Tuesday, June 28, 2011

दिवाळी म्हंजे काय रे भाऊ?

धाकटा : (चड्डी सावरत , शर्टाच्या बाहीने शेंबूड पुसत) दिवाळी म्हंजे काय रे भाऊ


 थोरला : अरेरे! तुझ्यासारख्या अज्ञ मुलांमुळेच आपल्या समाजाची थोरवी आपल्या लोकांनाच ज्ञात नाही. तुझा हा मूढ प्रश्न ऐकून आपल्या समाजाचे कसे होणार या विचाराने मला कसेसेच होत आहे रे! तुला साधी दिवाळी म्हणजे काय हेही ठाऊक नाही ?

धाकटा : (शांतपणे) मला तशी थोडीफार माहिती आहे. पण , ती फारच थोडी आहे. आणि जे जे अडेल ते आपल्या ज्ञानी दादाकडून समजून घ्यावे , असे मी ठरविले आहे. तर सांग मला दिवाळी म्हंजे काय ?
 
थोरला (विचारात पडून थोडेसे चाचरतच) : तसे मलाही सगळे स्पष्टपणे माहिती नाही. पण , माझ्याकडून शक्य तेवढा ज्ञानाचा उजेड पाडून तुझ्या मनातला अज्ञानाचा अंध:कार दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी तुला हे सांगीत आहे. अरे , दिवाळी म्हंजे दिवे लावण्याचा सण. 


 धाकटा : (निरागसपणे) पण भाऊ! आपण सारेच वर्षभर दिवे लावत असतो ना ? तू कॉलेजात आणि मी शाळेत काय दिवे लावले आहेत , हे आपली प्रगतीपुस्तके वाचून कळते , असे आपले पालक म्हणतात. बाबा ऑफिसात काय दिवे लावायला जातात , ते ठाऊक आहे , असे आई म्हणते. आई घरात बसून किती उजेड पाडते , ते ठाऊक असल्याचे बाबा सांगतात. झालेच तर राज्यात आणि देशात सत्ताधारी पक्ष काय दिवे लावतात , ते विरोधी पक्षांना ठाऊक असते. आणि हे दोघेही काय उजेड पाडतात , ते मतदारांना ठाऊक असते. असा आपल्या देशात सर्वांच्या कर्तबगारीचा उजेड पडलेला असताना दिवे लावण्यासाठी खास सण करणे हा तुला अपयव नाही वाटत का रे भाऊ ?

थोरला : तुला अपव्यय म्हणायचे आहे का ?
 
धाकटा : होय रे होय. मला तेच म्हणायचे होते. पण जोडाक्षरे उच्चारताना माझी जीभ वळते ना! पण मला सांग ना भाऊ... दिवे लावण्यासाठी वेगळा सण कशाला


 थोरला : रे वेड्या! ती आपली परंपरा आहे आणि आपल्या सगळ्या परंपरा नेहमी उदात्त आणि उज्ज्वलच असतात , हे पक्के ध्यानात ठेव. आणि परंपरांना प्रश्न विचारण्याची आपली परंपरा नाही , हेही ध्यानात ठेव.

धाकटा : होय रे होय! हे मी पक्के ध्यानात ठेवीन. पण भाऊ , पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मोठ्ठ्या आवाजाचे फटाके वाजवण्याचीही आपली उदात्त आणि उज्ज्वल परंपरा आहे का रे भाऊ ?

थोरला : हो रे! अर्थातच!  


धाकटा : पण भाऊ , फटाक्यांच्या आवाजाने माझे कान दुखतात. आपल्या आजारी आजीलाही त्रास होतो. ताईचे छोटे बाळही दचकून जागे होते. माझा मित्र बबन याचे हात की रे पोळले गेल्या वषीर् फटाक्याने आणि फटाक्याच्या धुराने तर श्वासही गुदमरतो. असे असताना आपण फटाके का रे वाजवतो भाऊ ?

थोरला : रे वेड्या! मघाशी सांगितले ते विसरलास का ? आपण असे का करतो , असे विचारायचे नसते रे! जे सारे करतात , तेच आपण करायचे असते. त्यातच आपले हित असते. अरे , फटाक्यांच्या आवाजाने सहनशीलता वाढते. कान साफ होतात. त्यांच्या प्रकाशाने डोळ्यांत पाणी येऊन ते स्वच्छ होतात. शिवाय धुरामुळे फुप्फुसांवर ताण पडून त्यांची शक्ती वाढते.  


