिहिल्याचं ऐकिवात नाही. तशी मराठीत परंपरा नाही. ज्या मध्यमवर्गाचे ते (कुमार केतकरांच्या भाषेत) ‘डार्लिंगहोते, त्या मध्यमवर्गाने त्यांच्या हयातीतच त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. अन्यथा, कोणा हृदयसम्राटाच्या शेपटावर पाय ठेवल्यावर पुलंची मोडका पूलअशी संभावना ते हृदयसम्राट करू शकले नसते... तेही पु.. हे आपले गुरू होते, असं सांगून. पुलंच्या लोकप्रियतेच्या शिखरकाळात हे घडतं तर किमान मध्यमवर्गीय महाराष्ट्राने तरी याची कठोर निर्भर्त्सना केली असती. तशी ती झाली नाही. कारण, पु.लं.चा टार्गेट ऑडियन्सच तोवर बदलला होता.

पु.. हे लेखनात आणि प्रत्यक्ष जीवनात नेमस्त (याला नंतर नेभळट म्हणून हिणवून चिथावलं गेलं), उदारमतवादी, (बनावट समाजवाद्यांची पुलंनी भरपूर हुर्रे उडवली असली तरी) बऱ्याच अंशी समाजवादी म्हणता येतील, अशी मूल्य मानणाऱ्या, खादी वापरणाऱ्या, गांधींना (त्यांची कर्मठ हेकट कर्मकांडं वगळून) मानणाऱ्या, सश्रद्ध पण धार्मिकतेचा बडिवार माजवणाऱ्या, सात्त्विकतेच्या तुपकट कल्पनांमध्ये अडकलेल्या स्वीकारशील, स्वागतशील मध्यमवर्गाचे प्रतिनिधी होते. हा मध्यमवर्ग क्रयशक्तीच्या संदर्भात भले देशाचं किंवा राज्याचंही इंजीन-बिंजीन नसेल, पण मराठी वृत्ती, प्रवृत्ती अधोरेखित करणारं आणि अभिरुचीला वळण देणारं इंजीन म्हणजे हाच वर्ग होता. या वर्गातलं गंगाधर गाडगीळांनी टिपलेलं किडकेपण वाढत गेलं आणि या वर्गाने आक्रमक, झुंडबाज मराठी बाण्याच्या मागे स्वेच्छेने जाणं पसंत केलं, मग तो फाटा हिंदुत्वाच्या आठपदरी महामार्गावर जाऊन पोहोचला... आज पु.. हयात असते आणि सक्रिय असते, तर एकेकाळच्या त्यांच्याच चाहत्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या असभ्य आणि गलिच्छ ट्रोलिंगचं ते टार्गेट ठरले असते.

हे सगळं बदलण्याच्या काळातच पुलंची सद्दी संपत गेली, यात नवल नाही. तशी ती संपणारच होती. किंबहुना पुलंनीखिल्लीहे शेवटचंताज्यालेखनाचं पुस्तक १९८० साली प्रकाशित केल्यानंतर नव्याने काही ग्रंथरूपात ग्रथित होण्याजोगं लिहिलं नाही. त्यांनंतर त्यांच्या आधीच्या लेखनातल्या उरवळीच्या आणि भाषणांच्या संग्रहांची पुस्तकं होत गेली. सर्व प्रकारच्या शक्यता असूनही पु.. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी थांबले आणि त्या निर्णयावर ठाम राहिले.
(सुनीताबाईंच्या आग्रहामुळे त्यांनी सिनेमाची अस्थिर, चंचल दुनिया सोडून पूर्णवेळ लेखन आणि व्यक्तिगत सादरीकरणांकडे लक्ष वळवलं, हा दुसरा ठाम निर्णयही याच तोलाचा.)

