Friday, November 22, 2013

सचिनचा अखेरचा सामना आणि बाळासाहेबांची आतषबाजी!

स्थळ : वानखेडे स्टेडियम
वेळ : जी कधीच येऊ नये, असं भावनाशील भारतीय क्रिकेटचाहत्यांना वाटत होतं ती... सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीची.
सचिनमय झालेल्या सामन्याच्या अखेरीला सचिनला खास मानवंदना देण्यात आली. भावव्याकुळ चाहत्यांच्या आग्रहाखातर रवी शात्रीने गदगदल्या स्वरात सचिनला माइकपाशी बोलावलं आणि विचारलं, आज इथे कोण हवं होतं, असं तुला वाटतं? भावनांचा बांध संयमाने रोखण्याचा प्रयत्न करत सचिन म्हणाला, ``अर्थातच माझे बाबा हवे होते, असं वाटतं. पण, त्याचबरोबर आज इथल्या बाळासाहेब ठाकरे स्टँडमध्ये खुद्द बाळासाहेब माझा हा अखेरचा सामना पाहायला, आशीर्वाद दय़ायला हजर असते, तर मला फारच आनंद झाला असता...''
सचिनचं वाक्य पूर्ण होतं ना होतं, तोच आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट झाला... ही सचिनच्या रिटायरमेंटची इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांनी केलेली आतषबाजी असावी, असं सगळय़ांना वाटत असताना आकाशातून तेजाचा एक लोळ ठाकरे स्टँडवर स्थिरावला आणि आश्चर्यचकित स्टेडियममध्ये चक्क दिव्य कांतीचे बाळासाहेबच अवतरले. त्यांच्यासमोर जमिनीतून कणीस फुटल्यासारखा माइकही आपोआप वर आला आणि बाळासाहेबांची चिरपरिचित साद सगळय़ा स्टेडियमभर घुमली, ``इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो...'' टाळय़ांचा एकच कडकडाट झाला... विस्फारल्या डोळय़ांनी हे अद्भुत दृश्य पाहणार्या सचिनचाही सगळय़ांना विसर पडला आणि सगळे कॅमेरे क्षणार्धात बाळासाहेबांवर रोखले गेले. पाच मिनिटं सुरू असणारा कडकडाट हाताच्या इशार्याने थांबवून बाळासाहेब सचिनला उद्देशून म्हणाले, ``अरे डोळे फाडून काय बघतोस? मीच आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वरून खाली आलोय. खालून वर सगळेच जातात. पण, वरून खाली येणारा मी पहिलाच असेन (हंशा)... माझा हा स्वभाव आहे. माझ्या आवडीच्या माणसांसाठी मी खाली-वर वगैरे काही बघत नाही... एकदा माणूस आपला म्हटला की तो माझा झाला (टाळय़ांचा कडकडाट)... भले त्याला तसं वाटत नसलं तरी मग त्याला माझा नाईलाज आहे... (सचिनला टोला बसतो, लोक हसतात...) आज सचिनची ही शेवटची मॅच पाहायला वर आकाशातही दाटी झालेली आहे. इथे काही हजार लोक आहेत तर ही रेटारेटी आहे, तिकडे वर तेहतीस कोटींची गर्दी आहे... काय चेंगराचेंगरी असेल विचार करा! त्या बिचार्या अप्सरांची पुण्यातल्या गणपतीच्या गर्दीत सापडलेल्या माताभगिनींसारखी गत झालेली आहे... पण आज त्यांच्याकडे पाहायलाही कुणाला फुरसत नाही... सगळय़ांचे डोळे पृथ्वीवरच्या या क्रिकेटच्या देवाकडे लागलेले आहेत (टाळय़ांचा कडकडाट)... माझ्या महाराष्ट्रात, मुंबईच्या भूमीत, सर्वसामान्य मराठी घरात जन्मलेल्या या असामान्य पोराने तुम्हाआम्हालाच नव्हे, तर जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं, त्या प्रत्येक देशातल्या रसिकाला आनंद दिला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. (टाळय़ांचा कडकडाट). त्याच्या अंगात अस्सल मराठी रक्त आहे, म्हणूनच आजपर्यंत त्याची बॅट मैदानात तलवारीसारखी तळपत होती आणि शत्रूच्या बोलिंगच्या खांडक्या पाडत होती. (टाळय़ा.) त्यामुळे त्याच्याबद्दल मला पहिल्यापासून जिव्हाळा आहे. त्यालाही माझ्याबद्दल जिव्हाळा होता, असं वाटतं... (`होता' या शब्दामुळे एकदम सगळे शांत होतात. सचिन प्रश्नार्थक पाहू लागतो.) होय, तुम्ही बरोबरच ऐकलंत, मी `होता' असंच म्हणालो. हल्लीच्या काळात त्याला मुकेशभाई आणि नीताभाभींचा जास्त लळा लागलेला आहे. (हशा) त्यात त्याची काही चूक नाही. आमच्या राजकारणातही बर्याचजणांना यांचा लळा लागलेला आहे. (आणखी हशा) काय करणार, मनुष्यस्वभाव आहे हा! जिकडे (हाताने पैशांची खूण करत) मळा, तिकडे लळा (प्रचंड हशा) त्यांच्या टीमचा कप्तान झाल्यावर सचिनला साक्षात्कार झाला होता की मुंबई सगळय़ांचीच आहे. मी म्हणालो, अरे बाबा, आम्ही कुठं म्हणतोय की ती माझ्याच बापाची आहे! आम्ही इतकंच म्हणतोय की मुंबई ही आधी महाराष्ट्राची आहे आणि नंतर भारताची, त्यानंतर सगळय़ा जगाची (प्रचंड टाळय़ा)... आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेल्या घटनेनुसार या मुंबईवर सगळय़ांचा हक्क आहे, कबूल; पण सर्वात पहिला आणि सर्वात मोठा हक्क आमच्या मराठी माणसांचाच आहे आणि तो आमचाच राहणार, ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. (अतिप्रचंड टाळय़ा. थोडा पॉझ घेऊन खटय़ाळपणे) गेल्या वर्षी आमचं विमान वर उडालं, तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की आता आपल्या वाटेतला सर्वात मोठा काटा दूर झाला. आता मुंबई स्वतंत्र करू आणि इथल्या उरल्यासुरल्या मराठी माणसाला हुसकावून लावू. पण, याद राखा. मी वरून तुमची थेरं पाहतो आहे आणि खाली इथे माझा वारसा चालवायला उद्धव भक्कम आहे, त्याच्या जोडीला आता आदित्यही सरसावलेला आहे. (टाळय़ा.) माझा सच्चा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत ही स्वप्नं झोपेतसुद्धा पाहण्याचं