Wednesday, May 18, 2011

घाऊक ‘श्रद्धाप्रामाण्य’

रामजन्मभूमी प्रकरणी अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने तिथली जमीन तीन भावंडांत वाटून देण्याचा निकाल दिला, तेव्हा तो अनेकांना चतुर, व्यावहारिक आणि अपरिहार्य वाटला होता. निकाल देणा-या तिन्ही न्यायाधिशांची तोंडं तीन दिशांना होती आणि त्यातले एक तर थेट हिंदू पार्टीचे धादांत पक्षपाती होते, हे स्पष्टपणे दिसत असूनही या निकालाने तीन धर्माना सलोख्याने राहण्याचा संदेशच दिल्याचा साक्षात्कारही अनेकांना झाला होता. अयोध्येतला मूळ दावा जमिनीच्या वाटणीसाठी नव्हता, ती कुणीच मागितली नव्हती, ही गोष्ट तेव्हाच्या, ‘बरं झालं, एकदाची कटकट संपलीपद्धतीच्या, सुस्का-यांमध्ये विरून गेली होती. यथावकाश या निकालाचा निकाललागला. आपल्या वाटणीला किती जमीन आली, यापेक्षा इतरांना किती मिळाली, यातच भारतीय भावंडांना अधिक रस असतो आणि त्यावरच सर्वात मोठा आक्षेपही असतो. तसा तो या भावंडांनाही होताच. साहजिकच सर्व भावंडांनी भ्रातृभाव त्वरेनं गुंडाळून ठेवून त्या निकालाला आव्हान दिलं. या तथाकथित समजूतदारनिकालाची संपूर्ण कल्हई सर्वोच्च न्यायालयाने आता काढली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विचित्रठरवून निकाली काढल्यामुळे अनेक समाजहितचिंतकांना हळहळ वाटते आहे. आता या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा निघण्याचा मार्ग बंद झाला, असं त्यांना वाटतं. एखादा दावा न्यायालयात कधी येतो? त्यावर सामंजस्याने तोडगा निघण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर. एकदा तो न्यायालयात आला की, त्यावर कायद्याच्या चौकटीत न्याय झाला पाहिजे आणि त्या तयारीनं न्यायालयात आलेल्या प्रत्येकानं तो स्वीकारला पाहिजे. न्यायालयात आल्यावर सामंजस्याने तडजोडीच्या बाता कशाला मारायच्या? ‘न्यायका नाही स्वीकारायचा?
 
भारतीय मानसिकतेची खरी गोची इथेच होते. कारण, कायद्याचं राज्य ही संकल्पना आपल्या संस्कृतीतून उमललेली नाही, ती उसनी घेतलेली आहे, ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत लादलेलीच आहे. त्यामुळे आपल्या रक्तात ना कायद्याचा धाक आहे, ना त्याबद्दल आदर, त्याच्या पालनाची कर्तव्यकठोरता तर दूरच राहिली. इथला जो-तो सतत कायद्याला डावं घालूनपुढे कसं जाता येईल, याचा जुगाड करण्यात मग्न! त्यामुळे, न्याय या शब्दाची आपल्यासाठीची व्याख्या फार सोपी आहे- न्याय म्हणजे आपल्या बाजूने लागलेला निकाल. अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं कोणत्याही एका पक्षाच्या बाजूनं निकाल दिला असता, तर तो त्या पक्षाच्या दृष्टीनं न्याय झाला असता आणि इतर पक्षांसाठी अन्याय. कोणाच्याही बाजूने निकाल लागणं हा न्यायअसतो, हे पचनी पडण्याइतकी परिपक्वता इथं नाही.
 