असामी असा मी, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, पूर्वरंग, खोगीरभरती, हसवणूक, यांसारख्या त्यांच्या अतीव लोकप्रिय पुस्तकांमधलं मुख्य मूलद्रव्य असलेलं भाबडं, एकरेषीय भावविश्वच मध्यमवर्गीय वस्त्यांमध्येच उरलं नव्हतं. तिथे महत्वाकांक्षेचे, अस्मितेचे नवनवे धुमारे फुटत गेले. ट्रामपासून ते पोस्ट ऑफिस, टेलिफोनपर्यंतच्या अनेक संकल्पनाच जिथे बाद होऊन गेल्या तिथे त्या संकल्पनांभोवती फिरणाऱ्या विनोदांचा कितीसा पाड लागणार होता. पु. . हे निव्वळ लेखक असते, तर आज त्यांचा फारसा मागमूसही उरला नसता. किंबहुना वाचकांच्या अगदी नव्या, ताज्या पिढीचा विचार कराल, तर तसा तो फारसा उरलेला नाहीच.

पु.. हे प्रामुख्याने एक परफॉर्मर होते आणि आपलं बहुतेक लेखन त्यांनी परफॉर्मन्स ओरिएंटेडच ठेवलं होतं, हे त्यांच्या टिकून राहण्याचं एक गमक असू शकतं. त्यांच्या समकालीन अनेक लेखकांनी परफॉर्मन्स केले, उत्तम केले, विविध प्रकारची सादरीकरणं केली, पण, पुलंची चतुरस्र भरारी काही इतर कोणाला घेता आली नाही. कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, दूरचित्रवाणी तंत्र, चित्रपट तंत्र, कायिक-वाचिक अभिनय, वाद्यवादन, गायन या सगळ्या कलांमध्ये गती असलेला दुसरा खेळिया महाराष्ट्राने पाहिलेला नाही. त्यांचा कोणताही परफॉर्मन्स हा कधीहौसेचा मामलानसायचा आणि प्रेक्षकांकडून घेतलेल्या पैशाचं पुरेपूर मोल त्याच्या पदरात पडलंच पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता, त्यामुळे त्यांच्या बहुतेक पुस्तकांनी जसा तडाखेबंद खप मिळवला, तसाच बहुतेक सगळ्या परफॉर्मन्सेसनी हाऊसफुल्लचा बोर्ड पाहिला. वेळ पाळण्यापासून ते संहिताबरहुकूम (तिचा लेखकच अभिवाचक किंवा अभिनेता-दिग्दर्शक असताना) सादर करण्याची त्यांची व्यावसायिक शिस्त ही पाश्चिमात्य रंगभूमीला साजणारी होती, हे आणखी एक विशेष.