धाडस करू नका. गप हय़ाच्यावर ते ठेवून झोपून राहा. (प्रचंड हशा). हातावर डोकं हो! (अतिप्रचंड हशा.) माझा प्रत्येक शिवसैनिक हा अंगार आहे, तो तुमची राख केल्यावाचून राहणार नाही. (अतिप्रचंड टाळय़ा. पॉझ घेऊन.) माझा प्रत्येक कडवट सैनिक म्हणजे साक्षात मीच आहे, हे लक्षात ठेवा. तोच माझं जिवंत स्मारक आहे. (थोडं थांबून) स्मारकावरून आठवलं, हल्लीच मी ऐकलं... काय तर म्हणे स्मारक का नाही उभं राहिलं साहेबांचं वर्षभरात? साहेब असते, तर असं झालं नसतं... अरे गधडय़ांनो, अनादिअनंत काळ तुमची धुणी धुवायला साहेब काय अमरपट्टा घेऊन आला होता का वरून? (हशा). तुम्हीही काही कायमचे इथे नाही राहणार आहात, तुम्हालाही यायचंय... (हशा, पॉझ) लवकरच (प्रचंड हशा). आमचा काळ वेगळा होता, तेव्हाचे प्रश्न वेगळे होते, आताचा काळ वेगळा आहे, माझा मराठी माणूस बदललेला आहे, समाज बदललेला आहे, आता सगळं जुन्या स्टाइलने करून कसं चालेल? उद्धव त्याच्या पद्धतीने करतोय ना, त्याला करूदय़ात ना! कशाला त्याच्या मध्ये मध्ये मध्ये मध्ये लुडबुडताय. माझा शिवसैनिक रस्त्यावर राडे घालत होता, बेडरपणे तुरुंगात जात होता, तेव्हा तुम्ही काय करत होता? इतका माझ्या स्मारकाचा पुळका आलाय तर उभारा ना सेनाभवनासमोर तुमच्या जागेत स्मारक... त्या आमच्या झेरॉक्स कॉपीला सोबत घेऊन! ते जमायचं नाही. स्वतःचा फदय़ा सुटायचा नाही आणि आयजीच्या जिवावर बायजी उदार. बरं मला सांगा, आता यांना काय मिळायचं राहिलंय हो? शिवसेनेच्या सावलीत आलात म्हणून `गाव तिथे एसटी' व्हायच्या आधी गाव तिथे कोहिनूर उभी राहिली तुमची. एकटय़ाने मुतारी तरी उभारता आली असती का तुम्हाला? (थांबून) चुकीचा शब्द गेला का? शौचालय म्हणायला हवं होतं, नाही का? हल्ली देशात सगळीकडे तीच घाण पसरलेली आहे. तिकडे त्या मोदींना शौचालयं बांधायची घाई झालीये. अरे, इतकी घाईची होते, तर आधी इतका ढोकळा खायचाच कशाला? (छप्परफाड हंशा) आधी मंदिर मंदिर म्हणून बोंबलत होते, आता शौचालय शौचालय म्हणून बोंबलतायत! मंदिरासाठी विटा गोळा करायला लावल्यात आता शौचालयासाठी काय गोळा करायचं? (हशा) आणि आता त्या विटांचं काय करायचं, त्यांच्यावर काय डोकं फोडून घ्यायचं? (प्रचंड हशा) मतं मिळवण्यासाठी कोणाचंही काहीही कुरवाळायला जातात हे लोक! मित्र झाले म्हणून काय झालं! जे चूक ते चूक. पंतप्रधानपदासाठी आमच्या शुभेच्छाच आहेत त्यांना, पण हे असं लाचारीने टोप्या बदलणं, विचार बदलणं, विचार सोडणं आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही आमच्या विचारांवर कायम ठाम राहिलो. मतांसाठी कधी भूमिका बदलली नाही, कधी कोणाची लाचारी केली नाही, मोडू पण वाकणार नाही, हा बाणा कधी सोडला नाही. (टाळय़ा). कोणाला काय वाटतं याची आम्ही कधी फिकीर केली नाही. म्हणूनच आमच्या सचिनवर आम्ही कायम प्रेम केलं. पुत्रवत माया केली. आमचा सचिन शिवाजी पार्कावर वडापाव खाऊन प्रॅक्टिस करत होता, तेव्हापासून तो आमचा आहे. आता त्याला इटालियन पिझाची आवड लागली आहे. (हशा. सचिन लाजतो) वयोमानाप्रमाणे बदलतात आवडीनिवडी. आमची काही त्याला हरकत नाही. फक्त त्याने आजच्या या सुवर्णमय क्षणाला माझी आठवण काढली, म्हणून वडीलकीच्या नात्याने त्याला एक सल्ला देईन. तुला आवडतो तर पिझा, खा, पास्ता खा, हवंतर, त्या इटालियन बयेच्या मांडीवर जाऊन बस गोड वाटत असेल तर. पण, आज शेवटच्या मॅचमध्ये जसा तू तुझ्या माऊलीला, रजनीताईंना विसरला नाहीस, तसाच आपल्या वडापावाचा विसर पडू देऊ नकोस आणि तुझी आई असलेल्या मायमराठीचाही विसर पडू देऊ नकोस. तुझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीबद्दल मी काही बोलावं, असं शिल्लक नाही. (खटय़ाळ हसून) आमचे पत्रकार बांधवही हे लक्षात घेतील, तर वाचकांची आणि टीव्हीच्या प्रेक्षकांची सुटका होईल. ते चॅनेलचे दांडेकर तर जो भेटेल त्याला विचारत सुटतात, आप सचिन की कोई आठवण बताओ. तोही कॅमेरा बघून चेकाळतो आणि सांगतो, माझ्या मावसकाकूच्या चुलतआजीच्या भाचेजावयाच्या साहेबांनी एकदा सचिनची फरारी पाहिली होती ओझरती. त्या आठवणींनी अजूनही आमचं अख्खं कुटुंब रोमांचित होतं. (प्रचंड हशा) हे असलं सगळं सुरू असतं टीव्हीवर. मीही दिवसभर पाहात असतो टीव्ही. आमच्याकडेही दिसतात सगळे चॅनेल. सांगायचा मुद्दा एवढाच की उगाच बॅटची आणि नशिबाची परीक्षा पाहात न बसता तू रिटायर झालास, हे चांगलं केलंस. भल्याभल्यांना हे जमत नाही. तुलाही थोडा उशीरच झाला. पण, देर आये, दुरुस्त आये. दुर्घटना से देर भली, हे तुला कळलं हेही काही कमी नाही. (हशा) आमचा विजय मर्चंट म्हणाला होता, लोक का रिटायर होताय, असं विचारतात, तोवर रिटायर व्हावं. कधी रिटायर होताय, असं त्यांनी विचारेपर्यंत वाट पाहू नये. आमचे पंत आणि परममित्र शरदबाबू यांनाही तुझ्यासारखीच सद्बुद्धी लाभावी, अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. तुझ्या भावी आयुष्यात तुला आतासारखंच उदंड यश लाभो आणि महाराष्ट्राचं, मराठीचं नाव तुझ्यामुळे उजळून निघो, हीच शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.''
(पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 