म्हणूनच तर अलाहाबादच्या न्यायाधिशांनी एकसमयावच्छेदेकरून सगळ्यांना थोडं थोडं खूष आणि थोडं थोडं नाखूषही करणारा सबगोलंकारी निकाल देऊन सुटका करून घेतली होती. त्या निकालातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती श्रद्धाही गोष्ट न्यायासाठी विचारात घेण्याची. वादग्रस्त भूमीत राम जन्मला होता अशी बहुसंख्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे ते गृहीत धरून चालूयात, असा महाघातकी उपक्रम त्या न्यायाधिशांनी केला होता (त्यामुळेच तिथे राम जन्मल्याचं न्यायालयानं मान्य केलं, अशा गैरअर्थ काढणा-या हेडलायनी हिंदुस्थानीदैनिकांत झळकल्या.) मुळात अमुक एक बहुसंख्यांची श्रद्धा आहे, अशी (किमान न्यायालयाकडे तरी) माहितीअसायला हवी, तिला आकडेवारीची जोड असायला हवी. या देशात श्रद्धाळूंचा भरणा अधिक, त्यामुळे सर्वाची ती श्रद्धा असणारच, ही न्यायालयाची श्रद्धाच होती- माहिती नव्हे. बरं, जिथं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, ज्या संदर्भात खटला उभा राहिला आहे, त्या संदर्भात निकाल देणं अपेक्षित आहे- त्या न्यायालयात कोणाची काय श्रद्धा आहे, याची उठाठेव कशाला? बरं वादापुरतं हेही मान्य केलं की बहुसंख्यांची असेल बुवा श्रद्धा की इथंच बाळरामाने पहिला टय़ँहँकेला, तर त्याने तरी काय साध्य होणार? न्यायासाठी पुरावा लागतो, श्रद्धा नव्हे. साक्षात न्यायालयांनी इतक्या ढोबळपणाने चालायचं ठरवलं तर बहुसंख्य भारतीयांची श्रद्धा भूत असतंअशी निघेल, मग ती श्रद्धा गृहीत धरून जागोजागच्या बंगाली बाबांना रीतसर शिक्षणसंस्था काढून डॉक्टरांसारखी अधिकृतपणे एमईपीएस (मास्टर ऑफ इव्हिल प्रॅक्टिसेस अँड सायन्सेस) प्रमाणपत्रं द्यावी लागतील.
 
बरं श्रद्धेच्या बाबतीत बहुसंख्येचा- आधुनिक लोकशाहीतून आलेला- कौल प्रमाण मानायचं कारण काय? श्रद्धा अल्पसंख्यांचीही असू शकते. ती तेवढीच प्रखरही असू शकते. उदाहरणार्थ, राम-कृष्ण या लोकप्रिय महाकाव्यांमधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा आहेत, इतिहासातली हाडामांसाची माणसं नव्हेत आणि देव तर नाहीतच नाहीत, ही कोणाची श्रद्धा असेल.. मग ही श्रद्धा बहुसंख्यांच्या श्रद्धेच्या विपरीत आहे, हे काही तिला नाकारण्याचं कारण असू शकत नाही. कारण श्रद्धेला पुरावा नसतो आणि त्यामुळेच कोणत्या श्रद्धेच्या बाजूला किती जण आहेत, असं संख्येचं मोजमाप तिला लावता येत नाही.
 
एकदा घाऊक प्रमाणात श्रद्धाप्रामाण्य स्वीकारलं की या सगळ्या गोच्या सुरू होतात..
 
..कारण श्रद्धा म्हणजे आळस.. विचार करण्याचा आळस.. चिकित्सा करण्याचा आळस.. प्रश्न विचारण्याचा आळस.. प्रश्न पाडून घेण्याचा आळस..
 
..आपण सारी भावंडं श्रद्धाप्रामाण्यवादी आहोत, यात आश्चर्य नाही आणि द्रौपदी असो, रामजन्मभूमी असो की सातबा-यावरची शेतजमीन- ती वाटूनच घेण्याची पाळी आपल्यावर येते, यातही काही आश्चर्य नाही.

(प्रहार, १५ मे, २०११)

No comments:

Post a Comment