पु.लं.ची सगळ्यात मोठी किमया काय होती? त्यांच्या साहित्यकृतींचं आणि त्यांवर आधारलेल्या सादरीकरणांचं भावविश्व तद्दन मध्यमवर्गीय, ब्राह्मणी असलं तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये निव्वळ याच वर्गाचा समावेश नव्हता. मुंबईतल्या चाळी कधीही पाहिलेल्या, तशा वातावरणात कधीही राहिलेल्या वर्गानेही त्यांच्या साहित्यकृती आणि परफॉर्मन्सेसचा आनंद लुटला आहे. त्याचबरोबर बहुजन वर्गातल्या शिक्षितांच्या पहिल्या पिढीला अनेक गोष्टींचा परिचय पुलंनी घडवला, त्याची मूलभूत अभिरुची घडवली. अनेक प्रयोग जेमतेम चालत असलेलंवस्त्रहरणपुलंच्या एका पोस्टकार्डावरच्या अभिप्रायाने जे उभं राहिलं ते हजारो प्रयोगांचा पल्ला पार करूनही अजूनही धावतंच आहे. आनंद यादव, ना. धों. महानोर, दया पवार यांच्यासारख्या अनेक लेखकांकडे पहिला अधिकारी अंगुलीनिर्देश त्यांनी केला होता. लेखक म्हणून पुलंच्या मर्यादा नाचवणाऱ्यांनी पुलंच्या आस्वादक अभिरुचीचा हा प्रचंड मोठा पैस कसा दुर्लक्षिला? पुलंच्या पानवाल्याच्या नादाने तंबाखूची पानं चाखलेली आणि ती सवय लागलेली एक पिढी असेल महाराष्ट्रात. पुलंच्या खाद्यजीवनावरच्या लेखात अमुक ठिकाणच्या तमुक पदार्थाचा उल्लेख आहे तर तो चाखलाच पाहिजे, असं वाटायचं या वर्गाला. आयुष्य रसरशीतपणे कसं जगायचं, आपल्या वाट्याला आलेल्या तापांकडेही हसत खेळत कसं पाहायचं, हे एकीकडे ते शिकवत होते. दुसरीकडे नाटक-चित्रपटांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत विविध कलांचा रसास्वाद रसाळ लेखणीतून पोहोचवत होते आणि तिसरीकडे कबाबांपासून चांदीचा वर्ख लावलेल्या सुगंधी पानापर्यंत काय, कसं आणि कुठे चाखावं, हे तबियतीने सांगत होते. थोडक्यात म्हणजे आयुष्य सजगतेने, चांगुलपणाने, सचोटीने, तरतरीत हुशारीने आणि अतिशय रसिकतेने जगण्याची इच्छा असलेल्या मराठी माणसाचं पान पुलंशिवाय हलणं शक्य नव्हतं त्या काळात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातला अखेरचा शब्द पुलंचा असावा, असं वजन होतं त्यात. मराठी साहित्यिक-सांस्कृतिक जगतात आणि मराठी मानसात असंख्य अभिरुचीसंपन्न अभिक्रिया घडवून आणणारी ही त्यांची उत्प्रेरकाची भूमिका किती मोलाची होती, हे आज या सगळ्या क्षेत्रांमधल्या बाजारू बुजबुजाटाकडे पाहिल्यावर सहजपणे कळून जातं.

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्वअशा एका सपाट फ्लेक्सवजा अभिधानाखाली पुलंना द्विमित करून टाकण्याचा एक उद्योग खूप काळ झालेला आहे. खुद्द त्यांनीही तो खपवून घेतला होता. त्यांच्या त्या निरागस कुतूहलाने पाहणाऱ्या मोठ्या डोळ्यांच्या, गोबऱ्या गालांच्या लोभस छबीने या गैरसमजाला आणखी बळ दिलं. पु. . अनेकांचे लाडके होतेच, त्यांच्या परफॉर्मन्सेसनी लोकांना चोखपणेहशीवलंसुद्धा. त्यामुळे रंगमंचावरच्या प्रकाशझोतातल्या स्टारची लोकप्रियताही त्यांच्या पदरात भरभरून पडली. पण, ते लाडके या शब्दातल्या लाडिक छटेप्रमाणेमिळमिळीत आणि गुळगुळीतलाडके कधीच नव्हते. मराठीमध्ये, खासकरून आचार्य अत्र्यांनी घातलेले शिवराळ आणि हिंस्त्र वाद खूप गाजले. प्रतिस्पर्ध्याच्या कमरेखाली वार करून त्याला नामोहरम करणारी, धमकावणारी ही भाषाशैली बाळासाहेब ठाकऱ्यांनी आत्मसात केली आणि खुद्द अत्र्यांनाचवरळीचा डुक्करअशी शेलकी गुरुदक्षिणा दिली. पुलंनीही साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेळोवेळी सुस्पष्ट भूमिका घेतली. एखाद्या राजकीय पुढारी किंवा तथाकथित हृदयसम्राट आपल्यामागची गर्दी कोणत्या बाजूला डोलते आहे, याचा अदमास घेऊन मतपेटीच्या गणितावर आधारलेली भूमिका ठरवतात. पुलंनी आपल्या उदंड लोकप्रियतेची फारशी पत्रास ठेवता भूमिका घेतल्या आणि वादही घातले. अर्थात, त्यांनी त्या त्या वेळी विरोधी विचाराच्या व्यक्तींच्या वर्मावर बोट ठेवून चिमटे काढले असले तरी अत्र्यांप्रमाणे ते कमरेखाली घसरल्याचं दिसत नाही आणि वैचारिक मतभेदांचं रूपांतर शत्रुत्वात होऊ दिलेलं नाही.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वेळ आली तेव्हा खणखणीत राजकीय भूमिकाही घेतली. आणीबाणीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या समविचारी मंडळींनी ज्यांची कड घेतली त्यांच्याकडून फार मोठा भ्रमनिरास होणार आहे आणि तोपर्यंत राजकीय-सामाजिक जीवनात नगण्य असलेल्या पुराणमतवादी शक्ती त्यातून प्रबळ होऊन बसणार आहेत, याची कल्पना त्यांना नसावी. पण, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करणारी राजवट उलथून टाकायला हवी, असं वाटल्यानंतर त्यासाठीच्या राजकीय लढ्यातही ते उतरले, तेव्हाच्या सुसंस्कृत सत्ताधीशांनी केलेलीविदूषकही संभावनाही त्यांनी सहजपणे स्वीकारली. लढाई संपल्यावर कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीचा टिळा कपाळावर गोंदवता, आपल्या अंगावर राजकीय लाभाचा बोटभरही डाग लावून घेता ते पुन्हा आपल्या मूळ कार्यक्षेत्रात आनंदाने परत गेले. नंतरचा भ्रमनिरासही त्यांनी आपलं अपयश म्हणून मोकळेपणाने स्वीकारला.