नमो फोनाय नमः!

मोबाइल फोनच्या बाजारात सध्या `नमो सॅफ्रन 1' या नावाचा मोबाइलचा हँडसेट उपलब्ध झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काढण्यात आलेल्या, साधारण 23 हजार रुपये किंमतीच्या या फोनमध्ये सगळय़ा स्मार्टफोन्समध्ये असतात त्या सोयीसुविधा आहेत, त्याशिवाय काही प्रीलोडेड ऍप्स आहेत. बीजेपी, नमो, नरेंद्र मोदी अशी या ऍप्सची नावं आहेत. भारतीय जनता पक्षाची माहिती, नरेंद्र मोदींचा परिचय, त्यांचं चरित्र, त्यांची भाषणं अशा प्रकारचं पक्षीय प्रचारसाहित्य या मोबाइलमध्ये डम्प करण्यात आलेलं आहे. त्यातली निम्मी ऍप्स धडपणे चालतही नाहीत, असा रिपोर्ट आहे.
मोदींच्या `चाहत्यां'नी केलेली ही निर्मिती, आम्हाला विचाराल, तर साफ फसली आहे. आता तुम्हाला कोण विचारतो, असं तुम्ही म्हणाल. पण, आम्ही वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागात वीसेक वर्षे लेखणी आणि कीबोर्डवरच्या कळी झिजवलेल्या असल्याने आम्हाला सर्व विषयांत गती प्राप्त झालेली आहे. शिवाय, कोणत्याही विषयावर, त्यातलं काही कळत असो वा नसो, भाष्य करण्याचा अधिकार तर आम्हाला भारतीय नागरिक असल्याने घटनादत्तच प्राप्त झालेला आहे. येणेप्रमाणे बिनचूक युक्तिवादाने आम्ही तुम्हाला निरुत्तर केलेलं असल्याने आता मूळ मुद्दय़ाकडे वळूयात. हा मुद्दा आहे नमो फोनचा. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला, तर कट्टर भाजपेयीही हे मान्य करतील की मोदींच्या इमेजच्या तुलनेत हा फोन जरा थंडाच आहे. तो पाहून उत्तर प्रदेशातल्या सभांमध्ये `मंदिर वही बनायेंगे' अशी सिंहगर्जना करण्याऐवजी `रामनामापेक्षा राष्ट्रनाम श्रेष्ठ' अशी गुळचट सेक्युलर भाषा करणार्या नमोंची आठवण येते. 
फोनचं नाव सॅफ्रन आणि बॉडी कोणत्याही इतर फोनसारखीच काळीपांढरी, गुळगुळीत आणि सुळसुळीत, हे काही बरोबर नाही. फोनला किमान भगवं कव्हर असलं असतं, म्हणजे मोदींप्रमाणेच हा फोनही बाजारात उठून दिसला असता. फोनचा आकार इतर फोनांप्रमाणे न ठेवता त्याला कमळाकार देता आला असता, तर हा फोन किती सुपरहिट झाला असता, विचार करा. पण, चिनी कारखान्यांमध्ये स्वदेशी डिझाइन्स असून असून किती असणार? नेक्स्ट टाइम! 
या फोनमध्ये इतर सगळय़ा अँड्रॉइड फोन्सप्रमाणे अँड्रॉइडचा प्लॅटफॉर्म आहे, इथपर्यंत काही वांधा नाही. देशात सगळय़ा पक्षांची व्यासपीठं एकाच प्रकारची असतात, अनेकदा एकच कंत्राटदार ती उभारून देतो, राहुल गांधींसाठी वेगळे बांबू आणि मोदींसाठी वेगळे बांबू, असे भेदभाव तो करत नाही. त्यामुळे अँड्रॉइडबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण, या फोनमध्ये यूटय़ूब, व्हॉट्सऍप, फेसबुक, गेम्स, ऍप्स स्टोअर वगैरे इतर ऍप्स आणि यंत्रणा देण्यात आल्या आहेत, हे काही फोनच्या नावाला साजेसं नाहीये. असं म्हणतात की नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचं नाव ओळखा, असा प्रश्न अमिताभ बच्चनने केबीसीमध्ये शेवटचा प्रश्न म्हणून विचारला होता आणि एकही लाइफलाइन शिल्लक नसलेल्या स्पर्धकाने भलती रिस्क घेण्याऐवजी मिळाले तेवढे पैसे गोड मानून घरी जाणं पसंत केलं होतं. त्यानंतर अमिताभच्या कम्प्यूटरजीनेही सुटकेचा निःश्वास सोडला होता म्हणतात. कारण, या स्पर्धकाने एखादं नाव सिलेक्ट केलं असतं, तरी कम्प्यूटरजीला कुठे माहिती होतं की मोदींच्या मंत्रिमंडळात आणखी कोण आहे. कम्प्यूटरला, इतर अनेक देशवासियांप्रमाणे, असंच वाटत होतं की मोदींच्या मंत्रिमंडळात ते एकटेच आहेत. वेगवेगळय़ा वेळांना तेच सगळय़ा खात्यांचा कारभार पाहतात आणि तेच सगळे निर्णय घेतात. आमच्या गण्याला इंटरनेटवर मोदींचा साधेपणा दाखवणारा प्रचारकाच्या वेषात झाडू मारत असलेला फोटो कौतुकाने दाखवला, तर तो म्हणाला, मला वाटलं होतं, हे काम तरी तिकडं दुसरे कोणीतरी करत असतील. हा माणूस आहे का सुपरमॅन!
मोदींची ही इमेज असताना या फोनमध्ये इतर ऍप्स आहेत, हेच मुळात चुकीचं नाही का? व्हॉट्सऍप असेल, तर ते फक्त भगव्या परिवारातल्या मंडळींचीच प्रोफाइल दाखवणारं हवं, फेसबुकवरही तीच व्यवस्था हवी. यू टय़ूबवर मोदींच्या प्रेरणादायी भाषणांशिवाय काहीच दिसता कामा नये, इंटरनेटवर भाजप आणि मोदींच्या साइट्सपलीकडे काही उघडता कामा नये. गेम्सही मंदिराच्या विटा कमीत कमी वेळात रचा, शौचालयावर योग्य आकाराचं छत बसवा, हिरवे बॉल फोडा, विरोधकांच्या नावांच्या शत्रूंचा नायनाट करा, अशा प्रकारचे स्वदेशी खेळ असले पाहिजेत. मोदींच्या डोक्यावर टोपी घाला, हा तर फारच यशस्वी खेळ होऊ शकतो. मोदींच्या डोक्यावर देशातल्या सगळय़ा प्रकारच्या टोप्या कशा फिट्ट दिसतात, पण, प्रत्यक्षात एकच टोपी कशी फिट्ट बसते, याचं दर्शन या गेममधून घडवता येईल. त्यांच्या डोक्यावर मुस्लिम फरकॅप किंवा गोल टोपी घालू पाहणार्याचे हात फोनच कलम करून टाकेल, अशी व्यवस्था करता येईल. कॉन्टॅक्ट्सची यादीही गुजरातच्या मंत्रिमंडळासारखी हवी; खान, शेख, अन्सारी, हुसेन बिसेन सगळे बाहेर. ऍड कॉन्टॅक्ट करताच नाही आला पाहिजे यांचा.
या फोनमध्ये कॅमेराही देण्यात आलेला आहे. तो कशाला? लोकांना कशाला आपले फोटो काढायचे आहेत? ते कोण बघतो? हल्ली तर आपले कट्टर कार्यकर्ते दिवसाचे 24 तास नमोंचे मुखवटे घालून वावरत असल्याने आपला चेहरा विसरून गेले आहेत. आरशात कधी मुखवटा काढून पाहतील, तर आपल्या घरात हा कोण शिरलाय, असा भास होईल त्यांना. त्यापेक्षा प्रीलोडेड साताठशे फोटो मोदींचे देता आले असते. तेवढे तर साधारण 23 मिनिटांत निघतच असतील त्यांचे रोजच्या रोज. जागे मोदी, झोपलेले मोदी, हसणारे मोदी, कडाडणारे मोदी, हात वर केलेले मोदी, हात खाली केलेले मोदी. खादीतले मोदी, सुटातले मोदी, पठाणी वेशातले मोदी. फोनचं नाव नमो आणि त्यावर छबी फोन वापरणार्याची ही दळभद्री समाजवादी लोकशाही या फोनमध्ये असायचं काही कारण नाही. हा फोन वापरायचा असेल, तर स्क्रीनसेव्हरही नमोंचाच हवा आणि रिंगटोनही `नमो नमः' हाच असला पाहिजे.
या फोनचा वापर करताना प्रत्येकाने समोरच्या माणसाला हॅलोबिलो म्हणण्याची गरज नाही. ते अमेरिकन आपल्या भावी पंतप्रधानांना अजून व्हिसा देत नाहीत आणि आपण त्यांच्या स्टायलीत हॅलो म्हणायचं कारण काय? आपण `नमो नमः' असंच म्हटलं पाहिजे. जो इतर कोणत्याही शब्दांनी फोनवर अभिवादन करेल, त्याच्या गालावर कडाड्कन् पाच बोटं उमटवण्याची व्यवस्था या फोनमध्ये असायला हवी...
...अरेच्च्या, इतक्या सगळय़ा सूचना, सुधारणा तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्यात, त्यांना माना डोलावल्यात आणि आता शेवटच्या सूचनेला एकदम चिडक्या नजरेने पाहू लागलात ते! ओहोहोहो, आता आलं लक्षात. नमो फोनमधून लोकांच्या गालांवर काँगेसचं चिन्ह उमटावं, हे तुम्हाला फारसं पसंत पडलेलं दिसत नाही... एकच शंका आहे... आपल्या महाविजयानंतर आपण देशभरात शौचालयं बांधून झाली की नंतर जी मंदिरं बांधणार आहोत, त्यातल्या भगवानजींच्या मूर्ती आशीर्वादपर हाताचा पंजा उंचावलेल्या असतील की समोर हात पसरलेल्या `हेल हिटलर' असं अभिवादन करणार्या नाझी पद्धतीच्या असतील?
 (पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 