धाकटा : बरे बरे! माझी चूक झाली. मला मोठ्या मनाने क्षमा कर आणि मला दिवाळीविषयी आणखी माहिती देण्याची कृपा कर.

थोरला : ऐक तर मग. अरे , ज्यांना ज्यांना पगार मिळतो , त्यातल्या बऱ्याचजणांना दिवाळीत बोनस मिळतो. ज्यांना तो मिळत नाही , त्यांना निदान एक महिना तरी वेळेवर पगार मिळतो. पैसे मिळाले की सर्वांना आनंद होतो. आनंदाच्या भरात ते पैसे खर्च करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय होतो , त्यांना नफा मिळतो. त्यामुळे त्यांनाही आनंद होतो. या सणाला लोक अभ्यंगस्नान करतात. त्यामुळे बऱ्याच गोरगरिबांना बऱ्याच काळाने आंघोळ घडते. सगळ्यांच्या घरी फराळाचे पदार्थ बनवतात. त्यामुळे घसे आणि पोटे बिघडून डॉक्टरांचा व्यवसाय होतो. त्यांनाही आनंद होतो. 
भाऊबीजेच्या सणाला बहीण भावाला ओवाळते आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. आता राखी पौणिर्मेपर्यंत कटकट नाही , म्हणून दोघेही आनंदतात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळतात , पती पत्नींना भेटी देतात. त्यांनाही खूप आनंद होतो. आणि वर्तमानपत्रे तू पाहतोसच ना! त्यांत किती सुलभ हप्त्यांच्या जाहिराती येतात. बिनव्याजी मासिक हप्त्यांवर अनेक वस्तू ग्राहकांच्या घरात येतात. घरातली सगळी मोकळी जागा तर भरतेच , शिवाय लॉफ्ट आणि अडगळीच्या खोल्याही या वस्तूंनी भरून जातात. त्यामुळे घरोघरच्या कोळ्यांना कोळिष्टके विणायला खूप अंधारी जागा मिळते. तेही आनंदतात. रस्त्यात फतकल मारून बसलेल्या गाई तू ठिकठिकाणी पाहिल्या असशीलच! त्या शेणाचे पो टाकण्याबरोबर आणि येणाऱ्या जाणाऱ्यावर शिंगे उगारण्याबरोबरच दूधही देतात. हो , भय्या असतो ना तो फक्त दूध घेऊन येतो आपल्याकडे. गाई या आपल्या गोमाता आहेत. या सणाला त्यांची पूजा होते. त्यामुळे त्यांना आनंद होतो. या सणाच्या काळात असा सगळीकडे खूप आनंदीआनंद असतो.

धाकटा : (आनंदून) वा वा भाऊ! तू मलाच नव्हे , तर येथे जमलेल्या सर्वच बालदोस्तांना खूप छान माहिती दिलीस. त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. आम्हाला खूप आनंद झाला.
 
थोरला : रे वेड्या! मी तुझा दादा ना! तुला योग्य माहिती देणे हे माझे कर्तव्यच होते. त्याबद्दल कसले आभार मानतोस ? तुला आनंद झाला , यातच मला भरून पावले. लक्षात ठेव. वर्षातील चार दिवस आनंद करण्याची सोय करून दिली की आपल्यासारखी सामान्य माणसे बाकीच्या 361 दिवसांतले दु:ख सहन करीत राहतात , हे आपल्या बुद्धिमान पूर्वजांना ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी या आनंदमयी दिवाळीची योजना केली आहे. (एकदम घड्याळावर नजर टाकून) अरे अरे अरे! तुझ्या प्रश्नांच्या नादात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. चल , आता लवकर घरी जायला हवे. नाहीतर आपली मुले कोठे दिवे लावत बसली आहेत , या विचाराने आपले पालक चिंताक्रांत होतील.

(
तद्दन नाटकी , खरेतर ' श्ाुतिकी ', खोटेखोटे हसत दोघेही जातात.)


(महाराष्ट्र टाइम्स)
 





No comments:

Post a Comment