(बंगाल आणि केरळशी तुलना करता) जिथे लेखन-वाचनाची सशक्त परंपरा नाही, जिथे लेखन ही उदरनिर्वाहासाठी वेगळा व्यवसाय करून फावल्या वेळात करण्याची चैन आहे, तिथे पुलंनी मूलत: लेखनाच्या बळावर उत्तम व्यवहारे संपत्ती मिळवली. ती चंगळीसाठी वापरताही उत्तम प्रतीचं आयुष्य जगण्याचा वस्तुपाठ घालून दिला. फकिरीची तोंडपाटीलकी करता तिचा मोठा हिस्सा सामाजिक कामांसाठी उदास विचारे खर्च करून टाकला. आपल्या राहत्या घरापासून सगळी स्थावर-जंगम मालमत्ता सुपात्र संस्थांना आधार बनत राहील, अशी व्यवस्था करून ते शांतपणे निमाले...

... पु.. कधीच आउटडेटेड झाले, अशी पिंक टाकणाऱ्या मंडळींना त्यांच्या विशिष्ट लेखनाबरोबरच हे सगळं गुणवैविध्यही आउटडेटेड झालं असं वाटतं का? तसं असेल तर मग प्रवाही रसरशीतपणाच्या, चिकित्सक स्वीकारशीलतेच्या आणि अभिरुचीसंपन्न अभिव्यक्तीच्या संदर्भात आपला समाजच आउटडेटेड होत चालला आहे, असंच म्हणावं लागेल. असाही तो राजकीय-सामाजिकदृष्ट्या- समोर पाहण्याची काचच नाही, नुसतेच सगळीकडे रिअर व्ह्यू मिरर, अशा गाडीतून चालल्यासारखा- काळात मागे मागे प्रवास करतो आहेच... या करंट्या काळातली त्याची ही गांजेकस भावतंद्री मोडणारी हार्मोनियमची प्रसन्न सुरावट पुढच्या पिढीतल्या मोजक्या दोनचार जणांच्या कानात आपणहून गुंजेल, क्षणात सगळं अंतर विरघळवून मैत्री जोडणारा तो स्वच्छ उमदा स्वर कानातून मनाचा ताबा घेईल, सत्य, शिव आणि सुंदर काय आहे, त्याचं भान करून देत राहील, तोवर पुलं आउटडेटेड झाले वगैरे निव्वळ गफ्फा आहेत हो निव्वळ गफ्फा!

No comments:

Post a Comment