फेकू की पप्पू?

``नारायण नारायण...'' तंबोरा बाजूला ठेवून दासीने दिलेल्या पात्रातल्या थंडगार पाण्याने घामेजल्या चेहर्यावर हलका हबका मारून तो उत्तरीयाने पुसत नारदमुनींनी अंतःपुरात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या मनात खिन्नता दाटून आली होती. एक काळ असा होता, जेव्हा नारदमुनी विष्णुमहालात येताहेत म्हटल्यावर लगबग वाढायची. भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाताच नव्हे, तर महालातले सेवकगणही मुनिवरांनी आणलेली पृथ्वीवरची खबर ऐकायला उत्सुक असायचे, आणि आज... आज साध्या दासीलाही त्यांची दखल घ्यावीशी वाटत नव्हती...
``या मुनिवर, या, काय खबर?...'' लक्ष्मीमातेच्या प्रसन्न हास्याने नारदमुनींची तंद्री भंग पावली. त्यांनी विचारलं, ``प्रणाम माते, भगवान कुठे दिसत नाहीत?''
मातेच्या कपाळावर दोन आठय़ा चढल्या. तुटकपणे ती म्हणाली, ``ते कुठे असणार?''
काडी घालायची संधी दिसताच नारदमुनींची कळी खुलली आणि ते म्हणाले, ``अप्सरांच्या सहवासात रममाण झालेली दिसतेय स्वारी?''
``तेवढं त्या बिचार्या अप्सरांचं भाग्य कुठलं? तुमचे लाडके भगवान बसले आहेत त्यांच्या लाडक्या टीव्हीसमोर...''
``ओहोहोहो, चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतायत की काय? मी सांगतो माते, तो क्रिकेटमधला देव निवृत्त झाल्याशिवाय भगवानांचा हा टीव्हीचा चस्का सुटायचा नाही...''
``चुकलात मुनिवर चुकलात,'' महालात प्रवेश करत भगवान विष्णु म्हणाले, ``तो क्रिकेटचा देव हल्ली मैदानात आला कधी आणि गेला कधी ते कळतही नाही. वर्षाचे 365 दिवसरात्र, 24 तास हा पैशांचा खेळ पाहणार कोण? तो मक्ता भारतवर्षातल्या रिकामटेकडय़ांचा...'' आसनावर विराजमान होत त्यांनी प्रश्न केला, ``बोला, काय खबर पृथ्वीची? सगळं क्षेमकुशल?''
अहाहा! हीच ती संधी! याच क्षणाची मुनी वाट पाहात होते. निवडणुकांच्या कव्हरेजला परराज्यात जाणार्या राजकीय वार्ताहराप्रमाणे मिळतील तेवढी स्थानिक वर्तमानपत्रं मिळवून, टीव्हीची न्यूज चॅनेलं पाहून मुनिवर आपल्या डोक्यात भगवान विष्णुंना सादर करण्याच्या रिपोर्टची कॉपी तयार करायचे आणि `सनसनी'च्या निवेदकाला लाजवतील इतक्या नाटय़मयतेने ती सादर करायचे. तोच हा क्षण... पण... पण, नारदांनी पहिला शब्द उच्चारण्याच्या आत भगवान मिष्कीलपणे म्हणाले, ``काही म्हणा मुनिवर, भारतवर्षात पप्पू आणि फेकू मजा आणतायत की नाही?''
मुनिवरांचं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड उघडंच राहिलं... त्यांचा आ मिटेचना... कारण, त्यांचं वाक्यच त्या त्रिकालज्ञानी भगवंताने हिरावून घेतलं होतं... मुनिवरांच्या नजरेसमोर त्यांच्या कल्पनेतला सीन तरळून गेला... नारदमुनी महालात येताच सगळय़ा अप्सरा, सेवकगण, देवदेवता गोळा झालेल्या आहेत. शेषनागानेही कान टवकारले आहेत. भगवान विष्णुंनी पृथ्वीतलावरची खबर विचारताच मुनी म्हणतात, ``सध्या पृथ्वीतलावर पप्पू आणि फेकू यांनी धूम उडवून दिलेली आहे.'' भगवान गोंधळून विचारतात, ``पप्पू आणि फेकू? हे कोण आहेत? ही नावं तर कधी ऐकली नाहीत? अटल, लाल, सोनिया, सुषमा, लालू, नीतिश, माया, ममता, जयललिता हे सगळे रिटायर झाले का?'' मग विजयी हास्य करत नारद त्यांना पप्पू म्हणजे कोण आणि फेकू म्हणजे कोण, हे सांगतात आणि सगळय़ांच्या कौतुकाच्या नजरा झेलतात... पण, इथे तर फटा पोस्टर, निकला झीरो... भगवानांनी रिपोर्टातली हवाच काढून घेतली.
``त..त..त..तुम्हाला हे माहिती आहेत दोघेही?'' नारदमुनींनी कसनुसं हासत प्रश्न केला.
``ऑफकोर्स!'' भगवान म्हणाले, ``24 तास न्यूज चॅनेल पाहात असतो मी!''
``पण, तुम्ही तर अंतर्यामी, त्रिकालज्ञानी. तुम्हाला काय गरज टीव्हीवरच्या बातम्या पाहण्याची?''
``तुम्हाला काय वाटतं, मी बातम्यांसाठी न्यूज चॅनेल पाहतो? अहो, मी ते पाहतो ते मनोरंजनासाठी. राजकारण, पुढारी, त्यांचे हितसंबंध, त्यांच्यातला भ्रातृभाव आणि शत्रुभाव, देशकालस्थिती याचं कसलंही भान नसलेली पॅनेलवरची फुटकळ माणसं फार मनोरंजन करतात. त्यांना वाटतं आपण, मोठमोठय़ाने बोललो किंवा पंचक्रोशीतले सगळे डास पळून जातील इतके वेगवान हातवारे केले की लोक आपल्याला सर्वज्ञ समजतील. आजकाल हिंदी सिनेमातही असे निखळ विनोदवीर राहिलेले नाहीत. 24 तास काय दाखवत राहायचं, हा या वाहिन्यांना पडणारा प्रश्न फेकू, पप्पू आणि कंपनी ज्या प्रकारे सोडवते, ते पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. जो साधा माणूस असतो, तो मौनात जातो आणि विद्वत्ता, चारित्र्य, सचोटी असतानाही अकारण मौनमोहन म्हणून कुप्रसिद्धी पावतो. पप्पूचा बालिशपणा आणि फेकूची चमकोगिरी मात्र जोरदार प्रसिद्धी पावते, हा काळाचा महिमा.''
``भगवान, आता तुम्ही इतकी खबर ठेवताच आहात तर एक प्रश्न विचारू का? काय वाटतं तुम्हाला? कोण होईल सिंहासनावर विराजमान? पप्पू की फेकू?'' नारदमुनींनी उत्कंठेने विचारलं.
``नारदमुनी, भारतात राहून तुम्हीही भारतीयांसारखेच बनून येता बरं का! मुक्काम थोडा लवकर आटोपता घेत चला, नाहीतर काही खरं नाही तुमचं,'' भगवान हसून म्हणाले, ``अहो, श्रीशांत आता बाउन्सर टाकणार का नो बॉल, यावर आयपीएलचा सट्टा लावत असल्यासारखे सगळे भारतीय याच प्रश्नात अडकून पडलेले आहेत... पप्पू येणार की फेकू? गंमत म्हणजे यांच्यातला जो कोणी विराजमान होणार, त्याला हेच सिंहासनावर बसवणार आहेत. तरीही यांनाच उत्सुकता. खरंतर कोणालाही प्रश्न असा पडायला हवा की पप्पू आला किंवा फेकू आला, तर सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनमानात काही बदल होणार आहे का? तो होणारच नसेल, तर कोण आला याने काय फरक पडतो?''
``असं कसं म्हणता भगवान, मध्यंतरी भारतीयांनी भाकरी पलटली होती...''
``...आणि भाकरीबरोबरच हात पोळून घेतला होता... टु बी प्रिसाइज... हात वेगळय़ा प्रकारे पोळून घेतला होता... आधी एका प्रकारे पोळतच होता, आता दुसर्या प्रकारे पोळला, एवढाच काय तो बदल. मला सांगा, हे `मंदिर वही बनायेंगे'चा नारा देत आले होते ना सत्तेत? एक वीट तरी रचली का पाच वर्षांत? आमचे रामभाऊ हुरळले होते, मी त्यांना तेव्हाच सांगितलं, थांबा आणि गंमत पाहा. यांच्या फक्त उक्तीतच राम आहे, कृतीत नाही. आता पटलं त्यांना! काय वेगळं झालं हो त्यांच्या सत्ताकाळात आणि काय वेगळं होतंय यांच्या सत्ताकाळात? सत्तेत पोहोचण्यासाठी आणि तेवढय़ापुरत्याच यांना एकमेकांपेक्षा विरोधी भूमिका घ्याव्या लागतात. नंतर यांचे बोलवते आणि करवते धनी वेगळेच असतात. सत्तेत कोणीही येवो. सगळे मिळून, वाटून खातात. पप्पू आला म्हणून फेकूचं काही बिघडत नाही, फेकू आला म्हणून पप्पूचं काही अडत नाही.''
``म्हणून मी मागेच म्हणालो होतो, महाराष्ट्रातून सतत हिमालयाच्या मदतीला धावणार्या सहय़ाद्रीवर जरा वरदहस्त ठेवा. जाणत्या राजाची लॉटरी लावा. शेतकर्यांचं तरी भलं होईल,'' नारदमुनींनी पोरासाठी ऍडमिशनसाठी आमदाराची चिठी आणलेल्या बापासारखा बापडा सूर लावला.
``मुनीवर, जाणत्या राजाच्या राजवटीत शेतकर्यांनी शेती करण्याऐवजी शेतांवर नांगर फिरवून स्टेडियम बांधली क्रिकेटची, तरच त्यांचा काही फायदा होऊ शकतो. यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातले निम्मे शेतकरी गुंठेपाटील बनून बरबाद झाले, निम्म्यांनी कीटकनाशकं तरी घशात ओतली नाहीतर गळफासात तरी मान दिली. त्यांच्यावर कृपा केली तर देशातल्या सगळय़ांचे बारा वाजतील आणि उरल्यासुरल्या शेतकर्यांची तिरडी क्रिकेटच्या स्टम्पांनीच बांधायला लागेल.''
भगवानांचं हे प्रक्षुब्ध वाक्ताडन ऐकून नारदमुनी गालातल्या गालात हसू लागले... भगवानांनी त्यांच्या हसण्याचं कारण विचारलं. नारदमुनी म्हणाले, ``तुम्ही भारतवर्षाबद्दल असे पोटतिडकीने बोलू लागलात की माझ्या मनात लगेच विचार येतो, आता भगवानांच्या अवताराची वेळ झालेली दिसते आहे. घेऊन टाका अवतार आणि बसवून टाका भारतवर्षाची सगळी घडी.''
``म्हणजे हे पुढे विस्कटायला मोकळे. आतापर्यंत एवढे अवतार घेऊन यांच्यात काही फरक पडलाय का नारदमुनी?'' भगवान सात्विक संतापाने कडाडले, ``दर पाच वर्षांनी हे अशीच वाट पाहात असतात कोणा ना कोणा अवतारपुरुषाची. हे आळशी गंगाराम ओठावर पडलेलं पिकलं जांभूळ ढकलायलाही अवतारपुरुषाची वाट पाहतील. यांच्यासाठी पप्पू आणि फेकूच योग्य आहेत. तीच त्यांची लायकी आहे. ती वाढलीच कधी चुकून तर हे स्वतःच देश बदलतील, त्यासाठी त्यांना कोणा अवतारपुरुषाची गरज पडायची नाही.''
``और अब एक आखरी सवाल?'' नारदमुनींनी वातावरण हलकं करण्यासाठी एकदम न्यूज चॅनेलच्या निवेदकाच्या स्टायलीतच बोलायला सुरुवात केली, ``तुमचं मत कोणाला? पप्पूला की फेकूला?''
``नारदमुनी, आपलं मत गुप्त ठेवायचं असतं हे माहिती नाही का तुम्हाला?'' भगवान हसून अगदी खासगी आवाज लावून म्हणाले, ``पण, तुम्ही आतल्या गोटातले म्हणून सांगतो, तुमच्या लक्ष्मीमाता कशावर विराजमान झालेल्या आहेत?''
``कमळावर?''
``...आणि आम्ही दोघे जेव्हा भक्तगणांना आशीर्वाद दय़ायला उभे राहतो, तेव्हा तो कसा देतो?''
``पंजा वर करून...'' आता नारदमुनींच्या डोक्यात टय़ूब पेटली आणि खो खो हसत ते म्हणाले, ``बापरे, तुम्ही तर या सगळय़ांपेक्षा मोठे पोलिटिशियन आहात भगवान! नारायण नारायण...''
(पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 

Sunday, March 31, 2013

डेंजर शाळेची महाडेंजर वाट


आता एक गुपित सांगावंच लागणार...
शाळेची वाट मी सहसा टाळतो...
पुण्यात कधी येणं झालंच तरी या वाटेकडे पाय वळू देत नाही...
का म्हणून काय विचारता? तुम्हालाही ठाऊक आहे...
ही वाट फार डेंजर आहे...
या वाटेवर कधी पाय वळले, तर काहीतरी अजब गजब होऊ लागतं... दाढीमिशा गायब होतात, अंगावरचे कपडे बदलतात, निळं शर्ट आणि खाकी पँट असा गणवेश चढतो मनातल्या मनात. पाठीवरची `मोठ्ठय़ा माणसा'च्या कामांची-विवंचनांची ओझी उतरतात आणि एका अदृश्य दप्तराचंच ओझं चढतं... पहिल्या वळणावर आता चिकूचं झाड आहे की नाही ठाऊक नाही- पण मला मात्र ते स्पष्ट दिसतं- त्यावर लगडलेल्या भरघोस चिकूंसह. एक गल्ली ओलांडली की टण्णूचं झाड. टण्णू हे त्या परदेशी झाडाचं विचित्र फळ. केसरांच्या गोल घट्ट झुबक्यामुळे टेनिस बॉलसारखं दिसणारं. त्याला एक लांब दांडी. ते केसर काढून टाकले की सिनेमातल्या शेट्टी नामक नटाच्या टकलासारखं तुळतुळीत गोल गरगरीत टक्कल जोडलेली दांडी उरायची. तो टण्णू लक्ष नसताना कोणीतरी टण्णकन डोक्यात हाणायचा आणि डोळय़ातून पाणीच काढायचा.
इथपर्यंत पोहोचेस्तोवर मनाच्या डोळय़ांना आसपास सगळी शाळेची मुलंमुलीच दिसू लागतात. निळं शर्ट, खाकी चड्डी, गर्द निळा फ्रॉक आणि आत पांढरं शर्ट. कुणी एकटा. कुणी घोळक्यात. कुणी मस्त मजेत. कुणी बावरलेला. कुणी सायकलवर टांग टाकून. कुणी सायकल हातात घेऊन. कुणी आपल्या तंद्रीत. कुणी कुणाला शोधतोय... तिकडून येणारा मित्र आता भेटेल का? होमवर्कच्या वह्या कॉपी करायला वेळ मिळेल का? पुस्तकपेटीतलं पुस्तक बरोबर घेतलं का? काल ज्याचं नाव वर्गशिक्षकांना सांगितलं, तो टेंपरवारी शत्रू आज पट्टीने `हल्ला' चढवायला कुठे दबा तर धरून बसला नसेल ना? आपल्याला छान वाटणारी `ती' त्या घोळक्यात असेल का? आपल्याकडे पाहील का? पाहिलं तर हसेल का? एवढय़ाशा जिवाला एक ना अनेक उलघाली.
शाळेत पोहोचल्यानंतर तर हा मोठ्ठा दंगा. शाळेच्या आवारात निळा महासागरच खळाळतोय. प्राथमिकचे वर्ग सुटलेत. त्यांना घ्यायला आलेले पालक. इंग्लिश मिडियमची पोरं दडदडा धावत उतरतायत. त्यांच्याशी `लढाई' करत माध्यमिकची पोरं वर्गांत घुसतायत. घंटा वाजून रेकॉर्डवर `जनगणमन' सुरू होईपर्यंत नुसता हैदोसदुलाबेधुल्ला!
शाळेची वाट डेंजरस यासाठी की त्या वाटेवर गेलं की शाळा लोहचुंबकाप्रमाणे याही वयात खेचून घेईल, अशी भयंकर भीती वाटते... शाळेच्या फाटकाजवळ आलं की आत वर्गात जाऊन बसायची ऊर्मी अनावर होते. अजून असतील का ते बाक? दोन दोन जणांनी बसायचे. समोर पेनसाठी छोटीशी घळ आणि उताराचे डेस्क. खाली दप्तराचा कप्पा. त्या बाकांवर करकटानं काय काय कोरलेलं. कुणाचं नाव. कुणी चोर आहे. कुणी डँबिस. कुणा शिक्षकाचा पाणउतारा. कुठे कुठे बारीक अक्षरात कॉपी उतरवून ठेवलेली.
आपला बाकही ठरलेला आणि शेजारी बसणारा मित्रही.
आता तो कुठे आहे याचा पत्ता नाही, त्याला आपली खबर नाही. तोही येईल का वर्गात? आता कसा दिसत असेल? `ती' कशी दिसत असेल? घणघणघण घंटा वाजली की बाहेरच्या जगाशी संबंध संपला. आता आपण शाळेचे आणि शाळा आपली. हात जोडून प्रार्थनेला उभं राहिलं की शाळेतला दिवस सुरू. सगळय़ा वर्गांमध्ये एकाच वेळी सुरू झालेल्या प्रार्थनेच्या सुरांनी जणू संपूर्ण शाळेवर एक अभेद्य कवच तयार व्हायचं आणि आत असायचं आमचं सुरक्षित जग. इथे खेळायचं, बागडायचं, मजा करायची, मस्ती करायची, हे सगळं करता करता शिकायचं.
इतर शाळांचं आपल्याला काही ठाऊक नाही- माहिती करून घ्यायची गरजही पडली नाही. पण, आपल्या शाळेत घोकंपट्टीवाला अभ्यास कधीच कंपल्सरी नव्हता. एखाददुसरे शिक्षक होते कडकबिडक. पण, साक्षात वैद्य संरांसारखे हेडमास्तरच सांगायचे, ``माझ्याकडे एसेस्सीला बोर्डात येण्यासाठी खूप विद्यार्थी आहेत. पण, नाटय़वाचन, वक्तृत्व, नाटक, प्रसंगनाटय़दर्शन, विज्ञान प्रदर्शन या सगळय़ा उपक्रमांमध्ये शाळेचं नाव काढशील, अशी मुलं कमी आहेत. तुला हे सगळं येतं तर ते कर. कशाला दहावीला बोर्डात येण्याच्या फंदात पडतोयस. तुझा मार्ग वेगळा आहे. त्याच मार्गाने चाल.'' आता बोला.
अशा मुख्याध्यापकानं आणि त्याच्याच तालमीतल्या शिक्षकांनी भरलेल्या शाळेनं काय दिलं, हा प्रश्न फिजूल आहे. शाळेनं काय दिलं नाही, ते विचारा. शाळेनं दिलेलं नाही असं आयुष्यात काहीही नाही, असं उत्तर येईल हजारोंच्या मुखातून. आज जे काही आहे, ते शाळेनंच दिलंय.
दहा बाय बाराच्या मातीच्या भिंती आणि सारवलेली जमीन यांच्या ओबडधोबड घरांच्या अंधाऱया वाडय़ांमध्ये वाढलेल्या, शिक्षणाची परंपराही नसलेल्या फाटक्या तुटक्या धुवट कपडय़ांमधल्या पोरांना या शाळेनं मायेनं जवळ घेतलं, पोटाशी धरलं. पुरात घरं बुडाली तेव्हा राहायला आसरा दिला आणि पुढे कोणत्याही पुरात बुडू नयेत अशी भक्कम घरं बांधण्याचा आत्मविश्वासही. मागच्या बाकावरच्या पोरातही काही ना काही गुण असणारच असा विश्वास बाळगणारी ही शाळा. शाळेला उशीर होत असताना कंडक्टर आला नाही म्हणून स्वत: कंडक्टर बनून अख्खी बस शाळेपर्यंत विदाउट तिकीट आणणाऱया मुलाला तंबी देऊन नंतर त्याच्या हिंमतीचं कौतुक करणारी ही शाळा. अभ्यास करायचा, गृहपाठ करायचा, परीक्षा द्यायच्या, या चक्राच्या पलीकडे पोरं जे काही करू मागतील ते आनंदानं करू देणारी, त्यात सहभागी होणारी ही शाळा. कोणत्याही नव्या उपक्रमात उडी मारायला लावणारी, त्यात तोंडावर पडलो तरी पाठीवर कौतुकाचीच थाप मारणारी ही शाळा. माझ्या शाळेतल्या पोरांनी भेळेची गाडी टाकली तरी मला त्याचं कौतुकच असेल कारण तो सचोटीनं, स्वकष्टानं मिळवून खात असेल, असं अभिमानानं सांगणारी ही शाळा. कुठल्या कुठल्या परिसरातले दगडधोंडे गोळा करून त्यांना साफसूफ करून त्यांच्या मूर्ती घडवणारी ही शाळा.
कॉलेजबिलेज पुढचं फार काही लक्षात राहिलेलं नाही. त्यातलं जे काही लक्षात आहे ते शिक्षणबाह्य कारणांकरता.
लक्षात राहिली ती शाळाच. 
आमच्या नसानसांत भिनलेली.
कसोटीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची हिंमत देणारी.
जगाच्या बाजारू बुजबुजाटात ताठ मानेनं जगण्याची ताकद देणारी.
कधी कुठे एकटं पडल्यासारखं वाटलं तर पाठिशी सगळय़ा विद्यार्थ्यांचं अख्खं `अधिवेशन' घेऊन उभी राहणारी.
आता सांगा, कधीही कुठेही मनाचा संपूर्ण ताबा घेणारी अशी शाळा डेंजरस नाही का?
म्हणूनच आजही शाळेची वाट मी टाळतो... कटाक्षानं टाळतो...
त्याचा काही फायदा नाही, हे ठाऊक आहे...
ही वाट टाळली तरी अवचित कधी डोळे मिटल्यावर मनात ती वाट समोर येते आणि बोट धरून शाळेला नेते...
किती मोठे झालो, यानं काहीच फरक पडत नाही. माझी शाळा अशी सॉलिड आहे की अजूनही तिचं बोट सुटलेलं नाही... अख्ख्या आयुष्यात ते सोडायची इच्छाही नाही...

(पूर्व-प्रसिद्धी : आपटे हायस्कूल स्मरणिका)

Tuesday, March 12, 2013

न कथा क्र. 7 : उत्सवप्रिय


सिनेमात नट म्हणाला, ``बिहडमें तो बागी होते हैं, डकैत बैठते है पार्लमेंटमे...''
...आम्ही शिटय़ांचा कल्लोळ केला.
भरसभेत महानेता म्हणाला, ``संसदेत बसलेल्या भ्रष्ट निठल्ल्यांना गोळय़ा घातल्या पाहिजेत...''
...आम्ही टाळय़ांचा कडकडाट केला.
पत्रकार परिषदेत गृहमंत्री म्हणाले, ``संसदेवर हल्ला करणाऱयांच्या मास्टरमाइंडला आज आम्ही गुपचूप फाशी देऊन टाकले...''
आम्ही शिटय़ांचा जल्लोष केला, टाळय़ांचा कडकडाट केला, फटाके वाजवले, पेढेसुद्धा वाटले...

न कथा क्र. 8 : शांतता


``बास झाला गोंगाट तुमचा, शांततेने प्रवास करण्याचा आम्हाला हक्क आहे की नाही,'' त्याने लोकलमध्ये कर्कश्श केकाटणारा एकाचा चायना मोबाइल भांडून बंद करवला आणि हुश्श करून तो जागेवर बसला, तेव्हा समोरचे इयरफोनवाले काका त्याच्याकडे पाहून मिष्कील हसत होते. `तुमचं बरं आहे, कानाला इयरफोन लावले की सुटलात, पण, सगळय़ांना कर्कश्श आवाजावर कर्कश्श आवाजाचा उतारा नको असतो...' तो वैतागून काय बडबडला ते हातवाऱयांवरून काकांना कळलं.
त्यांनी इयरफोन काढले आणि त्याच्या हातात दिले. त्याने इयरफोन कानात घातले आणि चमकून म्हणाला, ``अहो, यात तर कसलाच आवाज नाही.''
``असेल कसा? मी हिमालयातून तासाभराची शांतता आणली आहे रेकॉर्ड करून. लोकलमध्ये तीच ऐकत बसतो. त्रास कमी होतो.''


Thursday, March 7, 2013

जाओ गोरख, मच्छिंदर तो ‘गया’!


चलो मच्छिंदर, गोरख आयाअशी हाक कधीतरी कानी येईल आणि आपल्याला स्त्रीराज्यातून बाहेर पडावं लागेल, असं ज्याच्या घरात स्त्रीराज्य प्रस्थापित झालेलं आहे, अशा प्रत्येक पुरुषाला वाटतं...

...या राज्यातली पहिली स्त्री म्हणजे बायको. ती प्रत्येक विषमलिंगी आकर्षण असलेल्या पुरुषाने केलीच पाहिजे, असा समाजाचा आग्रह असतो. तो स्वत:ला समाजपुरुष आणि समाजस्त्री समजणारे मित्र, नातेवाईक वगैरे वेळोवेळी करत असतात. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाने किंवा भावाने लग्न केल्यानंतर ज्यांच्या त्याच्यावरच्यास्वामिनीत्वहक्कांवर थेट टाच येणार असते, अशी आई आणि बहीण या मोहिमेत सर्वात जास्त आघाडीवर असतात. नंतर कौटुंबिक रणधुमाळीच्या प्रसंगीतुला हौसेने सून म्हणून घरात आणली हेच चुकलंअसे ज्वलज्जहाल उद्गार निघतात खरे; पण तोवर त्यांची धार आणि चूकदुरुस्तीची वेळ या दोन्ही गोष्टी निघून गेलेल्या असतात.


ज्याच्या घरात आई आणि बहीण किंवा बहिणी असं स्त्रीराज्य आधीपासूनच अस्तित्वात असतं, तो माणूसहीमालकीत बदल हाच त्यातल्या त्यात विरंगुळाम्हणून की काय, पण पत्नीनामाचा अदृश्य सिंदूर भांगात भरून घ्यायला तयार होतो. कथानायक हा निर्णय घेऊन संस्कृतिरक्षण आणि वंशसातत्य या दोन महान जबाबदार्या पार पडत असल्याने इथपर्यंत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया खुश होऊन विकट हास्य करत असतात. ते हास्य लुप्त होऊन त्यांचा चेहरा खर्रकन उतरतो, तो स्त्रीराज्यातला दुसरा मेंबर म्हणजे दुसरी मेंबरीण घरात अवतरते तेव्हा.

जुन्या पिढीतल्या लोकांचं एक बरं असतं. ते आपले थेट शब्दांत आपले जुनाट आणि बुरसटलेले विचार मांडतात, त्यामुळे त्यांच्याचसमोर ते कोळिष्टकासारखे झटकून तरी टाकता येतात. ‘आम्हाला पहिला नातूच हवा बरं काअसं अतीव कौतुकानं तोंडभरून हसून बोलून दाखवणार्या कोणाही काका-मामा-मावशीलातुमची ऑर्डर नोंदवून घेतलेली आहे, बघतो आता कसं जमतं ते,’ असं सांगून वाटेला लावता येतं. पण स्वत:ला आधुनिक म्हणवणारी मंडळी आडून आडून आपला कल काय आहे, याचा अंदाज घेऊन त्यानुसार शुभेच्छांची पुडी बांधायला घेतात. वर पुन्हाआजकालच्या जगात मुलगा काय, मुलगी काय, सारखेचअसंतुम्हाला मुलगी झालीच, तर असू द्या हा ॅडव्हान्स शोकसंदेशअशा थाटात   सांगतात, तेव्हा हे ठोंबे डोक्यात जातात. अरेच्या, माणसं कायआता एक मुलगाच घालतो जन्माला, मस्तपैकी गोरापान, बुद्धिमान आणि ताकदवानकिंवाएक गोड गोजिरी मुलगीच घालतो जन्मालाअसं ठरवून मुलांचा निर्णय घेतात का? आता बाळ हवं, एवढंच ठरलेलं असेल, तर उभयतांत काहीतरी दोष आहे, अशा नजरेने कशाला बघायचं? मुलगा हवा की मुलगी हवी, यातलं काहीतरी एक पक्कंच असायला हवं आणि ते एक काय हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे... मुलगा, मुलगा, मुलगा.

त्यामुळेच अर्धवट ग्लानीत असलेल्या नवप्रसूत मातेला डॉक्टरमुलगी झालीहे सहसा अशा गांभीर्याने सांगतात की ते पाहून हिंदी सिनेमातले उलटा स्टेथास्कोप लावलेले मख्ख चेहर्याचे बावळट डॉक्टर नायकाला सांगतात ना कीहमने बहुत कोशिश की लेकिन आपके बच्चे को बचा नहीं पाये’, त्याचीच आठवण होते. त्यात जरमुलगी झालीहे ऐकल्यावर नवप्रसूत मातेने तोंडात बोट घालून एक शिट्टीच मारली आनंदाची तर डॉक्टरीणबाई बेशुद्ध पडायच्याच बाकी राहतात आणि तिला चुकीचं ऐकू गेलं असावं अशा समजुतीनेमुलगी झालीये मुलगीअसं सांगतात. त्यानंतरही तिचा आनंद तसाच राहिला तरप्रसूतीच्या वेळी होतं असं कधी कधी, येईल भानावरअसं मानून डॉक्टरीणबाई मुलीच्या वडिलांना ही वार्ता सांगायला जातात. तो जर ही खबर ऐकून आनंदाने चित्कारला तर डॉक्टरीणबाई, मघाशी रहित केलेला, बेशुद्ध पडण्याचा बेत आता मात्र अमलात आणतातच. त्या तरी किती सहन करू शकतील?

मुलगी झाली होअशी द्वाही फिरवायला घेतल्यानंतर येणार्या प्रतिक्रिया तर फारच गमतीच्या असतात. अनेकांचे चेहरेअरेरे, इतकं करून तुमच्याकडे उंदराचं पिल्लूच आलं जन्माला!’ इतक्या वाईट भावांनी भरलेले असतात. थोडाफार पाचपोच असलेली मंडळीपहिली बेटी, धनाची पेटीअसं म्हणून वेळ मारून नेतात. जणू पैशाचं आमिष नसतं, तर बापाने लेकीचा गळाच घोटला असता. बहुसंख्या असते तीमुलगा काय, मुलगी काय, आजकालच्या काळात सारखीचअसं आतमध्ये उकळ्या फुटत असताना दु:खाने मान हलवत सांगणार्या गणंगांची.


खरा बाँब फुटतो तो स्त्रीराज्यात तिसरा मेंबर दाखल होतो तेव्हा. आधी मुळातदुसरा चान्सहाच अनेकांसाठी धार्ष्ट्याचा विषय. ज्या अर्थी तो घेतला आहे, त्या अर्थी हे लोक वेळ निघून जाण्याआधी वंशाचा दिवा पेटवून त्रिखंडात उजेड पाडायला सिद्धच झालेले आहेत, अशी अधिकृत समजूत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया करून घेतात. आता उघडपणेफाटला बरं का टरटरा तुमच्या स्त्रीधार्जिण्या पुरोगामित्वाचा बुरखाअसा कुत्सित चेहरा करूनकाळजी करू नका, या वेळी मुलगाच होईलअसा खवचट आशीर्वाद दिला जातो. घरात मुलगा आणि मुलगी असे दोन्ही असले कीबॅलन्सराहतो, असं एक संशोधनही गंभीर चेहर्याने ऐकवलं जातं. ‘आम्हाला दोन वेण्या घातलेल्या दोन पर्याच हव्या होत्याकिंवाआता ताईला भाऊ हवायापैकी काय तो एक संवाद निवडा, असा या मंडळींचा आग्रह असतो. दुसरं मूल हेहीजे होईल ते आपलंइतक्या स्वच्छपणे आणि आनंदाने स्वीकारता येतं, यावर कुणाचाच विश्वास बसलेला दिसत नाही.

दुसरीही जेव्हा मुलगीच होते, तेव्हा डॉक्टरीणबाई, आपल्या हातून असं कसं घडलं, अशा पश्चात्तापदग्ध चेहर्यानेधरणीमातेने आपल्याला पोटात घेतलं तर बरंअशा कावर्याबावर्या होत्सात्या ही वार्ता बाबांच्या कानावर घालतात. कडेवर घेतलेल्या बालिकेला टाळी देऊन दोन्ही बापलेक जेव्हाबेबी झालीम्हणून खुश होतात, तेव्हा डॉक्टरीणबाई व्यवसाय बदलून दुपटी शिवण्याचा कारखाना टाकावा काय, याचा विचार करू लागल्याचं स्पष्ट दिसतं. समाजपुरुष आणि समाजस्त्री यांचा तर इतका विरस होतो की त्यांना काय बोलावं हेच सुचत नाही. त्यात दोन मुलींची आई आणि बाप हे दोघेही खरोखरचे खुश दिसत असले, तर कलियुग कलियुग म्हणतात ते हेच, याची त्यांना खात्री पटते. असं चौकोनी कुटुंब दिसलं की हेच तोंड लपवू लागतात. हे हतभागी समाजपुरुषा आणि गे कन्यासुखवंचित समाजस्त्रिये, रडण्याच्या श्रमांनी क्लांत झालेली छोटी कन्या बाबाच्या गुबगुबीत हातावर गाल टेकवून आणि गादीसारख्या गरगरीत पोटावर विसावलेली आहे आणि त्याच वेळी कानाशी चिमणीसारखी चिवचिवत मोठी कन्या त्याला 1171 व्या वेळेलाछोटा भीमची साडेतीन ओळींची गोष्ट रंगवून रंगवून साभिनय सांगते आहे, या दृश्यातली गोडी तुम्हाला कुठून कळणार?
जाओ गोरख, या जन्मात तरी मच्छिंदर तोगया’!

पूर्व-प्रसिद्धी : मधुरिमा, दिव्य मराठी 
(महिला दिन विशेष, ८ मार्च २०१३ )